मुंबई-मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचे सिद्ध करून दाखवा, असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सत्ताधारी महायुतीला दिले आहे. मनोज जरांगेंच्या मागे कुणाचा हात आहे की मराठे व ते स्वयंस्फुर्तीने आलेत हे सरकारने पाहावे. उगीच लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे राजकारण करू नये, असे त्यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी गत शुक्रवारपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. त्यांची प्रकृती काहीशी बिघडली असताना सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून त्यांच्या आंदोलनामागे महाविकास आघाडी विशेषतः शरद पवार यांच्या पक्षाचा हात असल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर शशिकांत शिंदे यांनी महायुतीला वरील आव्हान दिले आहे.
शशिकांत शिंदे म्हणाले, राज्याचे गृहखाते भाजपकडे विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असेल तर त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे. शरद पवार या प्रकरणी काही बोलले नाही, तर सत्ताधारी पक्षाचे नेते त्यांच्याकडे भूमिका स्पष्ट करण्याची मागणी करतात. तसेच या आंदोलनामागे त्यांचा अदृश्य हात असल्याचाही आरोप करतात. आता मनोज जरांगे यांच्या मागे नक्की कुणाचा हात आहे की ते व मराठे स्वयस्फुर्तीने आलेत हे सरकारने बघावे. या प्रकरणी लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे काम करू नये.
शशिकांत शिंदे यांनी यावेळी सरकारला हे आंदोलन गांभीर्याने घेण्याचेही आवाहन केले आहे. माझी सरकारला विनंती आहे. या प्रकरणी कुणाची काय भूमिका आहे हे न पाहता त्यांनी हे आंदोलन गांभीर्याने घ्यावे. सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावे. त्या समितीच्या अहवालाची वाट न पाहता सरकारच्या समितीने बैठक घेऊन तत्काळ निर्णय घ्यावेत, असे ते म्हणालेत.
आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी .. असा विनोदी प्रकार
मुंबई-मराठा आरक्षणाच्या आंदोलनात कळीचा मुद्दा बनलेले हैदराबादचे गॅझेट हे हैदराबादच्या निझामाकडे नाही, तर आपल्याच सरकारकडे उपलब्ध असल्याचा दावा लेखत तथा इतिहास संशोधक विश्वास पाटील यांनी केला आहे. हैदराबाद निजाम सरकारने तत्कालीन मुंबई प्रांतिक सरकारला नोव्हेंबर 1956 मध्येच सर्व रेकॉर्ड ऑफिशिअली दिल्याच्या नोंदी आहेत. त्यामुळे 5 निवृत्त न्यायाधीशांची कमिटी पाठवली तरी हैदराबादमध्ये काय मिळणार? इथे रेकॉर्ड पोचल्याच्या दोन्ही सरकारने नोटिफिकेशन सुद्धा काढल्या होत्या. मग गरीब शेतकऱ्यांचे रेकॉर्ड गेले कुठे? आज रेकॉर्ड उपलब्ध नसेल तर त्या परिस्थितीला किती मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री जबाबदार? असा प्रश्न त्यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे.
विश्वास पाटील यासंबंधी आपल्या एका विस्तृत पोस्टमध्ये म्हणाले की, तत्कालीन हैदराबादच्या चीफ सेक्रेटरीनी आपल्या अखत्यारीतील सर्व District Collectors ना निजामाच्या हद्दीतील मराठवाड्याचे रेकॉर्ड तात्काळ मुंबई सरकारकडे व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे सर्क्युलर ऑक्टोबर 1956 मध्ये काढले होते. त्यानुसार एक नोव्हेंबर 1956 च्या दरम्यानच सर्व रिव्ह्यून्यू, ट्रेझरी, पोलीस आणि त्यानंतर काही महिन्यात न्यायालयीन रेकॉर्ड मुंबई सरकारच्या ताब्यात देण्यात आले होते. तशी नोटिफिकेशन्स हैदराबाद आणि मुंबई सरकार या दोघांनीही काढली होती. तर ते रेकॉर्ड गेले कुठे? गेली दोन वर्ष आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी अशी परिस्थिती महाराष्ट्रात आहे.
भारत सरकारच्या स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट 1956 च्या सेक्शन 76 तसेच 77 व इतर संबंधित कलमानुसार नवीन राज्य किंवा त्याची पुनर्रचना झाली झाल्यावर तात्काळ संबंधित रेकॉर्ड ज्या त्या सरकारकडे देण्याचे आदेश पारित झाले होते. त्यानुसार किती तारखेपर्यंत कुठले रेकॉर्ड हस्तांतर झालेच पाहिजे अशा “डेडलाईन” सुद्धा ठरवणारे आदेश काढले गेले होते. त्यानुसार महसूल व जमाबंदी दप्तर हे डिसेंबर 1956, ट्रेझरी लेजर्स 31 डिसेंबर 1956 आणि हैदराबादच्या सचिवालयातील संबंधित सर्व सेक्रेटरीएट फाईल ह्या फेब्रुवारी 1957 पर्यंत द्यावयाच्या डेडलाईन्स ठरवून गेल्या दिल्या गेल्या होत्या. त्यानुसार संबंधित हस्तांतरण त्यावेळीच्या उत्तम प्रशासकीय यंत्रणेने विनाविलंब पार पाडले होते.
मग ते दिलेले सर्व रेकॉर्ड सांभाळण्याची जबाबदारी कोणाची ? कायद्याच्या भाषेत हू इज कस्टस्टोडीयन ऑफ गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स ? 18 91 मध्ये “इम्पेरियल रेकॉर्डस कीपर” नावाची पोस्ट निर्माण झाली होती. आता भारत सरकारने 1993 मध्ये पब्लिक रेकॉर्डस Act निर्माण केला आहे. कायद्यानुसार महसुली रेकॉर्डसाठी डिस्ट्रिक्ट कलेक्टर आणि त्या विभागाचे जे प्रमुख असतात ते कस्टोडियन ऑफ गव्हर्मेंट रेकॉर्ड असतात.
त्यानुसार एक नोव्हेंबर 1956 च्या दरम्यान औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बिदर लातूर, नळदुर्ग ह्या सीमेवरील जिल्ह्यांचे हस्तांतरण तीन राज्यांमध्ये विधिवतरीत्या पार पाडले गेले आहे.
हा बाळबोध नियम आमच्या प्रशासकांना माहित नाही का?
विश्वास पाटील पुढे म्हणतात, जेव्हा एखादे नवीन राज्य किंवा देश निर्माण होतो. तेव्हा सैन्य किंवा सुरक्षा घुसवण्याच्या आधीही त्या प्रांतातले जमिनींचे नकाशे आणि मालकी हक्कपत्रक ही सर्व रेकॉर्ड्स महत्वाची असतात. हा बाळबोध नियम आमच्या प्रशासकांना माहित नाही का? तसेच मौर्य काळापासून संबंधित कास्तकार किंवा शेतकरी याच्या मालकीचे कोणते क्षेत्र आहे अशा कागदपत्रांच्या दुय्यम सत्यप्रती राजाने आपल्या दप्तरांमध्ये सांभाळून ठेवायच्या असतात. तशीच कागदपत्रे ब्रिटिश आणि निजामाच्या किंवा तेव्हाच्या मुंबई राज्यांमध्ये सुद्धा सांभाळली गेली होती. समजा गाव पातळीवरचे तलाठ्याचे दप्तर हरवले, शेतकऱ्याकडचे जरी हरवले तरी राजाकडे म्हणजे सरकारकडे त्याच्या दुहेरी प्रती ठेवणे बंधनकारक असते. त्यानुसार व्हिलेज रेकॉर्डच्या नोंदी, त्यामध्ये काही जिल्हा पत्रके तसेच मुख्य तहशील पत्रके ही सांभाळली जात.
त्यानुसार निजाम सरकारने तत्कालीन मुंबई सरकारला प्रत्येक जिल्ह्यातील कोणती पत्रके हस्तांतरित केली होती?
खसरा पत्रक __ज्यामध्ये त्या तालुक्यातील प्रत्येक सर्वे नंबर, खातेदाराचे नाव, फसल अशी पूर्ण माहिती असायची
खतौनि पत्रक. ज्याची आजच्या सात बाऱ्याशी तुलना करता येईल. हू इज ओनर अँड हू इस कल्टीवेटर ?
जमाबंदी तथा सालाना पत्रक. ज्यामध्ये लगान , मागणी आणि बकाया म्हणजे राहिलेली बाकी याच्या नोंदी असतात.
लाल किताब. दिल्लीच्या मुघल प्रशासनापासून ते हैदराबादच्या निजामापर्यंत सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट होते. ते तांबड्या वेस्टर्नमध्ये बांधले जायचे. एक प्रकारे हे गाव पातळीवरचे गॅझेट होते. त्याच्यामध्ये गाव, गावातील माणसे, तळी, पाण्याची साधने, वसूल, जहागिरीचे क्षेत्र सर्व काही असायचे. हे दरवर्षी तलाठ्याकडून प्रांताधिकारी व जिल्हाधिकाऱ्यापर्यंत जाऊन त्याचे अवलोकन होऊन पुन्हा गावात परत यायचे. प्रत्येक गावात हे सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट होते.
शजरा ( खेतो का नक्शा) प्रत्येक शेतकऱ्याच्या शेती क्षेत्राचा सरकारमार्फत नकाशा काढला असायचा. त्यासाठी नक्शाणवीस नावाचे खास अधिकारी नेमलेले असायचे. हे पत्रक सुद्धा प्रत्येक गावात होते.
माल वसुली रजिस्टर, डिमांड अँड कलेक्शन
तहसील दप्तरी रजिस्टर
इक्रारनामा आणि सनद रजिस्टर. ज्यामध्ये गावातील इनामे जहागीर तसेच व पुढच्या वफ जमिनीच्या नोंदी असत.
दस्तऐवज सापडत नसतील तर त्यात शेतकऱ्यांचा काय दोष?
अशी सर्व रजिस्टर्स ही त्या – त्या जिल्हाधिकार्याकडे निजाम सरकारने सुपूर्द केली होती. ती सुपूर्त करताना स्पष्टपणे “हँड ओव्हर लिस्ट” म्हणजे हस्तांतरणाची यादी सुद्धा तयार केली गेली होती. हे सर्व रजिस्टर्स आज तालुका दप्तर मध्ये किंवा डिस्टिक कलेक्टर दप्तरमध्ये मिळत नसतील तर त्याबाबत गरीब शेतकऱ्यांचा काय दोष ? लोकांकडे जे डॉक्युमेंट्स असतील ते तपासण्यासाठी जर कायदेशीररित्या पर्यायी दप्तर जे पर्मनंट रेकॉर्ड म्हणून कस्टोस्डियन ऑफ गव्हर्नमेंट रेकॉर्डने मेंटेन करायला हवे, ते नसेल तर त्यात लोकांचा काय दोष?
मी चांद्यापासून ते बांधापर्यंतच्या सर्व ब्रिटिश गॅजेटीयर्सचा अभ्यास गेली दोन वर्ष करतो आहे. दिल्लीचे पार्लमेंट लायब्ररी रेकॉर्ड, जनगणना कार्यालय, हैदराबादचे तीन नाक्यावरचे कार्यालय व इतर कार्यालय सारी धुंडाळून झाली आहेत. महाराष्ट्रातील सर्वच मराठा हे कुणबी होते असे ब्रिटिशांची गॅझेट सुद्धा सांगत नाहीत. मात्र शेती करणारा बहुतांशी 85% मराठा वर्ग हा कुणबी होता हे या रेकॉर्डवरून आढळून येते. तशा अनेक ठिकाणी नोंदी आहेत. निजामाच्या पिरेड मध्ये सुद्धा कोर्टात, हायकोर्टात केसेस जाऊन तसे डिसिजनही झालेले आहेत.
आता तत्कालीन जिल्ह्यांचा वानगी दाखल विचार करायचा तर तेव्हाचा रत्नागिरी जिल्हा व सावंतवाडी संस्थान यांची 1881 ची जनगणना लक्षात घेता एकूण संख्या 9 लाख 41 हजार 49 होती. पैकी दोन लाख तीन हजार चारशे सहा हे मराठा होते. तर दोन लाख 84 हजार 267 हे कुणबी होते. जिल्ह्यात धनगर अठरा हजार पाचशे पाच, ब्राह्मण 66 हजार ०४६ महार समाज 85 हजार 513 तर भटक्यांची संख्या 6553 होती. ठाणे आणि मुंबई मध्ये कुणब्यांची संख्या अधिक आहे. तर सोलापूर मध्ये मराठा एक लाख ऐंशी हजार आणि मराठा कुणबी एक लाख 78 हजार 938, माळी 23898 वंजारी 3508 धनगर 57 04 ब्राह्मण 26979 महार समाज 44001 तर मातंग 1923 अशी संख्या आहे.
साधारणता माझ्या माहितीप्रमाणे 1985/ 86 पर्यंत महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांमध्ये ही सर्व रेकॉर्ड्स उपलब्ध होती. त्याचे महत्व न जाणता रेकॉर्डरुम कोणाच्या आदेशाने आणि कुणी खाली केल्या ? हे अविवेकी आदेश कोणी दिले. गेल्या पंचवीस तीस वर्षात ज्यांनी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री म्हणून कामे केली त्यांना त्याची उत्तरे द्यावे लागतील. तरच मग महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य वगैरे मैदानातली भाषा शोभून दिसेल.
सद्यस्थितीत आता जे रेकॉर्ड आहे त्यातून संबंधित शेतकरी वर्गाला कसा फायदा देता येईल, याचाही विचार व्हावा. माझ्या आजोबांचे आणि पंजोबांच्या नावे मोडीमध्ये कुणबी नावाची नोंद आहे. पण मला इथल्या जटील प्रशासकीय व्यवस्थेने तेव्हा तो दाखला मिळू दिला नाही. आज खानदानाच्या नावाने जे मोठ्या मोठ्या थापा मारतात त्यांचेही रेकॉर्ड माझ्याकडे आहे.
संपूर्ण मराठा समाज जरी कुणबी ठरत नसला तरी ज्यांच्याकडे दाखले आहेत त्यांच्याकडे तरी संशयाने पाहू नका. ब्रिटिशांनी दिलेल्या वर्गवारीनुसार साधारण प्रत्येक तालुक्यात कुठल्या समाजाचे किती लोक होते याची आकडेवारी आहे. त्या सरासरीचा विचार करून लोकांना काही फायदे देता येतील. जे ब्रिटिश रिकॉर्ड पहिले प्लॅनिंग कमिशन आणि शेड्युल्ड कास्ट कमिशन वगैरे रचताना आधारभूत ठरवले गेले होते. ते रेकॉर्ड पूर्णता या प्रश्नावर नाकारण्यात काय अर्थ आहे ?
या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार व्हावा आणि उनापावसामध्ये, शेतामध्ये राबणाऱ्या लोकांना न्याय मिळावा आणि तो सर्व जाती धर्माच्या लोकांना मिळावं. आपली लोकशाही, प्रत्येक राजकीय पक्षाची लोकशाही ही आज “स्वकुटुंबकल्याणशाही” झालेली आहे, हे वास्तव नाकारता येणार नाही. त्यामुळेच सार्वजनिक हिताच्या गोष्टींकडे सर्वांनीच ध्यान द्यायला हवे. नेत्यांच्या आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अविवेकामुळे लोकांचे हाल होऊ नयेत असेच मला वाटते, असेही विश्वास पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मुंबई-मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरू केले आहे. तसेच संपूर्ण मुंबईत मोठ्या संख्येने राज्यभरातून मराठा समाज जमा झाला आहे. तसेच रविवारी मनोज जरांगे यांनी आपण मरेपर्यंत उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. परंतु, जरांगेंच्या या आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणीत उच्च न्यायालयाने काही महत्त्वाचे निर्देश दिले असून आता कोणालाही मुंबईत येऊ देऊ नका, असे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. तसेच उद्या 4 पर्यंत जिथे रस्ते अडवण्यात आले आहेत त्या सर्व ठिकाणांवर आंदोलकांना हटवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.गुणरत्न सदावर्ते म्हणाले, मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मी 29 तारखेला तक्रार दिली, आझाद मैदानाच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांना परिस्थिती जाणीव करून दिली. लेखी तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला. पण, पोलिसांनी कारवाई केली नाही, असे गुणरत्न सदावर्त यांनी न्यायालयात म्हटले. तसेच, आज राज्याचा मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून हे सुरू असल्याची टीकाही गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयात मनोज जरांगे यांचा अर्ज वाचून दाखवला. या अर्जाच्या सुरुवातीलाच आमरण उपोषणाचा उल्लेख केला आहे. मात्र, आमरण उपोषणाला परवानगी नसल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारणा केली आहे. तसेच मनोज जरांगे यांना नोटीस बजावण्यात आली आहे का? असा सवालही मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केला आहे.
माजी सैनिकांना केवळ आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. याउलट, राज्य सरकारची बाजू अशी होती की, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी परवानगी देण्यात आली होती आणि इतरत्र आंदोलन करण्यास परवानगी नव्हती. आंदोलकांनी सर्व अटी व शर्तींचे पालन करण्याबाबत लेखी हमीपत्र दिल्यानंतरच त्यांना ही परवानगी देण्यात आली, अशी माहिती महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला दिली. न्यायालयाने नियमांचे पालन करून आंदोलन करण्याची परवानगी दिली होती आणि त्याच आधारावर ही परवानगी देण्यात आली होती. आझाद मैदान आंदोलनांसाठी आरक्षित आहे, परंतु त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन करण्यास परवानगी नाही, असेही सरकारने स्पष्ट केले.
पुढे आपली बाज मांडताना राज्य सरकारने म्हटले, गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणं पोलिसांसाठी देखील कठीण आहे. तरी आम्ही समतोल पाळण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही. शनिवारी आणि रविवारी आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही, केवळ 5 हजार आंदोलकांना परवानगी देण्यात आली होती. तसेच जरांगे यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे देखील सरकारने वारंवार सांगितले आहे. शहर एक खेळाचे मैदान झाले असल्याचेही राज्य सरकारने म्हटले आहे.
पुणे -३७व्या पुणे फेस्टिव्हल अंतर्गत आयोजित पुरुष आणि महिला बॉक्सिंग स्पर्धेत सुफियान शेख बेस्ट बॉक्सर ठरल्या. याशिवाय स्वीटी यादव – मोस्ट प्रॉमिसिंग, शुभम लांडगे – बेस्ट चॅलेंजर, यांची निवड झाली. या स्पर्धा पुण्यातील भवानी पेठ येथील वस्ताद लहुजी साळवे स्टेडियमवर रविवार ३१ ऑगस्ट रोजी रंगल्या. संपूर्ण दिवसभर झालेल्या या स्पर्धेत ४० पुरुष आणि ४० महिला खेळाडू विविध वजन गटांमध्ये सहभागी झाले होते. या जिल्हास्तरीय स्पर्धा पुणे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आल्या होत्या.
स्पर्धेचे उद्घाटन सकाळी इंडियन बॉक्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष ब्रिगेडियर पी. के. मुरलीधरन राजा यांच्या हस्ते झाले याप्रसंगी माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, माजी नगरसेवक अविनाश बागवे, पुणे फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड व क्रीडा समन्वयक प्रसन्न हे उपस्तीत झाले सायंकाळी बक्षीस वितरण माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी स्पर्धेचे मुख्य संयोजक व पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष अविनाशजी बागवे, छत्रपती पुरस्कार विजेते सलमान शेख, रेनॉल्ड जोसेफ , पुणे बॉक्सिंग असोसिएशनचे मदन वाणी, विजय गुजर, सुरेश गायकवाड आणि अशोक मेमजादे यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांचे स्वागत पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव श्री. विजय गुजर यांनी केले.
पुणे-केळीचे खुंट, नारळाच्या झावळ्या, तोरण व फुकलम (फुलांची रांगोळी) यांनी सजवलेले बालगंधर्व रंगमंदिराचे प्रवेश द्वार पारंपारिक पंचवाद्यमचा गजर , गणेश वंदनम, भरतनाट्यम, शास्त्रीय आणि अर्ध शास्त्रीय नृत्य, गाणी, तिरुवथिरकली लोकनृत्य, मोहिनीअट्टम आदी नृत्य प्रकारांद्वारे मल्याळी संस्कृतीचे दर्शन घडवणारा केरळ महोत्सव पुणे फेस्टिव्हल अंतर्गत संपन्न झाला. पुणे शहर व जिल्ह्यातील केरळवासियांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही रविवार दि. ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी केरळ महोत्सव उत्साहात साजरा झाला. पुण्यातील केरळवासियांनी या कार्यक्रमास मोठी गर्दी केली होती.
केरळचे खासदार व्ही के श्रीकंदन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह पुणे मल्याळी फेडरेशनचे अध्यक्ष राजन नायर, पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, मोहन टिल्लू, समन्वयक बाबू नायर, पुणे मल्याळी फेडरेशनचे उपाध्यक्ष एम व्ही परमेश्वरम व शानी नवशाद, सरचिटणीस टी.डी. जॉन, कार्यक्रम प्रमुख टी.पी. विजयन, सांस्कृतिक प्रमुख यु एन पोडूवाल, आर नायर आदींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सुरुवात झाली.
खासदार व्ही के श्रीकंदन यांचे पुणेरी पगडी घालून स्वागत करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राची तुतारी आणि केरळचे चेंडमेलम यांच्या निनादाने सभागृह भारून गेले. बाबू नायर यांनी प्रास्ताविक केले. पुणे फेस्टिव्हलचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी पुणे फेस्टिव्हलमध्ये केरळ महोत्सव सातत्याने आयोजित करून राष्ट्रीय एकात्मता साधली याचे खा. व्ही के श्रीकंदन यांनी कौतुक केले व सर्वांना ओनमच्या शुभेच्छा दिल्या तसेच सुरेश कलमाडी यांच्या या योगदानाबद्दल सभागृहातील सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात सुरेश कलमाडींचे अभिनंदन केले.
यावेळी पुणे जिल्ह्यातील केरळ वासियांच्या मुले व मुली कलावंतांनी केरळच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे बहारदार नृत्याविष्कार सादर केले. त्याचबरोबर ओप्पाना (मुस्लिम एथनिक नृत्य) आणि मोर्गमकली (ख्रिश्चन एथनिक नृत्य) हे नृत्याविष्कार सादर करून केरळ संस्कृतीतील धार्मिक सलोख्याचे मनोहारी दर्शनही घडवले. ड्रग्ज विरोधी संदेश देणाऱ्या नृत्याविष्काराला देखील प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला.
पुणे जिल्ह्यात ४.५ लाख केरळवासीय राहत असून त्यांच्या ३२ संस्थांच्या पुणे मल्याळी फेडरेशनचे चेअरमन राजन नायर आणि कॉ-ऑर्डिनेटर बाबू नायर यांनी याचे आयोजन केले. यामध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्व धर्मियांचा एकोपा दाखविणाऱ्या नृत्याविष्कारांनी प्रेक्षकांना विशेष आनंद मिळाला. या सर्व कार्यक्रमांमध्ये पुणे जिल्ह्यातील २०० हून अधिक केरळी युवक व युवती कलावंत सहभागी झाले होते.
महाराष्ट्रासारखी कर्मभूमी व केरळ सारखी मातृभूमी यांच्यात बंधूभाव वाढावा असा प्रयत्न यातून केला गेला आहे, असे पुणे मल्याळी फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजन नायर यांनी सांगितले.
‘राज्य महोत्सवा’ बाबतची तरतुद, नियमावली किंवा निश्चित व्याख्या’ काय..?- काँग्रेस वरिष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे – ‘गणेश भक्तां मध्ये केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्या करीता कोलेल्या घोषणे शिवाय, गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून अधिकृतपणे मान्यता देणारा शासकीय निर्णय (जीआर) अद्यापही जारी झाल्या बाबतचा उल्लेख मिळत नसून, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेत स्थळांवर (www.maharashtra.gov.in) वा इतर संकेतस्थळांवर (dgipr.maharashtra.gov.in, gr.maharashtra.gov.in) अशा जीआरचा तपशील उपलब्ध नसल्याचे राज्य काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
ते पुढे म्हणाले की, गणेशोत्सव हा ‘ राज्य महोत्सव” म्हणून साजरा केला जात असतांना त्या करीताची बजेट – तरतुद, नियमावली किंवा त्याची ‘निश्चित ‘व्याख्ये’ बाबत शासकीय स्तरावर कोठे ही स्पष्टता नसल्याने, स्टंटबाजी शिवाय सरकारला या विषयी गांभीर्य नसल्याचेच स्पष्ट होते. गणेशोत्सवात सहभागी ‘मुर्तीकार, कलाकार, मंडपवाले, वाद्ये वादक, पौरोहित्य करणारे, सेवेकरी, ढोल – ताशा पथकांचे साहीत्य वा सजावट साहीत्य वा सेवे’ वरील जीएसटी माफ करण्यात आला काय…? वा सवलत देण्यात आली आहे काय..? या उत्सवाचा ताण झेलत, गणेशोत्सव रात्रंदिवस सुरक्षितपणे व शांततेने पार पाडण्या करीता झटणारे ‘पोलीस – दला’स विशेष रजा – सुट्टी वा सवलत इ जाहीर केली काय..? आमदारांचे मागणी प्रमाणे गणेशोत्सवा’साठी 100 कोटी रु. निधीची मागणी होती. गणेशोत्सवाच्या सजावटीसाठी पुणे शहरात G20 परिषदेच्या धर्तीवर व्यवस्था, पोलिसांची अतिरिक्त कुमक, आणि पंढरपूर वारीप्रमाणे व्यवस्थापनाची मागणी होती. तसेच गणेशोत्सव काळात तालुका ते राज्य स्तरावरील सांस्कृतिक स्पर्धांसाठी 10 कोटी रुपये बक्षिसे ठेवण्यात आली आहेत काय..? गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केल्याने राज्य सरकार गाव आणि शहरांमध्ये उत्सवाच्या खर्चाचा काही भाग उचलणार आहे काय (?) ज्यामुळे समावेशिता आणि पारंपरिकता होईल. गणेशोत्सव मंडळांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक प्रोत्साहन देण्याचेही सरकारचे धोरण आहे काय..? सुरक्षा आणि पायाभूत सुविधा: राज्याचा उत्सव साजरा करताना सामाजिक भान, पर्यावरण पूरकता आणि पर्यटक – भाविकांचा उत्साह यांचा समन्वय साधण्यासाठी सरकारने पोलिसांची अतिरिक्त कुमक आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रायोजन केले आहे काय..? सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी गणेशोत्सवाला महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून संबोधले व उत्सवाला सामाजिक एकता, राष्ट्रीयत्व, स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाशी जोडले असून गणेशोत्सव” सर्व धर्म, जात आणि भाषांना” जोडणारा उत्सव असावा, अशी भूमिका असल्याचे समजते. मात्र प्रत्यक्षदर्शी अंमलबजावणी शुन्य असल्याची टीका ही काँग्रेस ने केली. याच धर्तीवर, तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारने ‘दही हंडी’ला राज्य क्रीड़ा दर्जा देण्याचे जाहीर करूनही, प्रत्यक्ष तोंडाला पाने पुसण्याचाच प्रकार केल्याची पुस्ती ही तिवारी यांनी जोडली.
आम्हाला संपलेला पक्ष म्हणता, आंदोलन झाल्यानंतर तुमचे 250 आमदार असूनही शरद पवारच केंद्रबिंदू म्हणता
मुंबईतील जरांगे भेट व आंदोलक घेऱ्याच्या प्रकारानंतर खासदार सुप्रिया सुळे पुण्यात गणेश भेटीला.. पुणे -जरांगे पाटील यांच्यासोबत थोडक्यात चर्चा झाल्यानंतर बाहेर पडताना आंदोलकांनी त्यांच्या गाडीला घेराव घालत जोरदार घोषणाबाजी केली.या घडामोडीवर पुण्यात प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी लोकप्रतिनिधी आहे आणि माझी नैतिक जबाबदारी आहे की, आंदोलनकर्त्यांच्या भावनांचा आदर केला पाहिजे. एखाद्या तरुणाला काही वेदना असतील तर त्याला समजून घेणं आणि त्यातून मार्ग काढणं हे माझं कर्तव्य आहे. आझाद मैदानावर फार काही झालेलं नाही. एखाद्या मुलाने हट्ट केला तर त्यात गैर काय? जरांगे पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत सुळे म्हणाल्या की, त्यांना थकवा असल्याने फक्त तब्येतीची चौकशी केली. डॉक्टरांशी सविस्तर चर्चा झाली. मुंबई महापालिका आणि सरकारने त्या परिसरातील स्वच्छतेवर लक्ष द्यावं,” अशी विनंती त्यांनी केली. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. “एकीकडे आम्हाला छोटा पक्ष म्हणतात, संपलं म्हणतात आणि दुसरीकडे इतक्या मोठ्या आंदोलनाचा केंद्रबिंदू शरद पवार ठरतात. त्यांच्या पक्षाकडे 250 आमदार, 300 खासदार आहेत असं सांगत भाजप त्यांच्याकडेच वळतो ही कमालच आहे, असा टोला त्यांनी लगावला. याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधत सुळे म्हणाल्या की, “सलग अकरा वर्ष भाजपचं गल्लीपासून दिल्लीपर्यंत राज्य आहे. 2018 साली फडणवीस यांनी विधानसभेत मराठा आरक्षणाची मागणी केली होती आणि उपायही सुचवले होते. आता तेच मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री सत्तेत आहेत. मग त्यांनी ते उपाय अंमलात आणावेत,” अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, सरकारवर थेट निशाणा साधत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “सध्याचं सरकारच आंदोलनाला जबाबदार आहे. जर निर्णय घ्यायचाच असेल तर तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवा, कॅबिनेट घ्या आणि अधिवेशन बोलवा. आंदोलनाला रसद पुरवणाऱ्यांची यादी जाहीर करा. गृहखात्याकडे माहिती असेल तर आम्हालाही द्या, नाहीतर सरकार फेल ठरेल.”
मुंबई -मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी पहिल्यांदाच मुंबईत रस्ते कथितपणे रस्ते जाम करणाऱ्या मराठा आंदोलकांना कडक शब्दांत समज दिली आहे. रस्ते अडवल्याने किंवा रिझर्व्ह बँकेच्या समोर जाऊन घोषणाबाजी केल्याने आरक्षण मिळत नाही. सरकारने घेतलेला निर्णय कोर्टात टिकावा असा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे या प्रकरणी वेळ लागत आहे, असे ते म्हणालेत.
मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी गत शुक्रवारपासून आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी आज रिझर्व्ह बँकेपुढे जाऊन घोषणाबाजी केली. तसेच काही आंदोलकांनी शेअर बाजाराच्या इमारतीतही शिरण्याचा प्रयत्न केला. विशेषतः काही आंदोलकांनी मुंबईतील काही प्रमुख रस्त्यांवर गाड्या आडव्या लावल्या आहेत. यामुळे रहदारीचा प्रश्न उपस्थित झाला असताना मंत्री राधाकृ्ष्ण विखे पाटील यांनी आंदोलकांना खडेबोल सुनावलेत. समाजाला गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य आंदोलकांनी करू नये, असे ते म्हणालेत.
राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, न्यायालयीन प्रक्रियेमुळे या प्रकरणी काहीसा वेळ लागत आहे. पण सरकारने घेतलेला निर्णय कोर्टात टिकला पाहिजे, यासाठी आमच्याकडून सर्वोतपरी प्रयत्न केले जात आहेत. मराठा समाजाने यापूर्वीही अनेकदा मोर्चे काढले. त्याची देशभर चर्चा झाली. पण कुठेही गालबोट लागले नाही. कारण, असे काही झाले तर त्याने समाजाची बदनामी होते. आता जी काही मंडळी काही प्रकार करत आहेत ते चुकीचे आहे. या प्रकरणी रस्ते अडवणे किंवा रिझर्व्ह बँकेपुढे जाऊन घोषणाबाजी केल्याने आरक्षण मिळत नाही. कोणताही प्रश्न सुटत नाही.
मनोज जरांगे स्वतः आझाद मैदानावर बसलेत. त्यामुळे सर्व मराठा बांधवांनीही आझाद मैदानावर गेले पाहिजे. त्या आंदोलनात आपला सहभाग नोंदवला पाहिजे. आपण मुंबईला कशासाठी आलो हे लक्षात घेतले पाहिजे. सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल होता कामा नये. आपलीही बदनामी होता कामा नये.
ते पुढे म्हणाले, मराठा बांधव आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मैदानात येत असतील तर त्यात काहीच गैर नाही. पण त्याशिवाय इतरत्र जाऊन दैनंदिन जीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर त्यामुळे समाजाची बदनामी होते याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी या प्रकरणी मराठा आंदोलकांवर टीका करण्याची काहीही गरज नसल्याचेही स्पष्ट केले. आंदोलनकर्त्यांमुळे मुंबईतील रहदारीवर काहीसा परिणाम झाला. पण त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याचे कोणतेही कारण नाही, असे ते म्हणाले.
दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आज बैठकांचे सत्र सुरू आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे उपस्थित आहेत. सोबतच मंत्री छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे-पाटील आणि महाधिवक्त्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होत आहे. यात काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर तिखट टीका केली होती. ते कुचक्या कानाचे असल्याचे ते म्हणाले होते. पण आता राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी एका निवेदनाद्वारे मनसैनिकांना राज्यभरातून आलेल्या मराठा बांधवांच्या पोटापाण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत आलेले मराठा बांधव आपलेच आहेत. त्यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत त्यांच्या पोटाची चिंता दिसू नये ही आपली जबाबदारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील गत 4 दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करत आहेत. त्यांच्या पोटापाण्यासाठी राज्यभरातून अन्नाची रसद पाठवली जात आहे. पण त्यानंतरही मुंबईत काहीही कमी पडू नये यासाठी मनसे नेते अमित ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मराठा आंदोलकांना अन्नपाणी पुरवण्याच्या सूचना केल्या आहेत.
अमित ठाकरे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, सध्या आपल्या मुंबईत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो मराठा बांधव आंदोलनासाठी जमले आहेत. मराठा आरक्षण हा विषय शासनाच्या हाती आहे, त्याचा निकाल काय लागेल हे काळ सांगेल. पण एवढं मात्र नक्की, आज जे इथे उभे आहेत ते आपले बांधव आहेत. हे शेतकरी आहेत, मजूर आहेत, लहानशा जमिनीवर पोट सांभाळणारे आहेत, शिक्षणासाठी धडपडणारे युवक आहेत… म्हणजेच मराठा समाजातील प्रत्येक स्तरातील, प्रत्येक जीवन जगणारी आपलीच माणसं आहेत.
ते आपल्या घरापासून, गावापासून, शेतापासून दूर येऊन इथे आंदोलन करीत आहेत. त्यांना काही कमी पडू नये, त्यांच्या मुलांच्या, आई-वडिलांच्या डोळ्यात पोटाची चिंता दिसू नये, ही जबाबदारी आपली आहे.
माझं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला स्पष्ट आवाहन आहे,
जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना अन्न-पाणी पुरवा. औषधोपचारात कोणतीही अडचण येऊ देऊ नका. त्यांच्या राहण्याची, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या. एकही मराठा बांधव असा राहू नये की ज्याला वाटेल की तो मुंबईत एकटा आहे. लक्षात ठेवा, ते आपलेच आहेत. त्यांची लढाई जरी आरक्षणासाठी असली, तरी ते आपली जबाबदारी आहेत, आणि आपण महाराष्ट्र सैनिक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण पार पाडणार आहोत. आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो, तर त्यांचं मनोबल दुप्पट होईल. आपला प्रत्येक महाराष्ट्र सैनिक या भावनेनं उभा राहील, ही मला खात्री आहे, असे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे हे पुन्हा मुंबईत का आले? या प्रश्नाचे उत्तर एकनाथ शिंदेच देऊ शकतात, असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर मनोज जरांगेंनी त्यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली होती. ते म्हणाले होते, राज्यातील समाजाचे म्हणणे आहे की, हे दोन्ही भाऊ चांगले आहेत. ब्रँड चांगला आहे. पण हा विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नात पडतो. त्याला आम्ही कधी विचारले का की, 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले? त्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात केव्हा आला? आम्ही तुला विचारले का तू काल पुण्यात केव्हा आला?तुला विचारले का तुझी नाशिकची सासरवाडी आहे, तू 50 वेळा नाशिकला का येतो? आम्ही विचारले का? देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेला तुझा गेम केला. त्यानंतर विधानसभेला तुझा पोरगा त्यांनी पाडला. त्यानंतरही तू त्यांची री ओढतो. राज ठाकरे कुचक्या कानाचा आहे. त्याच्या घरी फडणवीस चहा पिऊन गेला, सगळा पक्ष बरबाद झाला तरी त्याला चालते. आमच्या खेड्यात याला कुचक्या कानाचे म्हणतात, असे ते म्हणाले होते.
राज ठाकरे शनिवारी पुण्यात आले होते. तेव्हा त्यांनी मराठा आंदोलनावर भाष्य केले होते. ते म्हणाले होते, मराठा मोर्चा व आरक्षणाच्या मुद्यावर सर्व गोष्टींची उत्तरे एकनाथ शिंदेच देऊ शकतात. मनोज जरांगे परत का आले? याचेही उत्तर एकनाथ शिंदेंना विचारा. जेव्हा एकनाथ शिंदे येतील तेव्हा त्यांना विचारा मुंबईकरांना खूप त्रास होतोय, एकनाथ शिंदे मागच्यावेळी नवी मुंबईत गेले होते, त्यावेळी त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग हे परत का आले? या प्रश्नांची सगळी उत्तरे एकनाथ शिंदे देतील.
नागपूर-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी लोकांना आवाहन केले की मंत्री आणि नेत्यांना धार्मिक कार्यक्रमांपासून दूर ठेवावे. धर्माच्या नावाखाली राजकारण करणे समाजासाठी हानिकारक आहे.नागपूरमध्ये महानुभाव पंथाच्या परिषदेत गडकरी बोलत होते. ते म्हणाले की, राजकारणी जिथे जिथे प्रवेश करतात तिथे तिथे आग लावल्याशिवाय ते निघून जात नाहीत. जर धर्माला सत्तेच्या हाती दिले तर ते फक्त नुकसानच करेल.
गडकरी म्हणाले की, धार्मिक कार्य, सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य वेगळे आहेत. धर्म हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे. काही राजकारणी त्याचा वापर करतात. यामुळे विकास आणि रोजगाराचे प्रश्न दुय्यम बनतात. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांची शिकवण प्रत्येकाच्या जीवनासाठी प्रेरणादायी आहे, असे गडकरी म्हणाले. ते म्हणाले की, व्यक्तीमध्ये बदल त्याच्या मूल्यांमधून येतो. चक्रधर स्वामींनी सत्य, अहिंसा, शांती, मानवता आणि समानता ही मूल्ये शिकवली.
ते म्हणाले की, जीवनात सत्याचे अनुसरण करावे आणि कोणालाही दुखवू नये. गडकरी म्हणाले की, समाजात प्रामाणिकपणा, विश्वासार्हता आणि समर्पण यासारख्या मूल्यांना खूप महत्त्व आहे.
पुणे (दि. ३१ ऑगस्ट २०२५) शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानला जागतिक स्तरावर मोठा सन्मान प्राप्त झाला आहे. संस्थेची नोंद ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे. श्री साईबाबांच्या कृपेने लाखो भाविकांच्या श्रद्धास्थान ठरलेल्या या संस्थेच्या कार्याची दखल घेऊन वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड चे अध्यक्ष डॉ. मनिष कुमार व उपाध्यक्ष डॉ. दीपक हरके तसेच कार्यकारी संचालक जितेंद्र मित्तल यांनी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भाप्रसे) यांचेकडे प्रदान केले. यावेळी संस्थानचे प्र. उप मुख्यकार्यकारी अधिकारी तथा प्रशासकिय अधिकारी संदिपकुमार भोसले, प्र. प्रशासकिय अधिकारी विश्वनाथ बजाज, मुख्य कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे आदी उपस्थित होते.
या जागतिक मान्यतेमुळे श्री साईबाबा संस्थानचे धार्मिक, सामाजिक व मानवसेवेतील योगदान अधोरेखित झाले आहे. भाविकांच्या सेवेसाठी संस्थान सातत्याने करत असलेल्या कार्याला यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नवा गौरव लाभला आहे असे संस्थांनचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.
‘नाचून नाही, तर वाचून’च गणेशोत्सव साजरा करण्याचा विद्यार्थ्यांचा निर्धार
पुणे : ‘नाचून नाही, तर वाचून गणेशोत्सव साजरा करा’ हे विचार विद्यार्थ्यांमध्ये रूजविण्यासाठी संवाद, पुणे आणि वृद्धी रिॲलिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हलचा आज (दि. 31) समारोप झाला. ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करीत विद्यार्थ्यांनी ‘नाचून नाही, तर वाचून’च गणेशोत्सव साजरा करू असा निर्धार केला.
बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हल अंतर्गत विद्यार्थ्यांनी साकारलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे, श्रीगणेशाच्या चित्रांचे प्रदर्शन या निमित्ताने कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण कलादालनात भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला असंख्य पालकांनी भेट देत उपक्रमाचे कौतुक केले.
बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हल अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी काव्यवाचन, नाट्यछटा सादरीकरण, कथाकथन, रंगभरण स्पर्धा घेण्यात आल्या. यात पाच हजारापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धांची अंतिम फेरी यशवंतराव चव्हाण कलादालनात झाल्यानंतर पारितोषिक वितरण बालसाहित्यकार राजीव तांबे, वृद्धी रिॲलिटीचे संचालक अमोल शहा आणि संवाद, पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
राजीव तांबे यांनी या वेळी विद्यार्थ्यांशी गोष्टी सांगत संवाद साधला. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना दाद द्या, असा सल्ला त्यांनी पालकांना दिला.
शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या अभिनव उपक्रमाचे अमोल शहा यांनी कौतुक केले. या उपक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल आनंद व्यक्त करीत मुलांसाठी आयोजित केलेल्या उपक्रमात सहभागी झाल्यामुळे नवी उर्जा मिळाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
प्रास्ताविकात सुनील महाजन म्हणाले, बाल गणेश फेस्टिव्हलचे यंदाचे पहिलेच वर्ष असले तरी कोथरूड परिसरातील जवळपास तीस शाळांमधील पाच हजार विद्यार्थी विविध उपक्रमांमध्ये सहभागी झाले होते. यंदाचा प्रतिसाद बघता पुढील वर्षीपासून शहर पातळीवर उपक्रम राबविण्याचे नियोजन करू.
अस्तित्व फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. राजश्री जायभाये, सातारकर स्टुडिओच्या प्रज्ञा सातारकर, सिने मॉडेल आर्ट स्टुडिओचे सुरेश राऊत, सहसंवाद पुणेच्या केतकी महाजन-बोरकर, छत्रपती संभाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती मानकर, देवेंद्र भिडे, दिपाली गजभिये यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. ज्योती रहाळकर लिखित पुस्तकांचे प्रकाशन पुणे : ‘गजानना तू’ या काव्यसंग्रहातील प्रत्येक कवितेत शास्त्र आणि कला यांची उत्तम सांगड साधली आहे. तत्त्वज्ञान, पंचमहाभुते, निसर्गाची महती या विषयीचा सांगोपांग विचार संवेदनशील मनाच्या कवयित्रीने मांडला आहे. या काव्यसंग्रहातील प्रत्येक कवितेला गेयता, मधुर शब्द लाभले असून त्या सादरीकरणासाठी देखील पोषक आहेत, असे विचार ज्येष्ठ नृत्यगुरू स्मिता महाजन यांनी व्यक्त केले. सिग्नेट प्रकाशनतर्फे डॉ. ज्योती रहाळकर लिखित ‘गजानना तू’ या कविता संग्रहाचे आणि ‘कबीर वाणी’ या पुस्तिकेचे प्रकाशन रविवारी (दि. ३१) स्मिता महाजन आणि आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी महाजन बोलत होत्या. डॉ. जयेश रहाळकर मंचावर होते. डॉ. रहाळकर्स हेल्थकेअर अँड प्रेगकेअर, कोथरूड येथे कार्यक्रम झाला. स्मिता महाजन पुढे म्हणाल्या, डॉ. ज्योती रहाळकर यांचे व्यक्तिमत्व अत्यंत गुणी असून त्यांच्या मनात येणारे तरल, संवेदनाक्षम विचार त्या कवितेतून प्रकट करीत असतात. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, स्वत:ला आनंदीत ठेवण्यासाठी तसेच वेगळेपण दर्शविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सतत काहीतरी कर्म करत राहणे आवश्यक आहे. डॉ. ज्योती रहाळकर यांची बैठक वाङ्मयीन विचारांची व अभ्यासाची आहे. त्यांचे व्यक्तिमत्व हरहुन्नरी असून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रासह साहित्य क्षेत्रातही आपला ठसा उमटविला आहे. लेखनाविषयी बोलताना डॉ. ज्योती रहाळकर म्हणाल्या, मी गेली अनेक वर्षे प्रसंगानुरूप काव्य करत आहे. माझ्या हातून अनेक पुस्तकांचे अनुवाद घडले आहेत. गणेशोत्सवानिमित्त मी केलेल्या गणेशावरील कवितांच्या संग्रहाचे प्रकाशन करण्याचा योग जुळून आला आहे. मला आजेसासुबाईंचा लाभलेला मऊ सहवास स्मरणात ठेवून त्यांच्या स्मृतींना हे पुस्तक अर्पण करीत आहे. सुरुवातीस ऋचा खरे यांनी भरतनाट्यम् नृत्याद्वारे गणेशवंदना सादर केली. पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखाटणाऱ्या डॉ. सानिका मोडक यांचा विशेष सत्कार स्मिता महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अरुजा रहाळकर यांनी केले तर आभार डॉ. जयेश रहाळकर यांनी मानले.
या संदर्भात पोलिसांनी सांगितले कि,’खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मार्वल सिट्रिन या उच्चभ्रु सोसायटीमध्ये एका बंद फ्लॅटमध्ये अवैधरित्या पोकर हा जुगार चालू असल्याबाबतची माहिती खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांना प्राप्त झाल्यानंतर दि ३०/०८/२०२५ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संजय चव्हाण व त्यांचे पथकातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित जगताप, सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक राहुल कोळपे, पोलीस उप निरीक्षक गणेश घुले, व तपास पथक यांनी मार्वल सिट्रिन सोसायटीमधील फ्लॅट क्र से १२०२ सातव वस्ती खराडी, पुणे या ठिकाणी पंचासमक्ष जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी दोन मोठे टेबल त्यापैकी एका टेबल वरती १२ इसम समोरा समोर खुर्ध्यावरती तर दुस-याटेबल वरती १२ इसम समोरा समोर खुर्ध्यावरती बसलेल्या अवस्थेत प्रत्येकाचे हातातध्ये प्लेईंग कार्ड (पत्ते) तर त्यांचे समोरील टेबलावरती कॉईन त्यावरती आकडे असलेले कॉईन तसेच प्लेइंग कार्डचे बॉक्स असा सामान ठेवलेल्या अवस्थेत पोकर हा जुगार खेळताना एकुण २४ जण मिळून आले तसेच सदर सदानिका जुगाराचा अड्डा चालविणेसाठी वापर करून पोकर हा जुगार खेळ बेकायदेशीररित्या, विनापरवाना चालवून जुगारासाठी वापरण्यासाठी श्लोक संजय संग्तानी वय २९ वर्षे रा. सातववस्ती खराडी पुणे २) सिध्दांत संजीव कक्कर वय ३५ वर्षे यांनी दिला म्हणुन इतर एकुण २६ जणांना ताब्यात घेण्यात आले. सदर ठिकाणी जुगार खेळणारे वर यांचे हातामध्ये चौकट, इस्पिक , बदाम व किल्व्हर असे पत्ते व समोरील पुढयात वेगवेगळ्या रंगाचे कॉईन/चिप्स त्यावर पोकर असे असे इंग्रजीत लिहीलेले मिळुन आले. ६००/- रू. कि.चे प्लेइंग कार्डचे (पत्ते) ६ जम्बो कार्डस , ६५००/- रू. रोख रक्कम , ४०,०००/- रू कि.चा एक आयफोन-१२ काळया रंगाचा मोबाईल ३०,०००/- रू. कि.चा अशा एकूण ७७,१००/- रु.कि.चे मुद्देमालासह मिळून आले म्हणून त्यांचे विरुद्ध खराडी पोलीस स्टेशन गुन्हा रजि क्र १८९ / २०२५ महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम ४, ५ अन्वये दि ३०/०८/२०२५ रोजी दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरीअपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४, सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजित जगताप, तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक श्री रविंद्र गोडसे, पोलीस उप निरीक्षक श्री राहुल कोळपे, व पोलीस उप निरीक्षक श्री गणेश घुले, पोलीस अंमलदार श्रीकांत शेंडे, महेश नाणेकर, सुरेंद्र साबळे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, जयवंत श्रीरामे, विकास केदारी, महिला अंमलदार श्रीमती वर्षा कडीले यांनी केली.
पुणे- विज्ञान, उद्योग व तंत्रज्ञानासोबतच भाषेच्या आधारेच “मानवी सभ्यता” घडली आहे. भाषा ही ओळख निर्माण करते, संस्कृतीला जोपासते आणि काव्य हे परिवर्तनाचे एक महत्त्वाचे साधन आहे.” पुणे फेस्टिव्हल सारख्या मोठ्या सांस्कृतिक महोत्सवात मुशायराच्या माध्यमातून एकोपा जोपासला जातो हे मी खूप महत्वाचे मानते असे उदगार राज्यसभेच्या खासदार व महाराष्ट्र वक्फ बोर्डच्या सदस्या डॉ. फौजिया खान यांनी काढले. ३७व्या पुणे फेस्टिव्हल मध्ये आयोजित ऑल इंडिया मुशायराचे गणेश कला क्रीडा रंगमंच येथे उदघाटन करताना त्या बोलत होत्या. रात्री उशिरा पर्यंत हा कार्यक्रम रंगला. कार्यक्रमास प्रचंड गर्दी होती.
एम. सी. ई. सोसायटीच्या डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठाच्या वतीने ३७ व्या पुणे फेस्टिव्हल मध्ये ऑल इंडिया मुशायरा गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न झाला. गेल्या ३७ वर्षांपासून सलगपणे साजरा होणाऱ्या पुणे फेस्टिव्हलमध्ये डॉ. पी. ए. इनामदार आणि सौ. आबिदा इनामदार यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे. उर्दू मुशायरा हा या फेस्टिव्हलचा एक अविभाज्य भाग बनला आहे.
माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे, ॲड. अभय छाजेड,कृष्णकुमार गोयल,सतीश देसाई या प्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा व परस्पर प्रेमाचा संदेश देणे हा आहे. यामुळे पुणे शहरात शांतता व सौहार्दाचे वातावरण कायम राखले गेले आहे. गेली २७ वर्ष आम्ही या मुशायराचे आयोजन करीत आहोत असे ऑल इंडिया मुशायराच्या निमंत्रक सौ. आबिदा इनामदार यांनी सांगितले.
देशभरातील नामवंत शायरांनी या मुशायऱ्यात आपली गझल व कविता सादर करून रंगत आणली. हा मुशायरा न्यूज 24 चॅनेल, तसेच आझम कॅम्पसच्या फेसबुक, इंस्टाग्राम व यूट्यूबवरून थेट प्रक्षेपित करण्यात आला. मुख्य अतिथी डॉ. फौजिया खान यांची ओळख श्री. अब्दुल हमीद इनामदार (विश्वस्त, हाजी गुलाम एज्युकेशन ट्रस्ट) यांनी करून दिली.
ऑल इंडिया मुशायरात गोविंद गुलशन (गाझियाबाद), इरशाद अंजुम (मालेगाव), आरिफ सैफी (हैदराबाद), निकहत अमरोही (अमरोहा), सज्जाद झंझट (उत्तराखंड), मेहक कैरान्वी (हैदराबाद), जुबेर अली ताबिश (जळगाव), डॉ. इफ्तेखार शकील (रायचूर), अब्बास कमर (दिल्ली), कलीम जावेद (उत्तर प्रदेश) आणि स्थानिक शायर हिसामुद्दीन शोला (पुणे) आदींचा समावेश होता.
डॉ. इफ्तेखार शकील यांनी डॉ. पी. ए. इनामदार यांच्या सन्मानार्थ एक विशेष कविता सादर केली.
मुशायऱ्याचा समारोप मनमोहक शायरीने झाला.
“जंगल से न दुनिया में किसी टापू से आये हैं ज़मीन की गोद में हम अर्श की पहलू से आये हैं हमें रोज़ी तो हिन्दी और अंग्रेज़ी ने दी बेशक! मगर आदाब जीने के हमें उर्दू से आये हैं”
“जिस तरह चाँद सितारों में नज़र आता है मेरा महबूब हज़ारों में नज़र आता है
सब में होता नहीं क़ुर्बानी का जज़्बा ये तो बस इश्क़ के मारों से नज़र आता है ”
“जो हलाल रिज़्क है वो निवाले चूम लो छोड़ दो सारे अंधेरे उजाले चूम लो
कर रहे हैं आप के राहों को रोशन ये चराग़ जाओ अपने बाप के हाथों को चूम लो
सौदा पुरानी ज़िन्दगी का आसान कर दिया जो बिक नहीं रहा था उसे दान कर दिया
पूरी ग़ज़ल का लुत्फ़ उठा ही नहीं सके मतले ने इस क़दर हमें हैरान कर दिया”
डॉ. मोहम्मद सलीम अब्दुर्रहमान लाहोरी (कुलगुरू, डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठ) यांनी शायरांचा सन्मान करून त्यांचा सन्मान केला.
कार्यक्रमाच्या शेवटी सौ. अजमत दलाल यांनी पुणे फेस्टिव्हलमधील ऑल इंडिया मुशायराचे संयोजक डॉ. पी. ए. इनामदार आणि निमंत्रक सौ. आबिदा इनामदार, कृष्णकुमार गोयल, ॲड. अभय छाजेड, रमेश बागवे, डॉ. सतीश देसाई यांचे आभार मानले. तसेच आझम कॅम्पसचे शिक्षकवृंद, तांत्रिक सहकारी आणि सर्व आयोजकांचे विशेष कौतुक केले.