Home Blog Page 653

टीसीएसला फॉर्च्युन®ने २०२५ च्या जगातील सर्वात प्रशंसनीय कंपन्यांमध्ये सामील केले

नावीन्यग्राहककेंद्री दृष्टिकोन आणि लोकांना प्राथमिकता देण्याच्या संस्कृतीप्रती बांधिलकीने वेगाने विकसित होत असलेल्या व्यावसायिक वातावरणामध्ये टीसीएसचे नेतृत्व मजबूत केले आहे

न्यूयॉर्क/मुंबई, १८ फेब्रुवारी २०२५: माहिती तंत्रज्ञान सेवा, कन्सल्टिंग आणि व्यावसायिक उपाययोजनांमध्ये जागतिक स्तरावर आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला (TCS) (BSE: 532540, NSE: TCS) फॉर्च्युन® मॅगझीनच्या २०२५ च्या जगातील सर्वात प्रशंसनीय कंपन्यांच्याTM यादीमध्ये स्थान दिले आहे. हे यश टीसीएसच्या ग्राहक-केंद्री नावीन्यामार्फत दीर्घकालीन मूल्य प्रदान करण्याची, लोकांना प्राथमिकता देणाऱ्या प्रभावी संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची आणि आपल्या एआय व नेक्स्ट-जेन क्षमता वाढवण्याची क्षमता अधोरेखित करते.

कॉर्पोरेट प्रतिष्ठेतील एक मापदंड मानली जाणारी, फॉर्च्युन®ची जगातील सर्वात प्रशंसनीय कंपन्यांचीTM यादी पात्र कंपन्यांच्या ३३०० पेक्षा जास्त वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या, संचालकांच्या व आर्थिक विश्लेषकांच्या सर्वसमावेशक सर्वेक्षणावर आधारित आहे. त्यासाठी उद्योगक्षेत्रातील ६५० कंपन्यांचे मूल्यांकन करण्यात आले आहे. दोन दशकांहून जास्त काळापासून फॉर्च्युनने वार्षिक रँकिंग संकलित करण्यासाठी जागतिक ऑर्गनायझेशनल कन्सल्टिंग फर्म कॉर्न फेरीसोबत हातमिळवणी केली आहे. संघटनांचे मूल्यांकन नावीन्य, जागतिक स्तरावर व्यापार करण्याची क्षमता, प्रतिभा आकर्षित करण्याची, विकसित करण्याची व कायम राखण्याची क्षमता तसेच समुदाय व पर्यावरणाप्रती जबाबदारीचे पालन या निकषांच्या आधारे केले जाते.

फॉर्च्युनच्या मुख्य संपादक एलिसन शोंटेल म्हणाल्या, “फॉर्च्युनच्या यावर्षीच्या जगातील सर्वात प्रशंसनीय कंपन्यांच्या यादीमध्ये सामील करण्यात आलेल्या सर्व कंपन्यांचा आम्हाला अभिमान आहे. हे यश संपादन करण्याची त्यांची क्षमता खरोखरीच प्रभावी आहे. आव्हानात्मक जागतिक व्यवसाय वातावरणामध्ये देखील उच्च मानके, लवचिकता आणि दूरदर्शीपणाचे हे प्रमाण आहे.”

हे यश मिळवून देणारा एक प्रमुख घटक टीसीएस पेसइनोवेशन इकोसिस्टिम आहे. यामध्ये टीसीएसची अनोखी कार्यप्रणाली, जागतिक अंतर्दृष्टी, संशोधन, बौद्धिक प्रतिभा आणि को-इनोवेशन नेटवर्क TM(COIN™)चा उपयोग केला जातो. हे नेटवर्क नेक्स्ट-जनरेशन उपाययोजना विकसित करण्यासाठी ग्राहक, सहयोगी, स्टार्टअप आणि शिक्षणतज्ञ यांना एकत्र आणते. लंडन, पॅरिस आणि स्टॉकहोममध्ये टीसीएस पेस पोर्टकेंद्रांचा विस्तार, सुविधांची संख्या १२ पर्यंत वाढवणे, या गोष्टी सहयोगी दृष्टिकोन अजून मजबूत करतात, एआय, रोबोटिक्स आणि नवनवीन तंत्रज्ञानामध्ये यशाला गती प्रदान करतात.

टीसीएसचे उत्तर अमेरिकेचे अध्यक्ष श्री अमित बजाज यांनी सांगितले, “हे स्थान नावीन्य आणि ग्राहक-केंद्री दृष्टिकोन, अव्वल प्रतिभांना आकर्षित करून स्वतःकडे कायम ठेवण्याची क्षमता, आमच्या ग्राहकांसाठी उच्च मूल्य असलेले व्यावसायिक परिवर्तन सक्षम करण्याचा सिद्ध ट्रॅक रेकॉर्ड यांच्याप्रती टीसीएसची बांधिलकी अधोरेखित करते. व्यवसायांना सातत्याने अडीअडचणींचा सामना करावा लागतो, आम्ही त्यांना एक अनुकूलित उद्यम बनण्यासाठी सक्षम बनवतो, त्यामुळे त्यांना दीर्घकालीन विकास व लवचिकता आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात मदत मिळते.”

डिजिटल नावीन्याच्या पलीकडे जाऊन, टीसीएस डिजिटल ट्विन तंत्रज्ञानासारख्या उपक्रमांमार्फत सस्टेनेबिलिटीला पुढे नेते, ज्यामुळे औद्योगिक व वाणिज्यिक संचालनामध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्यात मदत मिळते. जगातील पहिले हायड्रोजन-चालित विमान इंजिन विकसित करण्यासाठी रोल्स-रॉयससोबत त्यांची भागीदारी अधिक शाश्वत भविष्य तयार करण्याप्रती त्यांची बांधिलकी मजबूत करते.

तंत्रज्ञानामध्ये अतिशय वेगाने होत असलेले बदल, पुरवठा शृंखलेमध्ये क्रांती, ग्राहकांच्या अपेक्षांमध्ये होत असलेली वाढ अशा सध्याच्या काळात व्यवसायांना कायम आघाडीवर राहण्यासाठी सातत्याने नावीन्य व अनुकूलन करणे आवश्यक आहे. टीसीएस या गुंतागुंतीतून बाहेर पडून पुढे जाण्यासाठी आघाडीच्या व्यवसायांसोबत सहयोग करते, विकास आणि लवचिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी एआय, क्लाऊड, सायबर सुरक्षा, स्वयंचालन आणि प्रगत कम्प्युटिंगमध्ये अत्याधुनिक डिजिटल उपाययोजनांचा लाभ घेते. आपल्या अनेक ग्राहकांसोबत फॉर्च्युनच्या यादीमध्ये मिळालेले स्थान, व्यवसाय परिवर्तनासाठी एक धोरणात्मक प्रवर्तक म्हणून टीसीएसची भूमिका अधोरेखित करते. 

टीसीएसला फॉर्च्युनच्या यादीमध्ये मिळालेले स्थान लोकांना प्राथमिकता देण्याची त्यांची बांधिलकी दर्शवते. लोकांच्या आचरणातील उत्कृष्टतेसंदर्भात काम करणारे जागतिक प्राधिकरण, टॉप एम्प्लॉयर्स इन्स्टिट्यूटने यावर्षी टीसीएसला त्यांचे एंटरप्राइज-वाईड टॉप एम्प्लॉयर सर्टिफिकेशन दिले, हे टीसीएससाठी एक खूप मोठे यश आहे. सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये कामाच्या ठिकाणच्या प्रथांमध्ये सातत्यपूर्ण उत्कृष्टता प्रदर्शित करणाऱ्या, निवडक संघटनांना हा प्रतिष्ठित सन्मान दिला जातो. याखेरीज टीसीएसला २०२५ साठी ग्लोबल टॉप एम्प्लॉयर म्हणून मानांकन देण्यात आले. हा मजबूत पाया टीसीएसला आघाडीच्या प्रतिभा आकर्षित करण्यात व त्या कायम राखण्यात सक्षम बनवतो, हे सुनिश्चित करतो की, त्यांचे मनुष्यबळ नावीन्य व व्यावसायिक यशाचे प्रमुख चालक बनेल. टीसीएस आपल्या कर्मचाऱ्यांच्या समाधानावर खूप भर देते आणि कौशल्यवृद्धी उपक्रमांमार्फत एआयसाठी सज्ज मनुष्यबळ तयार करण्यासाठी वचनबद्ध आहे.

आयटी सेवांमध्ये टीसीएसच्या नेतृत्वाला उद्योग विश्लेषकांनी आणि बाजारपेठ रँकिंगने सातत्याने मान्यता दिली आहे. या वर्षीच्या सुरुवातीला ब्रँड फायनान्सच्या २०२५ आयटी सेवा रँकिंगनुसार, कंपनीचे ब्रँड मूल्य २० बिलियन डॉलर्सच्या पुढे पोचले. हे यश मिळवणारी टीसीएस ही दुसरी जागतिक आयटी सेवा कंपनी बनली आहे.

राग प्रहरांच्या संकल्पनांपासून मुक्त:डॉ. प्रभा अत्रे यांच्या संकल्पनेवर आधारित संगीतोत्सव

‌‘रागप्रभा संगीतोत्सवा‌’चे डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनतर्फे 2 मार्चला आयोजन
पुणे : राग प्रहरांच्या कालबाह्य संकल्पनांपासून मुक्त ‌‘रागप्रभा संगीतोत्सवा‌’चे डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनतर्फे रविवार, दि. 2 मार्च 2025 रोजी पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. भारतीय अभिजात शास्त्रीय संगीत सादरीकरणाला राग-समयाचे बंधन नको या स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या संकल्पनेवर आधारित गायन-वादनाचा हा पहिला संगीत महोत्सव आहे.
भारतीय अभिजात शास्त्रीय संगीतातील रागांचे समय प्रहरानुसार सादरीकरण करायचे झाल्यास ज्या प्रहरात सांगीतिक कार्यक्रम आयोजित केले जात नाहीत ते राग विस्मरणात जाण्याची शक्यता आहे. तसेच मिश्र रागांचे सादरीकरण होणे शक्य नाही. यातून पर्यायाने भारतीय संगीत क्षेत्राचे आणि कलाकाराचे नुकसानच होईल. अशा परिस्थितीत कोणत्याही रागाचे कोणत्याही वेळी उत्तम प्रस्तुतीकरण होऊन तो रोग त्याच्या पूर्ण सौंदर्यासह खुलविला जाऊ शकतो, अशी धारणा डॉ. प्रभा अत्रे यांची आहे. या संकल्पनेला अनुरसरून हा महोत्सव आयोजित केला असल्याचे डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनच्या सचिव डॉ. भारती एम. डी. आणि कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.
संगीतोत्सव दि. 2 मार्च रोजी सकाळी 8 ते रात्री 9:30 या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या सत्राची सुरुवात पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाने होणार आहे. त्यानंतर पंडित उदय भवाळकर, पंडिता पद्मा तळवलकर, पंडित राम देशपांडे, पंडित राजा काळे यांचे गायन होणार आहे.
दुसऱ्या सत्राची सुरुवात दुपारी 4 वाजता होणार असून सुरुवातीस ताकाहिरो अकाई यांचे संतूर वादन होणार आहे. त्यानंतर पंडित श्रीनिवास जोशी, पंडित विनायक तोरवी, पंडिता अलका देव-मारुलकर, पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर यांचे गायन होणार आहे.
कलाकारांना पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर, पंडित योगेश समसी, पंडित अरविंदकुमार आझाद, भरत कामत, ऋषिकेश जगताप, प्रशांत पांडव, अजिंक्य जोशी (तबला), चैतन्य कुंटे, सुयोग कुंडलकर, मिलिंद कुलकर्णी, अविनाश दिघे, राहुल गोळे (संवादिनी), मृणाल उपाध्याय, प्रताप आव्हाड (पखवाज) साथसंगत करणार आहेत.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

थेरगाव येथील अन्‍यायग्रस्‍त दलित कुटुंबाची फिर्याद दाखल होणार

  • वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे बाबा कांबळे यांना आश्‍वासन
    -अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर बाबा कांबळे यांचे आत्मक्लेष सत्याग्रह आंदोलन स्थगित

पिंपरी ! प्रतिनिधी
थेरगाव येथील पिडित असलेल्‍या दलित कुटुंबियांची फिर्याद दाखल करण्याचे आश्‍वासन पिंपरी-चिंचवड पोलिस प्रशासनातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहे. कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्‍याशी झालेल्‍या चर्चेनंतर हे आश्‍वासन देण्यात आले. तसेच बाबा कांबळे यांच्‍या मागण्यांवर लवकर कार्यवाही केली जाईल, असेही आश्‍वासन दिले. त्‍यामुळे आत्‍मक्‍लेश सत्‍याग्रह आंदोलन स्‍थगित करत असल्‍याची माहिती बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिली.

सोमवारी (दिनांक १७) आज पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्‍या बैठकीत बाबा कांबळे यांच्‍या मागण्यांबाबत सविस्‍तर चर्चा करण्यात आली. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, पिंपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, आदी वरिष्ठ पोलीस अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.या वेळी हा निर्णय घेण्यात आला.

थेरगाव येथील कुटुंबावर पाणी पुरवठा तोडून अन्‍याय केला आहे. त्‍यासाठी ते कुटुंब मुंबईपर्यंत चालत जाऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत आपली कैफियत मांडणार आहेत. हे सर्व प्रकरण दुर्देवी असल्‍याचे सांगत या बाबत आंदोलन करणार असल्‍याचा इशारा कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांनी दिला होता. शहरात कायदा व सुव्यवस्‍थेचा बोजवारा उडाला असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. त्‍यांच्‍या इशाऱ्यानंतर पोलिस प्रशासनाने त्‍वरीत पाऊले उचलली आहेत.

दलित कुटुंबावरील अन्‍याय. सावकारी त्रासावरून झालेल्‍या आत्‍महत्‍या या सर्व प्रकरणाचे एसीपी दर्जाच्‍या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार आहे. सध्या मुंबई येथे पायी चालत गेलेल्या दलित कुटुंबाची फिर्याद घेण्यास पोलीसांनी सकारात्‍मकता दाखवली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 विशाल गायकवाड व सहाय्यक पोलीस आयुक्त कुराडे साहेब यांनी मुंबई आझाद मैदान येथे महिला पोलिस कर्मचारी पाठवण्यात आले आहेत. पीडित दलित कुटुंबाची फिर्याद घेण्यात येणार आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मार्फत चौकशी केली जाईल, अशी माहिती बाबा कांबळे यांनी बैठकीनंतर दिली.
या सर्व बैठकीनंतर सर्व मागण्यांबाबत सकारात्‍मक तोडगा काढण्याचे आश्‍वासन मिळाले आहे. त्‍यामुळे आत्‍मक्‍लेश सत्‍याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. प्रत्येक शनिवारी तक्रार अर्ज संदर्भामध्ये तक्रार निवारणासाठी जनता दरबार घेण्यात येतो याबाबत सर्वसामान्य माणसांना अधिक जागरूकता व्हावी यासाठी याबाबतची प्रसिद्धी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाच्‍या वतीने करण्यात येणार आहे. हे आंदोलनाचे यश आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने दिलेले आश्वासन पुढील 15 दिवसात पूर्ण न केल्यास शहरांमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असे देखील यावेळी बाबा कांबळे म्हणाले

  • बाबा कांबळे, अध्यक्ष, कष्टकरी कामगार पंचायत, महाराष्ट्र राज्‍य.

टोकियो येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन आणि शिव स्वराज्य यात्रेचा समारोप

पुणे : शिवरायांच्या भव्य प्रतिकृतीवर होणारा पुष्पवर्षाव…पारंपरिक पद्धतीने काढलेली मिरवणूक… रॉयल एनफिल्ड वर स्वार होऊन बाईकर्सने शिवरायांना दिलेली मानवंदना…शिव शंकराचा तू अवतार हाती घेउनी भवानी तलवार नर राक्षसांचा करुणी संहार धरणी मातेचा तू केला उद्धार ही आरती म्हणत महिलांनी शेकडो दिव्यांनी केलेली शिवरायांची आरती आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत जल्लोषपूर्ण वातावरणात शेकडो पुणेकरांच्या उपस्थित शिव स्वराज्य यात्रेचा समारोप आणि शिव पूजन सोहळा रंगला.

आम्ही पुणेकर संस्थेच्या वतीने टोकियो येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन आणि भारतातील १३ राज्यातून सुमारे ८ हजार किलोमीटरचा प्रवास केलेल्या शिव स्वराज्य यात्रेचा समारोप गणेश कला क्रीडा मंच येथे झाला. यावेळी एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, आम्ही पुणेकर संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव उपस्थित होते.

पांडुरंग बलकवडे म्हणाले, आजचा कार्यक्रम हा भारत देशासाठी हा एक सुवर्णक्षण आहे. संपूर्ण जगासाठी एक स्वातंत्र्यदेवता म्हणून शिवाजी महाराज यांचे महत्त्व आहे. आज कोणत्याही लोकशाही राष्ट्रासाठी हा युगपुरुष प्रेरणादायी आहे. जगभरात त्यांचे स्मारक निर्माण झाले पाहिजे. सामर्थ्य हे दीनदुबळ्यांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी असले पाहिजे हे शिवरायांनी सांगितले. जगाला आदर्शवादाकडे नेणारे शिवराय आवश्यक आहेत.

प्रदीप रावत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज केवळ महाराष्ट्राचे नाहीत तर ते राष्ट्रपुरुष आहेत. छत्रपती महाराज झाले नसते तर ज्ञानोबा माऊली पासून तुकाराम महाराज पर्यंत संतांनी निर्माण केलेला सहिष्णू परंपरा असलेला समाज नष्ट झाला असता. वारकरी जगायचे असतील तर महाराजांसारखे धारकरी उभे रहावे लागतात. शांतता हवी पण स्मशान शांतता नको या दोन गोष्टीला फरक महाराजांनी दाखवला, हा इतिहासाचा दाखला संपूर्ण जगासाठी कायम आदर्श ठरणार आहे.

डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, एक सुंदर, कृतिशील आणि दिशादर्शक असा हा उपक्रम आहे. जगातले महान राजा शिवाजी महाराज आहेत त्यांची तुलना करण्यासारखे कोणीही नाही. जगाला मार्ग दाखविणारे आदर्श म्हणजे शिवाजी महाराज, असेही त्यांनी सांगितले.

हेमंत जाधव म्हणाले, सन २०२३ साली कुपवाडा येथे सैनिकांना स्फूर्ती देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारले. अशाच प्रकारचे लोक वर्गणीतून साकार झालेले जागतिक स्मारक टोकियो शहरात होत आहे.

कार्यक्रमात जपान मधील इडीगोवा इंडियन कल्चरल सेंटरचे विश्वस्त योगेंद्र पुराणिक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे मनोगत व्यक्त केले. याशिवाय शाहू लक्ष्मी कला क्रीडा अकादमी यांनी शिवकालीन युद्ध कला सादरीकरण, राम देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र रेखाटन केले. भक्ती गुरुकुल भजनी मंडळाच्या वतीने भजन सादर करण्यात आले. केशव शंखनाद पथकाने शंखवादन केले तर आॅक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.

संतोष रासकर यांनी सूत्रसंचालन केले. उत्तम मांढरे यांनी आभार मानले.

राजधानीत अभिजात मराठीचा अभुतपूर्व जागर

९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रम

नवी दिल्ली :
यंदाचे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या शुक्रवारपासून (दिनांक २१ फेब्रुवारी) नवी दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी (तालकटोरा स्टेडिअम) मध्ये होत आहे. २१ते २३ फेब्रुवारीदरम्यान कवी संमेलन, मुलाखती, परिसंवाद, चर्चा असे वेगवेगळे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, यंदाच्या साहित्य संमलेनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रंथदिंडीची सुरुवात देशाच्या संसदेतील छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून होणार आहे. ‘लोकशाहीच्या मंदिरातून साहित्याच्या मंदिराकडे’ असा प्रवास ही ग्रंथदिंडी करणार आहे, अशी माहिती साहित्य संमेलन आयोजक असणाऱ्या सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी दिली. दिल्लीत त्यांनी यासंबंधी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सरहदचे डॉ. शैलेश पगारिया, लेशपाल जवळगे उपस्थित होते.

संजय नहार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन होत असून या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. २१ फेब्रुवारीला दुपारी ३.३० ला विज्ञान भवनात हा कार्यक्रम होईल. या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. राज्यातील साहित्यिकही या साहित्य सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता उद्घाटनाचे दुसरे सत्र संमेलनस्थळी होणार असून याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य मंत्री अशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल. मावळते संमेलनाध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे यांचे पूर्वाध्यक्ष भाषण होईल, तर संमेलनाच्या अध्यक्षा डॉ.तारा भवाळकर यांचे अध्यक्षीय भाषण होईल.

तत्पूर्वी सकाळी ग्रंथ दिंडी काढण्यात येणार असून ध्वजारोहण होईल. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे याच्या हस्ते ग्रंथदिंडीस प्रारंभ होणार असून नॅशनल बुक ट्रस्टचे चेअरमन मिलिंद मराठे, मावळते संमेलनाध्यक्ष डॉ.रविंद्र शोभणे, राज्याचे सांस्कृतिक सचिव विकास खारगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. ग्रंथदिंडीची सुरुवात संसदेतील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून होईल, या दिंडीत साहित्यिक, साहित्यप्रेमी, ‍मराठी मंडळी सहभागी होणार आहेत. विविध कला पथकेही या दिंडीत सहभागी होतील, असेही संजय नहार म्हणाले.

संमेलनाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रकाशकांचे स्टॉल असणार आहेत, तसेच याठिकाणी ‘संत महापती’ मंच असून तिथे इच्छूक साहित्यिकांच्या पुस्तकांचे प्रकाशन होईल. या साहित्य संमेलनास देशाबाहेरूनही साहित्यिक मंडळी येणार असल्याचे संजय नहार म्हणाले.

साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे
१९ फेब्रुवारीला पुणे येथून साहित्य संमलेनासाठी विशेष रेल्वे दिल्लीकडे येणार आहे. या रेल्वेमध्येही साहित्य संमेलन होणार आहे. या विशेष रेल्वेला महादजी शिंदे एक्सप्रेस असे नाव देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक रेल्वे डब्याला गड-किल्ल्यांची नावे देण्यात आलेली आहेत. या रेल्वेमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत असणार आहेत.

यावेळी बोलताना संजय नहार यांनी सांगितले की, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या ३ दिवसांमध्ये कोणते कार्यक्रम घ्यावे हा अधिकार साहित्य महामंडळाचा असतो. त्यामुळे महामंडळाच्या नियमानुसारच कार्यक्रम होणार आहेत. मात्र संमेलनाच्या निमित्ताने आम्हाला काही कार्यक्रम घेता येतात, तसे जवळपास १०० विविध कार्यक्रम झाले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे हे पहिले संमेलन आहे. ही एक आनंदाची गोष्ट आहे. इतिहासात दिल्ली जिंकताना मराठ्यांचा तळ तालकटोरा स्टेडियम होते. त्या जागेवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे.

संजय नहार म्हणाले की, साहित्य संमेलन हा उत्सव कुठल्या खासगी संस्थेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे. साहित्य संमलेनात परिसंवाद, काव्य संमेलन असे भरगच्च कार्यक्रम तीन दिवस होणार आहेत. जवळपास १०० पुस्तके संमेलनात प्रकाशित होतील, असा अंदाज आहे. दिल्लीतील लोकांना पुस्तकांसाठी ही मोठी संधी आहे, असेही ते म्हणाले.

इंग्लड, पाकिस्तानमधून लोकांची उपस्थिती
साहित्य संमलेनाला पाकिस्तानातील कराची, इंग्लंड आणि अन्य काही देशांतून लोक येत आहेत. लंडनमधून एक व्यक्ती पुस्तक प्रकाशन करण्यासाठी येणार आहेत.व्यवस्थेबाबत बोलताना डॉ. शैलेश पगारिया म्हणाले की, संमेलनाला महाराष्ट्रातून २७०० लोक येतील अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत १८०० लोकांची व्यवस्था झाली आहे. दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली आहे. तर याबाबत बोलताना नहार म्हणाले की, व्यवस्था नाही म्हणून काही लोक येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे शक्य असेल तर दिल्लीतील मराठी लोकांनी आपल्या घरी काही लोकांना ठेवावे, ही आमची विनंती आहे, असेही ते म्हणाले.

“राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ”

पुणे-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सभासद नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर आज लोकमान्य सभागृह, केसरीवाडा येथे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि निरीक्षक श्री. सुरेश पालवे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ झाला. यावेळी शहरातील माजी नगरसेवक, विधानसभा अध्यक्ष व सेल अध्यक्ष या पदाधिकाऱ्यांकडून सभासद नोंदणीसाठी करावयाची पूर्वतयारी म्हणून आढावा घेत माहिती घेण्यात आली.

सदर प्रसंगी माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, बाबुराव चांदेरे, माजी नगरसेवक सुभाष जगताप, माजी विरोधी पक्षनेते दत्ता सागरे, माजी विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ, माजी नगरसेवक सतीश म्हस्के, विनोद ओरसे, अविनाश जाधव, शीतल सावंत,शशिकला कुंभार,रईस सुंडके, फिरोज शेख,नंदा लोणकर, फारुख इनामदार, हिना मोमीन, अश्विनी भागवत,वासंती काकडे, विधानसभा अध्यक्ष शिवाजीनगर अभिषेक बोके, कोथरूड हर्षवर्धन मानकर, पर्वती संतोष नांगरे, हडपसर डॉ.शंतनू जगदाळे, पुणे कँन्टोमेंट नरेश जाधव, कसबा अध्यक्ष अजय दराडे, सेल अध्यक्ष युवती पूजा झोळे, विद्यार्थी शुभम माताळे, अल्पसंख्याक समीर शेख, सामाजिक न्याय जयदेव इसवे, सांस्कृतिक विजय राम कदम, सोशल मिडिया शीतल मेदने, दिव्यांग पंकज साठे, महिला बचत गट अश्विनी वाघ, अल्पसंख्याक महिला नूरजहाँ शेख, केमिस्ट विनोद काळोखे, माहिती अधिकार दिनेश खराडे, वैद्यकीय मदत कक्ष विजय बाबर, ग्राहक संरक्षण राजेंद्र घोलप,अभियंता सतीश आडके, क्रीडा राजेंद्र देशमुख, उद्योग चैतन्य जोशी, पथारी प्रशांत कडू, माथाडी हर्षद बोडके, जैन जया बोरा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ज्ञानेश कुमार नवे मुख्य निवडणूक आयुक्त:राहुल गांधींनी नियुक्तीला केला विरोध

0

नवी दिल्ली-1988च्या बॅचचे आयएएस अधिकारी आणि विद्यमान निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते आज ही जबाबदारी स्वीकारतील. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आज निवृत्त होत आहेत. नवीन कायद्यांतर्गत नियुक्त झालेले ते पहिले सीईसी आहेत. त्यांचा कार्यकाळ २६ जानेवारी २०२९ पर्यंत राहील.सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली. गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी बैठकीला उपस्थित होते. या पॅनेलच्या शिफारशीवरून नवीन सीईसीची नियुक्ती करण्यात आली.

बैठकीत विवेक जोशी यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते हरियाणाचे मुख्य सचिव आणि १९८९ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्याच वेळी, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू हे त्यांच्या पदावर राहतील.मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन सीईसीसाठी 5 नावांची यादी देण्यात आली होती. पण राहुल यांनी नावांचा विचार करण्यास नकार दिला होता.बैठकीनंतर राहुल गांधी यांनी एक असहमती पत्र जारी केले होते. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, त्यामुळे ही बैठक होऊ नये.

त्याच वेळी, काँग्रेसने म्हटले होते – आम्ही अहंकाराने काम करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाला लवकर निर्णय घेता यावा म्हणून बैठक पुढे ढकलावी लागली.

सिंघवी म्हणाले- सरकारने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईपर्यंत वाट पाहावी
काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, सीईसी निवड समिती ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी स्थापन केलेल्या समितीतून सरन्यायाधीशांना काढून टाकून सरकारने हे स्पष्ट केले आहे की त्यांना निवडणूक आयोगाची विश्वासार्हता नको आहे तर त्यावर नियंत्रण हवे आहे.

सिंघवी म्हणाले की, सीईसी आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठीच्या नवीन कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका प्रलंबित आहे. या प्रकरणाची सुनावणी १९ फेब्रुवारी रोजी आहे. फक्त ४८ तासांचा प्रश्न होता. सरकारने याचिकेची लवकर सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यायला हवी होती.

निवडणूक आयोगाच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर १९ फेब्रुवारी रोजी सुनावणी
सर्वोच्च न्यायालय १९ फेब्रुवारी रोजी मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करेल. या प्रकरणाची सुनावणी १२ फेब्रुवारी रोजी होणार होती, परंतु प्रकरण सूचीबद्ध झाले नाही. त्यानंतर ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर हा मुद्दा उपस्थित केला.

प्रशांत म्हणाले होते की, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार १८ फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत. अशा परिस्थितीत, सरकार नवीन सीईसी नियुक्त करू शकते, म्हणून न्यायालयाने या प्रकरणाची लवकरच सुनावणी करावी. यावर न्यायालयाने १९ फेब्रुवारीची तारीख दिली आणि सांगितले की जर यादरम्यान काही घडले तर ते न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन असेल, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.

हे प्रकरण मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त कायदा, २०२३ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांशी संबंधित आहे.

मुंडेंच्या शुक्रवार पेठेतील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा,32 जण पकडले

पुणे:शक्रवार पेठेतील शाहु चौकाजवळील अंग्रेवाडा येथे सुरु असलेल्या अंग्रेवाडा येथे छापा टाकून जुगार खेळणार्‍या एका महिलेसह ३२ जणांना पकडले. त्यांच्याकडून १ लाख ४६ हजार ४२० रुपयांची जुगाराची साधने मोबाईल व रोख रक्कम जप्त केली आहे.

सुनिल मुंडे हा पत्त्यांचा क्लब चालवत होता.पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील सर्व अवैध धंदे बंद करायचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बहुतांश अवैध धंदे बंद असताना शुक्रवार पेठेसारख्या मध्य वस्तीत एकाच वेळी इतके लोक जुगार खेळण्यासाठी जमलेले दिसून आले. दिघी पासून धनकवडीपर्यंत, गोखलेनगरपासून नाना पेठ आणि भवानी पेठेपासून नांदेडसिटीपर्यंतच्या भागात राहणारे या जुगार अड्ड्यावर जमले होते.

पत्त्यांचा क्लबच्या मॅनेजर भास्कर दत्तात्रय पंडीत (रा. संतनगर, अरण्येश्वर), घनश्याम ज्ञानेश्वर गुलापिल्ले (वय ४२, रा. भवानी पेठ), गणेश लक्ष्मण कांबळे (वय ३८, रा. भवानी माता मंदिराजवळ, भवानी पेठ), भागवत सखाराम कटारे (वय ३३, रा. कर्वेरोड, कोथरुड), आनंद सतिश खिवंसरा (वय ४५, रा. रविवार पेठ), निलेश रोहिदास गव्हाणे (वय ४२, रा. पर्वती दर्शन), शेखर चंद्रकांत जगताप (वय ५५, रा. काकडे वस्ती, कोंढवा), आशिष ज्ञानेश्वर राशणकर (वय ३५, रा. धनकवडी, आंबेगाव), गुड्डु रणजित रवानी (वय ३०, रा. हडपसर, माळवाडी), सतेंद्र सुनिल सिंग (वय २७, रा. माळवाडी, हडपसर), नवाज निझन पठाण (वय ४२, रा. गुरुनानक नगर, भवानी पेठ), रसुल बरसु शेख (वय ३०, रा. अपर डेपो), प्रदीप दशरथ खवळे (वय ४३, रा. जनता वसाहत), विलास गणपत काळे (वय ६३, रा. धनकवडी), बाळासाहेब बळीराम साठे (वय ३७, रा. अपर इंदिरानगर), कुमार गुंडा माने (वय ६०, रा. संतोषनगर, कात्रज), दीपक अर्जुन बागल (वय ६०, रा. ताडीवाला रोड), राकेश सुरेश मसुळे (वय ३२, रा. नांदेड सिटी), उमेश दत्तात्रय काळे (वय ४४, रा. गोखलेनगर), विष्णु रघुनाथ ढगे (वय ४८, रा. धनकवडी), दत्ता वसंत सितप (वय ५३, रा. संकल्प सोसायटी, आंबेगाव), बाळु किसन भेलके (वय ४८, रा. बालाजीनगर, धनकवडी), विलास विक्रम माने (वय ४७ रा. भारतमातानगर, दिघी), योगेश सतिश डेंगळे (वय २७, रा. अपर ओटा), विकास राजाभाऊ अडसुळ (वय ४७, रा. अपर बिबवेवाडी), दत्ता आबरावु शेटे (वय ५७, रा. जवाहर बेकरी शेजारी), बाळु शंकर कांदे (वय ५०, रा. शुक्रवार पेठ), बजरंग बाबुराव डोळसे (वय ५७, रा़ स्वारगेट), सचिन यशवंत माने (वय ५०, रा. राजवाडी, नाना पेठ), विकास सुभाष बनसोडे (वय ३५, रा. धायरी) अशी पकडलेल्यांची नावे आहेत.

जुगार खेळणाऱ्या महिलेला पोलीस ठाण्यात हजर राहण्याची समज देण्यात आली आहे. जुगार अड्डा मालक सुनिल मुंडे (रा. अंग्रेवाडी, शुक्रवार पेठ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अंमलदार आशिष चव्हाण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस आयुक्त नूतन पवार यांच्याकडून खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना आदेश दिला की, अंग्रेवाडा येथे जुगार खेळला जात आहे. तेथे जाऊन कारवाई करा. त्यानुसार खडक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) मनोजकुमार लोंढे, सहायक पोलीस निरीक्षक व्हटकर, पोलीस उपनिरीक्षक कांबळे, बनकर, ढोणे, हवालदार हर्षल दुडुम, ठवरे, कुंभार, बोडके, पेरणे, धारुरकर, राऊत, हरबा, लांडगे,गायकवाड, खराडे, नायकरे, नदाफ, देशमुख, वाबळे असे पथक रविवारी सायंकाळी शुक्रवार पेठेतील अंग्रेवाडा येथे पोहचले. त्यांनी आत जाऊन पाहिले तर चार गोलाकार टेबलावर अनेक जण तीन पत्त्यांचा जुगार खेळत होते. पोलिसांनी सर्वांना जागच्या जागी थांबायला सांगितले. जुगार अड्ड्याचा मॅनेजर भास्कर पंडित याने हा जुगार अड्डा सुनिल मुंडे याचा असल्याचे सांगितले. पोलिसांनी सर्वांची झडती घेऊन १ लाख ४६ हजार ४२० रुपयांचा माल जप्त केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण तपास करीत आहेत.

नवनियुक्त प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा उद्या मंगळवारी १८ फेब्रुवारीला पदग्रहण सोहळा.

प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत बिर्ला मातोश्री सभागृहात दुपारी १ वाजता सोहळा.

प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार

मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२५
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पदग्रहण सोहळा उद्या मंगळवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२५ रोजी मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात दुपारी १ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात हर्षवर्धन सपकाळ हे नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेतील.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया क कम्युनिकेशन विभागाचे चेअरमन पवन खेरा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष खा. इम्रान प्रतापगडी प्रदेश कार्याध्यक्ष व काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान यांच्यासर्व प्रदेश कार्याध्यक्ष, पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. पदग्रहण सोहळ्याची तयारी झाली असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून करण्यात आले आहे.
नाना पटोले यांनी चार वर्ष काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली, त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुका, पोटनिवडणुका व लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले. विधानसभा निवडणुकीनंतर नाना पटोले यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे ते दिल्ली यादरम्यान महादजी शिंदे यांच्या नावाने विशेष रेल्वे सेवा-मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी

पुणे, दि.17: दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर या संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्य रसिकांसाठी पुणे ते दिल्ली यादरम्यान महादजी शिंदे एक्सप्रेस ही विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार आहे, ही विशेष रेल्वे 19 फेब्रुवारी रोजी दुपारी पुण्यातून निघणार असून 20 फेब्रुवारी रोजी रात्री दिल्ली येथे पोहोचणार आहे, अशी माहिती मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी यांनी दिली आहे.

दिल्ली येथे 21 ते 23 फेब्रुवारी 2025 या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी, ताल कटोरा स्टेडियम येथे हे संमेलन होत आहे. या साहित्य समेंलनात सहभागी होणाऱ्या साहित्य रसिकांकरीता सुरु करण्यात येणाऱ्या या रेल्वेच्या डब्यांना गडकिल्यांची नावे देण्यात येणार आहे.

98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रवासी साहित्य संमेलन या संकल्पनेतून ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’ आयोजित करण्यात येणार आहे. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारे हे मराठीतील पहिलेच आणि जगातील सर्वात मोठे आणि दिर्घ साहित्य संमेलन असणार आहे.

पुणे-दिल्ली प्रवासादरम्यान रंगणार ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’

साहित्यरसिकांना पुण्यातून दिल्लीला घेऊन जाणाऱ्या रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव देण्यात येणार असून या विशेष रेल्वेला 16 डब्बे असणार असून डब्याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची नावे दिली जाणार आहेत. राज्याचे मराठी भाषामंत्री उदय सामंत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून तेही ‘मराठी साहित्ययात्री संमेलनात’सहभागी होत आहेत. ते या रेल्वेद्वारे प्रवास करणार करणार आहेत आणि साहित्यिक, कलावंतांशी ते संवाद साधणार आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रवासा दरम्यान प्रत्येक बोगीत विविध साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

युवा साहित्यिक व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ‘मराठी साहित्ययात्री संमेलन भरविण्यात येत आहे.‘मराठी साहित्ययात्री संमेलनात’महाराष्ट्रातील वेगवेगळ्या गावा-गावांमधून साहित्यिक, युवक, लोककलाकार, स्टँडअप कॉमेडियन्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तसेच शाहिर व भजनी मंडळांचा मोठ्या संख्येने सहभागी होणर आहे. मोठ्या प्रमाणात तरुणांच्या सहभागामुळे हे संमेलन तरुणाईचे संमेलन ठरणार आहे.

19 रोजी असलेल्या शिवजयंतीचे औचित्य साधून सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनानंतर पुण्यातून रेल्वे निघणार आहे. तत्पूर्वी पुस्तक दिंडीही काढली जाणार आहे. याच रेल्वे प्रवासात १ हजार २०० पेक्षा अधिक साहित्यिक येणार असून जळगाव आणि ग्वाल्हेर येथे ही विशेष रेल्वे पोहोचल्यानंतर ग्वाल्हेर येथील स्थानिक नागरिक भव्य स्वागत करणार आहेत. रेल्वे 20 फेब्रुवारी रोजी दिल्लीत पोहोचणार असून दिल्ली स्थानकावर पोहोचल्यानंतर पसायदानाने ‘मराठी साहित्ययात्री संमेलना’ची व पहिल्या टप्प्यातील प्रवासाची सांगता होणार आहे. या वेळी दिल्लीतील मराठीजन मोठ्या संख्येने स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. परतीच्या प्रवासात देखील हे संमेलन रंगणार असून 25 फेब्रुवारी रोजी पुणे रेल्वे स्थानकावर या संमेलनाची समारोप होणार आहे.

या अभिनव उपक्रमाची संकल्पना सरहद, पुणेचे अध्यक्ष संजय नहार यांची आहे. संमेलनाच्या निमित्ताने स्वतंत्र संयोजन समितीची स्थापना करण्यात आली आहे. रावण द आंत्रप्रिन्युअर या पुस्तकांचे लेखक शरद तांदळे यांची संमेलनाध्यक्ष तर वंदेमातरम् संघटनेचे अध्यक्ष व व्हायरल माणुसकी या पुस्तकाचे लेखक वैभव वाघ हे संमेलनाचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. डॉ. शरद गोरे (कार्याध्यक्ष), सचिन जामगे (कार्यवाह), ॲड. अनिश पाडेकर, सोमनाथ चोथे, गणेश बेंद्रे (मुख्य समन्वयक), अक्षय बिक्कड, सागर काकडे (निमंत्रक) यांचा कार्यकारिणीत समावेश आहे, अशी माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिली आहे.

कलापथक प्रमुखांनी 25 फेब्रुवारीला सादरीकरणास उपस्थित राहण्याचे आवाहन

पुणे, दि. 13: लोककला, पथनाट्याद्वारे शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिद्धी करावयाची आहे. त्यासाठी पुणे जिल्हयातील कलापथक /पथनाट्य संस्थांकडून कार्यक्रम मिळणेबाबत अर्ज मागविण्यात येत आहेत. मागणी अर्जामध्ये एका कार्यक्रमाचे सर्व खर्चासह एकूण मानधनाचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
संस्थांनी इतर विभागांच्या योजनांची प्रसिद्धी केलेल्या कार्यक्रमाची 3 ते 5 मिनिटांची ऑडिओ, व्हिडीओ क्लिप पेनड्राईव्हमध्ये सोबत आणणे आवश्यक आहे. प्रत्येक कार्यक्रमासाठी कलापथक/ पथनाट्य ग्रुपमध्ये स्त्री-पुरुष, गायक-वादक यांच्यासह एकूण 10 कलावंत असणे आवश्यक आहे. कार्यक्रमासाठी वाहन व्यवस्था, ध्वनीक्षेपण यंत्रणा, संगीत साहित्य, बॅनर, कलाकारांना अल्पोपहार, भोजन इत्यादी पुरविण्याची जबाबदारी संबंधित संस्थेची राहील.
सादरीकरणाद्वारे संस्थांची निवड करण्याकरीता दि. 25 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळ मजला, ससून रुग्णालयासमोरील दगडी बिल्डींग (सेंट्रल बिल्डींग) पुणे स्टेशन, पुणे 411001 येथे स्वखर्चाने उपस्थित रहावे, असे आवाहन पुणे जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.


कोथरूड येथे 20 फेब्रुवारी पासून संत्रा महोत्सवाला सुरुवात

पुणे, दि. 17: पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत दरवर्षी ‘उत्पादक ते ग्राहक थेट विक्री’ संकल्पनेअंतर्गत गांधी भवन, कोथरूड येथे 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान ‘संत्रा महोत्सव-2025 चे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली आहे.

संत्रा उत्पादकांची नोंदणी प्रक्रिया ही पणन मंडळाच्या अमरावती व नागपूर विभागीय कार्यालयाकडे करण्यात आलेली असुन यावेळी सुमारे 50 संत्रा उत्पादक सहभागी होणार आहेत. या उत्पादकांना पुणे येथील गांधी भवन, कोथरूड येथे सुमारे 25 स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या उत्पादकांमार्फत उत्तम प्रतिचा मृग बहारातील चवीला गोड असणारा अस्सल नागपूरी संत्रा, संत्र्याचा चवदार ताजा रस, संत्रा बर्फी व इतर संत्रा उत्पादने ग्राहकांना थेट उत्पादकांकडून उपलब्ध होणार आहे. अधिक माहितीकरीता सहाय्यक सरव्यवस्थापक मंगेश कदम 7588022201 यांच्याशी संपर्क साधावा, विदर्भातील उच्च प्रतीच्या नागपूरी संत्रा व इतर उत्पादित पदार्थाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.कदम यांनी केले.

00000

इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांचे ‘अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेड ची लढाई’ या विषयावर व्याख्यान :

संजीव सोशल फाउंडेशन उद्घाटन समारंभ  
पुणे : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे हे अजिंक्य योद्धा होते. परंतु त्यांचा पराक्रम आजही अनेकांना माहीत नाही. एक ही लढाई न हरलेले ते सेनापती होते, परंतु आपल्या लोकांचे दुर्दैव आहे की बाजीराव मस्तानी याशिवाय बाजीराव पेशवे आपल्याला फारसे माहिती नाहीत. बाजीराव पेशवे यांचा पराक्रमी इतिहास तरुणांनी वाचायला पाहिजे, असे मत इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांनी व्यक्त केले

माजी लष्कर अधिकारी स्व. संजीव गदादे यांचे सामाजिक कार्य सदैव सुरू ठेवण्यासाठी संजीव सोशल फाउंडेशन संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेचा उद्घाटन समारंभ  टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या पदमजी सभागृहात झाला. याप्रसंगी व्यासपीठावर पेशवा घराण्याचे वंशज पुष्कर सिंह पेशवा, उद्योजक अरुण कुदळे, शिवराजआप्पा घुले , राहुल शेवाळे , श्री देवदेवेश्वर संस्थानचे मुख्य विश्वस्त रमेश भागवत, इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत, संकेत गदादे, छाया गदादे उपस्थित होते. उद्घाटन समारंभ प्रसंगी इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत यांचे ‘अजिंक्य योद्धा बाजीराव आणि पालखेडची लढाई’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी त्यांनी श्रीमंत बाजीराव पेशवे यांचा पराक्रम उपस्थितांसमोर उलगडला.

संकेत गदादे म्हणाले, स्वर्गीय संजीव जयवंतराव गदादे हे निवृत्त लष्कर अधिकारी होते. ते स्वामी विवेकानंद विद्यामंदिर व स्वामी विवेकानंद अकॅडमीचे संस्थापक तसेच सदर्न कमांड बँकेचे माजी संचालक होते. संजीव सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक, वैद्यकीय, हिंदू धर्म जागरण व संघटन, बालसंगोपन व आरोग्य, निराधार जनसेवा, असंघटित कामगार सेवा, क्रीडा व कला या क्षेत्रात कामे केली जात आहेत. माधुरी विधाटे यांनी सूत्रसंचालन केले.

‘एमआयटी एडीटी’च्या ‘कंजूस’ ने गाजवला भारत रंग महोत्सव

नवी दिल्ली/ पुणे – हशा, व्यंग्य आणि उत्कृष्ट अभिनयाने परिपूर्ण अशी एक अविस्मरणीय संध्याकाळ मेघदूत ३ मध्ये अनुभवायला मिळाली, जेव्हा एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या थिएटर विभागाच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठित २५ व्या भारत रंग महोत्सव (बीआरएम) मध्ये कंजूस चे सादरीकरण केले. हे नाटक प्रसिद्ध फ्रेंच नाटककार मोलिएर यांच्या क्लासिक विनोदी नाटक द मायझर च्या हिंदी रूपांतरावर आधारित असून, थिएटर विभागाचे प्रमुख डॉ. अमोल देशमुख यांच्या दिग्दर्शनाखाली सादर करण्यात आले. या प्रयोगाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली.

मोलिएर यांचे द मायझर हे १७व्या शतकातील अजरामर व्यंग्यात्मक नाटक असून, कंजूस मध्ये त्याचे कौशल्यपूर्ण रूपांतर करण्यात आले आहे. या नाटकात मूळ हास्यशैली आणि वैशिष्ट्ये टिकवून ठेवण्यात आली असून, भारतीय प्रेक्षकांसाठी ते सांस्कृतिकदृष्ट्या अधिक समर्पक बनवण्यात आले आहे. हे नाटक मिर्झा शेख या पात्राभोवती फिरते, जो आपल्या संपत्तीच्या बाबतीत अतिशय कंजूस आणि हट्टी असतो. त्याच्या या स्वभावामुळे अनेक विनोदी गैरसमज आणि संघर्ष निर्माण होतात.

नाटकाच्या सुरुवातीपासूनच कंजूस प्रेक्षकांना खिळवून ठेवले. तरुण कलाकारांनी आपल्या भूमिकांवर ठाम पकड घेतली आणि ती उर्जेने आणि नेमकेपणाने सादर केली. मुख्य भूमिका साकारणाऱ्या मिर्झा शेख यांनी अप्रतिम कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना हसवले. त्यांची शरीर भाषा, चेहऱ्यावरील भाव आणि हावभावांनी कंजूस माणसाच्या मानसिकतेला उत्कृष्ट प्रकारे साकारले.

मात्र, या संध्याकाळी खरी चमक दाखवणाली ती नंबू या पात्राने. एका महिला कलाकाराने साकारलेले हे पात्र आपल्या मिश्कील शैलीने, देहबोलीच्या अभिनयाने आणि प्रभावी संवादफेकीने प्रेक्षकांच्या मनात ठसले. त्यांच्या जिवंत अभिनयशैलीने, योग्य टायमिंगने आणि उत्तम रंगमंचीय उपस्थितीमुळे संपूर्ण नाटक अधिक प्रभावी झाले. मुख्य पात्रांव्यतिरिक्त संपूर्ण कास्टनेही अप्रतिम अभिनय सादर केला. प्रेमकथा, चतुर नोकर आणि मिर्झा शेखच्या भोवतालची पात्रे यांनी नाटकात हास्य आणि मनोरंजनाचा उत्कृष्ट मिलाफ साधला. कलाकारांमध्ये उत्तम समन्वय होता, त्यामुळे संवाद आणि दृश्ये सहज आणि स्वाभाविक वाटली.

एमआयटी एडीटी थिएटर विभागाचे मोठे यश

राष्ट्रीय नाट्य विद्यालय (एनएसडी) तर्फे आयोजित भारत रंग महोत्सव हा भारतातील सर्वांत प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव आहे. यात कंजूस ची निवड होणे हे एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या थिएटर विभागासाठी एक मोठे यश आहे. हजारो नाटकांच्या कठोर निवड प्रक्रियेतून या नाटकाची निवड झाली, यामुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीला आणि विभागाच्या सर्जनशील दृष्टिकोनाला मान्यता मिळाली. कंजूस हे केवळ एक मनोरंजक नाटक नसून, हे संस्थेच्या उदयोन्मुख नाट्यकलावंतांना पोषण देण्याच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. बीआरएममध्ये मिळालेल्या उदंड प्रतिसादाने विद्यार्थ्यांची मेहनत आणि त्यांच्या मार्गदर्शकांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. हा यशस्वी प्रयोग या युवा कलाकारांसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

नवीन तंत्रज्ञान आले तरी रेडिओग्राफर्सचे महत्व कमी होणार नाही

रेडिएशन सुरक्षा आणि रेडियोलॉजीमधील नवीन प्रवाहांवर सेमिनारमध्ये तज्ञांचे मत ; रेडियोग्राफर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्र आणि एप्ट मेडिकल सिस्टिम्स प्रा. लि. यांच्या वतीने आयोजन
पुणे : वैद्यकीय क्षेत्राचा विचार केला तर त्यामध्ये अनेक शाखा आहेत. मात्र, एक्सरे विभागाचे महत्व त्यामध्ये मोठे आहे. रुग्णावर अंतिम उपचार काय करायचे, हे एक्सरे सारख्या सर्व तपासण्यांची मदत घेऊन करावे लागते. आता पूर्वीसारखी डार्क रुम ही संकल्पना अतित्वात नाही. मात्र, नवीन तंत्रज्ञान आले असले, तरी देखील अचूक व सुयोग्य निष्कर्षासाठी रेडिओग्राफर्सचे महत्व कमी होणार नाही, असे मत रेडिएशन सुरक्षा आणि रेडियोलॉजीमधील नवीन प्रवाहांवर आयोजित सेमिनारमध्ये तज्ञांनी व्यक्त केले.

रेडियोग्राफर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्र आणि एप्ट मेडिकल सिस्टिम्स प्रा. लि. यांच्या वतीने पूना हॉस्पिटल आॅडिटोरियममध्ये रेडियोलॉजीमधील रेडिएशन सुरक्षा आणि नवीन प्रवाहांवर लक्ष केंद्रित करणा-या ‘रेडिएशन सुरक्षा आणि रेडियोलॉजीमधील नवीन प्रवाह’ या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. एप्ट मेडिकल सिस्टिम्सचे संचालक केतन आपटे, गीता आपटे, रेडियोग्राफर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रमेश तांबे, माजी अध्यक्ष जगदीश जगताप आदींनी या सेमिनारचे आयोजन केले होते.

सेमिनारमध्ये प्रख्यात ज्येष्ठ रेडियोलॉजिस्ट डॉ. श्रीनिवास नाटेकर, डॉ. आर. व्ही. परांजपे, डॉ. डी. डी. शेट्टी आणि डॉ. लाखकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. याशिवाय,एइआरबी च्या रेडिएशन सुरक्षा आणि नियामक बाबींमध्ये विशेषतज्ञ असलेले वैज्ञानिक अधिकारी हर्ष देसले, अनुभवी रेडियोग्राफर चंद्रकांत शहाणे आणि बायोमेडिकल अभियंते अशोक श्रृंगारपूरे, अनिल जठार, समीर श्रृंगारपूरे आणि मुथुकुमार इत्यादी आपले विचार मांडले. तर, रेडियोलॉजिस्ट, रेडियोग्राफर आणि अभियंता यांना त्यांच्या क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. प्रमुख वक्त्यांव्यतिरिक्त सन्मानितांमध्ये सुधाकर रणदिवे , रत्नकांत नाईक, नाडुकरन, तानाजी जगताप, सुभाष बनसोडे, आणि प्रल्हाद कांबळे यांचा समावेश होता.

डॉ. आर.व्ही.परांजपे म्हणाले, एक्सरे साठी रुग्णांशी संवाद ही कला यायला हवी. तसेच ती प्रक्रिया सुरु असताना काही अपघात घडल्यास त्या स्थितीला सामोरे जाण्याची क्षमता देखील रेडियोग्राफर्सकडे असणे गरजेचे आहे. आता रेडिओलॉजीमध्ये एआय आले आहे. एक्सरे चे तंत्रज्ञान मोठे होत आहे. हे हाताळण्याचे काम तंत्रज्ञ म्हणजेच रेडियोग्राफर्स करीत असतात, असेही त्यांनी सांगितले.

हर्ष देसले म्हणाले, रेडिएशन ही एक एनर्जी आहे. त्यामुळे ती प्रक्रिया करीत असताना सुरक्षा घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कामाचा अनुभव, उपकरणांची काळजी, ज्या ठिकाणी उपकरण बसवू त्या जागेची योग्य निवड अशा अनेक गोष्टी यामध्ये महत्वाच्या आहेत. सुरक्षा नियमावलीप्रमाणे सर्व उपकरणे आहेत की नाही, हे तपासणे देखील गरजेचे असते. उपकरणांचा वापर हा माणसांसाठी होत असतो, त्यामुळे त्या उपकरणाची गुणवत्ता तपासणी ही देखील आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

केतन आपटे म्हणाले, सेमिनारचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे रेडियोलॉजीमध्ये सुरक्षा प्रोटोकॉल आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांबद्दल सहभागींना शिक्षित करणे, हा होता. तसेच रेडियोग्राफरच्या दृष्टिकोनातून एक्स-रे तंत्रज्ञानातील बदल, एक्स-रे तंत्रज्ञानाचा विकास, आणि रेडियोलॉजीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यावर सखोल चर्चा झाली. पुणे जिल्ह्याच्या विविध भागांतील तज्ञ तसेच  विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. 
डॉ. नाटेकर, महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ प्रॅक्टिसिंग रेडियोलॉजिस्ट, यांनी त्यांच्या ‘गोल्डन लाईफ’ या भाषणात फलदायी, अर्थपूर्ण, निरोगी आणि आनंदी जीवन कसे जगावे यावर चर्चा केली आणि सेमिनारची सांगता केली.एप्ट मेडिकल सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड,  रेडियोग्राफर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्र आणि वैरेक्स इमेजिंग इंडिया प्रा. लि. यांनी या उपक्रमाला सहकार्य केले होते.