कचरा वेचक महिलांचा सत्कार
मुस्लीम को-ऑप बँकेकडून महिलांचा सत्कार
पुणे :दि मुस्लीम को- ऑपरेटिव्ह बँकेने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.
आझम कॅम्पस हायटेक हॉल येथे महाराष्ट्र कॉसमॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष अबेदा इनामदार यांच्या हस्ते सत्कार समारंभ झाला.
उपजिल्हाधिकारी श्रीपती खंडु मोरेला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक
पुणे : जमिनीबाबत दाखल असलेल्या अपिलावर आपल्या बाजूने निकाल देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना उपजिल्हाधिका-यासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. उपजिल्हाधिकारी श्रीपती खंडु मोरे (वय ४१, रा. वडगाव शेरी) आणि खासगी व्यक्ती रामचंद्र पोपटराव खराडे (वय ४५) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहिती नुसार, तक्रारदार यांच्या आते बहिणीच्या जमिनीबाबत हवेली प्रांत अधिका-यांकडे अपिल दाखल केले होते़ हे प्रकरण पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी भूसंपादन अधिका-या क्रमांक ११ चे उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांच्याकडे वर्ग केले होते़ या अपिलाबाबत निकाल तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी व या निकालाचे आदेश तक्रारदार यांना देण्यासाठी भूसंपादन अधिकारी श्रीपती मोरे यांनी १५ हजार रुपयांची लाच मागितली़ तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़ या तक्रारीची गुरुवारी पडतळाणी करण्यात आली तेव्हा त्यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले़ त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नवीन प्रशासकीय इमारतीतील भूसंपादन कार्यालय क्रमांक ११ येथे सायंकाळी सापळा रचला़ तक्रारदारांकडून या कार्यालयात उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे यांनी खासगी व्यक्ती रामचंद्र खराडे यांच्यामार्फत १५ हजार रुपये स्वीकारताना पकडण्यात आले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काकडे कन्स्ट्रक्शनच्या कोथरूड प्रकल्पातील एका इमारतीला न्यायालयाची स्थगिती -काय आहे प्रकरण ..
पुणे-पुण्यातील काकडे कन्स्ट्रक्शन प्रा.लि. च्या कोथरूड प्रकल्पातील ‘इ-१’ या इमारतीच्या बांधकामाबाबत वाद निर्माण झाल्याने उच्च न्यायालयाने एक मार्च रोजी या इमारतीच्या बांधकामावर तात्पुरती स्थगिती दिली. उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना काकडे कन्स्ट्रक्शन प्रा.लि ला नोटीस बजावण्याचे निर्देश देत पुणे जिल्हाधिकारी व पुणे पालिकेला १९ मार्चपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले.या आरोपांचे संजय काकडे यांनी खंडन केले. ‘कोथरूड प्रकल्पा’ला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली नसून त्यातील ४० हजार चौरस फुटांच्या ‘इ-१’ इमारतीच्या बांधकामाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. याचिकाकर्त्यांनी दिशाभूल केल्याने न्यायालयाने ही स्थगिती दिली. पुढील सुनावणीस म्हणजेच ४ एप्रिल रोजी आम्ही आमचू बाजू न्यायालयात मांडू. मला खात्री आहे की, आमची बाजू ऐकल्यावर न्यायालय ही स्थगिती हटवेल,’ असे काकडे यांनी सांगितले. ‘सरकारची व पुनर्वसनधारकांची आम्ही कोणतीही फसवणूक केलेली नाही. सरकारने आम्हाला संबंधित जागेचा ताबा २००२ मध्ये दिला. २००७ पर्यंत ९० टक्के बांधकाम पूर्ण होऊन ३१७ लोकांना सदनिकेचा ताबाही दिला. उर्वरित ३५ जणांनी आम्हाला स्वत:हून बांधकाम करण्यास मुदतवाढ दिली. त्यांना आम्ही कराराप्रमाणे दरमहा भाडे देत आहोत. राज्य सरकारने व भूखंडांच्या मूळ मालकांनी याबाबत कधीच तक्रार केली नाही. जे दोन लोक न्यायालयात आले आहेत, त्यांच्याही सदनिका तयार असून त्यांना ताबा देण्यास आम्ही तयार आहोत,’ असे काकडे यांनी स्पष्ट केले.
कोथरूड प्रकल्पातील ‘इ-१’ या ४० हजार चौरस फूट इमारतीच्या बांधकामाविरुद्ध खडकवासला धरण प्रकल्पग्रस्त विशाल मोरे व अन्य एकाने दाखल केलेल्या याचिकेनुसार, खडकवासला धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी सरकारने हवेली तालुक्यातील हिंगणे गावात ३१ एकर २१ गुंठा भूखंड दिला. त्याच्या विकासासाठी काकडे कन्स्ट्रक्शनला पॉवर आॅफ अॅटर्नी दिली. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी काकडेंबरोबर करार करत एकूण भूखंडातील ३० टक्के जागेवर प्रकल्पग्रस्तांसाठी सदनिका बांधण्याची व ७० टक्के भूखंडावर खासगी विकास करण्याची परवानगी दिली. काकडे कन्स्ट्रक्शनने खासगी विकासासाठी ७० टक्के भूखंडावर बांधकाम सुरू केले. येथील सुमारे २०० सदनिका बाजारभावाने विकण्यातही आल्या आहेत.
विविध जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडण्याचे काम महिलाच करु शकतात
पुणे – स्त्री ही समाजाची अविभाज्य घटक असून घर सांभाळून कार्यालयीन जबाबदाऱ्या उत्कृष्टपणे पार पाडण्याचे काम महिलाच करु शकतात, असा विश्वास विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केला.
विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात श्री. दळवी बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग, वैमानिक पुनव गोडबोले, सिनेमा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, कलाकार सायली संजीव आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी मतदान नोंदणीच्या कामामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
श्री. दळवी म्हणाले, विविध क्षेत्रात आपले कतृर्त्व सिद्ध करुन महिलांनी आपला ठसा सर्वच क्षेत्रात उमटवला आहे. समाजात महिलांना सन्मानाची वागणूक देणे गरजेचे आहे. उच्चपदावर काम करणाऱ्या उच्च शिक्षित महिलांनाही कौटुंबिक छळ व त्रास सहन करावा लागत असल्याची उदाहरणे समाजात पहायला मिळतात, ही बाब खेदजनक असून ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे.
महिलांनी मनापासून कोणतीही गोष्ट करावयाची ठरवली तर त्या निश्चितच यशस्वीपणे पुर्ण करु शकतात. यासाठी सर्वप्रथम ध्येय निश्चित करा आणि आत्मविश्वास बाळगून ध्येय पूर्ण करण्यासाठी कष्ट करा, असे आवाहन करण्याबरोबरच महिलांनी तणावमुक्त जीवन जगावे, असा सल्ला श्रीमती शुक्ला यांनी दिला.
श्री.राव म्हणाले, ज्या ठिकाणी स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली जाते, तेथेच प्रगती नांदते, हे प्राचीन काळापासून आपण पाहत आलो आहोत. ‘नारी इश्वराची सर्वश्रेष्ठ संकल्पना आहे’, यावर माझा विश्वास आहे. यूपीएससी मध्ये या विषयातच मी अव्वल होतो, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. कुटुंब, समाज आणि देशाप्रती आपली कर्तव्ये व जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी आजच्या महिला दिनापासून सुरुवात करुया,असेही श्री.राव म्हणाले.
सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, आपलं आयुष्य कशाप्रकारे जगायचं, कोणतं ध्येय ठरवायचं, करिअर कोणतं निवडायचं हे महिलांनी स्वत: ठरवावं, पण या निर्णयात कुटुंबातील प्रत्येकाचं मत विचारात घ्यायला हवं.
यावेळी आयोजित व्याख्यान कार्यक्रमात प्रियांका सौरभ राव यांनी ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पेहराव, केशरचना, आपली देहबोली, सकारात्मक विचारसरणी कशी असावी याबाबत सादरीकरणातून माहिती दिली. डॉ. अपर्णा लेले यांनी योग्य आहार पध्दतीबाबत मार्गदर्शन केले. तसेच परिसंवाद कार्यक्रमात पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, वैमानिक पुनव गोडबोले, सिनेमा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व कलाकार सायली संजीव सहभागी झाल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मोनिका सिंग यांनी कार्यक्रमाची रुपरेषा विशद केली. मतदानामध्ये स्त्रियांचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे सांगून त्यासाठीच्या उपाययोजनांबाबत श्रीमती सिंग यांनी माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुकबधिर असूनही विविध पुरस्कार मिळविलेल्या प्रेरणा शहाणे- दिक्षीत यांनी गणेशवंदना सादर केली.
सूत्रसंचालन अक्षय घोळवे व स्नेहल दामले यांनी केले. यावेळी सर्व शासकीय कार्यालयातील महिला अधिकारी, कर्मचारी महिलांसाठी पैठणीचा खेळ व लकी ड्रॉ आयोजित करण्यात आला. यामध्ये मोठया संख्येने महिला सहभागी झाल्या. महिलांनी या कार्यक्रमांचा आनंद घेतला.
महिला दिन निमित्त तेजस्विनी बस चे लोकार्पण
पुणे-महिला दिनाचे औचित्य साधून आज पीएमपीएमएल तर्फे खास महिलांसाठी ३० ‘तेजस्विनी’ बसेसचे लोकार्पण पी एम पी एम एल चे संचालक नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे ह्यांच्या हस्ते करण्यात आले. ह्या प्रसंगी बोलताना शिरोळे म्हणाले,” पुणे शहरातील महिला भगिनींचा प्रवास सुखकर होण्यासाठी या ‘तेजस्विनी’ बसेसचा लाभ होणार आहे. स्त्री सशक्तीकरण करण्यासाठी एक चांगला प्रयत्न पीएमपीएमएल मार्फत केलेला आहे”. तसेच ह्या बस सेवेचा लाभ शहरातील महिला भगिनींनी जास्तीत जास्त घ्यावा अशी विनंती देण्खील ह्या प्रसंगी बोलताना शिरोळे ह्यांनी केली. त्याचप्रमाणे येत्या वर्षभरात ५०० इलेक्ट्रीक बसेस, ८०० साध्या बसेस व २०० मिडी बसेस पुणे शहरातील रस्त्यांवरती नक्कीच धावतील व त्याद्वारे पुणेकरांची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या बसेसमुळे निश्चितच सक्षम होईल असेही शिरोळे ह्या प्रसंगी बोलताना म्हणाले.
महिलादिन निमित्त – “अवघे पाऊणशे वयोमान”
महिला दिनानिमित्त मॉडेल कॉलनी येथील चित्तरंजन वाटिकेमध्ये ७५ आयु च्या वरती ज्या महिला आहेत अशा महिलांसाठी नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे ह्यांच्या वतीने “अवघे पाऊणशे वयोमान” हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये एका दीर्घ आयुष्याचे अनुभव याचा उपयोग तरुण पिढीला कसा होऊ शकतो याच्यावरती मनमोकळेपनाणे चर्चा झाली. ह्या प्रसंगी बोलताना नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे म्हणाले,’ आयुष्यात सगळेच अनुभव आपल्याला घ्यायची गरज नसते, दुसऱ्यांच्या अनुभवाचा सार समजा आपण ओळखला तर आपल्या आयुष्याचे निर्णय घेताना आपणास चांगली दिशा मिळते”. मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या प्रेरणेतून हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे सिद्धार्थ शिरोळे ह्यांनी ह्या प्रसंगी बोलताना नमूद केले.
संयुक्त राष्ट्र संघाच्या मंचावर महाराष्ट्राची मोहोर- पुण्याच्या सौरभ नावंदे यांनी मांडले विचार
नवी दिल्ली,: संयुक्त राष्ट्र संघाच्यावतीने न्युयॉर्क येथे आयोजित राष्ट्रकुल युवक विधानसभेच्या चर्चा सत्रात
पुण्याचा सौरभ नावंदे याने "शाश्वत विकास आणि २०३० मधील जागतिक बदल” या विषयावर आपले
विचार मांडले.
नुकतेच न्युयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र संघाच्यावतीने निरंतर विकासाच्या उद्दीष्टयांविषयी राष्ट्रकुल युवक
विधानसेभेच्या सत्रांचे आयोजन आयोजित करण्यात आले होते. या सत्रात सौरभ नवांदे ने आपले विचार व्यक्त
केले. यावेळी 140 देशांमधील निवडक युवकांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. या आयोजनाचा
उद्देश हा एक स्थायी व टिकाऊ जगासाठी नवीन संशोधन आणि सहयोग याची पुनारावृती करण्याचे उद्दिष्ट
होते. तीन दिवसीय विधानसभा संसदेमध्ये सखोल ज्ञान असलेले संयुक्त राष्ट्र संघाचे अधिकारी, राजदूत आणि
प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदविला.
संयुक्त् राष्ट्र संघाच्या युवक प्रतिनिधींपैकी सौरभची निवड ही संयुक्त राष्ट्र संघाच्या लोक माहिती
विभागातर्फे करण्यात आली. त्यामुळे जागतिक मंचावरून परखडपणे विचार मांडण्याची संधी सौरभला
मिळाली. सौरभने “शाश्वत विकास आणि 2030 मधील जागतिक बदल” विषयांवर आपले मत मांडात या
जागतिक मंचावरून सौरभ म्हणाला, "आम्ही पहिली पिढी आहे जी गरीबी नष्ट करू शकते आणि शेवटचे
म्हणजे हवामानातील बदल टाळू शकतो म्हणून, आम्ही तरुण पिढीला एकत्र आणणे आणि नवाचार, नागरी
सहभाग आणि सहयोगी भागीदारीतून उदिष्ट हाताळण्याचे काम करणे आवश्यक आहे’.
‘युवन फाऊंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक विकास या प्रकल्पावर सौरभ काम करत आहे.
‘मला या संसदेत सहभाग होण्याची संधी मिळाली ही माझासाठी खूप अभिमानाची बाबा आहे, यापुढे मी,
चांगले काम करण्यास बांधील राहील ‘, अशी प्रतिक्रिया सौरभ ने दिली.
या दरम्यान त्यांना जागतिक बँकेच्या सेमिनार, इंटरनॅशनल मॉनेटरी फंड, संयुक्त राष्ट्रसंघातील
ऑस्ट्रियाचे कायमस्वरुपी मिशन, संयुक्त राष्ट्रसंघामधील कायमस्वरुपी मिशन आणि स्लोव्हाकचे कायमस्वरुपी
मिशन कार्यक्रमांचे सादरीकरण दाखविण्यात आले. येथे सौरभला उद्देश असलेल्या प्रकल्पांचा प्रस्ताव
मांडण्याची संधी मिळाली.
स्थानिक आणि जागतिक समस्या सोडविण्यासाठी संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी मिशनच्या
कार्यालयाही सौरभ ने भेट दिली.
अखेर भाजप कुमारांना ‘बक्षिसी’ ? झाली केंद्रात बदली …
पुणे : ज्यांना भाजपकुमार असे संबोधिले जात, त्या पुणे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांची अखेर केंद्रात नियुक्ती करण्याचा आदेश आज जारी झाल्याचे वृत्त आहे . केंद्रात गृहनिर्माण विभागाच्या सहसचिव पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आबा बागुल,अरविंद शिंदे, चेतन तुपे पाटील या सारख्या कॉंग्रेस- राष्ट्रवादी नेत्यांनी या भाजप कुमार यांची बदली केंद्रात चांगल्या ठिकाणी होईल असे संकेत वारंवार त्यांच्यावर टीका करताना महापालिकेच्या मुख्य सभेत दिले होते, त्याची प्रचीती या आदेशाने आज येते आहे .
भाजप कुमार हे तब्बल पावणे चार वर्षे पुण्याचे आयुक्त होते. त्यांनी आधीच्या टप्प्यांत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा विश्वास संपादन केला. नंतर सत्तेवर आलेल्या भाजपच्या नेत्यांनाही त्यांनी आपलेसे केले. परिणामी त्यांचा कार्यकाल विनासायास पार पडला. पुण्याला चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठीचे टेंडर त्यांच्याच कालावधीत निघाले. यासाठी खुल्या बाजारातून पुणे महापालिकेने दोनशे कोटी रूपये हे खुल्या बाजारातून उभे केले. देशातील हा पहिलाच प्रयोग ठरला होता. ही निविदा जादा दराने वादात अडकली खरी. मात्र त्यातूनही भाजप कुमार यांनी मार्ग काढला. अनुभवी व प्रधान सचिव दर्जाचा अधिकारी पुणे पालिकेवर नेमला जातो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील अधिकारी मानले जातात तेच येथे येतील असे दिसते आहे
‘महापालिकेच्या आवारात विनापरवाना दादोजी कोंडदेव प्रतिमा पूजनाचा डाव ब्रिगेडने उधळला .. (व्हिडीओ)
पुणे – ब्राह्मण संघाने आज सकाळी पुणे महापालिकेच्या आवारात दादोजी कोंडदेव यांची प्रतिमा बसवून त्याचे पूजन केले. त्यावेळी कार्यक्रमस्थळी धाव घेत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. या सर्व वादानंतर ती प्रतिमा हटवण्यात आली.
आज ७ मार्च दादोजी कोंडदेव यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने ब्राम्हण महासंघाच्या वतीने आज सकाळी दादोजी कोंडदेव यांची प्रतिमा बसवून तिचे पूजन करण्यात आले. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच त्यांनी कार्यक्रमस्थळी धाव घेतली आणि दादोजी कोंडदेव यांची प्रतिमा त्वरित हटविण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच या कार्यकर्त्यांनी ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांशी वाद घालण्याचा प्रयत्न केला.
संभाजी ब्रिगेडच्या मागणी व वादविवादानंतर अखेर संघाचे शहराध्यक्ष आनंद दवे यांनी ही प्रतिमा काढून घेतली. केवळ दादोजी कोंडदेवांचा पुतळा बसविण्याची प्रशासनाला आठवण करून देण्यासाठी आम्ही पालिकेच्या आवारात प्रतिमा बसवली, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता पुढील वाद टळला.
” या मातांना, या मुलांना आपणच हातात हात घेऊन पुढे जाऊ या “
याच सोहळ्यात ‘रंगारंग धम्माल’ हा विनोद आणि गाणी यांचा कार्यक्रम सुप्रसिद्ध कलाकार संतोष चोरडिया, वंदन नगरकर, बंडा जोशी, राजेश शिंगाडे, अनुपमा खरे यांनी सादर केला.
पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपचे योगेश मुळीक(व्हिडिओ..)
पुणे -महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत योगेश मुळीक यांची निवड करण्यात आली आहे. मुळीक यांना 10 मते मिळाली तर यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवार लक्ष्मी दुधाणे यांना 5 मते पडली. शिवसेनेच्या संगीता ठोसर गैरहजर राहिल्या. स्थायी समितीमध्ये भाजपचे बहुमत असल्याने आजची निवडणूक ही केवळ औपचारिकता होती.
यावेळी सभागृहात महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, मावळते स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, विरोधीपक्षनेते चेतन तुपे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, पीठासन अधिकारी शेखर गायकवाड उपस्थित होते. या समितीमध्ये 16 पैकी 10 सदस्य भाजपाचे आहेत. पंधरा दिवसांपूर्वी चिठ्ठीद्वारे आठ सदस्य बाहेर पडले. पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी योगेश मुळीक यांची निवड झाल्याने वडगाव शेरी मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार जगदीश मुळीक यांची ताकद वाढली आहे. या वाढलेल्या ताकदीचा उपयोग त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो, असा त्यांच्या समर्थकांचा दावा आहे.ज्याला भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी हि दुजोरा दिला आहे .
आज मुळीक यांची निवड झाल्यानंतर गोगावले यांनी पत्रकारांशी बोलताना जी विधाने केली त्यांचा आधार घेऊन धोक्यात असलेल्या विधान सभा मतदार संघाकडे पक्षाने लक्ष वळविले असल्याचे मानले जात आहे . खडकवासला , हडपसर आणि वडगावशेरी ला ताकद देण्याचे संकेत आज गोगावले यांनी पालिकेत केलेल्या विधानांमधून मिळते आहे .
वडगाव शेरी मतदारसंघात कॉंग्रेस आणि नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसने वर्चस्व राखले होते. 2014 पर्यंत येथे भाजप मर्यादित असा पक्ष होता. भाजपसाठी कठीण असलेल्या काळापासून मुळीक कुटुंबाने भाजपचे कमळ हाती घेतले होते. त्यात 2012 मध्ये पहिल्यांदा भाजपचे नगरसेवक म्हणून योगेश मुळीक महापालिकेवर निवडून गेले होते. कमळाच्या चिन्हावर मिळालेला हा पहिलाच विजय या भागात होता. त्यानंतर 2014 मध्ये मोदी लाटेत निष्ठेचा फायदा झाला. त्यात जगदीश मुळीक हे आमदार झाले. वडगाव शेरी हा मतदारसंख्येच्या दृष्टीने सर्वांत मोठा मतदारसंघ आहे. परप्रांतीयांची मतेही येथे लक्षणीय आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत होण्यासाठी येथे भाजपची ताकद वाढणे गरजेचे असल्याने मुळीकांना ताकद देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे मानण्यात येते आहे .
दरम्यान आज महापालिकेत स्थायी समिती ची निवडणूक प्रत्यक्षात पहा कशी झाली , निवडणुकीनंतर पत्रकारांशी बोलताना कोण काय म्हणाले ? आणि निवडणुकीनंतर झालेला विजयाचा जल्लोष .. सोबत येथे खास व्हिडिओ..पहा
शंकर महादेवन म्हणतायेत ‘वेगे वेगे धावू’
छोट्यांच्या विश्वात घेऊन जाणार शंकर महादेवन
छोट्यांच्या विश्वात डोकावून पहिले तर त्या चिमुकल्या मनात विचारांची किती उलथापालथ चालेली असते हे नक्की कळू शकेल. मुलांच्या विश्वात रमताना आपणही लहान होतो. छोट्यांच्या दुनियेत घेवून जात त्यांच्या मनातील विश्व,गायक–संगीतकार शंकर महादेवन उलगडून दाखवणार आहेत. मुलांशी संवाद साधत त्यांच्या बालविश्वात घेऊन जाणारं सुमधुर गीत नुकतेच शंकर महादेवन यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आलं. योगायतन फिल्मस् च्या आगामी ‘परी हूँ मैं ’ या चित्रपटातील हे गीत अभिषेक खणकर यांच्या लेखणीतून साकारले असून संगीतकार समीर साप्तीस्कर यांचा सुरेख संगीत साज या गीताला लाभला आहे.
करूया किलबिल चिऊ काऊ सवे जरा… बोलकी बोबडी …
चांद ताऱ्याची वाऱ्याची विणूया ना जरा मलमली… गोधडी…
वेगे वेगे धावू कुशीमध्ये घेऊ चांदव्यात लपला ससोबा जरासा….
असे बोल असलेल्या या गीतातून बालपणाची मौज त्यातील निरागसता टिपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बालविश्वाची सुरेख सफर घडवणारं हे गीत प्रत्येकाला आपल्या बालपणाची आठवण करून देईल, असा विश्वास गायक शंकर महादेवन यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
जगण्याचा संघर्ष व स्वप्नांचा पाठलाग करण्याचा ध्यास याचा मेळ साधत एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा ध्येयापर्यंतचा ‘पॅशनेबल’ प्रवास ‘परी हूँ मैं ’ चित्रपटात दाखवण्यात आला आहे. नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी हे कलाकार या चित्रपटात आहेत. या चित्रपटाचे निर्माते डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि शीला राजेंद्र सिंह असून दिग्दर्शन रोहित शिलवंत यांचे आहे. असोसिएट प्रोड्युसर संजय गुजर आहेत.
4थ्या सुहाना लक्ष्य कॉर्पोरेट महिला व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत इन्फोसिस, कॉग्निझंट संघांची विजयी सलामी
पुणे: सुहाना प्रवीण मसालेवाले आणि लक्ष्य यांच्या संलग्नतेने आयोजित सुहाना लक्ष्य कॉर्पोरेट महिला व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत इन्फोसिस, कॉग्निझंट, टीसीएस व कॅपजेमिनी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
सिम्बायोसिस स्कुल, प्रभात रोड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत इन्फोसिस संघाने टेक महिंद्रा संघाचा 2-0 असा पराभव केला. पहिला सेट 25-19 असा एकतर्फी जिंकल्यानंतर दुस-या सेटमधे झालेल्या संघर्षपुर्ण लढतीत इन्फोसिस संघाच्या प्रशंसा शर्माने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत दुसरा सेट 25-23 असा जिंकून संघाला विजय मिळवून दिला. प्रशंसा शर्माला सामनावीर घोषीत करण्यात आले.
अन्य लढतीत कॉग्निझंट संघाने असेंच्युअर संघाचा 2-1(25-18, 15-25, 15-12) असा तीन सेटमध्ये पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. निकिशा पटेल सामनावीर ठरली. टीसीएस संघाने अमडॉक्स संघाचा 2-0(25-15, 25-14) असा तर कॅपजेमिनी संघाने सिंटेल संघाचा 2-0(25-11, 25-12) असा दोन सेटमध्ये एकतर्फी पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल– साखळी फेरी
इन्फोसिस वि.वि टेक महिंद्रा 2-0(25-19, 25-23) सामनावीर– प्रशंसा शर्मा
कॉग्निझंट वि.वि असेंच्युअर 2-1(25-18, 15-25, 15-12) सामनावीर– निकिशा पटेल
टीसीएस वि.वि अमडॉक्स 2-0(25-15, 25-14) सामनावीर– सिरीशा शामराव
कॅपजेमिनी वि.वि सिंटेल 2-0(25-11, 25-12) सामनावीर मिली प्रजापती
भिक्षेकरी मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पहाणारी आशावादी महिला अधिकारी सुवर्णा पवार
सुवर्णा पवार या महिला व बालविकास विभागामध्ये सहायक आयुक्त या पदावर कार्यरत आहेत. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत अधिकारी पदापर्यंत झेप घेतलेल्या या ग्रामीण महिलेने लहानपणी जवळच्या नातेवाईकांची भिक्षेकरी ही अवस्था जवळून पाहिली आणि भिक्षेकरी मुक्त महाराष्ट्र व्हावा याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वतीने 15 ऑगस्ट 2017 ते 26 जानेवारी 18 या कालावधीत भिक्षेकरी मुक्त अभियान राबविले, अभियानाला प्रतिसाद मिळण्याकरिता राज्याच्या धर्मदाय आयुक्तांना विनंती करुन त्यांचा सहभाग मिळविला आहे. विविध ठिकाणी कार्यक्रमाद्वारे अपंग निराधार निराश्रीत व्यक्तीला लाचारीने भिक देऊ नका तर सन्मानाने जगण्यासाठी मदत करा, असे त्या सांगतात. रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी भिक मागणाऱ्या व्यक्तीने लहान मुले असतील तर महिला व बालविकास विभागाची बालगृहे, महिला असतील तर महिलांसाठी असणारे आधारगृह, सरंक्षणगृह व भिक्षेकरी गृहापर्यंत पोहचवावे. वृध्द, अपंग, निराधार पुरुष असतील तर भिक्षेकरी गृहापर्यंत पोहचविण्यात यावे, असे त्या आवाहन करतात. नुकतेच दुरदर्शनवर सखी सहयाद्री या कार्यक्रमातून त्यांनी जनतेला आवाहन केले आहे.
सामाजिक बांधिलकी जपणारी ही महिला अधिकारी राजपत्रित महासंघाची महिला संघटन सचिव असून त्या अंतर्गत चालविलेल्या पुणे जिल्हा दुर्गामंचाची अध्यक्षा आहे. ऑफीसर फोरम या अधिकारी संघटनेची पुणे जिल्हा अध्यक्ष असून लेखिका, कवयित्री आहे. त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली असून त्यात एका कविता संग्रहाचा समावेश आहे. अधिकारी पदावर असूनही दुर्बल घटकासाठी हिरीरीने पुढे येणाऱ्या या महिला अधिकाऱ्याचे कार्य कौतुकास्पद आहे.







