Home Blog Page 47

पुण्याला वादळी पावसाने झोडपले:पिंपळाचे झाड कोसळल्याने साठ वर्षीय महिलेचा मृत्यू

रस्त्यांवरून जणू वाहू लागले ओढे नाले,नद्या

पुणे:आज शहर आणि परिसरात दुपारनंतर काळोख दाटून आला. त्यानंतर काही मिनिटांतच मुसळधार पावसाने शहराला झोडपून काढले. अनेक भागांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला, तर काही ठिकाणी गारपिटीची नोंदही झाली. या अचानक बदलामुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले. पुण्यात सिंहगड रोडवरील नवश्या मारुती मंदिरा शेजारील पिंपळाचे भले मोठे झाड कोसळले. यात साठ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.
दुपारच्या सुमारास सुरू झालेल्या या पावसामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर पाणी साचले. काही ठिकाणी तर रस्त्यांवरून अक्षरशः पाण्याचे प्रवाह वाहताना दिसले. सिंहगड रोड, मणिकबाग, कोंढवा बुद्रुक, प्राईड हॉस्पिटल परिसर, धानोरी आणि बालाजीनगर या भागांत पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही वाहनं पाण्यात अडकून थांबली, तर अनेकांनी वाहनांच्या हेडलाईट सुरू करूनच प्रवास केला.स्वारगेट बस स्थानक जणू पाण्याचे तळे बनले तर सिंहगड रस्त्याला देखील नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते .सेनापती बापट रस्ता , कर्वे रोड आणि एकूणच उपनगरातील बहुतांशी रस्ते पाण्याखाली होते.

उन्हाळ्याचा काळ असल्याने नागरिक छत्री किंवा रेनकोट न घेता घराबाहेर पडले होते. त्यामुळे अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची चांगलीच धांदल उडाली. जवळपास तासभर सुरू असलेल्या मुसळधार सरींमुळे शहरात वाहतुकीवर परिणाम झाला. पिंपरी-चिंचवड परिसरातही याच स्वरूपाचा पाऊस पडला आणि उद्योगनगरीतही अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे चित्र दिसून आले.

पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरात अवकाळी पावसात एक दुर्दैवी घटना घडली असून नवश्या मारुती मंदिराशेजारील पिंपळाचे भले मोठे झाड अचानक कोसळल्याने एका साठ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मृत महिलेचे नाव रंजना नवनाथ गिरी (वय 60) असे असून त्या परिसरात फुल विक्रीचा व्यवसाय करत होत्या. दररोजप्रमाणे त्या मंदिराजवळ आपला व्यवसाय करत असताना अचानक हे झाड कोसळले. झाड कोसळण्याचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिक तत्काळ घटनास्थळी धावून आले.स्थानिक नागरिकांनी तत्काळ बचावकार्य सुरू करत महिलेस झाडाखालून बाहेर काढले. मात्र त्यावेळी त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले, परंतु उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

शहरी गरीब आरोग्य योजना मिळकतकराची अट रद्द,जनगणने साठी ७०.८८ लाखांचा निधी मंजूर:स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

0

पुणे : स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार शहरी गरीब आरोग्य योजनेसाठी मिळकत कराची अट रद्द करण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे तसेच जनगणनेच्या कामासाठी तांत्रिक सहाय्यक व मल्टी टास्किंग स्टाफ नियुक्ती करण्यात येणार असून त्यासाठी ७० लाख ८८ हजार रुपयांच्या निविदेला महानगरपालिकेच्या स्थायी समितीत मंजुरी दिल्याची माहिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

भिमाले म्हणाले, “पाच हजार रुपयांपेक्षा अधिक मिळकत कर भरणाऱ्या नागरिकांना या योजनेचा लाभ देण्यात येऊ नये अशी भूमिका प्रशासकीय कार्यकाळात घेण्यात आली होती. मात्र या अटीमुळे सर्वसामान्य आणि गरीब नागरिक योजनेपासून वंचित राहत होते. त्यामुळे मिळकत कराची अट रद्द करण्यात आली.”

भिमाले म्हणाले, “ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख 60 हजार रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील नागरिकांना खासगी रुग्णालयांतील उपचारांसाठी सवलत देण्याच्या उद्देशाने शहरी गरीब योजना सुरू करण्यात आली. सध्या विविध प्रकारच्या आजारांसाठी अधिकाधिक एक लाख रुपयांपर्यंतचा उपचार खर्च देण्याची योजनेत तरतूद आहे. तसेच हृदय, कॅन्सर, किडनी अशा गंभीर स्वरूपाच्या आजारांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत उपचार खर्च दिला जातो.”

योजनेतील गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी प्रशासनाने मिळकत कर भरण्याचा निकष लावला होता. ही अट रद्द करावी असा प्रस्ताव भाजपचे नगरसेवक बाळा ओसवाल यांनी दिला होता. आज स्थायी समितीने मिळकत कराची अट रद्द करण्याचा निर्णय घेतला.

जनगणनेच्या कामासाठी तांत्रिक सहाय्यक व मल्टी टास्किंग स्टाफ नियुक्ती करण्यात येणार असून त्यासाठी ७० लाख ८८ हजार रुपयांच्या निविदेला महानगरपालिकेच्या स्थायी समितीत मंजुरी दिल्याची माहिती भिमाले यांनी दिली.भिमाले म्हणाले, “जनगणना ही अत्यंत महत्त्वाची प्रशासकीय प्रक्रिया असून तिच्या अचूक अंमलबजावणीसाठी मनुष्यबळाची आवश्यकता असते. त्यानुसार तांत्रिक सहाय्यक आणि मल्टी टास्किंग स्टाफ नेमण्यासाठी ही निविदा मंजूर करण्यात आली आहे.”

जनगणना प्रक्रियेचे दोन टप्पे निश्चित करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात घरांची यादी आणि घरांची गणना केली जाणार आहे. नागरिकांना १ मे ते १५ मे या कालावधीत स्व-जनगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून या कालावधीत प्रत्यक्ष क्षेत्रीय जनगणना केली जाणार आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून, प्रत्येक घराची माहिती मोबाईल ॲपद्वारे नोंदवली जाणार आहे. त्यामुळे माहिती अधिक अचूक, पारदर्शक आणि सुरक्षित राहील, असे भिमाले यांनी स्पष्ट केले.

“जनगणनेच्या माध्यमातून शहराच्या विकासासाठी आवश्यक असलेली अचूक माहिती मिळते. त्यामुळे नागरिकांनी या प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा,” असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

महसूल वाढ समिती स्थापन करण्याचा निर्णय

पुणे महापालिकेचे उत्पन्न वाढीच्या दृष्टीने महसूल वाढ समितीची स्थापना करण्या चा निर्णय आज स्थायी समितीत घेण्यात आला असल्याची माहिती यावेळी भिमाले यांनी दिली.भिमाले म्हणाले, “गेल्या दहा वर्षांतील अंदाजपत्रकाचा आढावा घेतल्यानंतर अपेक्षित उत्पन्न आणि प्रत्यक्षातील उत्पन्न यात मोठी तफावत दिसून येते. त्यासाठी अंदाजपत्रकातील अपेक्षित उत्पन्न वाढविण्यासाठी ठोस उपाययोजना आणि त्यांची अंमलबजावणी यावर विशेष भर देण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून
महसूल वाढीसाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे.”

या समितीमध्ये महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त यांच्यासह महसुलवाढीसाठी मिळकत कर विभाग, बांधकाम विभाग व इतर विभाग यांचा समावेश करुन स्थायी समितीचे अध्यक्ष आणि स्थायी समिती सदस्य व विरोधी पक्षातील आणि इतर पक्षातील सभासद यांचा समावेश केला जाणार आहे. या समितीकडून दर आठवड्याला आढावा घेतला जाणार आहे. या समितीमार्फत कर संकलन आणि थकबाकी वसुलीवर भर दिला जाईल. यामुळे महसूल व्यवस्थापन अधिक परिणामकारक होऊन महापालिकेच्या आर्थिक सक्षमतेस चालना मिळेल, असाही दावा भिमाले यांनी केला आहे.

पहिले वहिले  डिजिटल डेटा संकलन आणि स्व-गणना सुविधेसह जनगणना 2027 चा  राष्ट्रीय स्तरावर प्रारंभ

जगातील सर्वात मोठी जनगणना मोहीम, जनगणना 2027 सुरू झाली आहे. भारत सरकारने आजपासून जनगणना  2027चा पहिला टप्पा – घरांची यादी  आणि घरांची गणना  सुरू केला आहे, जो देशातील सर्वात मोठ्या प्रशासकीय आणि सांख्यिकी मोहिमेचा प्रारंभ आहे. ही भारताची पूर्णपणे डिजिटल डेटा संकलन आणि स्व-गणना सुविधा असलेली पहिलीच जनगणना आहे.

देशाच्या  प्रथम नागरिकापासून राष्ट्रीय गणनेला सुरुवात करण्याच्या गौरवशाली परंपरेनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्व-गणनेचा पर्याय निवडून राष्ट्रीय गणना मोहिमेला सुरुवात केली.उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती भवन येथे जनगणना 2027 साठी ऑनलाइन स्व-गणना अर्ज भरला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली स्व-गणना पूर्ण केली. पंतप्रधानांनी भारतातील नागरिकांना आवाहन केले की, त्यांनी आपल्या कुटुंबाचा तपशील स्वतः  नोंदवून जनगणना प्रक्रियेत सहभागी व्हावे.केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री  अमित शाह यांनीही स्व-गणना पोर्टलद्वारे आपली गणना पूर्ण करून, या राष्ट्रीय प्रक्रियेतील  लोकांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आजपासून आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये -ज्यामध्ये अंदमान आणि निकोबार बेटे, गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप, मिझोरम, ओडिशा, सिक्कीम, तसेच राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील नवी दिल्ली महानगरपालिका परिषद परिसर आणि दिल्ली छावणी मंडळ यांचा समावेश आहे, ‘स्व-गणना’ प्रक्रिया सुरू झाली आहे. या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे 55,000 कुटुंबांनी पहिल्याच दिवशी या स्व-गणना सुविधेचा लाभ घेतला. या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘घरयादी आणि गृहगणना’  प्रक्रिया 16 एप्रिल 2026 पासून सुरू होईल आणि 15 मे 2026 पर्यंत चालेल.

‘स्व-गणना’ (Self-Enumeration) ही एक सुरक्षित आणि वेब-आधारित सुविधा असून, ती 16 प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. प्रथमच, गणनाकाराच्या भेटीपूर्वीच आणि तेही आपल्या सोयीनुसार, प्रतिसादकर्ते आपली माहिती ऑनलाइन भरू शकतात.

मागील जनगणनेप्रमाणेच, गणनाकार त्यांना नेमून दिलेल्या सर्व घरांच्या यादी-गटांमधील घरोघरी जाऊन भेटी देतील.  ‘स्व-गणना’  ही एक पूरक सुविधा म्हणून उपलब्ध असेल. स्व-गणनेमध्ये सहभागी होण्यासाठी, प्रतिसादकर्ते आपला मोबाईल क्रमांक आणि मूलभूत तपशीलांचा वापर करून se.census.gov.in या पोर्टलवर लॉग-इन करू शकतात. माहिती यशस्वीरित्या सादर केल्यानंतर, एकमेव विशेष  ‘स्व-गणना ओळख क्रमांक’ (SE ID) तयार होतो; पडताळणीसाठी, त्यानंतरच्या प्रत्यक्ष भेटीदरम्यान हा क्रमांक गणनाकारासोबत सामायिक केला जाईल.

‘घरनोंदणी आणि गृहगणना’  टप्प्यादरम्यान, घरांची स्थिती, घरातील सोयीसुविधा आणि कुटुंबाच्या मालकीच्या मालमत्तेविषयीची सविस्तर माहिती संकलित केली जाईल. हे महत्त्वपूर्ण निर्देशक नोंदवून घेण्यासाठी जे पुरावा-आधारित नियोजन, धोरण-निर्मिती आणि लक्ष्यित कल्याणकारी उपक्रमांचा पाया ठरतात. पहिल्या टप्प्यासाठी एकूण 33 प्रश्न जानेवारी 2026 मध्ये अधिसूचित करण्यात आले आहेत.

जनगणने अंतर्गत 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधी दरम्यान संपूर्ण देशभरात गृहसूची आणि गृहगणनेचा (HLO – Houselisting and Housing Census) टप्पा पार पाडला जाणार आहे. या सहा महिन्यांच्या कालावधीत, प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिथल्या तिथल्या सरकारद्वारे अधिसूचित केल्यानुसार सलग 30 दिवस प्रत्यक्ष जागेवर जाऊन (Field operation) ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यंदा पहिल्यांदाच घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणापूर्वी, स्व गणनेसाठी (Self-Enumeration) 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.  या सुविधेअंतर्गत नागरिकांना गणणेसाठी येणाऱ्या अधिकाऱ्याच्या (Enumerator) भेटीपूर्वीच, आपापल्या घरांमधूनच स्वतःची माहितीची डिजिटल पद्धतीने नोंदवण्याची सोय उपलब्ध करून दिली गेली आहे.

जनगणना हे प्रशासनाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे साधन असून, या गणनेतून भारताच्या पुढच्या दशकातील विकासाच्या नियोजनाचा पाया रचला जातो. जनगणना कायदा, 1948 अंतर्गत संकलीत केलेली माहिती पूर्णपणे गोपनीय असते. जनगणने अंतर्गत संकलीत केल्या जाणाऱ्या माहितीची सर्वोच्च मानांकीत सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने जनगणना 2027 साठी मजबूत एनक्रीप्शन सुविधेने तसेच बहुघटकीय प्रमाणीकरण सुविधांनी सज्ज असलेली साधनेच वापरली जात आहे. नागरिकांनी स्व गणनेच्या माध्यमातून अथवा गणणेसाठी येणाऱ्या अधिकाऱ्याच्या (Enumerator)  भेटीदरम्यान त्यांना पूर्ण सहकार्य करावे आणि या जनगणना प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी व्हावे असे आवाहन केले जात आहे.

***

1972 नंतर पहिल्यांदाच चंद्रानजीक पोहोचेल मानव:10 दिवसांत चंद्राभोवती फिरून परत येतील, लाँच झाले आर्टेमिस-II मिशन

अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने आज 2 एप्रिल रोजी ‘आर्टेमिस-2’ मिशन लाँच केले. पहाटे 4:05 वाजता ‘स्पेस लॉन्च सिस्टम’ (SLS) ओरियन स्पेसक्राफ्टमध्ये बसून 4 अंतराळवीर चंद्राकडे रवाना झाले. फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून हे प्रक्षेपण झाले.

1972 मध्ये ‘अपोलो-17’ नंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा एखादा माणूस पृथ्वीच्या खालच्या कक्षेला (LEO) पार करून चंद्राजवळ पोहोचेल. चारही प्रवासी या मिशनमध्ये चंद्राभोवती फिरतील आणि नंतर पृथ्वीवर परत येतील. हे मिशन 10 दिवसांचे आहे.
टेक-ऑफच्या ठीक एक तास आधी ‘लाँच अबॉर्ट सिस्टिम’मध्ये काही अशा अडचणी आल्या, ज्यामुळे लॉन्चिंगवर धोका निर्माण झाला होता. हे तेच सिस्टम आहे ज्याद्वारे कोणत्याही बिघाडाच्या स्थितीत नासाचे अभियंते अंतराळवीरांना सुरक्षितपणे बाहेर काढू शकतात.

मात्र, अभियंत्यांनी ही समस्या वेगाने सोडवली. त्यानंतर सेफ्टी चेकसाठी काउंटडाउन घड्याळ 10 मिनिटांवर थांबवण्यात आले. यानंतर रॉकेटच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या सिस्टिम्सची जबाबदारी सांभाळणाऱ्या अभियंत्यांचा ‘ओके’ रिपोर्ट आला.

शेवटी क्रूला संदेश मिळाला- “आर्टेमिस II, मी लॉन्च डायरेक्टर बोलत आहे, तुम्ही उड्डाणासाठी तयार आहात.” यावर कमांडर रीड वाइजमन यांनी उत्तर दिले, “आम्ही संपूर्ण मानवतेसाठी जात आहोत.” यानंतर लगेचच चार RS-25 इंजिन आणि दोन सॉलिड रॉकेट बूस्टर सुरू झाले आणि अंतराळवीर रवाना झाले.

उद्देश: ‘लाइफ सपोर्ट सिस्टिम’ची तपासणी नासाला हवी आहे

या मिशनचा उद्देश स्पेसक्राफ्टच्या ‘लाइफ सपोर्ट सिस्टम’ची तपासणी करणे आहे. नासाला हे पाहायचे आहे की, अंतराळात मानवाच्या राहण्यासाठी हे किती सुरक्षित आहे. यान सध्या चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार नाही, परंतु भविष्यात चंद्रावर मानवाच्या वस्तीचा मार्ग सुकर करेल.

पुण्यात ड्रग विक्री: 250 ते 300 जणांचे रॅकेट,8 आरोपी निष्पन्न

पुणे- पुण्यात २५० ते ३०० जणांचे एमडी ड्रग विक्रीचे मोठे जाळे उत्तमनगर पोलिसांनी उघडकीस आणले आहे. अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात अटक केलेल्या आरोपीच्या चौकशीतून हे रॅकेट समोर आले. पोलिसांनी आठ आरोपींना निष्पन्न केले आहे. आणि चौघांना अटक केली आहे .सुनील गोपाळ राठोड उर्फ राठ्या राठोड (वय २८), राजन गोपाल नायर (वय ३७), जतीन जयवंत कदम (वय २६, रा. वारजे) आणि शुभम संतोष दहिभाते (वय २८, रा. कोंढवे धावडे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

राठोड याच्याकडून दोन मेफेड्रॉनच्या पुड्या जप्त करण्यात आल्या. त्याच्या बँक खात्यावर तब्बल दहा लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार झाल्याचेही तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी एकूण २ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे, ज्यात ८.१९ ग्रॅम एमडी आणि एक दुचाकीचा समावेश आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी सांगितले कि,’ किडनॅपिंग मधील WANTED आरोपी नामे सुनिल गोपाळ राठोड हा सिंहगड सृष्टी परिसरात येणार असले बाबत गोपनिय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिह क्षीरसागर यांना मिळाली होती या माहिती वरुन त्यांनी पोलीस उप निरीक्षक अक्षय पाटील व स्टाफ यांना सदर माहिती सांगितली असता त्यांनी सदर ठिकाणी सापळा लावून या आरोपीस ताब्यात घेतले त्याची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलीस उप निरीक्षक पाटील यांनी ती माहीती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिह क्षीरसागर यांना कळवीली. या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्टाफ व पंचासह गेले व आरोपीची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडती मध्ये अंमली पदार्थाचे ३ ग्रॅम इतके मेफेड्रॉन (एम.डी.) व दोन मोबाईल मिळून आले आरोपीस चौकशी करिता उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे आणले असता त्यांचे मोबाईल तपासले असता आरोपी सुनिल राठोड याचे मोबाईलवर फोन पे व गुगल पे द्वारे प्रथमदर्शनी १० लाख रु पर्यंतचे व्यवहार मोबाईल वरुन केल्याचे दिसून आले. त्या बाबत त्याचे कडे चौकशी केली असता ६ ते ८ लोकांना ५.५ लाख रुपये दिल्याचे दिसून येत होते व जवळपास २५० ते ३०० जणांकडून पैसे अकाउंटला आल्याचे दिसून येत होत त्या बाबत विचारणा केली असता मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ विक्री करिता १) शुभम संतोष दहिभाते २) राजन गोपाल नायर ३) जतीन जयंवत कदम, व इतर WANTED ४ आरोपी यांचे कडून विकत घेवून मागणी प्रमाणे पुढे विकल्याचे सांगितले वरिल आरोपीतांचे पूर्व रेकॉर्ड तपासले असता त्यांच्यावर पुणे शहरामधील विवीध पोलीस स्टेशन ला गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद असल्याचे निदर्शनास आले.
यातुन मोठ्या प्रमाणात अंमलीपदार्थाचे व्यवसायिक दृष्टी कोणातून संघटित पणे व बेकायदेशिर रॅकेट चालत असल्याचे निष्पन्न झाले आरोपी सुनिल राठोड व त्याच्या सहकाऱ्यांनी अंमलीपदार्थाचे केलेले व्यवहार हे व्यावसायिक दृष्टीने झाल्याचे दिसुन आले म्हणून पोलीस उप निरीक्षक अक्षय पाटील यांची सरकार तर्फे तक्रार घेवून उत्तमनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे
या गुन्ह्याची व्याप्ती खूप मोठी असल्याने वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने उत्तमनगर पोलीस स्टेशन कडून आरोपी शुभम संतोष दहिभाते रा. उत्तमनगर पुणे यास अटक करुन दिनांक १/०४/२०२६ रोजी त्याचे राहत्या घराची घरझडती मध्ये ५.१९ ग्रॅम इतके मेफेड्रॉन (एम.डी.) मिळून आले. तसेच गुन्हे शाखा पुणे शहर यांनी आरोपी ३) राजन गोपाल नायर रा. उत्तमनगर, पुणे ४) जतीन जयंवत कदम, रा वारजे, पुणे या दोन आरोपींना ताब्यात घेवून उत्तमनगर पोलीस स्टेशन येथे पूढील तपासकामी आणून दिले आहे. सदर गुन्ह्यात एकून ८ आरोपी निष्पन्न असून त्यापैकी ४ आरोपी अटक करण्यात आले आहेत. न्यायलयाने गुन्ह्याची व्याप्ती पाहता अटक आरोपींना दिनांक ०८/०४/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिह क्षीरसागर उत्तनमनगर पोलीस स्टेशन हे करत आहेत. या गुन्ह्यात आत्ता पर्यंत एकून ८.१९ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) सह मोबाईल व वाहने असा एकून २,३६,५००/- रुपये चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार , पोलीस सह. आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग राजेश बनसोडे , अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख , पोलीस उप-आयुक्त , परिमंडळ ३ संभाजी कदम,पोलीस उप आयुक्त गुन्हे निखील पिंगळे ,सहाय्यक पोलीस आयुक्त सिंहगड विभाग अजय परमार, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर तसेच उत्तमनगर पोलीस स्टेशन तपास पथकाचे प्रमुख पोलीस उप-निरीक्षक चेतन धनवडे, पोलीस उप निरीक्षक अक्षय पाटील, पोलीस उप निरीक्ष मुकेश कुरेवाड, पोलीस हवालदार प्रदीप शेलार, पुथ्वीराज गायकवाड, पोलीस शिपाई चेतन बराटे, परमेश्वर पाडळे, ज्ञानेश्वर तोडकर, अनिरुध्द गायकवाड यांचे पथकाने केली आहे.

कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्षपदावरून सुनील तटकरे पदच्युत ? चर्चेचे वादळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्षपदावरून सुनील तटकरे यांना हटविण्यात आले किंवा कसे, या प्रश्नामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी चर्चा आणि साशंकता असून, सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला दहा मार्च रोजी दिलेल्या पत्रात त्या स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष व शिवाजीराव गर्जे खजिनदार ही दोनच पदे नमूद करण्यात आली आहेत. त्यामुळे पटेल व तटकरे यांचे काय ? या प्रश्नातून पक्षात नवी फूट पडते की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

सुनेत्रा पवार यांनी २६ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर त्याविषयीची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यासाठी सादर केलेल्या पत्रात पटेल आणि तटकरे यांच्या नावापुढे त्यांचे पदच लिहिलेले नसल्याने या दाव्याला बळ मिळत असल्याचे बोलले जात आहे. दहा मार्च रोजी आयोगाला सादर केलेल्या पत्रात सुनेत्रा पवार या अध्यक्ष, तर शिवाजीराव गर्जे हे कोषाध्यक्ष म्हणून नमूद आहे. पटेल आणि तटकरे यांच्या नावापुढे पदच लिहिण्यात आलेले नाही. याच पत्रात पवार यांनी २८ जानेवारीनंतर त्यांनी दिलेल्या पत्रापर्यंत करण्यात आलेला कुठलाही पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये, असेही अधोरेखित केले आहे.
सुनेत्रा पवार यांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार पवार यांच्या निवडीवर आयोगाने शिक्कामोर्तब केल्याने हा प्रश्न निकालात निघाला आहे. सुनेत्रा पवार यांच्या या पत्रात पक्षाचे पदाधिकारी व शिखर समितीत त्यांच्या व्यतिरिक्त प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, चेतन तुपे, माणिकराव कोकाटे, शेखर निकम, सुबोध मोहिते, शिवाजीराव गर्जे, सरोज अहिरे, सना मलिक, जय अजित पवार व धीरज शर्मा आहेत. यात प्रफुल्ल पटेल व तटकरे यांचा एकही कट्टर समर्थक नाही. धीरज शर्मा कोणाच्या पारड्यात आयत्यावेळी वजन टाकतील याची शाश्वती पक्षात कोणालाही नाही; तसेच छगन भुजबळ हेदेखील प्रसंगी सुनेत्रा पवार यांच्याच पारड्यात वजन टाकू शकतात. उर्वरित सर्व सदस्य हे सुनेत्रा पवार यांच्याच मर्जीतले असल्याने पक्षावर त्यांची पूर्ण पकड आल्याचे बोलले जाते.

अमेरिकेने इराणविरुद्धचे युद्ध जिंकले आहे,इराणचे सैन्य आता आमच्या नियंत्रणाखाली..ट्रम्प

वॉशिंग्टन डीसी-अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राला संबोधित करत आहेत. ट्रम्प यांनी घोषित केले आहे की, अमेरिकेने इराणविरुद्धचे युद्ध जिंकले आहे. इराणची क्षेपणास्त्र आणि ड्रोन क्षमता नष्ट करण्यात आली आहे. जगाने असा विजय यापूर्वी कधीही पाहिला नाही.ट्रम्प यांनी दावा केला आहे की इराणचे नौदल आता नष्ट झाले असून देशाची लष्करी ताकद लक्षणीयरीत्या कमकुवत झाली आहे. ट्रम्प युद्ध संपवण्यासाठी एक अंतिम मुदतही देण्याची शक्यता आहे.त्याच वेळी, ट्रम्प नाटोबाबत एक मोठा निर्णय घेऊ शकतात. कालच त्यांनी नाटोला ‘कागदी वाघ’ म्हटले होते आणि आपण नाटोमधून बाहेर पडण्याचा गंभीरपणे विचार करत असल्याचे सांगितले होते.

ट्रम्प यांनी आपल्या भाषणाची सुरुवात आर्टेमिस II च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल नासाच्या टीमचे अभिनंदन करून केली. त्यांनी चंद्रावर जाणाऱ्या चमूचीही प्रशंसा केली.

ट्रम्प यांच्या भाषणातील ठळक मुद्दे

इराणची क्षेपणास्त्र-ड्रोन क्षमता आणि नौदल नष्ट झाले.
इराणचे सैन्य आमच्या नियंत्रणाखाली आहे.
इराणचे सर्व प्रमुख नेते मारले गेले आहेत, तिथे सत्तांतर झाले आहे.
इराणने आपल्याच ४५,००० लोकांना ठार मारले.
ऑपरेशन एपिक फ्युरी अमेरिकेचे संरक्षण करत राहील.
इराणला अणुशक्ती बनू दिले जाणार नाही.
आपल्याला होर्मुझची गरज नाही; ज्यांना तिथून तेलाची गरज आहे त्यांनी त्याचे संरक्षण केले पाहिजे.
इराणला अणुबॉम्ब बनवण्याची परवानगी दिली जाणार नाही.
इराणला धोकादायक क्षेपणास्त्रे बनवायची होती.
आपण आपले लक्ष्य गाठण्याच्या अगदी जवळ आहोत.
सौदी अरेबिया आणि बहरीन यांना एकटे सोडले जाणार नाही.
इराण दोन-तीन आठवड्यांत मोठा हल्ला करणार आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणे ही आमची जबाबदारी नाही
ट्रम्प यांनी म्हटले आहे की अमेरिकेची प्रमुख सामरिक उद्दिष्ट्ये जवळपास साध्य झाली आहेत आणि इराणमधील ‘मोहीम’ संपण्याच्या जवळ आहे. तथापि, हे कार्य पूर्ण करण्यासाठी आणखी दोन ते तीन आठवडे लागू शकतात.इराणविरुद्धच्या लढ्यात सहभागी न झाल्याबद्दल ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मित्र राष्ट्रांवर टीका केली. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याची जबाबदारी आता त्या देशांनी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.ते असेही म्हणाले की, अमेरिका आपल्या तेलाच्या गरजांसाठी या मार्गावर अवलंबून नाही, त्यामुळे तो खुला करण्याची जबाबदारी घेणार नाही.

ट्रम्प यांनी असा इशाराही दिला की, जर कोणताही करार झाला नाही, तर अमेरिका तेहरानला ‘अश्मयुगात’ परत पाठवेल.ते असेही म्हणाले की, अमेरिका हळूहळू आणि पद्धतशीरपणे इराणची ती शक्ती नष्ट करत आहे, जी अमेरिकेला धोका निर्माण करू शकते किंवा आपल्या देशाबाहेर प्रभाव टाकू शकते.त्यांनी दावा केला की इराणचे नौदल, हवाई दल आणि क्षेपणास्त्र निर्मिती क्षमता नष्ट झाली आहे. ट्रम्प म्हणाले,
आज रात्री मला हे सांगताना आनंद होत आहे की, ही प्रमुख सामरिक उद्दिष्ट्ये आता जवळपास पूर्ण झाली आहेत आणि इराणमधील मोहीम यशस्वी होण्याच्या अगदी जवळ आहे. तथापि, हे पूर्ण होण्यासाठी आणखी दोन/तीन आठवडे लागू शकतात .

ट्रम्प यांनी म्हटले आहे की अमेरिकेची प्रमुख सामरिक उद्दिष्ट्ये जवळपास साध्य झाली आहेत आणि इराणमधील ‘मोहीम’ संपण्याच्या जवळ आहे. तथापि, हे कार्य पूर्ण करण्यासाठी आणखी दोन ते तीन आठवडे लागू शकतात.

इराणविरुद्धच्या लढ्यात सहभागी न झाल्याबद्दल ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मित्र राष्ट्रांवर टीका केली. होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याची जबाबदारी आता त्या देशांनी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.

ते असेही म्हणाले की, अमेरिका आपल्या तेलाच्या गरजांसाठी या मार्गावर अवलंबून नाही, त्यामुळे तो खुला करण्याची जबाबदारी घेणार नाही.
ट्रम्प यांनी आपल्या मित्रराष्ट्रांचे, विशेषतः इस्रायल आणि आखाती देशांचे आभार मानले. ते म्हणाले, “त्यांनी प्रचंड पाठिंबा दिला आहे आणि आम्ही त्यांना कोणत्याही परिस्थितीत त्रास होऊ देणार नाही किंवा अपयशी होऊ देणार नाही.”

ट्रम्प असेही म्हणाले की, इराणने या देशांवर अनेक वेळा हल्ले केले आहेत आणि म्हणूनच इराणकडे कधीही अणुशस्त्रे असू नयेत.
ट्रम्प म्हणाले की, त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच शपथ घेतली होती की ते इराणला अण्वस्त्रे मिळवू देणार नाहीत.

“जर अशा दहशतवाद्यांनी अण्वस्त्रे मिळवली, तर तो एक गंभीर धोका असेल. जगातील सर्वात हिंसक आणि जुलमी सरकारे अणुसुरक्षेच्या नावाखाली दहशत, जुलूम, कब्जा आणि सामूहिक हत्याकांडाच्या मोहिमा राबवू शकतील,” असे ट्रम्प म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “मी असे कधीही घडू दिले नसते, आणि आपल्या पूर्वीच्या कोणत्याही राष्ट्रपतींनीही असे घडू द्यायला नको होते. ही परिस्थिती ४७ वर्षांपासून सुरू आहे आणि यावर खूप पूर्वीच उपाययोजना करायला हवी होती.”
ट्रम्प म्हणाले की, इराणविरोधातील त्यांच्या कठोर धोरणामुळे, ज्यात त्यांच्या पहिल्या कार्यकाळात इराणसोबतचा २०१५ चा अणुकरार रद्द करण्याचा समावेश होता, मध्य पूर्व आणि इस्रायल मोठ्या संकटातून वाचले.

ट्रम्प यांच्या मते, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात झालेला हा करार जर कायम राहिला असता, तर इराणकडे अण्वस्त्रांचा मोठा साठा असता.

“जर हा करार चालू राहिला असता,” असा दावा ट्रम्प यांनी केला, “तर इराणने अनेक वर्षांपूर्वीच अण्वस्त्रे मिळवली असती आणि त्यांचा वापर केला असता. जग पूर्णपणे वेगळे असते. मध्य-पूर्व आणि इस्रायल आज कदाचित अस्तित्वातच नसते.”

खाजगी विमा कंपन्यांकडून दावे फेटाळण्याचे प्रमाण अन्यायकारक

खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्याकडून संसदेत लक्षवेधी; नियमन कडक करण्याची मागणी

पुणे: खाजगी आरोग्य विमा कंपन्यांकडून दावे उशिरा निकाली काढणे किंवा अन्यायकारकपणे फेटाळणे याचे प्रमाण वाढत असून, यामुळे सर्वसामान्य पॉलिसीधारकांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, अशी गंभीर बाब राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा विश्राम कुलकर्णी यांनी लक्षवेधीद्वारे संसदेत मांडली आहे.

प्रा. डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केले की, खाजगी विमा कंपन्या कॅशलेस उपचार व तत्काळ दावा निकाली काढण्याचे आश्वासन देतात. मात्र प्रत्यक्षात वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत अनेक कुटुंबांना दावा अंशतः मंजूर होणे, विलंब होणे किंवा विविध तांत्रिक कारणांवरून नाकारणे अशा अडचणींना सामोरे जावे लागते. पूर्वअस्तित्वातील आजार, कागदपत्रांतील त्रुटी किंवा धोरणातील अटी यांचा आधार घेत दावे फेटाळले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (आयआरडीएआय) वार्षिक अहवालानुसार २०२४-२५ या कालावधीत विमा क्षेत्रात सुमारे २.५७ लाख तक्रारी नोंदविण्यात आल्या असून, त्यापैकी सुमारे १.२२ लाख तक्रारी या दावा निकाली काढण्यासंदर्भातील आहेत. यामध्ये आरोग्य विम्याचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दावे निकाली काढताना विलंब, वारंवार कागदपत्रांची मागणी आणि दीर्घ पडताळणी प्रक्रिया यामुळे रुग्ण व रुग्णालयांना अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेकदा रुग्ण कॅशलेस सुविधेच्या अपेक्षेने रुग्णालयात दाखल होतात; मात्र डिस्चार्जच्या वेळी दावा निकाली न निघाल्याने कुटुंबियांना मोठी रक्कम उभी करावी लागते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक व मानसिक ताण वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या पार्श्वभूमीवर डॉ. कुलकर्णी यांनी केंद्र सरकारने विमा क्षेत्रावरील नियामक नियंत्रण अधिक कडक करावे, अन्यायकारक दावे फेटाळणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच रुग्णालयांशी समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र दावा व्यवस्थापक नेमावेत, पॉलिसीच्या अटींची विक्रीपूर्व पारदर्शक माहिती देणे बंधनकारक करावे आणि सर्व तक्रारी ३० दिवसांच्या निश्चित कालमर्यादेत निकाली काढण्याची व्यवस्था करावी, असेही त्यांनी सुचविले.

सर्वसामान्य पॉलिसीधारकांचे हित जपण्यासाठी आणि आरोग्य विमा व्यवस्थेवरील विश्वास टिकवण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

१३० जणांनी प्रत्येकी १.४० कोटी भरले पण बिल्डर घर देईना .. बिल्डर विरोधात प्राणत्याग आंदोलनाचा इशारा

पुणे-खराडी येथील व्हर्टीलास को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीतील 100 हून अधिक सदनिकाधारकांनी बुधवारी आपल्या हक्काच्या घरासाठी धरणे आंदोलन केले. 95 टक्के रक्कम भरूनही गेल्या दोन वर्षांपासून घरांचा ताबा मिळत नसल्याने रहिवाशांमध्ये तीव्र संताप आहे. या प्रकल्पात तब्बल 200 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे की, जर दहा दिवसांत घराचा ताबा मिळाला नाही, तर आत्मदहन किंवा इमारतीवरून उडी मारण्यासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागेल.

सदनिकाधारकांच्या म्हणण्यानुसार, बिल्डरने घराचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यानुसार 95 टक्के रक्कम जबरदस्तीने वसूल केली. मात्र, मुदत उलटून दोन वर्षे झाली तरी प्रकल्प अपूर्णच आहे. सुमारे 130 रहिवाशांनी प्रत्येकी 1.40 कोटी रुपये याप्रमाणे 200 कोटींपेक्षा अधिक रक्कम भरली असूनही प्रकल्पात कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही.

या प्रकरणी महारेरा आणि पोलीस प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. उलट पोलिसांकडून दडपशाही होत असल्याचा दावाही करण्यात आला. हा केवळ निष्काळजीपणा नसून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी जाहीर.

संघटन सरचिटणीसपदी प्रविणकुमार बिरादार यांची नियुक्ती

मुंबई, दि. १ एप्रिल २०२६
अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची नवी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली आहे. १२६ जणांच्या या कार्यकारिणीत खजिनदारपदी अनिकेत नवले व अक्षय जैन, संघटन सरचिटणीसपदी प्रविणकुमार बिरादार आणि प्रशासन सरचिटणीसपदी विवेक गावंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याशिवाय तनवीर विद्रोही, प्रशांत ओगले, प्रथमेश अबनावे, कपिल ढोके, अनुराग भोयर, आमेर अब्दुल सलीम, दिप्तेश परब, आफरीन हुसेन यांची उपाध्यक्ष पदी तसेच ४४ सरचिटणीस आणि ७४ प्रदेश सचिवांची नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, या कार्यकारिणीत सर्वसामान्य कुटुंबातील आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या युवक-युवतींना मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आली आहे. या कार्यकारिणीत तळागाळात काम करणाऱ्या आणि संघटनेसाठी सातत्याने झटणाऱ्या युवकांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे युवक काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण होणार आहे. या नव्या कार्यकारिणीमुळे युवकांमध्ये काँग्रेस पक्षाबद्दल आणि युवक काँग्रेसबद्दल आशादायी वातावरण निर्माण झाले असून, राज्यभरातून या निर्णयाचे स्वागत आणि कौतुक होत आहे. नव्या कार्यकारिणीतील पदाधिकारी काँग्रेस पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवतील व युवकांच्या प्रश्नांवर जोरदार आंदोलने करतील असा विश्वास युवक प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी व्यक्त केला आहे.

भाजपला मदत करणाऱ्या कॉंग्रेसच्या ७ नगरसेवकांचे निलंबन.प्रदेश कॉंग्रेस आक्रमक पवित्र्यात

मुंबई, दि. १ एप्रिल २०२६.. कॉंग्रेसमध्ये राहून भाजपाला मदत करणाऱ्या नेत्यांच्या आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या बाबत प्रदेश कॉंग्रेसने आता आक्रमक पवित्रा घेण्याचे ठरविले असून जालना महानगरपालिकेतील ७ नगरसेवकांना काँग्रेस पक्षाने निलंबित केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार हि कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

महानगरपालिकेत स्विकृत सदस्य नियुक्ती करतेवेळी काँग्रेस नगरसेवक फरुक सादिक तुंडीवाले, इम्रान खान आमानुल्ला खान, फरहाना अ. रऊफ अंसारी, सुनिल अशोक बोरडे, मयुरी दिनेश देने, रुबिना मजिद पठाण, अनिल अशोक तिरुखे या ७ नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षाला उघडपणे मदत करून पक्षशिस्तीचा भंग केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

आज सोन्याचे दर 2,836 ने वाढून 1.50 लाखांवर

सोन्या-चांदीच्या दरात आज 1 एप्रिल रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 2,836 रुपयांनी वाढून 1.50 लाख रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी त्याची किंमत 1.47 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम होती.

तर, एक किलो चांदीचा दर 9,348 रुपयांनी वाढून 2.39 लाख रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी त्याची किंमत 2.30 लाख रुपये प्रति किलो होती.
या वर्षी सोने-चांदीच्या किमतीत सतत चढ-उतार दिसून येत आहे. सोने 2026 मध्ये आतापर्यंत 16,374 रुपयांनी आणि चांदी 9,063 रुपयांनी महाग झाली आहे. या दरम्यान 29 जानेवारी रोजी सोन्याने 1.76 लाख रुपये आणि चांदीने 3.86 लाख रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता.

28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इझ्रायलचे इराणसोबत युद्ध सुरू झाल्यानंतर सातत्याने घसरण दिसून येत आहे. तेव्हापासून सोने 9,528 रुपयांनी आणि चांदी 27,217 रुपयांनी घसरली आहे.

ज्वेलर्सकडून सोने खरेदी करताना या 2 गोष्टी ध्यानात घ्या …

  1. प्रमाणित सोनेच खरेदी करा: नेहमी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) चा हॉलमार्क असलेले प्रमाणित सोनेच खरेदी करा. हा क्रमांक अल्फान्यूमेरिक म्हणजे AZ4524 असा असू शकतो. हॉलमार्किंगमुळे सोने किती कॅरेटचे आहे हे कळते.
  2. किंमत तपासा: सोन्याचे योग्य वजन आणि खरेदीच्या दिवशी त्याची किंमत अनेक स्त्रोतांकडून (उदा. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनची वेबसाइट) तपासा. सोन्याचा भाव 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेटनुसार वेगवेगळा असतो.

खऱ्या चांदीची ओळख करण्याचे 4 मार्ग

मॅग्नेट टेस्ट: खरी चांदी चुंबकाला चिकटत नाही. जर चिकटली तर ती बनावट आहे.

आईस टेस्ट: चांदीवर बर्फ ठेवा. खऱ्या चांदीवर बर्फ वेगाने वितळतो.

स्मेल टेस्ट: खऱ्या चांदीला वास येत नाही. बनावट चांदीला तांब्यासारखा वास येतो.

क्लॉथ टेस्ट: चांदीला पांढऱ्या कपड्याने घासा. जर काळा डाग आला तर ती खरी आहे.

रशियाचे मिलिटरी ट्रान्सपोर्ट प्लेन क्रिमियामध्ये क्रॅश:29 ठार; खडकावर आदळले

रशियाचे मिलिटरी ट्रान्सपोर्ट प्लेन An-26 मंगळवारी क्रिमियामध्ये क्रॅश झाले. यात 23 प्रवासी आणि 6 क्रू सदस्य होते. सर्वांचा जागीच मृत्यू झाला. रशियन वृत्तसंस्था तासच्या मते, आधी विमानाचा संपर्क तुटला होता. नंतर ते खडकावर आदळून दुर्घटनाग्रस्त झाले.

प्राथमिक तपासानुसार, अपघाताचे कारण तांत्रिक बिघाड असल्याचे मानले जात आहे. याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. प्रकरणाचा तपास सुरू आहे. An-26 विमान सोव्हिएत काळातील लष्करी वाहतूक विमान आहे. ते अँटोनोव्ह कंपनीने बनवले होते. याचे पहिले उड्डाण 1969 मध्ये झाले होते.

याचा वापर सैनिक, शस्त्रे आणि लष्करी साहित्य वाहून नेण्यासाठी केला जातो. यात एकाच वेळी डझनभर सैनिक किंवा जड मालवाहू वस्तू नेल्या जाऊ शकतात.

या विमानाचे वैशिष्ट्य आहे की ते लहान आणि खराब धावपट्टीवरूनही उड्डाण करू शकते. त्यामुळे याचा वापर दुर्गम आणि युद्धग्रस्त भागांमध्ये केला जातो. याच्या मागील मोठ्या मालवाहू दरवाज्यातून एअरड्रॉप ऑपरेशन्स देखील करता येतात.
50 वर्षांहून अधिक जुन्या डिझाइनमुळे त्याच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वेळोवेळी त्याचे अपघातही समोर आले आहेत. आजही अनेक देशांमध्ये हे विमान वापरले जात आहे, परंतु हळूहळू ते आधुनिक वाहतूक विमानांनी बदलले जात आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ

नवी दिल्ली – नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात व्यावसायिक गॅस सिलिंडर महाग झाल्याने झाली आहे. सरकारी तेल कंपन्यांनी त्याचे दर 218 रुपयांपर्यंत वाढवले आहेत. गेल्या एका महिन्यापासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराण युद्धाचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसताना दिसून येत आहे. आखाती देशांतील संघर्षामुळे जगातील अनेक देशांत ऊर्जा संकट ओढावण्याची शक्यता आहे. भारतातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असतानाच आता भारतातील व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.

तेल विपणन कंपन्यांनी प्रमुख महानगरांमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर्सच्या किमतीत १९५ रुपये ५० पैशांची वाढ केली आहे. ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’च्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये आता व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर्सची किरकोळ किंमत २ हजार ३१ रुपये, दिल्लीमध्ये २ हजार ७८ रुपये, कोलकाता इथं २ हजार २०८, आणि चेन्नईमध्ये २ हजार २४६ रुपये झाले आहेत.

पिंपळे निलख येथिल अनधिकृत RMC प्लॅन्टमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात – रविराज काळे.

पुणे- पिंपळे निलख येथील CNG पंपच्या मागे असणाऱ्या ग्रेस्टोंन इन्फ्रा व कार्निवल इन्फ्रा या दोन अनधिकृत RMC प्लॅनटमुळे मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषण व रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. पिंपळे निलख परिसरामध्ये या अनधिकृत RMC प्लॅन्ट मधून बराचसा धुर निघतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषण होत आहे. बाजूलाच एक अकॅडमी , कलमाडी शाळेचे खेळाचे मैदान,गार्डन, अनेक सोसायट्या, CNG पंप आहे त्यामुळे या ठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. गार्डनमध्ये लहान मुले. हे खेळण्यासाठी व जेष्ठ नागरिक व्यायामासाठी व विरंगुळ्यासाठी गार्डनमधे येतात. बाजूलाच अॅकडमी असल्याने अनेक खेळाडू आणि लहान मुले खेळण्यासाठी येत आहेत, श्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणावर होऊ शकतात. CNG पंपच्या मागे चालू असणारे RMC प्लॅन्ट अनधिकृत असल्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभागास पत्राद्वारे कळवून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभाने सिल लावलेले असतानाही RMC चालकाने सिल तोडून पुन्हा प्लॅन्ट चालू केला.तरी देखिल पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभाग गुन्हा दाखल करण्यास तयार नाही.तरी सुदधा पिंपरी चिंचवड महानगरपालिका पर्यावरण विभागाने कारवाई केली नाही.आता महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने महावितरण विभागास विद्युत प्रवाह रोखण्यासाठी पत्राद्वारे कळवण्यात आले आहे. असे आपचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी सांगितले.