ठाणे-उल्हासनगरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका महिलेला बेदम मारहाण करून, तिचे केस कापून आणि चपलांचा हार घालून विवस्त्र अवस्थेत तिची धिंड काढण्यात आली. या अमानुष अत्याचाराचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत तीन आरोपींना अटक केली आहे. हा सर्व प्रकार मंदिरात प्रवेश करण्याच्या वादातून आणि जुन्या वैमनस्यातून घडल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून ते वाघरी समुदायातील आहेत. हे दोन्ही पक्ष फुगे विकण्याचे काम करतात आणि त्यांच्यात आधीपासूनच वाद सुरू आहेत. आरोपींचा असा आरोप आहे की, पीडित महिलेने त्यांच्या देवतेबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते, ज्यामुळे त्यांनी तिला मंदिरात प्रवेश न करण्याची ताकीद दिली होती. याच वादाचे पर्यवसान गुरुवारी विठ्ठलवाडी परिसरात या अत्यंत घृणास्पद घटनेत झाले.
उल्हासनगर सेंट्रल पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर आवताडे यांनी सांगितले की, ही घटना गुरुवारी घडली असून व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगवान केली. पोलिसांनी शुक्रवारी दोन आणि शनिवारी एका आरोपीला अटक केली आहे. “नातेवाईकांनी महिलेवर देवतेचा अपमान केल्याचा आरोप केला आहे, आम्ही या आरोपांची पडताळणी करत आहोत. या प्रकरणात मारहाण करताना दिसलेल्या तीन जणांना अटक करण्यात आली असून, इतर चार फरार आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत असल्याने, सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवत आहोत,” अशी माहिती शंकर आवताडे यांनी दिली.

या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींनी यापूर्वीही या महिलेविरुद्ध एक एफआयआर (FIR) नोंदवला होता. आता पीडित महिलेवर झालेल्या अमानुष अत्याचारानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८ (२): धोकादायक हत्यारांनी किंवा साधनांनी दुखापत करणे. कलम ११५ (२): स्वेच्छेने दुखापत केल्याबद्दलची शिक्षा. कलम ३५१ (२)(३): गुन्हेगारी धमकी देणे. कलम ३५२: शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून केलेला अपमान. कलम १८९: बेकायदेशीर जमाव जमवणे, या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत असून फरार आरोपींना लवकरच बेड्या ठोकल्या जातील असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

