वर्गीकरणाच्या नावाखाली वाद निर्माण केले जात आहेत – ॲड. जयदेव गायकवाड
पिंपरी, पुणे (दि. २९ जून २०२६) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संसदेच्या सभागृहावर मोठे प्रभुत्व निर्माण केले होते, ते प्रज्ञा आणि ज्ञानामुळे. या देशाच्या सर्व समाजाची पुनर्रचना करण्याचे काम डॉ. आंबेडकरांनी केले. ज्ञान आणि शिक्षणाचे महत्व २०० वर्षांपूर्वी महात्मा जोतीराव फुले यांनी सांगितले. मुक्ता साळवे सारखी महिला ज्ञानामुळेच ब्रिटिशांशी लढली. आपण जातींच्या पलीकडे विचार केला पाहिजे. या देशाला राष्ट्र म्हणून निर्माण करताना समतेचे तत्व अंगीकारून पहिल्या जाती नष्ट केल्या पाहिजेत. यामुळेच विषमता नष्ट होईल. सध्या मात्र मागासवर्गीयांच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या नावाखाली जाती जातींमध्ये वाद निर्माण केले जात आहेत. बहुतांश समाजाचा याला विरोध असताना सर्वोच्च न्यायालयाच्या जजमेंटच्या आधारे क्रिमिलेयरची अट लादण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. यामुळे मागासवर्गीय समाजामध्ये वाद निर्माण होऊन फूट पडेल. याला आरक्षण उप वर्गीकरण परिषदेचा विरोध आहे असे स्पष्ट मत माजी आमदार व जेष्ठ नेते ॲड. जयदेव गायकवाड यांनी व्यक्त केले.
चिंचवड येथे आयोजित केलेल्या आरक्षण उप वर्गीकरण विरोधी परिषदेत ॲड. गायकवाड बोलत होते. यावेळी नगरसेवक डॉ. सुहास कांबळे, ज्येष्ठ नेते मानव कांबळे, ॲड. विवेक भाई चव्हाण (कोब्रा), वसंत दादा साळवी, ॲड. अंबादास बनसोडे, प्रा. केशव वाघमारे, बाळासाहेब भागवत, देवेंद्र तायडे, कपिल सरोदे, ॲड. अरविंद तायडे, विवेक बनसोडे, सुरेश निकाळजे, बापू गायकवाड आदींनी या कार्यक्रमात सहभागी होऊन मार्गदर्शन केले.
मुख्य आयोजक म्हणून ईश्वर कांबळे, ॲड. मिलिंद कांबळे, राहुल सोनवणे, ईश्वर कांबळे, नितीन कांबळे, प्रकाश बुक्तर, विनोद सरोदे, ॲड. नीलध्वज माने, प्रमोद क्षीरसागर, सुरेश गायकवाड, विकास साळवे यांनी सहभाग घेतला होता.
ॲड. जयदेव गायकवाड यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिताना ‘बॅकवर्ड’ (मागासलेला समाज) या शब्दाची व्याख्या केलेली नाही. का तर प्रत्येक राज्यात वेग वेगळा समाज बॅकवर्ड असू शकतो, त्यांना बॅकवर्ड ठरवणे हा त्या त्या राज्य सरकारचा अधिकार आहे. महाराष्ट्रात ५९ जाती बॅकवर्ड आहेत इतर राज्यात हा आकडा व जाती वेग वेगळ्या असतील. केवळ एका जातीच्या मागणीवरून आरक्षणाचे उपवर्गीकरण करणे याला आमचा तीव्र विरोध असल्याचे ॲड. जयदेव गायकवाड यांनी सांगितले.

