Home Blog Page 338

370 हटवणारे गृहमंत्री मराठा आरक्षणावर गप्प का?:शहा ‘बीएमसी’साठी लालबागच्या राजाकडे पण मराठ्यांकडे दुर्लक्ष

मुंबईकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईत येऊन काय केले? त्यांनी केवळ मुंबईचा महापौर हा भाजपचा झाला पाहिजे म्हणजे, गुजराती, अमराठी झाला पाहिजे हे भाजपच्या नेत्यांना सांगितले आहे. गृहमंत्री लालबाग च्या राजाकडे जात प्रार्थना करतात की मुंबईचा महापौर हा एक उपरा भाजपचा होऊ देत, असे म्हणत उबाठाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र डागले आहे. पण त्यांना मराठा समाजाचे दु:ख विचारण्यासाठी वेळ नव्हता.

संजय राऊत म्हणाले की, भर पावसात मराठा समाज बांधव उपोषणाला बसले आहेत. मुंबईतील अनेक भागात मराठा बांधव आल्याने तो परिसर विस्कळीत झाला आहे. काल इथे देशाचे गृहमंत्री अमित शहा येऊन गेले. त्यांच्याबरोबर भाजपचे सर्व लोक उपस्थित होते. इतका गंभीर प्रश्न मुंबईत सुरू आहे. तो प्रश्न केंद्र सरकारशी निगडीत आहे. तर आमची अपेक्षा होती देशाचे गृहमंत्री तिथे जातील आणि दिलासा देतील. तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील. 370 हटवून काश्मीर प्रश्न जर गृहमंत्री सोडवू शकतात त्यासाठी घटनेत बदल करु शकतात ते गृहमंत्री मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी घटनेत बदल करु शकतात. 370 कलम हटवण्याचे श्रेय जसे ते घेतात तसेच हे श्रेय त्यांना घेता आले असते. पण त्यांनी ते केले नाही.

संजय राऊत म्हणाले की, मुंबईमध्ये मराठी माणसाचा पराभव होऊ द्या आणि ही मराठी आम्हाला मिळावी ही प्रार्थना करण्यासाठी लालबाग च्या राजाच्या दर्शनाला गेले होते.म्हणून ज्या संख्येने मराठी बांधव मुंबईत जमत आहे त्यांचे आम्ही स्वागत करत आहोत. आम्हाला त्यांचा काहीच त्रास होत नाही. आम्ही त्यांचे स्वागत करु. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना आवाहन केले आहे, की मराठा बांधवांना जी काही मदत शक्य आहे ती आपण करावी. अमित शहांनी जो प्रकार केला तो अत्यंत क्रुर आहे.

संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे मराठी माणूस नाहीत. ते अमित शहा यांच्या मागे फिरत होते पण त्यांनी मराठा बांधवांसाठी काहीही केले नाही. मराठा बांधवांनी मुंबई आपली आहे हे लक्षात घेऊन मुंबईत मुक्काम केला पाहिजे. आमचा पक्ष त्यांच्या सोबत आहे आम्ही त्यांना सर्व काही सहकार्य करू. अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार मराठी माणसांना मारायला निघाले आहे. हे बोलतात एक आणि करतात एक असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. याचे सरकार मराठी माणसांना संपवण्यासाठी आलेले आहे. महायुतीतील तिघे एकमेकांना संपवण्याच्या नादात मराठी माणसांना संपवत आहेत. एकनाथ शिंदेंना शहांच्या मागे फिरायला लाज वाटायला हवी होती. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊ नका.

संजय राऊत म्हणाले की, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांनी मनोज जरांगे यांच्यासोबत उपोषणाला बसण्याची गरज आहे. पण ही सर्व लोकं भाजपच्या दबावाखाली आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. लोक प्रश्न विचारतील म्हणून शिंदे गावाकडे लपून बसले आहे. त्यांना महत्त्वाच्या क्षणी गावाकडे काय करत आहे.

पुणे महापालिकेने महावितरणला पिंपरी चिंचवड प्रमाणे रस्ते खुदाई शुल्क आकारावे-उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निर्देश

पुणे जिल्हा विद्युत सनियंत्रण समिती बैठक

पुणे, दि. ३१ ऑगस्ट, २०२५- पुणे शहर व जिल्ह्यात महावितरणमार्फत विविध योजनेतून विजेची पायाभूत कामे सुरु आहेत. मात्र भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून महावितरणला जादा खुदाई शुल्क आकारले जात असल्याने अनुमानित रकमेत प्रकल्पाची कामे होत नाहीत. त्यामुळे पुणे महापालिकेने पिंपरी चिंचवड महानगरपालिका ज्याप्रमाणे शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार रस्ते खुदाई घेते त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेनेही रस्ते खुदाई शुल्काची आकारणी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांनी जिल्हा विद्युत सनियंत्रण समितीच्या बैठकीत दिले.

            शनिवारी (दि. ३०) दुपारी सर्किट हाऊस सभागृहात जिल्हा विद्युत संनियंत्रण समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला आ. योगेश टिळेकर, आ. शरद सोनावणे, आ. बाबाजी काळे, आ. शंकर मांडेकर, आ. शंकर जगताप, आ. सिद्घार्थ शिरोळे, आ. चेतन तुपे, आ. बापुसाहेब पठारे यांचेसह जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी अर्चना पठारे, पिंपरी चिंचवड मनपाचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल काकडे व धर्मराज पेठकर, महापारेषणचे अधीक्षक अभियंता विठ्ठल भुजबळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            या बैठकीत महावितरणतर्फे जिल्ह्यात सुरु असलेल्या आरडीएसएस, पीएम सूर्यघर, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदींसह जिल्हा विकास निधीतून मिळणाऱ्या योजनेतील कामाचे सादरीकरण करण्यात आले. आरडीएसएस योजनेतून विद्युत वाहिन्यांचे बळकटीकरण करण्यासाठी १७८ कोटींचा निधी मिळाला आहे. यामध्ये जिल्ह्यात ११ नविन उपकेंद्रे व १७ उपकेंद्राची क्षमतावाढीसह इतर कामे होणार आहेत. वितरण हानी कमी करण्यासाठी पुणे शहरात १३२० किमी उच्चदाब वाहिन्या भूमिगत केल्या जाणार आहेत. तर १४६ ठिकाणी नविन रोहित्रे उभारली जाणारआहेत. तसेच ग्रामीण भागासाठी ५०५ कोटी निधी मिळाला असून यानिधीतून २४०८ किमी उच्चदाब व २०६४ किमी लघुदाब वाहिन्यांची कामे होणार आहेत. याशिवाय २९८४ वितरण रोहित्रेही उभारली जाणार आहेत.

आरडीएसएस योजनेतील कामांची व्याप्ती पाहता यामध्ये भूमिगत वाहिन्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याने व जादा खुदाई शुल्कामुळे या कामांच्या पूर्णत्वास विलंब होत असल्याचे पालकमंत्री महोदयांच्या निदर्शनास आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांनी महापालिका आयुक्तांना खुदाई शुल्क आकारणी करताना पिंपरी चिंचवड मनपाची कार्यपद्धती अवलंबावी. पिंपरी मनपा १०० रुपये प्रतिमिटर इतके पर्यवेक्षण शुल्क घेते. यामध्ये खोदलेला रस्ता दुरुस्त करण्याची जबाबदारी महावितरणची असते. तर पुणे महानगरपालिका प्रतिमिटर ६६०० रुपये इतकी आकारणी करते. ज्यामध्ये रस्ते दुरुस्तीचा अंतर्भाव आहे.

जिल्हा विकास निधीतूनही महावितरणला गतवर्षी ४० कोटी इतका नियतव्यय प्रस्तावित होता. त्यापैकी २१ कोटी निधी महावितरणला प्राप्त आहे. तर चालू २०२५-२६ वर्षासाठी महावितरणने जिल्हा विकास निधीतून ९४ कोटी रुपयांचा प्रस्ताव दिलेला आहे.

पीएम-सूर्यघर योजनेला गती द्या

पुणे जिल्ह्यात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा आतापर्यत २० हजार ७६ ग्राहकांनी लाभ घेतला आहे. त्याची स्थापित क्षमता जवळपास ९४ मेगावॅट इतकी आहे. या योजनेला महावितरणने अधिक गती द्यावी. त्याचा प्रचार प्रसार करुन वीज ग्राहकांना या योजनेसाठी प्रोत्साहित करावे असेही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांनी सांगितले.

महापारेषणला उपकेंद्राची कामे तातडीने सुरु करण्याचे निर्देश

पुणे जिल्ह्यात महापारेषण कंपनीची ११ अतिउच्चदाब उपकेंद्रे मंजूर आहेत. तर ११ अतिउच्चदाब केंद्रे प्रस्तावित आहेत. त्यापैकी ज्या उपकेंद्रांना मंजुरी मिळालेली आहे. त्यांची कामे तातडीने हाती घ्यावीत व ती वेळेत पूर्ण करावीत असे निर्देशही उपमुख्यंमत्री अजितदादा पवार यांनी महापारेषणचे अधीक्षक अभियंता विठ्ठल भुजबळ यांना दिले.

राजकीय आरक्षणासाठी आंदोलन सुरू, तामिळनाडूचे उदाहरण चुकीचे,मराठा समाजाला OBC आरक्षण देणे कायदेशीरदृष्ट्या अशक्य- चंद्रकांत पाटील

पंढरपूर -मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण सुरू केले असताना, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी तून आरक्षण देणे शक्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच, त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनावर आणि विरोधी पक्षांच्या भूमिकेवरही जोरदार टीका केली आहे.चंद्रकांत पाटील म्हणाले की, आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिली असतानाही सामान्य मुंबईकरांना वेठीस धरणे चुकीचे आहे. हे आंदोलन राजकीय असून, येणाऱ्या पंचायत राज निवडणुकीत ओबीसी आरक्षण घेऊन त्याचा राजकीय वापर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस कधीही खोटे बोलत नाहीत, पण काही लोक नेहमीच ‘खोटं बोल पण रेटून बोल’ असे करतात

चंद्रकांत पाटील म्हणाले की, मराठे हे सामाजिक मागास नाहीत. मराठ्यांना दलितांसारखी अस्पृश्यतेची वागणूक मिळालेली नाही, असे ते म्हणाले. त्यांनी EWS आरक्षणालाच मराठा समाजाचे खरे आरक्षण म्हटले. एखाद्या जातीला मागास ठरवण्याचा अधिकार केवळ मागासवर्गीय आयोगाला आहे, तो शिंदे समितीला नाही, असे स्पष्ट करत त्यांनी आंदोलनाच्या कायदेशीर बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, कायदेशीरदृष्ट्या ज्याचा दाखला नाही अशा मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसी मधून आरक्षण मिळणे अशक्य आहे. आता वेळ मारून नेण्यासाठी जरी काही मागण्या मान्य केल्या तरी त्या कायदेशीरदृष्ट्या टिकणाऱ्या नसतील.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, पितृसत्ताक पद्धतीनुसार सगेसोयरे हे फक्त वडिलांकडचेच मानले जातात, आणि आता लाखो मराठा बांधवांना कुणबी दाखल्याचा लाभ होत आहे. त्यांनी शरद पवार यांच्या तामिळनाडूच्या उदाहरणावरही टीका केली. तामिळनाडूचे आरक्षण अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे आणि ते टिकणारे नाही, असे पाटील म्हणाले.

40 वर्षांच्या ब्रिटिशकालीन नोंदी कशा नाकारता येतील?:पहिला नियोजन आयोग व शेड्युल्ड कास्ट कमिशननेही ते पुरावा म्हणून ग्राह्य धरले – विश्वास पाटील

मराठवाड्याच्या सलग चाळीस वर्षांच्या ब्रिटिशकालीन जनगणना नोंदी कशा नाकारल्या जातील, असा सवाल ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील यांनी उपस्थित केला आहे. इंडियन इव्हिडन्स ॲक्टनुसार ‘इम्पेरियल रेकॉर्ड कीपर्स’च्या नोंदींना कायदेशीर दर्जा असून, भारताच्या पहिल्या नियोजन आयोगापासून ते शेड्यूल्ड कास्ट कमिशनपर्यंत या आकडेवारीचा अधिकृत वापर झालेला आहे. अशा वेळी “मराठा कुणबी” समाजाचे स्पष्ट पुरावे समोर असूनही, त्याकडे डोळेझाक का केली जाते, असा थेट प्रश्न विश्वास पाटील यांनी उपस्थित केला आहे. सध्या मुंबई सुरू असलेल्या मराठा आरक्षण प्रश्नी विश्वास पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ब्रिटिशकालीन जनगणना नोंदीची माहिती दिली.

विश्वास पाटील यांची सोशल मीडिया पोस्ट जशास तशी…

मराठवाड्याच्या सलग, निरंतर 40 वर्षांच्या ब्रिटिशकालीन नोंदी कशा नाकारता ्र येतील? भारताच्या पहिल्या नियोजन आयोग व शेड्युल्ड कास्ट कमिशननेही ब्रिटिश रेकॉर्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरले होते. Indian Evidence Act 1872 नुसार “द इम्पेरियल रेकॉर्ड कीपर्स”च्या नोंदी सुद्धा ग्राह्य धराव्याच लागतील, असे ज्येष्ठ लेखक विश्वास पाटील म्हणालेत.

1881 मध्ये ब्रिटिशांनी शास्त्रशुद्ध सर्वच जाती व धर्मीयांची जनगणना पहिल्यांदा पार पाडली. . पुणे जिल्ह्याची जनगणना तर स्वतः महात्मा फुले यांच्या डोळ्यासमोर व सहकार्याने पार पडली. कारण ब्रिटिशांनी तेव्हा महात्मा फुले यांना पुणे मुनिसिपल कौन्सिलवर सरकार नियुक्त सदस्य म्हणून नेमले होते.

आज 1870 पासून ते साधारण 1908 पर्यंतचे मराठवाड्यातील व महाराष्ट्रातील जनगणनेचे सर्व जाती, उपजाती, पोटजाती, धर्म, भटके, विमुक्त या सर्वांच्या नोंदी या ब्रिटिशांनी नोंदवल्या. त्या उपलब्ध आहेत.

त्यानुसार तत्कालीन औरंगाबाद (जालना सह) लोकसंख्या किती होती?

1881/ 7,3 0380 1901/ 7,26407

पैकी 1901 च्या जनगणनेनुसार व तसेच इतर सर्व जनगणनानुसार, त्यामध्ये “मराठा कुणबी” अशी स्पष्ट 2,88,825 लोकांची नोंद झाली असून त्या नोंदीनुसार पुरुषांची संख्या 1,47,542 तर स्त्रियांची संख्या एक लाख 41 हजार 283 आहे.

नांदेड जिल्हा

1881. 636023 1901. 503684

यामध्ये “मराठा कुणबी” किंवा कापू या शीर्षकाखाली एक लाख 29 हजार 700 लोकांची नोंद आहे. ज्यामध्ये the purely agriculture casts number is 171 600 or about 34% , the most important among them being Maratha kunbi or kapus are 129700” अशी नोंद पान क्रमांक 226 वर केलेली आहे.

बीड जिल्हा

1881 558345 1901. 492258

पैकी “मराठा कुणबी” अशी स्पष्ट नोंद 196000 अशी आहे. तसेच पान क्रमांक 234 वर the most numerous caste is the “Maratha kunbi” 39% of the total population असे स्पष्ट म्हटले आहे.

नळदुर्ग उर्फ उस्मानाबाद जिल्हा (सध्याच्या लातूर मधील काही तालुक्यांसह)

1881. 583,402 1901. 535027

वरील पाच लाखांपैकी दोन लाख पाच हजार म्हणजे 38% लोकसंख्या ही कापू तथा “मराठा कुणबी” अशीच नोंदवली गेलेली आहे. पान क्रमांक 262 वर तशी इंग्रजीमध्ये स्वयंस्पष्ट नोंद आहे.

परभणी 1881. 685099 1901. 645765

पैकी कुणब्यांची संख्या दोन लाख 60 हजार 800 आहे. म्हणजे 40% असल्याची पान क्रमांक 216 वर नोंद आहे.

बिदर

1981. 788827 1901. 766129

तेव्हाच्या बिदर जिल्ह्यामध्ये कारी मुंगी, औराद, निलंगा, उदगीर, वारावल, राजुरा व काही जहागिरी अंतर्गत मधला हा भाग आहे. त्यानुसार तेव्हा बिदर जिल्ह्यामध्ये कुणबी तथा कापू एक लाख 13 हजार 800 राहत होते. धनगरांची संख्या 52 हजार तर महार 68 हजार व मांग तथा मातंग समाज 60000 अशी नोंद आहे.

पहिल्या ब्रिटिशांच्या जनगणनेवेळी हैदराबाद मध्ये Sir Richard Meade नावाचे ब्रिटिश रेसिडेंट होते. त्यांच्या नेतृत्वाखाली त्या काळात हजारो इंनोमीटर नेमून म्हणजेच पर्यवेक्षकांची फौज तयार करून ही जनगणना झालेली आहे. 1881 च्या आधीही Dr Bradley and company नावाच्या जगप्रसिद्ध कंपनीने गावोगाव जाऊन घोड्यावरून सर्व जाती व धर्मीयांचा सर्वे केलेला आहे. 1891 चे जनगणनेचे आकडे सुद्धा माझ्याकडे आहेत. त्यानुसार वरील सर्व जिल्ह्यांमध्ये, प्रत्येक तालुक्यात किती जातीचे धर्माचे शेड्युल कास्ट शेड्युल tribe, भटके , विमुक्त, वडार, फासेपारधी अशा सर्व जातींचा पूर्णता सर्वे झालेला आहे.

याचा दुसरा अर्थ असा की 1870 ते साधारण 1910 पर्यंतचे प्रत्येक तालुक्यातील उपविभागातील कुणबी मराठा समाजाचे आकडे व नोंदी स्पष्ट आहेत . ब्रिटिशांनी 1891 मध्ये The Imperial Records keeper हे कायदेशीर पद निर्माण केले होते. तसेच इंडियन इव्हिडन्स ॲक्टच्या नुसार या सर्व रेकॉर्डला कायदेशीर दर्जा आहे. एक दोन वर्षांच्या नव्हे तर 40 वर्षांच्या नोंदी कोणालाही नाकारता येणार नाहीत.

जर सार्वजनिक बांधकाम विभागात एखाद्या नदीवरचा पूल ब्रिटिशकालीन 1880 च्या दरम्यानचा असेल तर त्याची मोजमापे आजही इव्हिडन्स म्हणून गृहीत धरली जातात. मुद्रा विभाग तुरुंग कोषागार सर्व ठिकाणी जर हा पुरावा चालत असेल तर तुम्ही कायद्याच्या कोणत्या कसोटीवर गोरगरिबांच्या या नोंदी नाकारू शकता?

मी स्वयंप्रेरणेने ह्या गरीब, दरिद्री व “राजकीय दृष्ट्या नेतृत्वहीन मराठा समाजासाठी” स्वतःच्या खर्चाने गेली दीड वर्ष दिल्लीची पार्लमेंट लायब्ररी, मुंबईतील अभिलेखागार, हैदराबाद येथील लेखागार, सर्व काही अनेक वेळा जाऊन तपासले आहे. माझे वरील रेकॉर्ड व मी दिलेले आकडे हे अनेकदा टॅली केलेले आहेत.

मी स्वतः दिल्लीमध्ये जाऊन जनगणनेचे मदर रेकॉर्ड सुद्धा बघितले आहे. मी ही आकडेवारी याआधी आंदोलक आणि शासन यांना समक्ष भेटून दाखवण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने मी जमा केलेली जी सत्याधीष्टीत आकडेवारी आजपर्यंत कुठल्याही कोर्टामध्ये दाखल केली गेलेली नाही. जेव्हा महाराष्ट्रात डोळे झाकून “मंडल आयोग” लागू केला. तेव्हा तर ही आकडेवारी कोणी बघण्याचा प्रश्नच नव्हता.

जे लोक मराठवाडा किंवा महाराष्ट्रात वर्षानुवर्षे राहत होते ते त्याच गावात पुढे शंभर वर्षेही राहिले आहेत. हिरोशिमा किंवा नागासाकी सारखे बॉम्ब पडले म्हणून कोणी गावे सोडलेली नाही. फक्त सामाजिक दृष्ट्या बोलायचे तर मराठवाड्यातला मागासवर्ग हा 1972 च्या भीषण दुष्काळावेळी मात्र आपली गावी सोडून पुणे मुख्यतः आणि मुंबईकडे स्थलांतरित झाला होता.

या निमित्ताने माझे सर्वांना व्यक्तिगत असे आव्हान आहे की, जी ब्रिटिशकालीन आकडेवारी भारताचे पहिले प्लॅनिंग कमिशन किंवा शेड्युल्ड कास्ट कमिशन किंवा पार्लमेंट मधील मागासवर्गीय सदस्यांची संख्या निश्चित करताना डॉक्टर आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर पंजाबराव देशमुख अशा घटना तज्ञांनी सुद्धा अनेकदा गृहीत धरली होती. तिचा नियोजनासाठी वापर केला होता . ही आकडेवारी फक्त मराठा किंवा कुणबी किंवा मागासवर्गीयांची नसून ब्राह्मण, जैन तेली, ख्रिश्चन, त्या काळात भारतात येऊन राहिलेले चिनी डॉक्टर या सर्वांचे आकडेवारी आहे. तिचा आज गांभीर्याने का विचार होत नाही?

केवळ बोगस बोगस म्हणून ती बाजूला कशी ठेवता येईल ? केवळ “लागू पुरते सत्य” आणि “अर्धसत्य” स्वीकारून आदरणीय महात्मा फुले यांनी दाखवून दिलेल्या “सार्वजनिक सत्यधर्मा”कडे कसे पोहोचता येईल, याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार करावा.

शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा पुणे गणेश वंदन दौरा

0

“सार्वजनिक गणेशोत्सव ही लोकमान्य टिळकांची प्रेरणादायी परंपरा आहे; समाजसेवा व भक्तिभावाचा अद्वितीय संगम” — डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, दि. ३० ऑगस्ट २०२५ — महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज पुणे शहरातील मानाच्या गणपती मंडळांचा व प्रमुख ऐतिहासिक मंडळांचा दौरा करून गणरायाचे दर्शन घेतले. या दौऱ्यात त्यांनी श्री कसबा गणपती, श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती, श्री दत्त मंदिर, श्री मंडई गणपती, श्री तांबडी जोगेश्वरी, श्री गुरुजी तालीम गणपती, श्री तुळशीबाग गणपती आणि श्री गणेश केसरी वाडा येथे भेट देत दर्शन घेतले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “सन्माननीय लोकमान्य टिळकांनी सुरू केलेली सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा आजही समाजात भक्तिभाव, सामाजिक ऐक्य व सेवाभाव वाढवण्याचे कार्य करत आहे. पुण्यासह महाराष्ट्रभर हजारो गणेशभक्त या निमित्ताने एकत्र येतात, आणि लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांना श्री गणेश आपल्याकडून चांगले कार्य घडवण्यासाठी प्रेरणा देतात.”

केसरी वाडा गणपती मंडळाचे दर्शन घेतले त्यावेळी केसरीचे सरव्यवस्थापक श्री. रोहित टिळक हे आवर्जून उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे यांनी त्यांच्या फिजिओथेरपी शिबिरासारख्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. विविध गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवनावर आधारित ‘योद्धा’ हे पुस्तक भेट दिले व त्यांचा सत्कारही केला. सामाजिक सेवेच्या परंपरेला पुढे नेण्यासाठी, “गणपती मंडळांना वर्षभर सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी योजना आखण्याचा माझा मानस आहे व त्याबाबत लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.

या दौऱ्यात त्यांच्या सोबत भगिनी व स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी प्रमुख उपस्थित होत्या. तसेच, शिवसेना महिला आघाडीच्या सुदर्शना त्रिगुणाईत, सुरेखा कदम पाटील, अनिता परदेशी, कांताताई पांढरे, सारिका पवार, मनीषा परांडे, मीनल धनवटे, वैजयंती पाचपुते व किरण साळी (सचिव युवा सेना, महाराष्ट्र राज्य), आनंद गोयल (शहर संघटक, पुणे), राजू वीटकर (झोपडपट्टी विकास प्रमुख), नितीन पवार (उपशहर प्रमुख, कोथरूड) आणि शिवसेनेचे तसेच युवा सेनेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “राज्य सरकार व केंद्र सरकार या प्रश्नावर सकारात्मक दृष्टीकोन ठेवत आहेत. कोणाच्याही हक्कांवर गदा न आणता सर्व समाजघटकांना न्याय मिळावा हीच माझी गणरायाकडे प्रार्थना आहे.”
तसेच, येत्या महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढविण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी नमूद केले.

धनकवडीतही १० किलो गांजा पकडला, २५ वर्षीय विक्रेत्याला पकडले..

पुणे- वाघोली पाठोपाठ पुणे पोलिसांनी धनकवडी येथेही १० किलो गांजा पकडला आणि तो विक्रीसाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुणाला अटक केली .

पोलिसांनी सांगितले कि,’दि.२९/०८/२०२५ रोजी सहकारनगर पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार व पोलीस अंमलदार हे हद्दीत अवैध धंदे प्रतिबंधात्मक पेट्रोलींग करीत असताना रांका ज्वेलर्स पुणे सातारा रोड पुणे येथील मोरे वस्ती परिसरात आले असता पोलीस अंमलदार अमोल पवार व अभिजीत वालगुडे यांना सहकारनगर पोलीस स्टेशन कडील एन.डी.पी.एस. अभिलेखावरील जामीनावर असलेला आरोपी प्रसाद गणेश हारगुडे हा एका खोलीमधुन संशयीत रित्या बाहेर येताना दिसला. त्यावेळी तो पोलीसांना पाहुन पळुन जावु लागल्याने पोलीस अंमलदार अमोल पवार व अभिजीत वालगुडे यांनी त्यास थोड्याच अंतरावर पाठलाग करुन पकडुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांचे समक्ष हजर केले. त्यास पळुन जाण्याचे कारण विचारता तो उडवाउडवीची उत्तरे देवु लागला. त्याचा अंमली पदार्थाचे अनुषंगाने अधिक संशय आल्याने त्यास त्यांचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव प्रसाद गणेश हारगुडे वय २५ वर्षे रा. शंकर महाराज वसाहत, ज्ञानेश्वर सोसायटी मागे, एस.आर.ए. बिल्डिंग तीसरा मजला, धनकवडी पुणे असे असल्याचे सांगितले. पोलीस स्टाफ व पंचाना आरोपी ज्या खोलीमधुन बाहेर आला त्या खोलीमध्ये घेवुन गेला असता खोलीमध्ये अंमली पदार्थाचा उग्र वास आल्याने खोलीच्या मध्यभागी एका कापडी पिशवीमध्ये काहीतरी असल्याचे व त्यामधुन अंमली पदार्थाचा उग्र वास आल्याने सदरच्या पिशवीची पंचासमक्ष तपासणी केली असता त्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या एकूण ६ प्लॅस्टीक पिशव्या त्या प्रत्येक पिशवीमध्ये गांजा सदृश्य अंमली पदार्थ मिळुन आला, त्याबाबत सदर इसमाकडे चौकशी केली असता त्याने सदर गांजाचा माल हा त्याचे साथीदाराचा असुन मी त्याचेकडे कामाला असुन मी सदरचा गांजाचा माल पॅकींग करून चोरून विक्री करणार होतो असे सांगतिल्याने सदर ठिकाणाहुन एकुण ३,००,०००/- रु. किं.चा १० किलो १३८ ग्रॅम वजन असलेला गांजा हा अंमली पदार्थ सदर आरोपीच्या ताब्यात मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला असुन सहकारनगर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३६१/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट क. ८ (क), २० (ब) (II) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परि.२, मिलींद मोहीते सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग राहुल आवारे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती सुरेखा चव्हाण सहकारनगर पोलीस स्टेशन कडील सहा. पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोउपनिरी सद्दाम हुसेन फकीर, पोलीस अंमलदार बापु खुटवड, अमोल पवार, अभिजीत वालगुडे, बजरंग पवार, सागर सुतकर, निखील राजीवडे, किरण कांबळे, संजय म्हस्के, अशोक ढावरे, अमित पदमाळे, महेश भगत, सत्यवान बाठे व रवी कदम यांनी केली आहे.

राहुल यांच्यासमोर मोदी जिंदाबादचे नारे:BJP कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले; फ्लाइंग किस देत निघून गेले राहुल गांधी

आज बिहारमध्ये राहुल गांधींच्या मतदार हक्क यात्रेचा १४ वा दिवस आहे. भोजपूरमधील यात्रेदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना काळे झेंडे दाखवले. त्यांनी नरेंद्र मोदी झिंदाबादचे नारे दिले. राहुल गांधी निदर्शकांना फ्लाइंग किस देत पुढे सरकले.

शनिवारी आरा येथील वीर कुंवर सिंह स्टेडियममध्ये एक जाहीर सभा झाली. जिथे तेजस्वी यादव म्हणाले, ‘नितीश कुमार यांची आश्वासने ही कागदी होड्या आणि विमानांसारखी आहेत जी मुले बनवतात आणि उडवतात. तुम्ही असे सरकार बनवावे जे शिक्षण, औषध, उत्पन्न आणि सिंचन पुरवते. तुम्हाला मूळ मुख्यमंत्री हवा आहे की डुप्लिकेट? तुम्ही ठरवावे लागेल.’

त्याच वेळी, सपा प्रमुख अखिलेश यादव म्हणाले, ‘बिहारच्या लोकांना कळेल की भाजपचा रथ येथे आधी थांबला आहे. यावेळीही येथील लोक त्यांचा रथ थांबवतील.’

‘ते आधी मतदानाचा अधिकार हिसकावून घेतील, नंतर रेशनचा अधिकार. नंतर नोकरीचा अधिकार. ते तुम्हाला रस्त्यावर आणू इच्छितात. अन्यायाविरुद्धची लढाई अजूनही सुरू आहे.’

पीएम मोदींचे चीनमध्ये शानदार स्वागत ..ट्रम्प टॅरिफची दहशत, तब्बल सात वर्षांनी चीनला भेट

पंतप्रधान मोदी जपानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर एससीओ शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी शनिवारी चीनला पोहोचले आहेत. ते सात वर्षांनी चीनला पोहोचले आहेत. एससीओ शिखर परिषदेव्यतिरिक्त, पंतप्रधान मोदी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा देखील करतील. या दरम्यान, डिसेंबरमध्ये राष्ट्रपती पुतिन यांच्या भारत दौऱ्याच्या कार्यक्रमावर देखील चर्चा केली जाईल. पंतप्रधान मोदींचा हा दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा संपूर्ण जग अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणांशी झुंजत आहे. ट्रम्प यांनी भारतावर 50 आणि चीनवर 30 टक्के टॅरिफ लादला आहे. एससीओ शिखर परिषद 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान चीनमध्ये होणार आहे. 20 हून अधिक देशांचे नेते त्यात सहभागी होतील.गेल्या महिन्यात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनला भेट दिली होती, जिथे त्यांनी अध्यक्ष शी जिनपिंग आणि परराष्ट्र मंत्री वांग यी यांची भेट घेतली होती. जयशंकर यांनी जलसंपदा डेटा शेअर करणे, व्यापार निर्बंध, एलएसीवरील तणाव कमी करणे आणि दहशतवाद आणि अतिरेकांविरुद्ध कठोर भूमिका घेणे यासारख्या मुद्द्यांवर चर्चा केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या बैठकीमुळे मोदींच्या चीन दौऱ्याचा रोडमॅप तयार झाला होता.

मोदी आणि जिनपिंग यांची शेवटची भेट रशियामध्ये
मोदी आणि जिनपिंग यांची शेवटची भेट ऑक्टोबर 2024 मध्ये रशियातील काझान येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान झाली होती. यादरम्यान दोघांमध्ये द्विपक्षीय चर्चाही झाली. 50 मिनिटांच्या संभाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले होते की ‘सीमेवर शांतता आणि स्थिरता राखणे ही आपली प्राथमिकता असली पाहिजे. परस्पर विश्वास, परस्पर आदर आणि परस्पर संवेदनशीलता हा आपल्या संबंधांचा पाया राहिला पाहिजे.

जिनपिंग 2019 मध्ये भारताला भेटले
शी जिनपिंग यांनी 2019 मध्ये शेवटचा भारत दौरा केला होता. त्यानंतर दोन्ही नेत्यांची तामिळनाडूतील महाबलीपुरम येथे भेट झाली. ही भेट भारत-चीन संबंध मजबूत करण्यासाठी आणि परस्पर मतभेदांचे व्यवस्थापन करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल होते. दोन्ही नेत्यांनी सीमेवर शांतता आणि स्थिरता राखण्यासही सहमती दर्शविली.

एससीओची स्थापना 2001 मध्ये झाली
शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) ही 2001 मध्ये चीन, रशिया, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी स्थापन केलेली एक प्रादेशिक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. नंतर 2017 मध्ये भारत आणि पाकिस्तान त्यात सामील झाले. 2023 मध्ये इराणही त्याचा सदस्य झाला. एससीओचे उद्दिष्ट सदस्य देशांमधील सुरक्षा, आर्थिक आणि राजकीय सहकार्य वाढवणे आहे. ही संघटना दहशतवाद, अतिरेकीपणा, अंमली पदार्थांची तस्करी आणि सायबर गुन्हे यासारख्या मुद्द्यांवर एक समान रणनीती तयार करते.

“पर्यावरणपूरक गणेशोत्सवाने विमाननगरच्या गंगा नेब्युला सोसायटीत पसरवली आनंदाची लहर”

पुणे- विमाननगर येथील गंगा नेब्युला सोसायटीमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. हा वार्षिक उत्सव सोसायटीतील रहिवाशांच्या हृदयात विशेष स्थान राखतो आणि सर्वांना एकत्र आणणारा, जपणीय असा सोहळा ठरतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्सवात भक्तिभाव व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून रहिवाशांमध्ये एकात्मतेची भावना वृद्धिंगत होत आहे. तसेच, सोसायटी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देते व पर्यावरण रक्षणासाठी शाश्वत उपक्रम राबवते.

उत्सवाची सुरुवात भव्य मिरवणुकीने झाली, ज्यात सुंदररित्या सजविलेल्या बाप्पाच्या मूर्तीचे सोसायटीच्या परिसरात वाजत-गाजत स्वागत करण्यात आले. पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात आणि रहिवाशांच्या जल्लोषात ही मिरवणूक पार पडली. सोसायटीतील सर्व रहिवासी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी होतात. दररोज आरतीचे आयोजन करून गणरायाच्या चरणी प्रार्थना आणि आशीर्वाद मागितले जातात.

नृत्यप्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध स्पर्धा उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरतात. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक विशेष उत्साहाने या कार्यक्रमांत सहभागी होतात.

गणेशोत्सव हा केवळ श्रद्धा व संस्कृतीचा उत्सव न ठरता गंगा नेब्युला सोसायटीत एकतेचे बंध अधिक दृढ करणारा आणि समाजासाठी एक आदर्श ठरणारा सोहळा ठरतो.गणेशोत्सव हा केवळ श्रद्धा व संस्कृतीचा उत्सव न ठरता गंगा नेब्युला सोसायटीत एकतेचे बंध अधिक दृढ करणारा आणि समाजासाठी एक आदर्श ठरणारा सोहळा ठरतो.

वाघोलीत पकडला २८.८०२ किलोग्रॅम गांजा, २२ वर्षीय विक्रेत्याला अटक

पुणे – गणेशोत्सव काळात शहरामध्ये विक्रीसाठी आलेला २८ किलो गांजा जप्त करून पोलिसांनी गांजा विक्रेत्या आरोपीला पकडले आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहरामध्ये अंमली पदार्थांचे अवैध विक्रीवर आळा घालणेकरीता अंमली पदार्थाचे समुळ उच्चाटण करणेबाबत आदेशीत केले असल्याने दि.२८/०८/२०२५ रोजीवरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे गणेशोत्सव व गुन्हे प्रतिबंध, अवैध धंदयावर कारवाई करणेकामी पेट्रोलींग करीत असताना टिटॉज हॉटेल जवळ, वाघोली, पुणे येथे पोलीस अंमलदार प्रदिप मोटे यांना संशयित कार दिसल्याने त्यांना हटकले असता वाहन चालकाचे शेजारी बसेलला इसम हा घाईगडबडीने उतरुन पळुन गेला. त्यावेळी त्यांचेवर अधिक संशय आल्याने वाहन चालकास ताब्यात घेवून त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव विलेश धारासिंग पावरा वय २२ वर्षे रा. महादेव दोंदवाडा ता. शिरपुर जि. धुळे असे असल्याचे सांगितले. त्यावेळी विलेश धारासिंग पावरा याचे ताब्यातील चारचाकी गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये ५,७६,०४०/-रू.कि.चा २८.८०२ किलोग्रॅम गांजा, १०,०००/-रू.कि.चा मोबाईल, ५,००,०००/-रू.कि.ची चारचाकी गाडी असा एकूण १०,८६,०४०/- रू. किं. चा मुद्देमाल मिळून आला. सदरचा मुद्देमाल जप्त करून वाघोली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.४५८/२०२५, एन.डी.पी.एस. अॅक्ट क. ८ (क), २० (ब) (ii) (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीस नमुद गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, पुमनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परी.४, सोमय मुंडे, सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग पु श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक वाघोली पोलीस स्टेशन युवराज हांडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), आसाराम शेटे यांचे सुचनेप्रमाणे तपास पथक पोलीस अधिकारी पोउपनि मनोज बागल, पोलीस अंमलदार रमेश साबळे, बाबासाहेब मोराळे, राम ठोंबरे, प्रदिप मोटे, मंगेश जाधव, सुनिल कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दिपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रितम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे व सिध्दनाथ ढवळे यांनी केली आहे.

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना न्याय देण्याकरिता आयोग कटिबद्ध- उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम

पुणे, दि.३०:: महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक न्यायाची प्रतिबद्धता दाखविण्यासोबतच ती प्रतिष्ठापित करण्याकरिता आयोग कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत केले.

ॲड. मेश्राम म्हणाले, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाची १ मार्च २००५ रोजी स्थापना झाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन २०२४ मध्ये आयोगाचे पृथक्करण करत वैधानिक दर्जा देण्याचे काम केले. यामाध्यमातून सामाजिक न्यायाबद्दल असलेली त्यांची प्रतिबद्धता, संवेदनशीलता दिसून येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन संस्था (बार्टी), आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टार्टी) छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) यासंस्थेच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय प्रवर्गातील तसेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अनुषंगाने प्रशिक्षण देण्यात येते. यामध्यमातून त्यांचे राज्याच्या जडणघडण आणि विकासामध्ये योगदान निर्मितीच्या अनुषंगाने या संस्थेच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे. या संस्थेच्या कामकाजावर आयोगाचे लक्ष असून कामकाजात अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल.

काल पार पडलेल्या जन सुनावणीमध्ये बँकिंग सोल्यूशन (बीएस) एज्युकेशन संस्थेबाबत विविध माध्यमातून प्राप्त तक्रारीची दखल घेत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेला सखोल चौकशी करुन वस्तुनिष्ठ अहवाल आयोगाकडे १५ दिवसात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, या अहवालानुसार संबंधित संस्थेवर उचित कार्यवाही करण्यात येईल, असेही ॲड. मेश्राम यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतीचे नगर परिषदेमध्ये परावर्तन होत असतांना नगर विकास प्रशासनाच्यावतीने सफाई कर्मचारी या पदाचा आकृतीबंधात समावेश केलेला नाही, त्यामुळे अशा कर्मचारी, त्यांच्या कुटुंबियांना शासकीय लाभापासून वंचित राहावे लागले, याबाबत आयोगाने गंभीर दखल घेत नगर विकास प्रशासनाला तात्काळ प्रभावासह कारणे दाखवा नोटीस बजावली असून या पदाला आकृतीबंधात समावेश करण्याची शिफारस करण्यात आली आहे, असेही
ॲड. मेश्राम म्हणाले.

जरांगे अन् शिष्टमंडळ यांच्यातील चर्चा फिस्कटली; तासभरही वेळ वाढवून देणार नाही -जरांगे

मुंबई- सेवानिवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारचे शिष्टमंडळाने आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली आहे.मात्र ती फिस्कटली . यावेळी न्यायमूर्ती शिंदे यांनी राज्यभरात आतापर्यंत मिळालेल्या कुणबी प्रमाणपत्राची माहिती दिली. मराठवाड्यात एकूण 47 हजार कुणबी नोंदी सापडल्याचे म्हणाले. यावेळी शिंदे व मनोज जरांगे यांच्यात व्यासपीठावर माध्यमांपुढे चर्चा झाली आहे.
शिंदे समितीने एखाद्या व्यक्तीला जातीचा दाखला मिळू शकेल. मात्र, सरसकट समाजाला दाखला मिळू शकणार नाही सांगितलं. सर्व मराठ्यांना कुणबी ठरवता येणार नाही असे शिंदे समितीने जरांगे यांना सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम राहताना जोपर्यंत मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जीआर निघत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही, असे स्पष्ट केले. जीआर काढण्यासाठी कोणतीही मुदत देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान मराठवाड्यामधील मराठे कुणबी तत्वत: मान्य असल्याचं शिंदे समितीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज शिंदे समितीने आझाद मैदानात जात भेट घेतली. या भेटीमध्ये शिंदे समितीकडून आजवर करण्यात आलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला व सरकार काय करणार या संदर्भातील माहिती देण्यात आली. मात्र, शिंदे समितीकडून जे मुद्दे मांडण्यात आले त्याला बहुतांश मुद्द्यांना जरांगे पाटील यांनी विरोध केला.
हैदराबाद आणि सातारा गॅझेटिअरची तातडीने अंमलबजावणी करावी, यासाठी एक मिनिट सुद्धा वेळ देणार नाही अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली. शिंदे समितीकडून सांगण्यात आले की आतापर्यंत मराठवाड्यामध्ये दोन लाख 47 हजार नोंदी मिळाले असून त्यापैकी दोन लाख 39 हजार जणांना प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 58 लाख कुणबी नोंदी सापडले असून त्यामध्ये दहा लाख 35 हजार प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. दरम्यान हैदराबाद आणि सातारा गॅझेटिअर संदर्भात शिंदे समितीने अजूनही याबाबतीत निर्णय व्हायचा असल्याचे सांगितलं. अभ्यास करूनच गॅझेटिअरचे रूपांतर कायद्यात करावा लागेल असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान गॅझेटिअरसाठी सहा महिन्यांचा कालावधी लागेल असेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.

जरांगे म्हणाले, खरे तर इथे सरकारने यायला हवे होते. हे शिंदे समितीचे काम नाही. कारण, हे काम शिंदे समितीचे नाही. सरकारला इकडे यायला तोंड नाही. त्यामुळे ते या समितीला पुढे करत आहे. मी त्यांना सांगितले की, सातारा संस्थान गॅझेटियरमधील सर्व मराठा हा कुणबीमध्ये बसतो. हैदराबादच्या गॅझेटियरनुसार मराठवाड्यातील मराठा समाज हा सगळा कुणबी आहे. आम्हाला हे आत्ता अंमलबजावणीसह लागू पाहिजेत. त्याच्यात आम्ही एक तासाचाही वेळ देणार नाही. राहिला विषय केसेसचा, तर केससही सरकारने सरसकट मागे घेतल्या पाहिजेत. नोकऱ्या व निधीचा विषय ही समिती मंत्रिमंडळापुढे मांडणार आहे, असे जरांगे म्हणाले.

शिंदे समितीने बॉम्बे गव्हर्नमेंट व औंध संस्थानच्या गॅझेटियरसाठी वेळ मागितला. या दोन मुद्यांवर वेळ देण्यासाठी आमची तयारी आहे. पण पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या मुद्यावर एक मिनिटही वेळ मिळणार नाही, असे जरांगे म्हणाले.

शिंदे समितीला इकडे चर्चेसाठी पाठवणे हा मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या राज्य सरकारचा, राज्याच्या राजभवनाचा व दोन्ही कायदेमंडळाचा केलेला अपमान आहे. कारण, हे काम शिंदे समितीचे नाही. मुख्यमंत्र्यांकडून राज्यपाल भवनाचा अपमान होत आहे. सरकारने राज्य मंत्रिमंडळाला चर्चा करण्यासाठी पाठवण्याची गरज होती. पण त्यांनी शिंदे समितीला पाठवले. हे साफ चूक आहे. इथे विधान मंडळ अस्तित्वात आहे. इथे राज्यपाल अस्तित्वात आहेत. त्यानंतरही त्यांनी शिंदे समितीला पाठवून राज्याचा अपमान केला. स्वतः देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राच्या कायदेमंडळाचा अपमान करण्याचे काम करत आहेत. कदाचित त्यांचे तोंड काळे झाले असेल म्हणून त्यांनी ही समिती पाठवली असेल, असे जरांगे म्हणाले.

हैदराबाद गॅझेट म्हणजे नेमकं काय?
हैदराबाद गॅझेट म्हणजे 1918 साली तत्कालीन हैदराबाद निजामशाही सरकारने जारी केलेला आदेश/गॅझेट. त्याकाळी हैदराबाद संस्थानामध्ये मराठा समाज बहुसंख्य होता आणि त्यांची सत्ता व नोकऱ्यांमध्ये उपेक्षा होत असल्याची नोंद होती. म्हणून निजाम सरकारने मराठा समाजाला “हिंदू मराठा” या नावाने शैक्षणिक व नोकरीत आरक्षण (काही प्रमाणात राखीव जागा) देणारा आदेश काढला. हैदराबाद निजामशाहीने 1918 मध्ये काढलेल्या आदेशात मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण दिले होते. आजही मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात याचाच ऐतिहासिक पुरावा म्हणून हवाला दिला जातो.

हैदराबाद गॅझेटमधील मुख्य मुद्दे:

  1. हैदराबाद राज्यातील मराठ्यांना शासकीय नोकऱ्यांत व शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय.
  2. हा निर्णय अधिकृत गॅझेटद्वारे नोंदवण्यात आला, म्हणून त्याला “हैदराबाद गॅझेट” म्हटलं जातं.
  3. पुढे महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मागणीदरम्यान इतिहासातील आरक्षणाचा दाखला म्हणून हा गॅझेट वारंवार दाखवला जातो.
  4. मराठा समाज आधीपासूनच मागास म्हणून शासकीय कागदपत्रांमध्ये नोंद आहे, असा पुरावा म्हणून याचा वापर होतो.

अभिनेत्री जयश्री गडकर ज्यांनी ५ दशके सिनेसृष्टीत गाजविली

  1. नाचू किती नाचू किती कंबर लचकली (सुगंधी कट्टा)
  2. बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला (सांगत्ये ऐका)
  3. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा (मल्हारी मार्तंड)
  4. सोळावं वरीस धोक्याचं (सवाल माझा ऐका)
  5. कसं काय पाटील बरं हाय का (सवाल माझा ऐका)
  6. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे (साधी माणसं)
  7. बाई मी पतंग उडवीत होते (लाखात अशी देखणी)
  8. कशी गवळण राधा बावरली (एक गाव बारा भानगडी)
  9. कशानं आज माझ्या डोळ्यात लाज आली (काय हो चमत्कार)
  10. पप्पा सांगा कुणाचे (घरकुल)

हि अशी लोकप्रिय आणि ज्यांच्यावर चित्रित झाली त्या अभिनेत्री जयश्री गडकर यांचा आज स्मृतिदिन … आजच्या पिढीला त्यांची गाणी ठाऊक असतीलच पण त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्याबद्दलची माहिती नवरसिकांनी जाणून घ्यावी यासाठी हि माहिती

जयश्री गडकर : (21 फेब्रुवारी 1942 – 29 ऑगस्ट 2008).

Jayshree Gadkar and Mahipal in Poonam Ka Chand (1967)

प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ कार्यरत असणाऱ्या अभिनेत्री, निर्मात्या आणि दिग्दर्शिका. त्यांचा जन्म कर्नाटकातील कणसगिरी (ता. सदाशिवगड, जि. कारवार आताचा जि. उत्तर कन्नड) या लहानशा खेडेगावात झाला. लहानपणीच त्या मुंबईला आल्या. खेतवाडीतील महानगरपालिकेच्या शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. गिरगावच्या राममोहन हायस्कूलमधून त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. त्यांना लहानपणापासून नृत्याची आणि गाण्याची आवड होती. त्यांनी मास्टर नवरंग यांच्याकडे दहा वर्षे गाण्याची तालीम घेतली. त्यांनी कथ्थक नृत्याचे प्रशिक्षणही घेतले होते. हौशी रंगभूमीवरही त्यांनी काम केले. जयश्री यांचा रुपेरी पडद्यावरचा प्रवेश बाल कलाकार म्हणून झाला.निर्माते-दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे’ (1955) या गाजलेल्या चित्रपटातील नायिका संध्या यांच्याबरोबरच्या एका समूहनृत्यात भाग घेण्याची संधी जयश्रीबाईंना मिळाली. रशियाचे नेते न्यिकित ख्रुश्चॉव्ह हे भारत भेटीवर आले असताना त्यांच्यासाठी पुण्यात सादर केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ‘लटपट लटपट तुझं चालणं’ या गाण्यावर नृत्य केले. त्याची छायाचित्रे दिग्दर्शक दिनकर पाटील यांनी पाहिली आणि त्यांच्या ‘दिसतं तसं नसतं’ (1956) या चित्रपटात त्यांनी जयश्रीबाईंना नृत्याची संधी दिली. हा त्यांचा खऱ्या अर्थाने पदार्पणाचा चित्रपट मानता येईल. प्रसिद्ध चित्रपटकर्मी भालजी पेंढारकर यांची निर्मिती असणाऱ्या, राजा परांजपे दिग्दर्शित ‘गाठ पडली ठकाठका’ (1956) या चित्रपटात जयश्रीबाईंना पहिल्यांदा नायिका म्हणून संधी मिळाली. या चित्रपटात बाबूराव पेंढारकर, राजा गोसावी, सूर्यकांत, रमेश देव, गणपत पाटील अशा दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी काम केले.

यानंतर राजा गोसावींबरोबर त्यांनी ‘आलीया भोगासी’ (1957) हा चित्रपट केला. त्यांना पुढे ‘सांगत्ये ऐका’ (1959) या तमाशाप्रधान चित्रपटात साहाय्यक अभिनेत्रीची भूमिका मिळाली. या चित्रपटामध्ये हंसा वाडकर, चंद्रकांत, सूर्यकांत, रत्नमाला आणि वसंतराव पेहेलवान अशा आघाडीच्या कलाकारांबरोबर काम करताना जयश्रीबाईंच्या अभिनयाचा कस लागला आणि व्यक्तिरेखा दुय्यम असूनही त्यातल्या त्यांच्या कामगिरीमुळे त्यांचे नाव एकदम प्रकाशझोतात आले. हा चित्रपट खूप गाजला. पुण्याच्या विजयानंद चित्रपटगृहात 132 आठवडे चालून त्याने विक्रम केला. त्यातील ‘बुगडी माझी सांडली गं’ हे गाणे विशेष गाजले. हे गीत त्यातल्या जयश्रीबाईंच्या नृत्यचापल्य आणि अभिनयामुळे इतकी वर्षे उलटूनही रसिकांच्या स्मरणात आहे. त्यानंतरच्या त्यांच्या ‘सवाल माझा ऐका’ (1961) व ‘मल्हारी मार्तंड’ (1965) ह्या तमाशाप्रधान चित्रपटांना खूप प्रसिद्धी मिळाली. तसेच त्यांतील त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले. या दोन चित्रपटांतील ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘कसं काय पाटील बरं हाय का’, ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’ ही लावणी नृत्ये खूप गाजली.

जयश्रीबाईंवरचा तमाशाप्रधान चित्रपटाची नायिका हा शिक्का पुसून टाकून कारकीर्दीला नवे वळण देणाऱ्या अनंत माने दिग्दर्शित “मानिनी” (1961) या कौटुंबिक चित्रपटात त्यांनी प्रसिद्ध अभिनेते चंद्रकांत गोखले यांच्या नायिकेचे काम केले. गरीब पण स्वाभिमानी अशा मालतीची भूमिका त्यांनी त्यात यशस्वीपणे साकारली. या चित्रपटातील ‘खोप्यामधी खोपा’, ‘अरे संसार संसार’, ‘मन वढाय वढाय’ ही गाणी खूप गाजली. “मोहित्यांची मंजुळा” (1963) या ऐतिहासिक चित्रपटात त्यांनी पुरुष वेष धारण करून स्वराज्याच्या रक्षणार्थ लढाईत उतरलेली मराठमोळी वीरांगना साकार केली. साधी माणसं हा त्यांचा गाजलेला एक सामाजिक चित्रपट. यात त्यांनी व्यवसायाने लोहाराचे काम करणाऱ्या, सामान्य वाटणाऱ्या पण मनाने खंबीर अशा स्त्रीची भूमिका केली. फसवणूक झालेल्या पतीच्या मागे त्याच्याशी एकनिष्ठ राहून अनेक संकटांना सामोरे जाताना तिची झालेली ससेहोलपट जयश्रीबाईंनी या चित्रपटात परिणामकारतेने रंगवली. या चित्रपटाला लता मंगेशकर यांनी ‘आनंदघन’ या नावाने संगीत दिले होते. ‘ऐरणीच्या देवा तुला’, ‘वाट पाहुनी जीव शिणला’, ‘माळ्याच्या मळ्यामंदी’, ‘राजाच्या रंगम्हाली सोन्याचा बाई पलंग’, ‘नको देवराया अंत आता पाहू’ इत्यादी या चित्रपटातील गाणी आणि जयश्रीबाईंचा अभिनय इत्यादींमुळे हा चित्रपट यशस्वी झाला.

जयश्रीबाईंनी अवघाची संसार (1960), कलंक शोभा (1961), पवनाकाठचा धोंडी (1966), घरगंगेच्या काठी (1975) इत्यादी सामाजिक चित्रपटांत; याला जीवन ऐसे नाव (1959), पैशाचा पाऊस (1960) इत्यादी विनोदी चित्रपटांत; उतावळा नारद (1957), सुभद्राहरण (1963), गोपाळ कृष्ण (1965), तुलसी विवाह (1971) इत्यादी पौराणिक चित्रपटांत यशस्वी भूमिका वठवल्या. त्यांनी जे मोजके हिंदी चित्रपट केले त्यांत प्रायव्हेट सेक्रेटरी (1962), मदारी (1959), सारंगा (1961), बहारों के सपने (1967), तुलसी विवाह (1971), बजरंग बली (1976) इत्यादी गाजलेल्या पौराणिक आणि संतपटांचा समावेश आहे.

जयश्रीबाईंनी तमाशाप्रधान चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली, त्यामुळे अशाप्रकारच्या भूमिका त्यांच्या वाट्याला अधिक प्रमाणात आल्या. त्यातील दिलखेचक नृत्याभिनयाने त्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. याबरोबरच त्यांनी कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक अशा अडीचशेहून अधिक मराठी चित्रपटांतून वेगवेगळ्या धाटणीतल्या विविध व्यक्तिरेखा साकारल्या. यामुळे अष्टपैलू अभिनेत्री म्हणून त्या नावारूपास आल्या. मराठी चित्रपटाच्या सुरुवातीच्या कालखंडातील बहुतांशी दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केले. त्यांमध्ये भालजी पेंढारकर, राजा परांजपे, दिनकर पाटील, दत्ता माने, अनंत माने, राजा ठाकूर इत्यादी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज दिग्दर्शकांचा समावेश होतो. अभिजात सौंदर्य, नृत्यकौशल्य, कसलेला अभिनय यांच्या जोडीला चिकाटी आणि परिश्रम करण्याची क्षमता यांमुळे त्या मराठी चित्रपटसृष्टीत दीर्घकाळ चमकत राहिल्या. मराठी आणि हिंदी चित्रपटांशिवाय गुजराती, भोजपुरी, पंजाबी आणि तमिळ चित्रपटांतही त्यांनी भूमिका केल्या.

मराठी चित्रपटसृष्टीतील काही अभिनेत्यांसोबत जयश्रीबाईंनी केलेले काम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. सांगत्ये ऐका या चित्रपटापासून जयश्रीबाई आणि अभिनेते सूर्यकांत यांची जमलेली जोडी पुढे लग्नाला जातो मी, पंचारती (1960), वैजयंता, रंगपंचमी (1961), मल्हारी मार्तंड, साधी माणसं, पाटलाची सून (1965), लाखात अशी देखणी (1971) अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकली. अभिनेते अरुण सरनाईक यांच्याबरोबरच्या सवाल माझा ऐका , एक गाव बारा भानगडी (1968), घरकुल (1971), गणगौळण (1969) इत्यादी चित्रपटांतून ही जोडी रुपेरी पडद्यावर गाजली.

1975 साली जयश्रीबाई मराठी नाटक आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेते बाळ धुरी यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. विवाहानंतर जयश्रीबाईंनी त्यांच्यासोबत अशी असावी सासू (1996), हे दान कुंकवाचे (1983), मुंबई ते मॉरिशस (1991) इत्यादी चित्रपटांत काम केले. या दांपत्याला आनंद हे सुपुत्र आहेत. बाळ धुरी आणि आनंद धुरी यांनी ललितकलेला प्रोत्साहन देण्याकरता ‘जयश्री गडकर प्रतिष्ठाना’ची स्थापन केली आहे.

विवाहानंतरही जयश्रीबाईंची रुपेरी पडद्यावरची घोडदौड पुढे सुरू राहिली. दिग्दर्शक दत्ता केशव यांच्या “जिद्द” (1980) या चित्रपटापासून त्या चरित्र भूमिकेकडे वळल्या. निर्माते-दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या “रामायण” (1986) या दूरचित्रवाणी मालिकेत त्यांनी कौसल्या, तर त्यांचे पती बाळ धुरी यांनी दशरथाची भूमिका साकारली. या भूमिकांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. नंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतून चरित्र भूमिका केल्या. त्यांनी ‘सासर माहेर’ (1994), अशी असावी सासू (1996) या मराठी चित्रपटांची निर्मिती, लेखन व दिग्दर्शन केले. शिवाय त्यांत प्रमुख भूमिकाही केली.

जयश्रीबाईंना अनेक मानसन्मानांनी गौरवण्यात आले. मानिनी, वैजयंता, सवाल माझा ऐका, साधी माणसं, पवनाकाठचा धोंडी या चित्रपटांसाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्री या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. साधी माणसं, पाटलाची सून, थांब लक्ष्मी कुंकू लावते आणि घरगंगेच्या काठी या चित्रपटांसाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचे राज्य पुरस्कार प्राप्त झाले. घरकुलसाठी विशेष अभिनेत्री राज्य पुरस्कार त्यांना देण्यात आला. त्यांच्या चित्रपटसृष्टीतील यशस्वी कारकीर्दीकरता त्यांना व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, ग. दि. माडगूळकर आणि जनकवी पी.सावळाराम पुरस्कार यांनी गौरवण्यात आले. त्यांचे “अशी मी जयश्री” हे आत्मचरित्र 1986 साली प्रसिद्ध झाले. यामध्ये त्यांनी आपल्या चित्रपटातील कारकीर्दीचा वेध घेतला आहे. त्यांचे पती बाळ धुरी यांनी “सुवर्ण नायिका जयश्री गडकर – नक्षत्रलेणं” हे पुस्तक प्रकाशित करून त्यात आपल्या अभिनेत्री-पत्नीच्या पन्नास वर्षांच्या चित्रपटीय कारकीर्दीचा सर्वंकष पण साक्षेपाने आढावा घेतला आहे.

तब्बल पाच दशके मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या चतुरस्त्र कामगिरीमुळे अढळपद मिळवणाऱ्या या गुणी अभिनेत्रीचे वयाच्या 66 व्या वर्षी हृदयविकाराने मुंबईत निधन झाले.

अभिनेत्री जयश्री गडकर यांना मिळालेले पुरस्कार –

■ 1959 : ‘सांगत्ये ऐका’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा रसरंग फाळके पुरस्कार
■ 1962 : ‘मानिनी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राज्य सरकारकडून पुरस्कार (maharashtra state award)
■ 1963 : ‘साधी माणसं’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राज्य सरकारचा पुरस्कार
■ 1964 : ‘सवाल माझा ऐका’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राज्य सरकारचा पुरस्कार
■ 1965 : ‘थांब लक्ष्मी कुंकू लावते’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राज्य सरकारचा पुरस्कार
■ 1971 : ‘घरकुल’ चित्रपटासाठी special appearance साठी राज्य सरकारचा पुरस्कार
■ 1976 : ‘घर गंगेच्या काठी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राज्य सरकारचा पुरस्कार

मराठी चित्रपटसृष्टीतल्या या चौफेर प्रदीर्घ कारकिर्दीची दखल घेऊन 30 एप्रिल 2003 रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांना ‘व्ही. शांताराम पुरस्कार’ दिला. त्यापूर्वीही 1998 साली ‘गदिमा पुरस्कार’, 2001 मध्ये ‘झी अल्फा गौरव पुरस्कार’, 2003 मद्धे ‘झी चित्र गौरव पुरस्कार’, 2004 साली जनकवी पी. सावळाराम स्मरणार्थ ‘गंगाजमुना पुरस्कार’, 2005 मध्ये ‘समाजदर्पण’, सिने अँड टीव्ही आर्टिस्टतर्फे दिला जाणारा ‘सीण्टा’ पुरस्कार,यासह अनेक महत्त्वाचे पुरस्कार, सन्मान त्यांना लाभले.

कुटनीती:आंदोलकांची गळचेपी-मुंबईतील पाणपोया बंद, स्वच्छतागृहांना लॉक,दुकाने बंद – रोहित पवारांचा आरोप

मुंबई-शत्रूच्या सैनिकांची रसद ..खाण्यापिण्याचा साठा अडवून जशी युद्धात शत्रुसैनिक जेरीस आणले जातात त्याप्रमाणे कुटनीतीचा अवलंब करून मुंबईत आलेल्या आंदोलकांची गळचेपी करण्यासाठी मुंबईतील पाणपोया बंद, स्वच्छतागृहांना लॉक,दुकाने बंद ठेवण्यात आल्याचा आरोप होतो आहे. याबाबतआमदार रोहित पवारांनीहि आवाज उठविला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील मराठा बांधव राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत जमलेत. पण आता त्यांना सरकारकडून करण्यात येणाऱ्या कथित गळचेपीला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकारवर मुंबई शहरातील पाणपोया व स्वच्छतागृह बंद केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर मनोज जरांगे यांनी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. या प्रकरणी सर्वांचा हिशोब होईल. फक्त बीएमसीचा आयुक्त कोण आहे? त्याचे नाव लिहून ठेवा, असे ते म्हणालेत.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी शुक्रवारपासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. पण अजूनही त्यावर तोडगा निघाला नाही. त्यातच सरकारकडून कथितपणे आंदोलकांसाठी पायाभूत सुविधा पुरवल्या जात नसल्यामुळे स्थिती चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी सरकारवर पाणपोया व स्वच्छतागृह बंद केल्याचा आरोप केला आहे.

रोहित पवार शनिवारी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, मुंबई शहरातील पाणपोया बंद, रेल्वे स्थानकावरील तसेच इतर ठिकाणावरील सार्वजनिक स्वच्छतागृहांना काही ठिकाणी लॉक करण्यात आले आहेत तर काही ठिकाणी पाणी बंद करण्यात आले आहे. पिण्याचे पाणी देखील उपलब्ध केले जात नसल्याचे तसेच सामाजिक संघटना पाठवत असलेली मदत देखील ब्लॉक करण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे समजत आहे. खाऊगल्ल्या, टपऱ्या, हॉटेल्स देखील बंद ठेवण्याचे अलिखित आदेश आहेत. शांतेतेच्या मार्गाने आंदोलन करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आंदोलक माणसं आहेत याचा सरकारला विसर पडला की काय?

सरकार एवढे निष्ठुर झाले तर लोकशाहीलाच काय तर माणुसकीला सुद्धा अर्थ राहणार नाही. सरकारने त्वरित मूलभूत सुविधा द्याव्यात आणि आंदोलकांशी संवाद सुरू ठेवावा. संवाद ठेवल्यास संवेदनशीलता आणि सामंजस्य दाखवण्यास आंदोलक देखील सकारात्मक प्रतिसाद देतील आणि तोडगा निघेल, असे ते म्हणाले.

दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनीही या प्रकरणी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, बीएमसी व सीएसएमटी समोरच्या पोरांना विनंती आहे की, शांततेने घ्या. तुम्हाला जेवायला मिळाले नाही. मुख्यमंत्री तुम्हाला पाणी मिळू देत नाहीत. कारण सध्या प्रशासक आहे. त्यामुळे कंट्रोल सगळा मुख्यमंत्र्यांचा आहे. पण कधी ना कधीतरी वेळ बदलेल. तुम्ही सेवानिवृत्त झाले तरी आयुक्त साहेब तुम्हाला सुट्टी देणार नाही. कारण तुम्ही मराठ्यांच्या पोरांचे पाणी बंद केले. आजवर चांगल्या चांगल्यांची जिरली आहे, तर तुमचा काहीच विषय नाही. कधी ना कधी बदल होईल. त्यावेळी सगळा हिशोब होणार आहे. त्यांचे नाव फक्त लिहून ठेवा. बीएमसीचा आयुक्त कोण आहे? असे ते आयुक्तांना थेट इशारा देताना म्हणालेत.मुख्यमंत्र्यांचे ऐकून आयुक्तांनी आमच्या पोरांचे पाणी बंद केले. बाथरूम बंद केले. दुकाने बंद केली. पोलिसांनी आमच्या पोरांना डिवचू नये. विनाकारण ताण देऊ नये, असेही जरांगे यावेळी बोलताना म्हणाले.

इशाऱ्यानंतर प्रशासनाला जाग, आंदोलकांना सुविधा पुरवल्या

सततच्या पावसामुळे, आझाद मैदानावर झालेला चिखल हटवून प्रवेशमार्गावर 2 ट्रक खडी टाकून मार्ग समतल केला.
आझाद मैदान परिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी म्हणून मुंबई अग्निशमन दलाच्या माध्यमातून प्रखर झोताचे विद्युत दिवे उभारण्यात आले आहेत.
आंदोलकांसाठी पिण्याच्या पाण्याचे 11 टँकर्स उपलब्ध केले आहेत. अतिरिक्त टँकर्स मागविले आहेत.
आंदोलनस्थळ व परिसरात स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत सातत्याने स्वच्छता केली जात आहे. त्यासाठी समर्पित कर्मचारी तैनात आहेत.
वैद्यकीय मदत कक्ष उभारणी करून आरोग्य सेवा पुरवण्यात येत आहे.
4 वैद्यकीय पथक आणि 2 रुग्णवाहिका मैदान परिसरात 24 तास कार्यरत आहेत.
108 रुग्णवाहिका सेवा देखील उपलब्ध.
आझाद मैदान व परिसरातील “पैसे द्या आणि वापरा” या तत्त्वावरील तसेच इतर सर्व सार्वजनिक शौचालये आंदोलकांच्या वापरासाठी मोफत उपलब्ध.
मैदानात आतील बाजूस एकूण 29 शौचकूप असणारे शौचालय विनामूल्य उपलब्ध.
आझाद मैदानास लागून असलेल्या महात्मा गांधी मार्गावर प्रत्येकी 10 शौचकुपे असलेली 3 फिरती शौचालये उपलब्ध.
मेट्रो साइट शेजारी 12 फिरती (पोर्टेबल) शौचालये + अतिरिक्त शौचालयांची सोय.
तसेच, फॅशन स्ट्रीट पदपथ आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर मिळून 250 शौचकूपे असणारी फिरती शौचालये विनामूल्य वापरासाठी पुरवली आहेत.
पावसाळी परिस्थिती पाहता आझाद मैदान परिसरात कीटकनाशक धूम्रफवारणी सातत्याने केली जात आहे. त्यासाठी स्वतंत्र 2 पथके कार्यरत आहेत.
इतर आवश्यक सेवा सुविधा पुरवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून आंदोलन परिसरात सातत्याने पाहणी आणि देखरेख. नजीकच्या इतर कार्यालयांमधून अतिरिक्त अधिकारी, कर्मचारी, कामगार यांची नेमणूक.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने आझाद मैदान आणि परिसरातील कोणतीही उपाहारगृहे अथवा खाद्यपदार्थांची दुकाने बंद केलेली नाहीत, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा रोखलेला नाही.

मराठा आरक्षणावर शरद पवार म्हणाले-तामिळनाडूत 72 टक्के आरक्षण शक्य तर महाराष्ट्रात का नाही?घटनादुरुस्ती गरजेची..

अहिल्यानगर -मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन सुरू आहे. यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका मांडली आहे. “जर तामिळनाडूमध्ये 72 टक्के आरक्षण देता येऊ शकते, तर घटनेत बदल करून महाराष्ट्रातील मराठा समाजालाही न्याय देता येऊ शकतो. आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल, तर घटनादुरुस्ती आवश्यक आहे,” असे विधान त्यांनी अहिल्यानगर येथील कार्यक्रमात केले.

यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना स्पष्ट भूमिका मांडण्याचे आव्हान दिले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी स्पष्ट केले की, समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन वेळप्रसंगी संसदेत घटनादुरुस्ती करणे आवश्यक आहे.असेही ते म्हणाले.

सुप्रीम कोर्टाने 50-52% आरक्षण मर्यादा घालून दिली असली तरी तामिळनाडूसारख्या राज्यात 72% आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकले असल्याचे उदाहरण देत पवार यांनी मराठा आरक्षणासाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले.