Home Blog Page 337

नृत्य-संगीताच्या बहारदार मेजवानी ने पुणेकर मंत्रमुग्ध

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय स्कूल ऑफ परफाॅर्मिंग आर्ट्स पुणे च्या वतीने पुणे फेस्टिवल मध्ये आविष्कार भारती  कार्यक्रमाचे सादरीकरण
पुणे ः भक्तिरसाने नटलेले अभंग, ठुमरीच्या माधुर्यात गुंफलेली शब्दांची आणि संगीताची सुरेल मेजवानी, तर गझलेतील कोमल शृंगाराचा सुरेल आविष्कार…रसिकांना भुरळ घालणारे नाट्यसंगीत आणि यासोबतच भरतनाट्यम, कथक आणि सत्रिय नृत्याच्या मोहक सादरीकरणाने  पुणेकर मंत्रमुग्ध झाले. नृत्य व संगीताच्या या अद्वितीय कलाविष्कारातून रसिकांनी एक आगळावेगळा कलोत्सव अनुभवला. कार्यक्रमाचे संयोजन आणि मार्गदर्शन ऑफ परफाॅर्मिंग आर्ट्स चे संचालक  प्रा. शारंगधर साठे यांचे होते.

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय स्कूल ऑफ परफाॅर्मिंग आर्ट पुणे आयोजित आविष्कार भारती या कार्यक्रमाचे सादरीकरण बालगंधर्व येथे सुरू असलेल्या ३७ व्या पुणे फेस्टिव्हल मध्ये झाले. यावेळी स्कूल ऑफ परफाॅर्मिंग आर्टचे विद्यार्थी श्रृती विश्वकर्मा -मराठे, भाग्येश मराठे, नागेश आडगावकर यांनी गीतांचे सादरीकरण केले. तर स्कूल ऑफ परफाॅर्मिंग आर्ट मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थींनी नृत्याचे सादरीकरण केले. यावेळी पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अभय छाजेड  , मोहन टिल्लू, डॉ प्रवीण कासलीकर, डॉ. देविका बोरठाकूर हे उपस्थित होते. विनायक कुडाळकर, ऋषिकेश जगताप (तबला),  स्वानंद कुलकर्णी (हार्मोनियम), स्वप्निल सूर्यवंशी (पखवाज), ओंकार ओजागरे (कीबोर्ड ) यांनी साथसंगत केली. 

‘गणपत विघ्न हरण गजानन’ या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर मंदारमाला या नाटकातील ‘सोऽहम हर डमरू बाजे’ ही तोडी रागावर आधारित बंदिशीने रसिकांना पुन्हा भुरळ पाडली. ‘ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया’, ‘आओगे जब तुम ओ सजना’ या गझलेला रसिकांनी भरभरून दाद दिली. कार्यक्रमाचा मध्यांतर ‘युवती मना’  या गीताने झाला. त्यानंतर कथक, भरतनाट्यम, मोहिनीहट्टमआणि सत्रिय नृत्याच्या सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली. विद्यार्थ्यांच्या नृत्याविष्काराने कार्यक्रमाचे  शिखर गाठले. 

देशी झाडांचे महत्त्व पटवून देत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प

कस्तुरे चौक गणेशोत्सव मंडळाने गणेशभक्तांना दिले देशी झाडांचे प्रसादरुपी बीजगोळे


पुणे : पूर्व भागातील कस्तुरे चौक गणेशोत्सव मंडळाने वेगळा उपक्रम राबवत गणपती बघायला येणाऱ्या भाविकांना प्रसादासोबत देशी झाडांचे बीज गोळे दिले. यासोबतच देशी झाडांच्या बिया देखील वाटण्यात आल्या. कार्यकर्त्यांनी देशी झाडांचे रोपण आणि संवर्धनाचा संकल्प करत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही त्याचे महत्त्व पटवून दिले.

मंडळातर्फे १ हजार हून अधिक बीज गोळे आणि देशी झाडांच्या बिया गणेश भक्तांना देण्यात आले आहेत. यावेळी राजेश होनराव, वनेश गोरले, अभिजित मानकर, दिपक कोंढरे, बाबा सट्टे, सुयश भगत, योगेश येनपुरे, धनराज राठी, ऍड.उमेश झाडे, बंटी मोटे, संजय धांडे व मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंडळाचे अध्यक्ष राजेश होनराव म्हणाले, सध्या  देशी झाडांचे प्रमाण कमी होत चालले आहे. शोभेची झाडे लावली जातात; पण पिंपळ, वड, आंबा, बाभूळ, कडुलिंब, चिंच यांसारखी उपयुक्त देशी झाडे सहसा कोणी लावत नाही. ही झाडे केवळ सावली, ऑक्सिजन आणि औषधी गुणधर्मासाठीच नव्हे तर पक्षी व प्राण्यांसाठीही उपयुक्त ठरतात. पर्यावरणाचा समतोल राखण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे देशी झाडांचे बीज गोळे देण्यात आले आहेत.

पवारांनी मराठ्यांचे वाटोळे केले हे काही पटण्यासारखे नाही. आंदोलकांच्या समोर निधड्या छातीने जाण्याची हिंमत सरकारमध्ये नाही

पुणे-मुंबई येथील काही आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना घेरण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया सुळे गाडीत बसल्यावर त्यांच्या गाडीवर पण्याच्या बॉटल फेकल्याची घटना घडली. यावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया देत महायुती सरकारवर टीका केली आहे.पवारांनी मराठ्यांचे वाटोळे केले हे काही पटण्यासारखे नाही. आंदोलकांच्या समोर निधड्या छातीने जाण्याची हिंमत सरकारमध्ये नाही अशी वक्तव्ये त्यांनी प्रतिक्रिया देताना केली आहेत .

सुषमा अंधारे म्हणाल्या, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस असताना सुद्धा सत्तास्थानी नसणाऱ्या 85 वर्षाच्या पवारांनी आपले प्रश्न सोडवावेत ही अपेक्षा जर पवारांकडूनच केली जात असेल तर याचा अर्थ फडणवीस यांचा नाकर्तेपणा अधिक सिद्ध करणारी आणि 85 व्या वर्षी सुद्धा पवारांकडून अपेक्षा सकारात्मकता दाखवणारी आहे. खरेतर या आंदोलन स्थळी सत्तेत असलेले एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जायला हवे, मात्र या आंदोलकांच्या समोर निधड्या छातीने जाण्याची हिंमत सरकारमध्ये नाही. अशावेळी आपल्या भावंडांची विचारपूस करण्यासाठी सुप्रिया सुळे तिथे पोचत असतील तर हे स्वागतार्ह आहे.सुप्रिया सुळे मराठा आंदोलकांना भेटण्यासाठी गेल्या असता काही लोकांनी त्यांना घेराव घातल्याची बातमी मोठी करून दाखवली जात आहे. ब्रेकिंग न्यूज च्या नावाखाली “पवारांनी मराठ्यांचे वाटोळे केले” अशी ही एक बातमी दाखवली जात आहे. खरंतर मी पवारांची अनेक वर्ष टीकाकार राहिले आहे. मात्र पवारांनी मराठ्यांचे वाटोळे केले हे काही पटण्यासारखे नाही. महाराष्ट्रात संस्थात्मक काम उभा करण्यामध्ये पवारांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. सहकार क्षेत्राचे कार्य जाळे पवारामुळेच महाराष्ट्रात गावा खेड्या पर्यंत पोहोचू शकले.

पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये दिसणाऱ्या मराठा समुदायाच्या शिक्षण संस्था, साखर कारखाने, ऑइल मिल, डाळ मिल, पेपर मिल, दूध डेरी हे उभे करण्यात नक्कीच पवारांचे योगदान आहे. आज घडीला भाजपने ज्या अनेक नेत्यांना मांडीवर घेतले आहे हे नेते सुद्धा पवारांनीच उभे केले आहेत. एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर झिरोवर आणून भाजपासोबत सत्तेत बसलेले अजित पवार हे शरद पवारांनीच घडवलेले आहेत. अजित पवारांना राजकारणात तयार करणे म्हणजे मराठ्यांचे वाटोळे करणे असे असेल तर मग अजित पवारांच्या सत्तास्थानी असल्याचे लाभ घेणारे सगळे कोण आहेत ते एकदा शोधले पाहिजेत.

मराठा आरक्षणाची मागणी पवारांच्या ऐन उमेदीच्या काळात कधीही झाली नाही. या मागणीने जोर धरला तो साधारण 1992 नंतर. पण तोपर्यंत पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी नावाचा नवा पक्ष स्थापन केला होता. आणि या पक्षाची केंद्रात कधीही सत्ता आली नाही. इतरांच्या मदतीने केंद्रातल्या सत्तेचे एखादे पद नक्की मिळालेले असेल. मात्र संपूर्ण पक्षाची अशी सत्ता केंद्रात कधीही मिळाली नाही, अशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, 1995 ते 2005 या काळामध्ये विविध मराठा संघटनांची आरक्षणांवर चर्चा आणि बैठका जेव्हा सुरू झाल्या विशेषतः संभाजीनगर येथे क्रांती सेनेच्या शालिनी पाटील, मराठा संग्रामचे विनायक मेटे, छावाचे अण्णा जावळे किंवा अनेक संघटना जेव्हा एकत्र आल्या तेव्हा त्या मंचावर शरद पवारही होते. पण तेव्हा आर्थिक निकषावर आरक्षण मिळाले पाहिजे याची चर्चा सुरू झाली होती. आरक्षणाची जी आजची मागणी आहे ती ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे अशी आहे आणि ही मागणी एका तांत्रिक पेचात अडकलेली आहे.

50 टक्के पेक्षा आरक्षणाची मर्यादा वाढवता येत नाही हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय या फेरबदल करण्याची क्षमता जर कुणाची असेल तर ती फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयाशी समक्ष असणारी दुसरी संस्था म्हणजे संसदेची. संसदेत सत्ता पवारांची नाही तर ती भाजपाची आहे. मग तरीसुद्धा सुप्रिया सुळेंना घेराव का घातला जावा? तर याचे उत्तर सोपे आहे. आपल्याला भूक लागली तर आपण शेजाऱ्यावर चिडचिड करत नाही आपल्या घरातल्या आई किंवा बाबाकडे हक्काने मागतो, असे अंधारे यांनी म्हटले.

गेल्या तीन दिवसांपासून मराठ्यांची अन्ना-पाण्याची रसद फडणवीस यांनी तोडली. आझाद मैदानावरची वीज बंद ठेवली. तरीही मराठी लढत आहेत. अशावेळी आपल्या संयमाचा बांध फुटला तर आपली सगळी भडास निश्चितच आपल्याच माणसांवर निघेल. संसदेत आरक्षणाच्या प्रश्नावर वारंवार भूमिका मांडणाऱ्या सुप्रिया सुळे या अर्थाने जर त्यांना आपली हक्काची बहीण वाटत असेल तर हे अत्यंत सकारात्मक आहे.

अजित पवार सर्व कार्यक्रम रद्द करून मुंबईला

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणारे उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे उद्घाटन अखेर फक्त शरद पवार यांच्या हस्तेच झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार तातडीने मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने उरुळी ग्रामपंचायतीचे कामकाज साकारण्यात आले आहे, त्यामुळे त्यांनी उपस्थित राहावे अशी गावकऱ्यांची अपेक्षा होती. तसेच, नवीन महानगरपालिका उभारण्याच्या प्रक्रियेत उरुळी कांचनचा समावेश होणार आहे. गावासाठी अनेक प्रस्ताव अजित पवार यांनी केले आहेत. यापूर्वी उरुळी कांचनमधील शाळा, रस्ते आणि इतर विकासकामे शरद पवार यांच्या हस्तेच झालेली आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी या कार्यालयाचे उद्घाटन शरद पवार आणि अजित पवार यांच्या संयुक्त हस्ते व्हावे, अशी मागणी केली होती. परंतु गेल्या अनेक कार्यक्रमांत अजित पवार, शरद पवारांसोबत मंचावर येणं टाळत असल्याचे चित्र दिसून आले आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्येही शरद पवारांच्या शेजारी बसणं अजित पवार टाळत असल्याचे उदाहरण पाहायला मिळाले आहे. त्यामुळे दोघे एकत्र आल्यावर नेहमीच राजकीय चर्चांना उधाण येते.दरम्यान, मनोज जरांगे यांनी आझाद मैदानावर मागील तीन दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी आज मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक बोलावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कोणता निकाल लागतो किंवा मनोज जरांगे यांना काय दिलासा मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरसकट कुणबी संबोधण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

मुंबई-मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे, मात्र मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने या मागणीला स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दोन्ही न्यायालयांचे निकाल हा या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरला आहे. हा पेच सोडवण्यासाठी उपसमितीचे प्रमुख मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्याच्या महाधिवक्त्यांसोबत सायंकाळी 5 वाजता बैठक बोलावली आहे.

यापूर्वी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या प्रकरणांमुळे ‘सरसकट कुणबी’ असा उल्लेख करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे, मराठा आरक्षणाचा मार्ग काढण्यासाठी उपसमितीची ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. या बैठकीनंतर नेमका कोणता तोडगा निघतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

पहिले प्रकरण

जगन्नाथ होले यांनी बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांच्या 2001 च्या कुणबी प्रमाणपत्रावर आक्षेप घेतल्याने हा वाद सुरू झाला. यावर दाद न मिळाल्याने होले यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.

17 ऑक्टोबर 2003 रोजी, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.एच. मार्लापल्ले आणि ए.एस. बग्गा यांच्या खंडपीठाने निकाल दिला. या निकालातील परिच्छेद 17 मध्ये नमूद केले आहे की, जर हे प्रमाणपत्र ग्राह्य धरले, तर महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाज कुणबी म्हणून स्वीकारावा लागेल, जे एक ‘सामाजिक मूर्खपणा’ ठरेल.

या निर्णयाविरोधात बाळासाहेब चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले. परंतु, 15 एप्रिल 2005 रोजी न्यायमूर्ती बी.एन. अग्रवाल आणि पी.के. बालसुब्रमण्यम यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि चव्हाण यांची याचिका फेटाळून लावली.

दुसरे प्रकरण

सुहास दशरथे विरुद्ध महाराष्ट्र सरकार या आणखी एका प्रकरणातही उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाचा निकाल दिला. 6 ऑक्टोबर 2002 रोजी न्यायमूर्ती मार्लापल्ले आणि न्यायमूर्ती एन. व्ही. दाभोळकर यांच्या खंडपीठाने यावर निकाल देताना परिच्छेद 46 मध्ये म्हटले की, जर जात पडताळणी समितीकडे मांडलेली भूमिका स्वीकारली, तर मराठा समाजातील प्रत्येक व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र द्यावे लागेल.

न्यायालयाने हेदेखील स्पष्ट केले की, असे केल्यास ते महाराष्ट्रातील ‘वास्तविक सामाजिक व्यवस्थेच्या’ विरोधात जाईल. त्यामुळे उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालांनुसार सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य नाही, हाच सध्या सरकारपुढील सर्वात मोठा अडथळा ठरला आहे.

सुप्रिया सुळेंना नेमके घेरलं कोणी ? शरद पवारांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली,मुंबई पोलीस सतर्क..

मुंबई- जरांगेंना भेटून परत जाताना काही आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर बाटल्या फेकल्या. या घटनेनंतर आता सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.सुप्रिया सुळे यांच्यासोबत घडलेल्या घटनेनंतर मुंबई पोलीस आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे अनेक लोकप्रतिनिधी मनोज जरांगे यांची भेट घेऊन येत आहेत. पण सुप्रिया सुळे यांनाच अशाप्रकारे वागणूक का दिली गेली? असा प्रश्न उपस्थित होतोय. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्यासोबत घडलेल्या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. मुंबई पोलिसांची कुमक आझाद मैदानात आहेच, पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’ घराबाहेरही पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची अनपेक्षित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे.दरम्यान, आझाद मैदानात आता गर्दी वाढताना दिसत आहे. राज्यभरातील मराठा आंदोलक मुंबईत ठाण मांडून आहे. आंदोलनासाठी आलेले आंदोलक मुंबईतील विविध ठिकाणी फिरताना देखील बघायला मिळत आहेत. अनेक आंदोलक मरीन ड्राईव्ह परिसरात बघायला मिळाले. विशेष म्हणजे काही जण थेट समुद्रात उतरलेले बघायला मिळाले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना समुद्राच्या बाहेर काढलं. समुद्रापासून लांब उभं राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं. मुंबई पोलिसांकडून आंदोलकांच्या सुरक्षेसाठी देखील सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

गणपती उत्सवासाठी ध्वनीवर्धक वापरावरील आदेशात दुरुस्ती…

पुणे : गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापरासाठी शनिवार ३० ऑगस्ट, रविवार ३१ ऑगस्ट, सोमवार १ सप्टेंबर, मंगळवार २ सप्टेंबर, बुधवार ३ सप्टेंबर, गुरुवार ४ सप्टेंबर, शनिवार ६ सप्टेंबर या एकूण ७ दिवसांच्या कालावधीत सदर निर्बंधांना सूट देण्यात आली होती.मात्र आता त्यात दुरुस्ती करण्यात आली असून दिनांक १ सप्टेंबर २०२५, सोमवार (सहावा दिवस) या दिवशीच्या ऐवजी आता दिनांक ५ सप्टेंबर २०२५, शुक्रवार (दहावा दिवस) असा बदल करण्यात आला आहे

ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० च्या अंमलबजावणीबाबत सन २०२५ मध्ये ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांच्या वापरासाठी दिलेल्या शिथिलीकरणाच्या आदेशात दुरुस्ती करण्यात आली आहे.पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड पुणे यांच्या दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजीच्या पत्रानुसार या कार्यालयाकडून काढण्यात आलेल्या आदेश क्र. पगक/कावि/२५८/२०२५ दि. १८ ऑगस्ट २०२५ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

गणपती उत्सवासाठी निश्चित करण्यात आलेल्या कालावधीतील दिनांक १ सप्टेंबर २०२५, सोमवार (सहावा दिवस) या दिवशीच्या ऐवजी आता दिनांक ५ सप्टेंबर २०२५, शुक्रवार (दहावा दिवस) असा बदल करण्यात आला आहे.हा दुरुस्त आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हांडाधिकारी, पुणे जितेंद्र डूडी यांनी जारी केला आहे.

शरद पवार राजकीय पोळी भाजत असल्याचा राधाकृष्ण विखे पाटलांचा आरोप

mumbai मराठा आरक्षणाचा प्रश्नाबाबत जरांगे पाटील यांच्याकडून आलेल्या प्रस्तावावर उपसमितीने चर्चा केली असून,यासंदर्भात कायदेशीर मार्गदर्शन घेत आहोत.सरकारला प्रश्न सोडवायचा आहे,मात्र महाविकास आघाडीचे नेते केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी वेगवेगळी विधान करीत आहे. घटनेत बदल करून आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याचा सल्ला देणारे शरद पवार केंद्रात मंत्री असताना गप्प का बसले? असा सवाल जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

जरांगे पाटील यांच्या उपोषणावर मार्ग काढण्यासाठी तसेच त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी उपसमितीची बैठक मंत्री विखे पाटील यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला मंत्री गिरीष महाजन मंत्री, दादा भुसे, मंत्री मकरंद पाटील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, तसेच अन्य मंत्री दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. विधी व न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की, प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात उपसमिती काम करीत असून, काल त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर आजच्या बैठकीत चर्चा सकारत्मक झाली असल्याचे त्यांनी सांगितले. हैद्राबाद आणि सातारा गॅजेटिअर बाबत विस्ताराने आजच्या बैठकीत चर्चा झाली. यातील त्रृटी विचारात घेवून अंमलबजावणी करताना कायदेशीर अडचणी येवू नयेत म्हणून राज्याचे अॅडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा करणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.

काल बीड जिल्ह्यातील आमदारांनी भेट घेवून केलेल्या मागण्यांबाबत विचार करू, समितीकडे अशा अनेक सूचना येत असतात, त्याचे स्वागत करून समितीचे सदस्य विचारही करीत असल्याचे विखे पाटील सांगितले.

जरांगे पाटील यांना कोणी भेटायला जावे यावर आक्षेप असण्याचे काहीही कारण नाही. मात्र जे फक्त या विषयाचे राजकारण करून पोळी भाजण्यासाठी येत आहेत. हे दुर्दैव आहे. त्यांना जरांगे पाटलांनी कधीतरी प्रश्न विचारून आरक्षणाच्या संदर्भातील भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली पाहिजे, असा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला.

शरद पवारांनी ज्ञानदानाचे काम करू नये

शरद पवार यांनी घटनेत बदल करून आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्यात चारवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवार यांना मंडल आयोग स्थापन करण्यापूर्वी हे लक्षात का आले नाही. त्याचवेळी मराठा समाजाचा समावेश त्यामध्ये करण्याचे का सुचले नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न आज निर्माण झालेला नाही. दहा वर्ष केंद्रात मंत्री राहिले तेव्हा जबाबदारी पूर्ण केली नसल्याचा थेट आरोप मंत्री विखे पाटील यांनी केला. ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देता येते किंवा देवू नये यावर कधी तरी त्यांनी भाष्य केले पाहिजे उगाच ज्ञानदानाचे काम करू नये, अशी टीकाही विखे पाटील यांनी केली.

सुप्रिया सुळेंच्या गाडीवर बाटल्या फेकल्या,शरद पवारांनी वाटोळं केलं,जरांगेंना भेटून परतताना आंदोलकांनी घेरलं


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या आज मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आझाद मैदानात दाखल झाल्या. त्यांनी आझाद मैदानात मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी जात जरांगेंची विचारपूस केली. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना प्रचंड अशक्तपणा जाणवत आहे. यामुळे मनोज जरांगे उपोषणस्थळी झोपलेले होते. सुप्रिया सुळे यांनी यावेळी मंचावर असलेल्या मराठा समान्वयकांशी चर्चा केली. तसेच अंतरवलीच्या सरपंचांनी मनोज जरांगे यांना उठवलं. यावेळी मनोज जरांगे बोलण्याच्या अवस्थेत नव्हते. सुप्रिया सुळे मनोज जरांगे यांना तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन केले .

त्यानंतर सुप्रिया सुळे मंचावरुन खाली उतरल्यावर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या चार दिवसांपासून काहीही खाल्ले नसल्याने खूप जास्त वीकनेस आला आहे. मी त्यांना म्हणाले की उठू नका आणि तब्येतीची काळजी घ्या. तसेच येथे स्वच्छतेचा मोठा प्रॉब्लेम येत असल्याची तक्रार जरांगे यांनी केली आहे. त्यामुळे येथील बीएमसीला सांगून येथील स्वच्छतेचे काम करण्यात यावे. त्यानुसार मी आयुक्तांना बोलणार आहे, अशी माहिती सुळे यांनी दिली आहे.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात यावी. तसेच पाहिजे असेल तर लगेच एक दिवसाचे अधिवेशन बोलवा आणि हा निर्णय मार्गी लावा. मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीला कोणाचाच विरोध नाही, मग मुख्यमंत्र्यांना काय अडचण आहे? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्याचे वाक्य होते आमचे सरकार आल्यावर मराठा समाजाला आरक्षण देऊ, आता काय झाले. एवढे मोठे बहुमत दिले आहे महायुतीला तर देऊन टाकायला पाहिजे आरक्षण. लोकशाही आहे आणि आम्ही हुकुमशाही होऊ देणार नाही. चर्चेला आम्ही सगळे तयार आहोत. सगळ्यांना बोलवा आणि मार्ग काढावा. ११ वर्षे झाले सत्ता आहे तर मराठा आरक्षण देऊन दाखवावे, असे आव्हान देखील सुप्रिया सुळे यांनी केले आहे.


यानंतर ते परतीला जात असताना त्यांच्या गाडीजवळ आंदोलकांनी त्यांना घेराव घातला. आंदोलकांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलकांनी यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली. “शरद पवारांनी मराठ्यांचं वाटोळं केलं”, अशी घोषणाबाजी आंदोलकांनी यावेळी केली. यावेळी आंदोलक प्रचंड आक्रमक झालेले बघायला मिळाले. या भर गर्दीत काही आंदोलकांनी सु्प्रिया सुळे यांना गाडीत बसण्यासाठी प्रयत्न केले. इतर आंदोलकांनी आक्रमक आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पण आक्रमक आंदोलन ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते.आंदोलकांचा इतका मोठा रोष असताना सुप्रिया सुळे यांनी संयम ढळू दिला नाही. त्या चारही बाजूने आंदोलकांना हात जोडून नमस्कार करत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा राग नव्हता. त्या स्मितहास्य करुन आंदोलकांना नमस्कार करताना दिसत होत्या. यावेळी काही आंदोलकांनी त्यांना सुखरुप गाडीत बसवलं. पण गाडीत बसवल्यानंतर काही आंदोलक आणखी आक्रमक झाले. त्यांनी चारही बाजूने गाडीला घेरलं. ते जोरदार घोषणाबाजी करत राहिले

गोयल,मित्तल,अगरवाल आदींची गुंडागर्दी, 90 कोटीची वाघोलीतील १० एकराचा भूखंड हडपण्यासाठी अपहरण करून लुधियानात व्यवहाराचा प्रयत्न

पुणे- गोयल,मित्तल,अगरवाल,मुलाणी आदींची गुंडागर्दी पुणे पोलिसांनी उघड करून एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे .यांनी एकाचे आणि त्याच्या परिवाराचे लोणावळा येथे अपहरण करून 90 कोटीची वाघोलीतील १० एकराचा भूखंड हडपण्यासाठी लुधियानात जागा खरेदीच्या व्यवहाराचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे . याप्रकरणी एंफासिस ग्रुपचे भागीदार १) राजेश जयभगवान गोयल २) नवीन जयभगवान गोयल ३) रितेश राजाराम मित्तल ४) निलेश राजाराम अगरवाल ५) किशोर भरत मित्तल ६) रितेश सतिश अगरवाल ७) समीर इमामबक्ष मुलाणी, ८) सोहेल शेख ९) अमराज सय्यद १०) शोएब शेख ११) फिरोज खान १२) उस्मान खान,१३) स्वप्निल उत्तम रांजगे यांच्यावर खंडणी विरोधी पथकाने गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’ मौजे वाघोली येथील गट नं १२७६ मधील १०एकर जागेचे बनावट दस्ताचे आधारे दोन वेगवेगळे साठेखत नोंदणी केल्याने वाघोली पोलीस ठाणे गु.रं.क. २५७२०२५ व ४००/२०२५ अन्वये गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यातील आरोपी जॅक्सन जोसेफ दास व रोहित दास यांचे वाघोली पो.स्टे.गु.रं.नं ४००/२०२५ मधील इतर आरोपी यांनी त्यांचे बरोबर जमीनीचा व्यवहार करावा या करिता अपहरण करुन डांबुन ठेवुन मारहाण करुन जीवे मारण्याची भीती दाखविली या बाबी तपासात निष्पन्न झाल्याने वानवडी पो.स्टे.३४९/२०२५ भा. न्या. सं. कलम ११९,१२७ (२),१३८,१४० (२), ६१ (२) अन्वये गुन्हा नोंद केला आहे .
मौजे वाघोली येथील गट नं १२७६ मधील १० एकर जागेचे बनावट दस्ताचे आधारे दोन वेगवेगळे साठेखत नोदणी केल्याने वाघोली पोलीस ठाणे गु.रं. क. २५७/२०२५ व ४००/२०२५ अन्वये गुन्हे दाखल आहेत. नमुद गुन्ह्यातील आरोपी जॅक्सन जोसेफ दास व रोहित दास यांचे वाघोली पो.स्टे.गु.रं.नं ४००/२०२५ मधील इत्तर आरोपी एंफासिस ग्रुपचे भागीदार १) राजेश जयभगवान गोयल २) नवीन जयभगवान गोयल ३) रितेश राजाराम मित्तल ४) निलेश राजाराम अगरवाल ५) किशोर भरत मित्तल ६) रितेश सतिश अगरवाल ७) समीर इमामबक्ष मुलाणी, ८) सोहेल शेख ९) अमराज सय्यद १०) शोएब शेख ११) फिरोज खान १२) उस्मान खान,१३) स्वप्निल उत्तम रांजगे यांनी वर नमुद जागेची फिर्यादीप्रमाणे बाजारमुल्य ९० कोटी रुपये किंमत असताना सदर जागा अत्यंत कमी किंमतीमध्ये म्हणेजच २४ कोटी रुपयांमध्ये व्यवहार करुन प्रत्यक्षात केवळ २,५०,००,०००/-रु मोबदला देवुन जमीन बळकवण्याच्या उद्देशाने आर्थिक फायद्याकरीता नमुद आरोपीतांनी आपआपसात फौजदारीपात्र कट रचुन जॅक्सन दास यास त्याने व दास परिवाराने आरोपीबरोबर दस्त नोंदणाचा पुढील व्यवहार करावा याकरीता जॅक्सन दास यास लोणावळा येथे नेले व त्याचा मुलगा रोहित दास याला लोणावळा येथे बोलावुन रोहित दास यास डांबुन ठेवुन नोएल दास व त्याचे परिवारास लुधियाणा येथुन दस्त नोंदणीकरीता घेवुन नाही आल्यास रोहित दास यास सोडणार नाही अशी धमकी देवुन जॅक्सन दास यास तात्काळ लुधियाणा येथे जाण्यास भाग पाडले.
तसेच जॅक्सन दास याचे रेसकोर्स पुणे येथुन दि १५/०२/२०२५ रोजी अपहरण करुन त्यास धमकावुन जीवे ठार मारण्याची भिती दाखवुन मारहाण केली त्यामुळे वानवडी पो.स्टे गुर.नं ३४९/२०२५ भा.न्या.सं. कलम ११९,१२७(२),१३८,१४०,६१ (२) अन्वये सोहेल शेख, शोएब शेख, उस्मान खान, अमजद सय्यद, फिरोज खान तसेच एंफासिस ग्रुपचे भागीदार राजेश जयभगवान गोयल, नवीन जयभगवान गोयल, रितेश राजाराम मित्तल, निलेश राजाराम अगरवाल किशोर भरत मित्तल, रितेश सतिश अगरवाल समीर इमामबक्ष मुलाणी, स्वप्निल उत्तम रांजणे यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे खंडणी विरोधी पथक-१ हे करीत आहे.

व्यवसायातून उन्नती साधू या.. जीवनाचा उत्कर्ष घडवू या

राज्यातील युवक-युवतींमध्ये असलेल्या प्रचंड क्षमतेला दिशा देण्यासाठी व स्वप्नांना वास्तवात आणण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील आहे. समाजातील मागास घटक, बेरोजगार युवक-युवती यांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देऊन विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येत असून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात येत आहेत.युवकांच्या हाताला रोजगार दिला तर ते इतरांसाठीही रोजगार निर्माण करतील. याच विचाराने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कार्यरत आहे. बेरोजगारी कमी करण्यासाठी व उद्योग-व्यवसायात तरुणांना संधी देण्यासाठी या महामंडळामार्फत विविध योजना राबविल्या जातात.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील एक महत्त्वाचे महामंडळ आहे. हे महामंडळ प्रामुख्याने मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तरुणांना आर्थिक सहाय्य पुरवून त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आले आहे. या महामंडळाची स्थापना 27 नोव्हेंबर 1998 रोजी मराठा समाजातील बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी करण्यात आली आहे. या महामंडळामार्फत अल्प व्याजदर कर्ज सुविधा, अनुदानावर आधारित आर्थिक योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, व्यवसाय मार्गदर्शन आणि तरुणांसाठी व्यवसाय योजना अशा आर्थिक विकासाच्या योजना राबवल्या जातात. या योजनांचा मुख्य उद्देश मराठा समाजातील तरुणांना व्यवसायासाठी लागणारी भांडवली मदत पुरवून त्यांना स्वावलंबी बनवणे. यामुळे अनेक तरुणांनी स्वतःचे उद्योग सुरू केले आहेत. या महामंडळाच्या मदतीमुळे ग्रामीण भागातसुद्धा उद्योजकतेचा विकास होताना दिसत आहे.

अर्थसंकल्पात 750 कोटी रुपयांची तरतूद

सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांसाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात 750 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात 300 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. नियोजन विभागाने याबाबतचा शासन निर्णय 15 जुलै 2025 रोजी निर्गमित केला आहे.

या महामंडळा मार्फत वैयक्तिक कर्ज आणि गट कर्ज व्याज परतावा या योजना राबवल्या जातात.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना(IR-I)

या योजनेअंतर्गत राज्यातील कोणत्याही बँकेमार्फत 15 लाख रुपयाच्या मर्यादेत कोणत्याही व्यवसाय / उद्योगाकरीता लाभार्थ्यांनी कर्ज घेतल्यास, त्या कर्जावरील व्याज परतावा जास्तीत-जास्त 7 वर्षाकरीता, 12 टक्केंच्या कर्ज दर मर्यादेत अथवा 4.5 लाख रुपये रक्कमेच्या मर्यादेत देण्यात येतो. 2 फेब्रुवारी 2018 ते 29 ऑगस्ट 2025 या कालावधीत एकूण निर्माण झालेले पात्रता प्रमाणपत्र (LOI) 1,89,318 तर एकूण बँक कर्ज मंजुरी लाभार्थी संख्या 1,53,726 असून

बँकांनी वितरित केलेली कर्ज मंजूर रक्कम 13,169.99 कोटी आहे.
व्याज परतावा सुरु झालेली लाभार्थी संख्या (Claim) 1,75,836 असून
व्याज परतावा झालेली रक्कम 1,361.58 कोटी रुपये आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II)

या योजनेअंतर्गत किमान दोन किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने एकत्र येऊन, दोन व्यक्तींसाठी कमाल 25 लाख रुपयाच्या मर्यादेवर, तीन व्यक्तींसाठी 35 लाखाच्या मर्यादेवर, चार व्यक्तींसाठी 45 लाखाच्या मर्यादेवर व पाच व पाच पेक्षा अधिक व्यक्ती असल्यास 50 लाखापर्यतच्या व्यवसाय / उद्योग कर्जावर 5 वर्षापर्यत अथवा कर्ज कालावधी यापैकी जे कमी असेल ते, जास्तीत जास्त 12 टक्के व्याज किंवा 15 लाखाच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हफ्ते भरल्यास, हफ्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम गटाच्या बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. या योजनेमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) गटांनी त्यांच्या शेतीपूरक व्यवसायाकरीता बँकेमार्फत घेतलेल्या कर्जावरील देखील व्याज परतावा नियमानुसार महामंडळ करेल. 2 फेब्रुवारी 2018 ते 29 ऑगस्ट 2025 या कालावधीत एकूण निर्माण झालेले पात्रता प्रमाणपत्र (LOI) 1014 असून एकूण बँक कर्ज मंजुरी लाभार्थी गट संख्या 969 आहे. एकूण बँकेने वितरित केलेली कर्ज मंजूर रक्कम 361.87 कोटी आहे.

व्याज परतावा सुरु झालेली लाभार्थी संख्या (Claim) 589 आहे. व्याज परतावा झालेली रक्कम 34.03 कोटी आहे.
गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I):
FPC (Farmer Producer Company) गटांना 10 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उद्योगासाठी देण्यात येते व 7 वर्षे वसुली करण्यात येते. सद्यस्थितीत गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I) ही गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. महामंडळामार्फत 29 ऑगस्ट 2025 पर्यंत लाभार्थ्यांना व लाभार्थी गटांना एकूण 1,398.96 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.

महामंडळाच्या योजनांकरिता अटी व शर्ती

उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे. लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या आत असावे. (जे 8 लाखाच्या मर्यादेत असल्याचे तहसिलदाराचे प्रमाणपत्र) किंवा वैयक्तीक I.T.R. (पती व पत्नीचे) लाभार्थ्यांने महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रात स्थायिक / कार्यरत असलेल्या बँकेकडून कर्ज घेणे अनिवार्य असेल. दिव्यांग व्यक्तीला योजनेअंतर्गत लाभ घ्यावयाचा असल्यास तो मानसिक दृष्ट्या सक्षम असावा. गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II) अंतर्गत भागीदारी संस्था, सहकारी संस्था, बचत गट, एल.एल.पी. कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणीकृत संस्था व इतर शासन नोंदणीकृत गट / संस्था लाभास पात्र असतील. महामंडळाच्या योजनांतर्गत फक्त व्यवसाय / उद्योगाकरीता घेतलेल्या कर्जावरील व्याज परतावा करण्यात येईल व या योजनांची अंमलबजावणी तंतोतंत शासन निर्णय क्र. अपाम 2017/प्र.क्र.189/रोस्वरो-1, दिनांक 21 नोव्हेंबर, 2017 नुसार करण्यात येईल.

योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्यपध्दती

महामंडळाकडून ‘Letter of Intent (LOI) काढण्यासाठी खालील कागदपत्रे लागतात. ही कागदपत्रे ऑनलाइन अर्ज करताना अपलोड करावी लागतात.
पात्रता प्रमाणपत्र (LOI) करीता महत्वाची कागदपत्रे :

  1. आधार कार्ड (अपडेटेड मोबाइल क्रमांक व स्वतःचा ई-मेल आयडीसह)
  2. रहिवासी पुरावा (रहिवासी दाखला / लाईट बिल / रेशनकार्ड / गॅस बिल / बँक बुक)
  3. उत्पन्नाचा पुरावा
    (उत्पन्नाचा दाखला / आयकर रिटर्न जर लग्न झाले असल्यास, नवरा-बायकोचे व लग्न न झालेल्या सदस्यांचे स्वतःचे आयकर रिटर्न आवश्यक)
  4. जातीचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला/General Register उतारा नंबर १ किंवा जातीचा दाखला.
  5. लग्न झालेल्या महिलांसाठी Pan Card / Marriage Certificate / गॅझेट आवश्यक.
  6. एक पानी प्रकल्प अहवाल (वेब प्रणलीवर उपलब्ध आहे)
  7. स्वतः घोषणापत्र (वेब प्रणलीवर उपलब्ध आहे)
    (जर आधार कार्ड व शाळा सोडल्याचा दाखला यामधील जन्म तारखे मध्ये तफावत असल्यास)
    ही कागदपत्रे अपलोड करताना त्यांची स्कॅन केलेली प्रत स्पष्ट आणि वाचण्यायोग्य असावी. अर्ज करताना तुम्हाला https://udyog.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करून अर्ज भरावा लागतो. यानंतर तुम्हाला ‘LOI’ मिळते, जे बँकेत कर्ज मंजुरीसाठी सादर करावे लागते.
    तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज करत आहात (वैयक्तिक किंवा गट) त्यानुसार काही कागदपत्रे बदलू शकतात. अधिकृत आणि अचूक माहितीसाठी, महामंडळाच्या वेबसाइटला भेट देणे किंवा जवळच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधावा.

अर्ज प्रक्रिया

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला https://udyog.mahaswayam.gov.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून अर्ज करावा. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला ऑनलाइन अर्ज करून ‘Letter of Intent (LOI)’ घेणे आवश्यक आहे. पात्रता प्रमाणपत्र (LOI) प्राप्त झाल्यानंतर LOI समवेत लाभार्थ्यांने त्याला करावयाचा असलेल्या व्यवसायाचा / उद्योगाचा प्रकल्प अहवाल (आवश्यक ते सर्व कागदपत्र) घेऊन त्यांच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही बँकेमध्ये कर्ज प्रकरण दाखल करावे. कर्ज मंजूरीची पुर्ण प्रक्रीया बँक त्यांच्या नियमानुसार करीत असते, यामध्ये महामंडळ कोणत्याही स्वरुपाचा हस्तक्षेप करीत नाही. कर्ज प्रकरण दाखल केल्यानंतर पोचपावती बँकेकडून घ्यावी. बँकेने कर्ज मंजुर केल्यानंतर कर्ज मंजूरीबाबतची आवश्यक सर्व माहिती संबंधिताने वेब प्रणालीवर करावी. (उदा. ज्या खात्यामध्ये व्याज परतावा हवा आहे त्याचा तपशील, बँक कर्ज मंजुरी पत्र, बँकेमार्फत वितरीत करण्यात आलेल्या कर्जाचा पुरावा (बँक स्टेटमेंट), बँक EMI वेळापत्रक (त्यावर वसुलीचा दिनांक असणे अनिवार्य), प्रकल्प अहवाल, हफ्ता भरल्याबाबतचा पुरावा (बँक स्टेटमेंट).

त्यानंतर बँकेमध्ये पुर्ण EMI हफ्ता भरल्यानंतरच महामंडळाच्या वेब प्रणालीवर ऑनलाईन क्लेम दाखल करावा. लाभार्थ्यांने EMI विहित कालमर्यादेत भरला असेल तरच त्याला व्याज परताव्याचा लाभ देता येईल. यामध्ये हफ्ता भरल्याबाबतचा पुरावा म्हणून बँक स्टेटमेंट अपलोड करणे अनिवार्य असेल. लाभार्थ्याने दाखल केलेल्या क्लेमची पडताळणी महामंडळामार्फत करण्यात येऊन, लाभार्थ्यांस अनुज्ञेय असलेली व्याज परताव्याची रक्कम संबंधिताच्या बँक खात्यात ऑनलाईन स्वरुपात वितरीत करण्यात येईल. या योजनांच्या लाभाकरीता कोणत्याही सहकार्याची आवश्यकता असल्यास महामंडळाच्या जिल्हा समन्वयकांना संपर्क साधावा. जिल्हा समन्वयकांचा संपर्क वेब प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या योजनांच्या सहाय्याकरिता महामंडळाचे मुंबई मुख्यालय व जिल्हा निहाय जिल्हा समन्वयकांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे कोणत्याही खाजगी व्यक्ती / संस्थेच्या आमीषाला बळी पडू नये.
या महामंडळाच्यावतीने तरुणांना व उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी केवळ भांडवली मदतच नव्हे तर सर्वांगीण मार्गदर्शन आणि आवश्यक प्रशिक्षणाचीही सुविधा उपलब्ध करून दिली जाते. महामंडळाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत राज्यातील हजारो तरुणांनी व्यवसाय, सेवा क्षेत्र, उत्पादन उद्योग, लघु व मध्यम उद्योग, तसेच शेतीपूरक व्यवसाय यांसारख्या विविध क्षेत्रांत स्वतःचा ठसा उमटवला आहे. या तरुणांनी उभारलेल्या उद्योगधंद्यांमुळे केवळ स्वतःचा रोजगार निर्माण झाला नाही, तर इतर अनेकांना देखील रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
राज्य शासनाच्या धोरणांतर्गत महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीच्या या योजना ही फक्त लाभार्थ्यांच्या हितासाठी नसून महाराष्ट्राच्या भविष्याच्या पायाभरणीसाठी टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. ग्रामीण व शहरी भागातील युवकांना संधी देऊन त्यांना स्वावलंबनाच्या मार्गावर उभे करण्याचे कार्य या माध्यमातून होत आहे. या योजना ही केवळ आर्थिक मदत पुरवणारी नसून, आत्मनिर्भर महाराष्ट्र घडविण्यासाठी आणि मराठा समाजातील घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी एक प्रभावी साधन ठरल्या आहेत.

शैलजा पाटील ,
विभागीय संपर्क अधिकारी.

“तुम्ही गांधींना मारलं, तुकारामांना मारलं… आता जरांगेंनाही मारणार का?: शरद पवार गटाच्या राज राजापूरकरांचा घणाघात

मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मराठा-ओबीसी, हिंदू-मुस्लिम वाद वाढला पाहिजे ही भाजपची भूमिका आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.राज राजापूरकर म्हणाले की, तुम्ही गांधींना मारले, तुकारामांना मारले, आता तुम्हाला जरांगे यांना मारायचे आहे का? असा सवाल करत त्यांनी आंदोलनाला अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना म्हटले की, “मुख्यमंत्र्यांनी सर्वांचा मुख्यमंत्री व्हावे, फक्त भाजपचा नाही. समाजात दंगली घडवण्याचे काम आता व्हायला नको.

जरांगेंच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट घेतल्यानंतर राजापूरकरांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी देशाचा नागरिक आहे. म्हणून मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपुस करायला, भेटायला गेलो होतो, मात्र याचा चुकीचा अर्थ घेत ओबीसी मराठ्यांच्या भेटीला, असे वाद लावले जात आहेत. भाजपला हेच पाहिजे आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. सरकारने यावर निर्णय घ्यायचा आहे. मुख्यमंत्र्यांनी हातात बांगड्या तर भरल्या नाहीत ना? असा खोचक सवाल राजापूरकर यांनी केला आहे. एकनाथ शिंदे किंवा अजित पवार नाराज झाल्यावर ते मोदींकडे जातात, मग आता मराठा समाज नाराज असताना त्यांची अडचण का सोडवत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. तुम्ही गांधींना मारलं, आता जरांगेना मारणार आहात का? काय चाललय महाराष्ट्रात? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी केला आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून पंडीत रसराज महाराज यांच्या हनुमान चालीसा पठणाचे आयोजन

मंगळवारी सायंकाळी ५ वाजता होणार कार्यक्रम

पुणे -हिदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून हनुमान भक्त पंडित रसराज महाराज यांच्या हनुमान चालीसा पठण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी महाराजांच्या हस्ते बाप्पाची महाआरतीही होणार आहे. येत्या मंगळवारी (दि. २) सायंकाळी पाच वाजता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या देखावा मंडपात हा कार्यक्रम होणार आहे.

ट्रस्टचे उत्सवप्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या गणेशोत्सवाच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यानुसार यंदा भारतातील अध्यात्म आणि धार्मिक संगीताच्या जगतातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व पंडित रसराज महाराज यांच्या अमोघ वाणीतून हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंडीत रसराज महाराज हे हिंदू धर्मग्रंथांचे सखोल आणि सुमधुर पठण आणि धार्मिक गीते आणि श्लोक सादर करण्यासाठी लोकप्रिय आहेत. त्यांच्या विविध धार्मिक सादरीकरणांमध्ये, सुंदरकांड मार्ग विशेष लोकप्रिय आहे. अनेक उच्चभ्रू आणि सेलिब्रिटीं वर्गात त्यांचा चाहता वर्ग आहे. पंडितजींची ख्याती देश विदेशात पसरलेली आहे. विविध धार्मिक समारंभ आणि कार्यक्रमांसाठी त्यांना विविध देशांमध्ये आमंत्रित केले जाते, ज्यामुळे त्यांचे आध्यात्मिक अंतर्दृष्टी आणि आशीर्वाद जागतिक पातळीवरील भाविकांपर्यंत पोहोचतात. पुणेकरांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून पंडीत रसराज महाराज यांच्या अमोघ वाणीतील हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन पुनीत बालन यांनी केले आहे.

मनोज जरांगे पाटील उद्यापासून पाणी बंद करणार, म्हणाले- राज ठाकरे कुचक्या कानाचे

मनोज जरांगे म्हणाले की, मी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मुंबई सोडणार नाही. पण तुम्ही कायदा हातात घेऊ नका. मराठा प्रश्नाबद्दल राज ठाकरेंनी बोलू नये. ते मराठवाड्यात का येतात, नाशिकमध्ये का जातात आम्ही विचारले का? राज ठाकरे कुचक्या कानाचे आहेत. फडणवीस त्यांच्या घरी जाऊन चहा पिले की इकडे पक्ष संपला तरी त्यांना काही फरक पडत नाही. दोन्ही ठाकरे बंधू चांगले आहेत.आंदोलन संपल्यावर नीतेश राणे यांच्यामध्ये कीती दम आहे, मी बघतो. नारायण राणेंना मी समजून सांगितले होते पण ते ऐकत नाही.असेही ते म्हणालेत

मुंबई-मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असल्यामुळे मराठा आंदोलकांमध्ये चिंता वाढली आहे.मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकार मागण्या करत नाही म्हणून मी आता उद्यापासून पाणी सुद्धा बंद करणार आहे.

मराठा आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील व्यापाऱ्यांचे नुकसान- शाह
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शाह यांनी यासंदर्भात राज्य सरकारकडे तोडगा काढण्याची मागणी केली आहे.आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याचा थेट फटका येथील व्यापारी आणि व्यावसायिकांना बसत आहे. शनिवार आणि रविवार सारख्या सुट्टीच्या दिवसांत हे आंदोलन सुरू असल्यामुळे व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे, असे व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे.

‘पवित्र रिश्ता’ फेम प्रिया मराठे यांचे वयाच्या ३८ व्या वर्षीच कर्करोगाने निधन..

मुंबई -अभिनेत्री प्रिया मराठे यांचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन झाले आहे. आज (रविवार) पहाटे कर्करोगामुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षभरापासून त्या सोशल मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर होत्या. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

प्रिया मराठे यांनी शेवटचे ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत काम केले होते. मात्र, आरोग्याच्या कारणामुळे त्यांनी ही मालिका मध्येच सोडण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा त्यांनी एका व्हिडिओद्वारे चाहत्यांना याबद्दल माहिती दिली होती. त्यात म्हटले होते की, “आरोग्याची समस्या अचानक उद्भवल्यामुळे मालिकेच्या शूटिंग आणि आरोग्यात समतोल साधणे कठीण झाले आहे. त्यामुळे ‘मोनिका’ ही भूमिका साकारताना मला खूप आनंद झाला असला तरी, मला हा प्रवास इथेच थांबवावा लागत आहे.”

प्रिया मराठे यांनी ‘या सुखांनो या’ या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले होते. ‘चार दिवस सासूचे’ या मालिकेतही त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. हिंदी टेलिव्हिजनमध्ये त्यांनी ‘कसम से’ या मालिकेद्वारे पाऊल ठेवले. त्यानंतर त्या ‘पवित्र रिश्ता’ मध्ये ‘वर्षा’ची भूमिकेत आणि ‘बडे अच्छे लगते है’ मध्ये ‘ज्योती मल्होत्रा’च्या भूमिकेत दिसल्या. या भूमिकांमुळे त्या घराघरांत पोहोचल्या.

प्रिया मराठे यांनी 24 एप्रिल 2012 रोजी अभिनेता शंतनू मोघे यांच्याशी लग्न केले होते. शंतनु मोघे यांनी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. मराठी अभिनय क्षेत्रातील एक सुंदर जोडपे म्हणूनही यांच्याकडे पाहिले जात होते. प्रिया मराठे यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीतील अनेकांना धक्का बसला असून, चाहते आणि सहकलाकारांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.