- बुद्ध जयंतीनिमित्त माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका नंदिनी धेंडे यांच्या वतीने आयोजन
पुणे । प्रतिनिधी
सोनियाची उगवली सकाळ, जन्मास आले भीमराव..छाती ठोकू हे सांगू जगाला, असा विद्वान होणार नाही..साऱ्या विश्वाला बुद्ध हवा..लाखात एकच खरा भीमराव कोहिनूर हिरा यासह भीमगीतांचा सुरेख कार्यक्रम येरवडा परिसरात रंगला.
तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त येरवडा परिसरातील समतानगर येथे आयोजित करण्यात आलेली ‘धम्म संध्या’ कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात पार पडला. पुणे महापालिका प्रभाग क्रमांक दोन मधील समतानगर येथील लुंबिनी उद्यानात झालेल्या या कार्यक्रमाला पूजनीय भिक्खू संघ, श्रामणेर तसेच वडगावशेरी मतदार संघातील विविध मान्यवर, सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे आयोजन माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका नंदिनी धेंडे आणि यांच्या मार्गदर्शनाखाली यश फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने करण्यात आले होते.
‘भीमगीतांची सुरेल संध्या’ या संकल्पनेतून साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमात गौतम बुद्ध जन्मोत्सव सोहळ्याचे औचित्य साधत प्रबोधनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमात आमदार बापूसाहेब पठारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तथा माजी आमदार सुनील टिंगरे, नगरसेवक सुहास टिंगरे, नगरसेविका नंदिनी धेंडे, हर्षद जाधव, वृषाली रणधीर, किशोर भोंडे आदी उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.

बाट माझी बघतोय रिक्षावाला’, ‘ही पोळी साजूक तुपातली’, ‘ओ नाखवा मला बोटीन फिरवाल का’ या गाण्याची फेम पार्श्वगायिका रेश्मा सोनावणे यांनी ‘गाणी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. तसेच ‘सुर नवा ध्यास नवा’ आणि ‘संगीत सम्राट’ या कार्यक्रमांमधून परिचित असलेले पार्श्वगायक रविंद्र खोमणे यांनीही आपल्या गायनाने वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमाचे सादरीकरण चंद्रकांत चव्हाण यांनी केले.
या कार्यक्रमासाठी त्रिरत्न संघ, भदंत आनंद मंडळ, तक्षशिला महिला मंडळ, धम्म ज्योती संघटना, सुजाता महिला मंडळ तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कृती समिती यांचे सहकार्य लाभले.
बाबासाहेब होते म्हणून सामाजिक चळवळी उभ्या राहत आहेत. त्यांचे कार्य भीम गीतातून पुढे आणले जात आहे हे महत्वाचे. बाबासाहेबांनी संविधान दिल्याने देश गुण्या गोविंदाने जगत आहे. या प्रभागात होणाऱ्या त्रिरत्न विहाराला आणखीन आवश्यक ती मदत करून हे विहार ऐतिहासिक बनवू.
- बापूसाहेब पठारे, आमदार, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ.
गेल्या अनेक वर्षांपासून या प्रभागात मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होतो. प्रभाग क्रमांक दोन मध्ये सर्व जाती धर्मातील लोक राहतात. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून या लोकांशी हितगुज सध्या येत हे महत्वाचे आहे. असे कार्यक्रम होणे गरजेचे आहे.
- सुनील टिंगरे, माजी आमदार तथा अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस.
प्रभाग क्रमांक दोनला आंबेडकरी चळवळीचा मोठा वारसा आहे. ही चळवळ सामाजिक क्रांतीला जन्म घालते. सर्व जण सन्मानाने उभे आहेत त्याचे श्रेय बाबासाहेबांना जाते. त्यामुळे थोर पुरुषांचे
- वृषाली रणधीर, प्राचार्या, वाडिया महाविद्यालय.

