मुंबई-सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही पार्थ पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सध्या पार्थ पवार स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वेसर्वा समजू लागला आहे. अजित पवारांची जागा आपण घेतली, अशी भावना त्याच्या वागण्यात दिसते. पक्षात तो मनाप्रमाणे निर्णय घेत असून स्वतःच्या गटालाच महत्त्व देत आहे. त्याच्या भोवती स्वतःचीच टीम तयार झाली आहे. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना डावलले जात असल्याची भावना वाढत आहे. पार्थ पवार यांच्या वागण्यात सध्या अतिआत्मविश्वास आणि अहंकार दिसत असून त्यांच्या डोक्यात हवा गेल्याची चर्चा पक्षात सुरू आहे, अशा शब्दांत दमानिया यांनी निशाणा साधला.
पुणे- मुंढवा परिसरातील कोट्यवधी रुपयांच्या शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात तपास यंत्रणेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्रात (दिग्विजय पाटील यांचे नाव ‘आरोपी क्रमांक 2’ म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. सुमारे तीन महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या पहिल्या आरोपपत्रात केवळ शीतल तेजवानी यांचेच नाव होते. मात्र, आता दिग्विजय पाटील यांच्यावर दोषारोप निश्चित झाल्यामुळे या प्रकरणाला मोठे राजकीय व सामाजिक वळण मिळाले आहे.
दिग्विजय पाटील हे ‘अमेडिया’ कंपनीचे भागधारक आहेत. या जमीन व्यवहाराशी संबंधित महत्त्वाच्या दस्तऐवजांवर कंपनीच्या वतीने दिग्विजय पाटील यांची स्वाक्षरी आढळल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याच पुराव्याच्या आधारे पोलिसांनी त्यांच्यावर शासकीय जमीन परस्पर खरेदी करणे आणि व्यवहारात गंभीर अनियमितता केल्याचे आरोप ठेवले आहेत.
या घडामोडींवर प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. दमानिया म्हणाल्या की, या संपूर्ण गैरव्यवहाराचा खरा ‘मास्टरमाइंड’ पार्थ पवारच आहे. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून या 40 एकर जमिनीवर त्यांची नजर होती. हा व्यवहार पार्थ यांनी केला नसून केवळ दिग्विजय यांनी केला आहे, हे कोणालाही पटणारे नाही. या प्रकरणात दिग्विजय पाटील यांचा वाटा केवळ 1 टक्का, तर पार्थ पवार 99 टक्के भागीदार आहेत. पुढे बोलताना त्यांनी, दिग्विजय यांच्यावर झालेली कारवाई हे भाजप आणि सुनील तटकरे गटाचे एक राजकीय षडयंत्र असल्याचाही दावा केला.

