Home Blog Page 291

सरहद पुणे ने साकारलेल्या संगीतकार स्व. श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचे उद्धव ठाकरेंनी केले उद्घाटन

पुणे – शिवसेना ही केवळ सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. त्यामुळे सत्ताप्राप्तीसाठी राजकारण करायचे नाही हे सूत्र बाळासाहेबांपासून आम्ही पाळत आलो आहेत, असे प्रतिपादन शिवसेना (उबाठा)चे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
सरहद, पुणेच्या वतीने गुजर निंबाळकरवाडी येथे साकारण्यात आलेल्या संगीतकार स्व. श्रीकांत ठाकरे म्युझिक स्टुडिओचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. या वेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, सरहदचे संस्थापक संजय नहार, संतसिंग मोखा, वसंत मोरे, शैलेश वाडेकर, शैलेश पगारिया आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना उद्धव ठाकरे यांनी वडील बाळासाहेब ठाकरे आणि काका श्रीकांत ठाकरे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, माझे काका श्रीकांत ठाकरे यांच्या नावाने स्टुडिओ साकारला याचा मला खूप आनंद आहे. त्यांच्या मनात सतत संगीत सुरू असायचे. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आघाडीवर होते. त्यांच्यासमवेत त्यांची ही दोन मुले बाळासाहेब आणि श्रीकांत यांनी मार्मिकच्या माध्यमातून सर्व मदत केली होती. असे काका आणि वडील लाभले यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. शिवसेनेची खरी ताकद शिवसैनिकामध्ये आहे. त्यामुळे बाळासाहेबांनीसुद्धा सत्तेसाठी कधी राजकारण केले नाही. वेळ आली तेव्हा सत्तेवर लाथ मारली. शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही तर सत्ता शिवसेनेसाठी जन्माला आलेली आहे.


मणिपूरमधील एका मुलीने माझा सन्मान केला त्याने मी निःशब्द झालो आणि मला गहिवरून आले असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, २०१४ नंतर खरे तर युतीचे सरकार आले. पण आज परिस्थिती काय आहे. मणिपूर पेटलेले आहे. लेह-लडाखमध्ये संघर्ष सुरू आहे. गावागावात जवान तैनात केलेले आहेत. आसाममध्येही परिस्थिती पेटलेली आहे. काश्मीरमध्येही अशांतता आहे, हे सगळे चित्र चांगले नाही. ७५ वर्षे झाली आता हेच का स्वातंत्र्य असा प्रश्न मनात आल्यावाचून राहत नाही. अशा परिस्थितीत सूर जुळवायचे कसे आणि मैफिल रंगवायची कशी हा प्रश्न पडतो असे उद्धव ठाकरे म्हणाले.
या वेळी संजय राऊत म्हणाले, श्रीकांत ठाकरे हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. ते उत्तम संगीतकार, व्यंगचित्रकार, वक्ते, संपादक, लेखक होते. बाळासाहेब आणि त्यांची राम-लक्ष्मणाची जोडी होती. संगीतक्षेत्राला त्या काळात ५० वर्षे पुढे नेण्याचे काम श्रीकांत ठाकरे यांनी केले. आज जे मोठे गायक दिसतात त्यातील अनेकांना पहिल्यांदा गाण्याची संधी ठाकरे यांनीच दिली होती.
प्रास्ताविक करताना संजय नहार यांनी बाळासाहेबांच्या अनेक मौलिक आठवणींना उजाळा दिला. काश्मीरमधील कुपवाडा येथील मुले मातोश्रीवर आलेली होती त्यावेळी आत येताना ती घाबरत होती पण बाहेर पडल्यानंतर आमच्या आजोबांना भेटल्यासारखे आम्हाला वाटले अशा भावना मुलांनी व्यक्त केल्या होत्या ही आठवण नहार यांनी सांगितली. बाळासाहेब हे महाराष्ट्राच्या मातीतील उमदे व्यक्तिमत्त्व होते असे सांगून त्यांनी आठवणी जागवल्या.
या वेळी गुजरवाडी व कात्रज ग्रामस्थांच्या हस्ते उद्धव ठाकरे यांचा सन्मान करण्यात आला. सरहदचे संस्थापक संजय नहार यांनी प्रास्ताविक केले. शैलेश वाडेकर यांनी आभारप्रदर्शन केले.
महमंद रफींसाठी मराठी गाणे लिहिले ऊर्दूत – ठाकरे …
मजहर सिद्दीका यांनी शोधिशी मानवा हे गीत सादर केले त्याचे अभिनंदन करून उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत ठाकरे यांची एक सुंदर आठवण सांगितली. श्रीकांत ठाकरे यांनी महंमद रफी यांच्याकडून हे गीत गाऊन घेतले होते. पण विशेष म्हणजे श्रीकांत ठाकरे यांना उत्तम ऊर्दू येत असते. त्यामुळे महंमद रफी यांना त्यातील शब्द कळावेत म्हणून ते मराठी गाणे त्यांनी महंमद रफी यांना ऊर्दूत लिहून दिले होते. ठाकरे यांनी सांगितलेल्या या आठवणीला उपस्थितांनी दाद दिली.

ख्यातनाम, ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांचे निधन

मुंबई- -मराठीतील पिंजरा सिनेमातील संध्या आणि आधा ही चंद्रमा रात आधी या गाण्यातील संध्या सर्वांना आठवत असेल ,अत्यंत उत्कृष्ट नर्तकी आणि अभिनेत्री म्हणून आपली प्रत्येक भूमिका साकारलेली व्ही शांताराम यांची पत्नी संध्या शांताराम यांचे आज निधन झाले वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.

1972 साली प्रदर्शित झालेला व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा’ हा मराठी चित्रपटसृष्टीतील अमर कलाकृती मानली जाते. एका आदर्श शिक्षक आणि तमाशा कलावंत यांच्यातील प्रेम कथेवर आधारित या चित्रपटात संध्या यांनी साकारलेली तमाशातील नर्तिकेची भूमिका प्रचंड गाजली. या भूमिकेमुळे त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री बनल्या. आजही ‘पिंजरा’ आणि संध्या यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.

संध्या यांचा जन्म.२७ सप्टेंबर १९३२ रोजी चा. त्यांचे संपूर्ण नाव विजया श्रीधर देशमुख. त्यांचे वडील श्रीधर देशमुख हे रंगभूमीवरील कलाकार होते. ते देशी नाटक समाज या गुजराती नाटक कंपनीत काम करत असत. भांगवाडी थिएटरमध्ये त्या कंपनीची नाटके होत असत. विजया म्हणजेच संध्या आणि त्यांची मोठी बहीण वत्सला या दोघी लहानपणापासून त्या कंपनीच्या गुजराती नाटकातून भूमिका करत. नाटकातून अभिनय करता करता संध्या यांनी गुजराती चित्रपटातून काम करण्यास सुरुवात केली.
या सुमारास व्ही शांताराम मौज दिवाळी अंकात आलेल्या ‘श्रीमंताकडचे बोलावणे’ या चि. य. मराठे यांच्या कथेवर चित्रपट काढण्याच्या तयारीत होते. त्यासाठी त्यांनी विजया देशमुख या नव्या नटीची निवड केली, तो चित्रपट होता ‘अमर भूपाळी’. या चित्रपटासाठी विजया यांचे ‘संध्या’ असे नाव ठेवण्यात आले. ‘अमर भूपाळी’ चित्रपटातील त्यांची भूमिका ही तमासगिरिणीची होती व नाव होते गुणवती. या चित्रपटात त्यांना बरीच नृत्ये करावयाची होती व त्यासाठी संध्या यांनी अपार कष्ट घेऊन नृत्याचे धडे गिरवले आणि आपली भूमिका पार पाडली. चित्रपट खूपच चालला आणि नायिका संध्या यांचे नाव झाले. होनाजी बाळांवरचा हा चित्रपट पुढे बंगाली भाषेत पण झाला.
संध्या यांचा पुढचा चित्रपट होता ‘परछाई’. हा फक्त हिंदी भाषेत होता आणि त्यात त्यांच्या वाट्यास खलनायिकेची भूमिका आली होती. चित्रपटात नायक आणि नायिका म्हणून खुद्द व्ही.शांताराम आणि जयश्रीबाई होत्या. या चित्रपटामुळे संध्या हे नाव तमाम हिंदी भाषिक प्रांतातून प्रसिद्ध झाले. त्यांचा पुढचा चित्रपट होता ‘तीन बत्ती चार रास्ता’. हा चित्रपट भाषिक प्रांतवादावर आधारित होता. त्यानंतर व्ही शांताराम यांनी नृत्याला प्राधान्य असणारा रंगीत चित्रपट काढण्याचे ठरवले. हा चित्रपट होता ‘झनक झनक पायल बाजे’. नायिका म्हणून संध्या हे नाव जाहीर झाले. त्या प्रसंगी सुप्रसिद्ध दिग्दर्शक मेहबूब खान शांतारामबापूंना म्हणाले, ‘देखो, आप ये फिल्म कलरमें बना रहे हो, तो बडी नामवाली हिरॉईन – जैसे वैजयंतीमाला, पद्मिनी को लिजिये|’’ पण शांतारामबापू बधले नाहीत आणि संध्या यांनी चित्रपटात काम करून इतिहास घडवला. पुढे ‘दो आँखे बारह हाथ’, ‘नवरंग’ या चित्रपटांनी राजकमल चित्रपट संस्थेला मालामाल करुन टाकले. ‘दो आँखे बारह हाथ’ ने बर्लिनच्या चित्रपट महोत्सवात पारितोषिक पटकविण्याचा मान मिळवला. हॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक सेसील बी. डिमेल यांनी त्यांच्यातर्फे एक पारितोषिक दिले. त्यानंतर संध्याबाईंनी ‘स्त्री’, ‘सेहरा’, ‘लडकी सह्याद्री की’, ‘जल बिन मछली नृत्य बिन बिजली’ यांसारखे चित्रपट शांतारामबापूंसाठी केले.
१९७२ सालात त्यांचा मराठी चित्रपट ‘पिंजरा’ पडद्यावर झळकला आणि त्या चित्रपटाने सर्व विक्रम मोडले. ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ आणि वर्ष होते १९७५. ‘अमर भूपाळी’नंतर तब्बल पंधरा वर्षांनी संध्या यांनी ‘इथे मराठीचिया नगरी’ या व्ही. शांताराम दिग्दर्शित चित्रपटात भूमिका केली. संध्या यांनी ‘राजकमल’ खेरीज दुसऱ्या कुठल्याही चित्रपट संस्थेत काम केले नाही. राजकमल आणि व्ही. शांताराम यांच्याशी संध्या यांची निष्ठा होती, हे सर्वज्ञात आहे. महाराष्ट्र शासनाने संध्या यांचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव केला होता.

ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी त्यांच्या आयुष्यात तीन विवाह केले होते. संध्या या त्यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. दुसरी पत्नी, अभिनेत्री जयश्री यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच शांताराम यांनी संध्या यांच्याशी विवाह केला होता. संध्या यांनी मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केले असले, तरी त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या. अभिनयासोबतच त्या एक कुशल नृत्यांगना म्हणूनही ओळखल्या जात.

संध्या यांनी 1959 मध्ये आलेल्या ‘नवरंग’ सिनेमातून कमाल दाखवली होती. व्ही. शांताराम यांचा हा चित्रपट होता. “अरे जा रे हट नटखट” हे त्यांचे गाणे आजही तुफान लोकप्रिय आहे. संध्या शांताराम, यांचे खरे नाव विजया देशमुख होते. अरे जा रे हट नटखट या गाण्यासाठी त्या विशेषतः शास्त्रीय नृत्य शिकल्या. त्यावेळी कोणतेही नृत्यदिग्दर्शक नव्हते; गाण्यात तुम्हाला दिसणारी स्टेप संध्या स्वतः किंवा दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी सादर केली होती.

दिग्दर्शक व्ही. शांताराम यांना हे गाणे खरोखरच खास बनवायचे होते, म्हणून त्यांनी खऱ्या हत्ती आणि घोड्यांची व्यवस्था केली. सेटवर खऱ्या प्राण्यांमध्ये संध्या निर्भयपणे नाचत होत्या. अभिनेत्री संध्यांना माहित होते की हे सोपे नाही, कारण प्राणी आवाज आणि माणसांमुळे अस्वस्थ होऊ शकतात. पण त्या घाबरल्या नाहीत. त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांनी बॉडी डबलही वापरला नाही. गाण्याच्या शूटिंगपूर्वी, त्यांनी हत्ती आणि घोड्यांशी मैत्री केली, त्यांना स्वतःच्या हातांनी केळी आणि नारळ खायला दिले आणि पाणी पाजले. संध्याच्या समर्पणाने आणि धाडसाने दिग्दर्शक प्रभावित झाले.

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर,१३२९ हरकती पूर्णतः मान्य ,४५२४ हरकती फेटाळल्या

पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. १३२९ हरकती पूर्णतः मान्य ,४५२४ हरकती फेटाळल्या , तर ६९ हरकती अंशतः मान्य करून आता तिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. प्रारूप प्रभाग रचनेवर मोठ्या प्रमाणावर हरकती आल्याने निवडणूक आयोगाने या हरकतींचा विचार करून काही प्रभागांमध्ये बदल केले असून प्रभागांची नावेही बदलली आहे. काही प्रभागातील हद्दीत बदल झाला आहे.

प्रभाग रचना तयार करताना नैसर्गिक हद्दी ओलांडल्या होत्या, तसेच निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन केले नव्हते. असा आरोप करण्यात आला होता. त्यावर पुणेकरांनी हरकती आणि सूचना नोंदविल्या होत्या.

प्रभाग क्रमांक 15 चा थिटे वस्ती चा भाग प्रभाग क्रमांक चारला जोडला आहे. अंतिम प्रभाग रचनेमध्ये वानवडी शिंदे वस्ती या प्रभागातील शिंदे वस्तीचा काही भाग प्रभाग क्रमांक 14 ला जोडण्यात आला आहे. प्रारूप मध्ये रस्त्याने शिंदे वस्ती विभागल्याने मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल झाल्या होत्या. प्रभाग क्रमांक 14 चा मगरपट्टा सिटी समोरील रस्त्याचा पलीकडचा भाग हा प्रभाग क्रमांक 17 ला जोडण्यात आला आहे.

बिबवेवाडी महेश सोसायटी या प्रभागाचे नावही बदलले असून बिबवेवाडी शंकर महाराज मठ असे करण्यात आले आहे. या प्रभागातील के के मार्केट येथील पुण्याई नगर हा भाग प्रभाग क्रमांक 38 अप्पर सुपर इंदिरानगर ला जोडण्यात आला आहे. तर प्रभाग क्रमांक 34 धनकवडी चा आंबेगाव दाभाडी हा भाग पाच सदस्य प्रभाग 38 ला जोडण्यात आला आहे.तसेच कोळेवाडी जांभूळवाडी हा भाग देखील 38 ला जोडण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक 38 चा सुखसागर नगरचा भाग प्रभाग 39 कोंडवा येवलेवाडी ला जोडण्यात आला आहे. विशेष असे की या प्रभागावरी सर्वाधिक हरकती आल्या होत्या.

प्रभाग रचनेत रडीचा डाव केला तऱी जनता निवडणुकीत न्याय करणार- प्रशांत जगताप

प्रभाग रचनेतील हरकतींना केराची टोपली, राष्ट्रवादी आक्रमक

पुणे- प्रभाग रचनेतील हरकतींना केराची टोपली दाखवून प्रभाग रचनेत रडीचा डाव केला तऱी जनता निवडणुकीत न्याय करेल असे आज येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटले आहे

पुणे महापालिकेच्या आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना आज जाहीर करण्यात आली. त्यावर तातडीने जगताप यांनी प्रतिक्रिया देत संतापही व्यक्त केला आहे. ते म्हणाले,’महाराष्ट्राचे नगररचना खाते नावापुरते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असले, तरी या खात्याची सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच हलवले जातात. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतील इतर घटकपक्षांना विश्वासात न घेता देवेंद्र फडणवीस यांनी रडीचा डाव खेळत भाजपने प्रभाग रचना केली. या प्रभाग रचनेवर हजारो पुणेकरांनी आक्षेप नोंदवला होता, मात्र प्रत्यक्षात प्रभाग रचनेत काहीही बदल न करता केवळ प्रभागांच्या नावांमध्ये बदल करून भाजपने पुणेकरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या बळावर हा रडीचा डाव खेळला. पुणेकरांना ही सत्तेची मस्ती आजिबात आवडलेली नाही. वाहतूक कोंडीच्या बाबतीत जगात पाचवा नंबर, गुन्हेगारीच्या बाबतीत भारतात पहिला नंबर, भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारतात पहिला नंबर मिळवून सत्ताधाऱ्यांनी पुणेकरांच्या लौकिकाला गालबोट लावला आहे. याचे उत्तर पुणेकर नागरिक आपल्या मतदानातून नक्कीच व्यक्त करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जनतेच्या पसंतीचे दमदार उमेदवार घेऊन मैदानात उतरणार आहे. महानगरपालिका निवडणुकीत जनतेचा पाठिंबा नक्कीच महाविकास आघाडीला मिळेल.

सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? हे विचारण्याची ताकद पत्रकारांमध्ये आहे का?

पुणे-शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी तेथील पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी दसरा मेळावा, भारत-पाक संबंध, हिंदुत्व, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची धोरणे, रामदास कदम यांची टीका आदी विविध मुद्यांवर भाष्य केले. पत्रकारांनाही त्यांनी विचारले , निव्वळ टिळक आगरकरांचे नाव घेऊन चालणार नाही सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? हे विचारण्याची ताकद तुमच्या आहे का? हिंमत आहे काय ? या बद्दलही आत्मचिंतन करा .

उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांची टीकेला प्रत्युत्तर देणे टाळले आहे. मी गद्दार व नमकहारांना उत्तर देत नाही. मला ते देण्याची गरज वाटत नाही. ठाकरे म्हणजे काय? हे संपूर्ण महाराष्ट्र व देश ओळखतो. त्यामुळे मी त्या गद्दाराला व हरामखोराला उत्तर देणार नाही, असे ते म्हणालेत. तो माणूस कसा आहे हे मला माहिती आहे. त्यामुळे मला त्याला उत्तर देण्याची गरज वाटत नाही. कारण, ठाकरे म्हणजे काय? हे संपूर्ण महाराष्ट्र व देश ओळखतो. त्यामुळे त्या गद्दाराला व हरामखोराला मी काही उत्तर देत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

पत्रकारांनी यावेळी त्यांना अशा प्रकारे आरोप झाल्यावर त्रास होतो का? असा प्रश्न केला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, हो, मला त्रास आणि वेदना नक्कीच होतात. पण शिवाजी पार्कमध्ये हजारो माणसे मी माझे भाषण थांबवू का असे विचारल्यावर तुम्ही बोला म्हणतात, तेव्हा या वेदनांवर रामबाण उपाय झाला, असे मला वाटते. शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणाऱ्यांचे हात माझ्या पाठिशी आहेत. म्हणून तर मी उभा राहू शकलो, असे ते म्हणाले.

कालचा दसरा मेळावा अभूतपूर्व झाला. हे केवळ माझे श्रेय नाही. पावसामुळे शिवाजी पार्कवर चिखल झाला होता. तळे झाले होते. पण त्याही स्थितीत केवळ मुंबईचाच नव्हे तर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील शिवसैनिक आले होते. त्यांनी स्वतःची चटणी भाकरी आणली होती. आपल्याकडे बिर्याणी वगैरेची काही सोय नाही. जे येतात ते स्वकष्टाचे येतात. पाऊस पडत असतानाही कुणीही जागचे हलले नाहीत. शिवाजी पार्कला दरवाजे नाहीत. बांधावरून उडी मारली की माणूस बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे आलेल्या लोकांना कोंडून ठेवण्याची गरज आम्हाला वाटत नाही. जी इतरांना कदाचित वाटत असेल, असे ते एकनाथ शिंदेंवर निशाणा साधताना म्हणाले.

ते पुढे म्हणाले, शिवसेनेचा 1966 मध्ये पहिला दसरा मेळावा झाला. मी 6 वर्षांचा होतो. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी शिवाजी पार्कवर तो घेण्याचा निर्णय घेतला. त्यावर काहींनी एवढे मोठे मैदान भरेल का? अशी शंका घेतली. त्यांनी हॉल किंवा दुसऱ्या एखाद्या छोट्या मैदानात सभा घेण्याचा प्रस्ताव ठेवला. पण बाळासाहेबांनी ही सभा शिवाजी पार्कवरच घेण्यावर ठाम राहिले. मी वेडा की लोकं वेडी हे पाहून घेऊ, असे ते तेव्हा म्हणाले होते. आता हे दोघेही वेडे नव्हते हे स्पष्ट झाले आहे. हा प्रवास आजही सुरू आहे. त्यामुळेच पाऊस सुरू असतानाही लोकं जागचे हलले नाही.

आपल्या देशाला आता पंतप्रधान, गृहमंत्री व अख्ख्या मंत्रिमंडळाची गरज आहे. आत्ता जे बसलेत ते एका पक्षाचे मंत्री बसलेत. ते देशाचे नाहीत. देशाचे म्हणून कारभार कुठे सुरू आहे. सोनम वांगचुक यांनी काय गुन्हा केला? की थेट त्यांच्यावर रासुका लावण्यात आला. त्यांनी एवढे मोठे राष्ट्रविघातक त्यांनी कोणते काम केले? काल परवापर्यंत ते पंतप्रधानांची स्तुती करत होते. तेव्हा ते देशप्रेमी होते. पण नंतर काय घडले? सोनम वांगचुक यांनी चूक केली असेल, तर मणिपूरमध्ये कुणी चूक केली? लेह, लडाखमध्ये काय स्थिती आहे? तेथील परिस्थिती शांत झाली आहे का? आसाममध्ये आदिवासी रस्त्यावर उतरलेत. त्यांच्या हातात मशाली आहेत. पण दुर्दैवाने त्याची एकही बातमी येत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

ते पुढे म्हणाले, मी माझ्या परीने काम करण्याचा प्रयत्न करत आहे. ते करत राहणार. याला आमची घराणेशाही म्हणा किंवा घराण्याची परंपरा म्हणा. जिथे जिथे अन्याय दिसेल त्याला लाथ मार असे माझ्या आजोबांनी शिकवलेले ब्रिदवाक्य आहे. हे माझ्या वडिलांनी आयुष्यभर पाळले. तेच घेऊन मी पुढे जात आहे. त्यामुळे अन्याय दिसेल तिथे लाथ मारणे हे आमचे कामच आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, हे लोक हिंदुत्व सोडल्याचा आरोप करत आमच्या अंगावर येतात. पण त्यांनी त्यांच्याच वंशावळी पाहून कुणी काय सोडले हे पहावे. आम्ही भाजपसोबत होतो तेव्हा कडवट हिंदुत्ववादी होतो. मग आम्ही भाजपला सोडले म्हणजे हिंदुत्व सोडले का? आम्ही भाजपला सोडले म्हणून हिंदुत्व सोडले असे असेल, तर मग सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानंतर लागलेली विषारी फळे हेच त्याचे फलित आहे का? हे सांगावे. कारण, स्वतः मोहन भागवत मशिदीत जातात. भाजप अल्पसंख्यकांना सदस्यत्व देते. त्यांना सौगात ए मोदी देते. पण आम्ही काँग्रेससोबत गेलो तर हिंदूत्व सोडले. तुम्ही सौगात ए नेहरू कधी पाहिले का? सौगात ए इंदिरा गांधी कधी ऐकले का? मग सौगात ए मोदी वाटणारे हिंदुत्ववादी कसे?

तुमच्या राज्यात हिंदू असुरक्षित आहेत. ज्यांनी हिंदूंना मारले त्या पाकसोबत तुम्ही क्रिकेट मॅच खेळू कशी शकता? आम्ही काँग्रेससोबत गेलो म्हणून हिंदुत्व सोडले, तर मग तुम्ही चंद्राबाबू नायडूंसोबत गेलात, ते नायडू हिंदुत्ववादी आहेत का? असे विविध प्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपवर शरसंधान साधताना उपस्थित केले. भाजपने जे केले अमर प्रेम आणि इतरांनी केले तर ते लव्ह जिहाद, असे कसे असू शकते? असे ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबतच्या संभाव्य युतीवरही भाष्य केले. ते म्हणाले, मी व राज 2005 मध्ये वेगळे झालो होतो. त्यानंतर आत्ता एका मुद्यावर आम्ही एकत्र आलो. त्यामुळे आता रोज उठून आम्ही एकत्र आलो, आम्ही एकत्र आलो असे सांगण्याची गरज नाही. आम्हाला एकत्र यायचे नसते तर 5 जुलै रोजी झालेला मेळावा झालाच नसता. आम्ही एकत्र आल्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणलेत. मराठी माणूस एकवटल्याने काय होणार? याची त्यांना भीती वाटत आहे.

बिहारमध्ये निवडणूक म्हणून महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये टाकले.. पूरग्रस्त म्हणून मराठवाड्यातील लाडक्या बहिणींना एकगठ्ठा 6 हप्ते द्या

पुणे – बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये टाकले. त्यानुसार मराठवाड्यातील लाडक्या बहिणींनाही एकगठ्ठा 6 हप्ते मदत म्हणून द्यावेत, मराठवाड्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने सरकारने लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना 6 महिन्यांचे हप्त एकगठ्ठा द्यावेत, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी केली.

उद्धव ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर होते. तिथे आयोजित पक्षाच्या मेळाव्यात पक्षकार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी वरील मागणी केली. ते म्हणाले, मराठवाड्यात गंभीर पूरस्थिती उद्भवली आहे. तेथील शेतकऱ्यांना व सर्वसामान्य नागरिकांना तत्काळ मदतीची गरज आहे. सत्ता असो किंवा नसो शिवसेना तुमच्या मदतीसाटी आहे. पण ज्या परिस्थितीत मराठवाड्यातील शेतकरी सध्या सापडला आहे, त्यांना तत्काळ मदत करण्याची गरज आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात दोन-तीन महिन्यांचे पैसे एकदाच टाकण्यात आले. त्यानुसार आत्ताही 6 महिन्यांचे हप्ते एकाचवेळी द्या. सध्या पूरस्थितीत लाडक्या बहिणींना या पैशांची नितांत गरज आहे.

बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी तेथील महिलांच्या खात्यांत 10 हजार रुपये टाकले. त्या ठिकाणी निवडणूक आहे म्हणून त्यांनी तसे केले. पण महाराष्ट्रात अशी मदत का केली जात नाही? असा सवाल उद्धव यांनी या प्रकरणी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले, या देशातील उद्योगपतींनी हजारो कोटींचे कर्ज काढले. त्यानंतर त्याची परतफेड न करता ते पळून गेले. नंतर या उद्योगपतींचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. याऊलट शेतकरी कर्ज काढून कधीच पळून जात नाही. ज्यावेळी आपण काढलेले कर्ज फेडू शकत नाही, असे त्याला वाटते तेव्हा तो आत्महत्या करून मृत्यूला कवटाळतो. पण तरीही शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जात नाही. त्यामुळे ज्या ठिकाणी गरज असेल त्या ठिकाणी शिवसैनिकांनी मदत करावी. सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धावून जावे.

मएसो सीनियर कॉलेजमध्ये ग्रीन क्लब अंतर्गत माती दान उपक्रम 

मएसो सीनियर कॉलेज ग्रीन क्लबच्या आणि पूर्णम इकोव्हिजनच्या सहकार्याने उपक्रम

पुणे: मएसो सीनियर कॉलेजच्या ग्रीन क्लबच्या पुढाकाराने आणि पूर्णम इकोव्हिजनच्या सहकार्याने पुनर्वापर संकल्पनेवर आधारित माती दान उपक्रम  यशस्वीपणे पार पडला. या उपक्रमात परिसरातील नागरिकांनी माती दान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

मातीच्या मूर्तीचे विसर्जन केल्याने जलाशयांमध्ये गाळ निर्माण होतो. शाडू मातीचा पुनर्वापर शक्य असल्याने नागरिकांनी साधी पद्धत अवलंबावी. मूर्तीचे विसर्जन घरी स्वच्छ पाण्यात करावे, तयार झालेला गाळ गोळा करून कोरडा करावा आणि जवळच्या माती संकलन केंद्रात जमा करावा. ही माती नंतर कलाकारांना विनामूल्य उपलब्ध करून दिली जाते, ज्यामुळे पर्यावरण संवर्धनास हातभार लागतो.

मएसो सीनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य यांनी ग्रीन क्लबच्या या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना या उपक्रमातून मिळालेलं ज्ञान व अनुभव दैनंदिन जीवनातही अंमलात आणण्याचे आवाहन केले. या उपक्रमासाठी कॉलेजच्या प्रा. प्रतिभा पाटील आणि आयएमसीसी कॉलेजच्या प्रा. स्नेहा गवारे यांनी समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रीन क्लबने चालू शैक्षणिक वर्षातही विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे नियोजन केले असून, मएसो सीनियर कॉलेजला एक आदर्श पर्यावरणपूरक परिसर बनविण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

लोककलांचे विकृतीकरण थांबणे आवश्यक : डॉ. सदानंद मोरे

0

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री-नृत्यांगना जयमाला काळे-इनामदार यांचा सन्मान

पुणे : कला हे संस्कृतीचे अंग आहे. लोकनाट्य, वगनाट्य, लावणी, चित्रपट अशा सांस्कृतिक क्षेत्रात सर्वच कलाकारांचे मोठे योगदान आहे. ही संस्कृती, कलांचे जतन व्हावे व तिचा अस्सलपणा रसिकांपर्यंत पोहोचावा तसेच लावणी सारख्या लोककलांचे चाललेले विकृतीकरण थांबवावे या करिता प्रयत्न होणे आवश्यक आहेत, असे प्रतिपादन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, विचारवंत आणि महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री-नृत्यांगना जयमाला काळे-इनामदार यांच्या अभिनय-नृत्य कारकिर्दीस ६५ वर्षे पूर्ण झाल्याप्रित्यर्थ डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्या प्रसंगी डॉ. मोरे बोलत होते. पूना गेस्ट हाऊसचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार यांची प्रमुख उपस्थिती होती. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, रंगत संगत प्रतिष्ठान काव्य विभागाच्या कार्याध्यक्ष मैथिली आडकर मंचावर होते. पत्रकार भवन, नवी पेठ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सन्मापत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

डॉ. मोरे पुढे म्हणाले, जयमाला इनामदार यांनी एकलव्याच्या भूमिकेतून कलेचे शिक्षण घेत स्वत:चे व्यक्तिमत्व स्वत: घडविलेले आहे. लावणीची व्याप्ती मोठी असल्यामुळेच लावणीत ‘ज्ञानेशाची ओवी, जनीचे अभंगा गाना’  असे शब्दही येतात. लावणी ही फक्त शृंगारापुरती मर्यादित नसून सैनिकांची करमणूक, विरंगुळा म्हणूनही तिचा वापर झाला आहे.

सत्काराला उत्तर देताना जयमाला काळे-इनामदार म्हणाल्या, मला लहानपणापासूनच नृत्याची विशेष आवड होती. मी कोणाकडेही नृत्य न शिकता माझ्यातील कला जोपसत गेले. कलेशिवाय मी जगू शकत नाही. घरातील अडचणींमुळे मी या कलेला व्यवसाय म्हणून स्वीकारले. यातूनच परदेशातही सादरीकरण करण्याची संधी मिळाली. पंडित रविशंकर यांच्यासारख्या जगविख्यात कलाकारांना भेटण्याची संधी मिळाली. याचा विशेष आनंद आहे.

कलेनेच मला मान-मरातब-पैसा मिळवून दिला पण मी कधीच कलेचे हिडीस दर्शन मांडले नाही, असे सांगून जयमाला काळे-इनामदार पुढे म्हणाल्या, सातत्यपूर्ण रियाज, तालमी, कष्ट यात मी कधीच मागे हटले नाही. मंचावर लावणी, वगनाट्य, लोककला सादर करताना त्यातील घरंदाजपणा, शालीनता जपली, प्रेक्षकांच्या नजरेला नजर दिली नाही की कधीही इशारे केले नाहीत. काही ठराविक कलावंतामुळे आजच्या काळात लावणीचा दर्जा घसरला असून लावणी या कलेचा मान कमी झाल्याचे जाणवते, या विषयी त्यांनी खंत व्यक्त केली.  

जयमाला इनामदार यांनी कलेशी-नृत्याशी आपले इमान, प्रामाणिकपणा जपला असल्याचे सांगून किशोर सरपोतदार म्हणाले, जयमालाबाई यांनी नृत्यकलेवर जय मिळविला आहे. कलाकारांचे माहेर घर असणाऱ्या पूना गेस्ट हाऊसचा संचालक म्हणून माझ्या उपस्थितीत जयमालाबाईंचा सन्मान होणे म्हणजे एका माहेरवाशीणीचा सत्कार आहे. रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे हे समाजापुढे आदर्शवत ठरणारे कार्य आहे.

प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताता मान्यवर व्यक्ती आणि रसिक श्रोत्यांमुळे संस्था मोठी होते, असे सांगून ॲड. आडकर म्हणाले, गेली ६५ वर्षे कलेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या जयमाला इनामदार यांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘लावण्य‌’या विषयावर लावण्यांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. यात जयंत भिडे, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, प्रभा सोनवणे, वर्षा कुलकर्णी, मीना शिंदे, रूपाली अवचरे, विजय सातपुते, वासंती वैद्य, मनीषा सराफ, स्वप्नील पोरे, सुजाता पवार यांचा सहभाग होता.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैजयंती आपटे यांनी केले.

श्री रामायण कथेच्या टीझरमध्ये देव शर्मा आणि अंजली अरोरा ने वेधले लक्ष

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ‘श्री रामायण कथा’चा बहुप्रतिक्षित टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे, जो प्रेक्षकांना कालातीत महाकाव्याच्या भव्य सिनेमॅटिक पुनर्कथनाची पहिली झलक देतो. देव शर्मा आणि अंजली अरोरा यांच्या प्रमुख भूमिकांसह, शील वर्मा, निर्भय वाधवा आणि रजनीश दुग्गल यांचा समावेश असलेला हा टीझर श्री रामाच्या प्रवासातील भक्ती, शौर्य आणि भावनिक सार टिपतो.

या टीझरमध्ये रामायणातील मुख्य विषयांवर – धर्म, त्याग, भक्ती आणि धैर्य – भर देण्यात आला आहे आणि त्यांना एका ताज्या, आधुनिक चित्रपट शैलीत सादर करण्यात आले आहे. पात्रांमधील भावनिक संबंध, विशेषतः श्री रामाच्या प्रवासाचे चित्रण, टीझरचे हृदय म्हणून उभे आहे.

हा चित्रपट श्री रामांच्या जीवनातील घटना अशा प्रकारे मांडत आहे की ज्या यापूर्वी कधीही पडद्यावर पाहिल्या नव्हत्या.

प्रकाश महोबिया आणि संजय बुंदेला निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक सिंग यांनी केले आहे, ज्यांनी कथा देखील लिहिली आहे. पटकथा आणि संवाद सचिन कुमार सिंग यांनी लिहिले आहेत, तर छायांकन कुणाल व्ही. कदम यांनी केले आहे. संगीत देव आणि आशिष यांनी दिले आहे, गीते जयदेव जोनवाल आणि नंदलाल सिंग यांनी लिहिली आहेत.

देव शर्मा, अंजली अरोरा, शील वर्मा, निर्भय वाधवा आणि रजनीश दुग्गल हे दिग्गज कलाकार या चित्रपटात महाकाव्य पात्रांना ताज्या तीव्रतेने आणि भव्यतेने जिवंत करतात.

टीझर लाँच प्रसंगी बोलताना दिग्दर्शक अभिषेक सिंह म्हणाले की, श्री रामायण कथा ही केवळ रामायणाची पुनरावृत्ती नाही तर एक हृदयस्पर्शी सिनेमॅटिक अनुभव आहे जो भक्ती आणि भव्यतेचे मिश्रण करतो. आम्हाला श्री रामाच्या प्रवासाचे भावनिक सार टिपायचे होते आणि ते दृश्यात्मकदृष्ट्या भव्य पद्धतीने सादर करायचे होते.

निर्माते प्रकाश महोबिया म्हणाले की, हा प्रकल्प आमच्या हृदयाच्या खूप जवळचा आहे. आम्हाला असा चित्रपट बनवायचा होता जो आमच्या परंपरांचा आदर करतो आणि आजच्या प्रेक्षकांशी संवाद साधतो. टीझरला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की हा चित्रपट या डिसेंबरमध्ये प्रदर्शित होईल तेव्हा तो खूप लोकप्रिय होईल.

मुंबई, छत्तीसगड, अयोध्या आणि रामोजी फिल्म सिटीमध्ये चित्रित झालेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण आधीच पूर्ण झाले आहे आणि आता ते पोस्ट-प्रॉडक्शनमध्ये आहे. फ्लेमिंगो व्हीएफएक्सच्या उच्च-गुणवत्तेच्या व्हीएफएक्स, आफ्टरप्ले स्टुडिओचे प्रभावी ध्वनी डिझाइन आणि पोस्ट मॅन स्टुडिओचे व्हिज्युअल प्रमोशन यांच्या मदतीने, हा चित्रपट प्रेक्षकांना आध्यात्मिक आणि सिनेमॅटिक दृश्ये देण्यासाठी सज्ज आहे.

श्री रामायण कथा डिसेंबर २०२५ मध्ये छत्तीसगढी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

श्री रामायण कथा ही महोबिया फिल्म प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली तयार केली जाते आणि संजय बुंदेला सह-निर्माते आहेत.
दसऱ्याच्या दिवशी टीझर लाँच झाल्यामुळे, निर्मात्यांना श्री रामाची कहाणी आजही प्रेरणा देत असलेल्या भक्ती, शक्ती आणि कालातीत मूल्यांची झलक प्रेक्षकांना देण्याची आशा आहे.

टीझर लिंक 👇

राजीव बर्वे लिखित ‘मनातील पत्रे’ या दिलीपराज प्रकाशनच्या ३०००व्या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : प्रकाशक आणि विक्रेता यांच्यातील सुंदर नाते दिलीपराज प्रकाशनने जपले आहे. एका ग्रंथविक्रेत्याचा सत्कार होणे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ग्रंथविक्री व्यवसायात यश मिळविण्यासाठी विक्रेत्याने वाचकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. आजच्या काळात वाचक नाही, असे सांगितले जाते; परंतु अशी परिस्थिती नाही. युवा पिढीदेखील आज वाचते आहे, फक्त त्यांचे माध्यम बदललेले असू शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक संजय भास्कर जोशी यांनी केले.

पुण्यातील दिलीपराज प्रकाशनच्या ५४व्या वर्धापनदिनानिमित्त दिलीपराज सुवर्णस्मृती ग्रंथोत्तेजक पुरस्काराने आज (दि. ३) अनिल बुक एजन्सीचे संचालक (नागपूर), ज्येष्ठ ग्रंथ वितरक अनिल टांकसाळे यांचा गौरव करण्यात आला. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ निरुपणकार उल्हास पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण टोकेकर आणि ज्येष्ठ समीक्षक संजय भास्कर जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्या वेळी संजय भास्कर जोशी बोलत होते. पुरस्काराचे यंदाचे पाचवे वर्ष असून मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि ११ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष आणि दिलीपराज प्रकाशनचे संचालक राजीव बर्वे लिखित ‘मनातील पत्रे’ या दिलीपराज प्रकाशनच्या गौरवशाली ३०००व्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. दिलीपराज प्रकाशनचे संचालक मधुर बर्वे मंचावर होते.

लेखकाइतकीच वाचकांची प्रतिभा महत्त्वाची वाटते असे आवर्जून नमूद करून संजय भास्कर जोशी म्हणाले, राजीव बर्वे यांच्या पुस्तकातून त्यांनी न पाठविलेली पत्रे हा हाताळलेला वाङ्‌मयीन प्रकार अतिशय सुंदर आणि प्रभावशाली आहे.

‘दिलीपराज’ची पुस्तके मराठी भाषेला सकस करणारी : प्रवीण टोकेकर..

प्रवीण टोकेकर म्हणाले, अनिल टांकसाळे हे भाषासंस्कार करणारे लोभस व्यक्तिमत्त्व आहे. ‘मनातील पत्रे’ या पुस्तकाविषयी बोलताना टोकेकर म्हणाले, ही पत्रे एखाद्या दृश्याप्रमाणे उलगडत जातात. या पत्रांमधून लेखकाच्या पारदर्शक मनाचे सर्जनशील दर्शन घडते. दिलीपराज प्रकाशनतर्फे प्रकाशित पुस्तके मराठी भाषेला सकस करणारी आहेत. तंत्रज्ञान बदलले तरी शब्द हे एकमेव माध्यम आहे जे बोलेल आणि लिहिले जाईल. दिलीपराज प्रकाशनतर्फे पुढील काळात तंत्रज्ञानात होणारे बदल स्वीकारून कार्य घडावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पुस्तकविक्री चळवळ म्हणूनच स्वीकारली : अनिल टांकसाळे..

सत्काराला उत्तर देताना अनिल टांकसाळे म्हणाले, मराठी वाचकाला काय हवे जाणून घेण्यासाठी मी सातत्याने ग्रंथप्रदर्शने भरवत गेलो. यातूनच पुस्तकांचे दुकान थाटले आणि व्यवसाय वाढत गेला. आजच्या सन्मानाने पुस्तकविक्रेता उपेक्षित नाही हा भाव निर्माण झाला आहे. पुस्तक विक्रीचा व्यवसाय आज संक्रमण काळातून जात आहे, तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप परिश्रम करावे लागत आहेत. आज नवे लेखक, नवे साहित्य निर्माण होत आहे, परंतु वाचक सिमित झाला आहे. पुस्तकविक्री हा व्यवसाय न समजता ती चळवळ म्हणूनच स्वीकारली आहे.

‘मनातील पत्रे’तून उत्तम मनसंवाद : उल्हास पवार..

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना उल्हास पवार म्हणाले, आजच्या काळात कुटंबव्यवस्थेची वीण उसवत चालेली असताना ‘मनातील पत्रे’ या पुस्तकातील पत्रांचे महत्त्व आहे. अनेकांच्या मनातील कल्लोळ व्यक्त होत नाही परंतु राजीव बर्वे यांनी आपल्या लेखणीतून तो उत्तम प्रकारे मांडला आहे. या पत्रांमधून सप्रेम मनसंवाद व्यक्त होत असून यातील कल्पनाशक्ती, सुंदर वर्णने अंतर्मुख करणारी आहेत. विज्ञान युगामुळे पत्र लिखाण मागे पडले आहे अशा काळात कृत्रिमता नाहीशी होण्यासाठी या पत्रांचा नक्कीच उपयोग होईल. या पुस्तकातून साहित्याला वेगळा आयाम मिळाला आहे.

‘मनातील पत्रे’ : मनातील भावनांचा उद्रेक : राजीव बर्वे..

लेखनाविषयी मनेगत व्यक्त करताना राजीव बर्वे म्हणाले, पत्र लेखनाचे बाळकडू मला वडिलांकडून मिळाले आहे. मनातील भावभावना कुठल्यातरी प्रकारे बाहेर याव्यात या करिता मी लिहिता झालो. पत्र रूपाने लिखाण करण्याचे माध्यम मला आवडल्याने मनातील भावनांचा उद्रेक या पुस्तकातून वाचकांसमोर आला आहे.

स्वागतपर प्रास्ताविक मधुर बर्वे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत मधुर बर्वे, मधुमिता बर्वे यांनी केले. अंजली टांकसाळे यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.

गौतमी पाटीलच्या गाडीकडून रिक्षाचालकाला धडक प्रकरण:दोषींवर कठोर कारवाई करा

ना. चंद्रकांतदादा पाटील यांचे डीसीपी संभाजी पाटील यांना निर्देश

पुणे : नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारमुळे झालेल्या अपघात प्रकरणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आक्रमक झाले असून, सदर प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी अशा सूचना ना. पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.

नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वाहनाने 30 सप्टेंबर रोजी एका रिक्षाला वडगाव पुलाजवळ मागूनजोरदार धडक दिली. त्यामध्ये रिक्षाचालक मरगळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सदर प्रकरणी आज मरगळे कुटुंबियांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित जनता दरबारात भेट घेऊन; मदतीची मागणी केली. त्यावर ना. पाटील यांनी डीसीपी संभाजी पाटील यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधून दोषींवर कठोर कारवाई करा, असे निर्देश दिले.

पुणे नवरात्राै महोत्सवाची हजोरांच्या उपस्थित सांगता.

पुणे-नवरात्रात सलग १० दिवस दर्जेदार संगीत राजनींचे आयोजन करून हजारो संगीत प्रेमींना आनंद देणाऱ्या ३१ व्या पुणे नवरात्राै महोत्सवाची विजयादशमीच्या संध्येला सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या गाण्यांची संगीतरजनी कार्यक्रमाने हजारोंच्या उपस्थित सांगता झाली. सुरवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुणे नवरात्र महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल, गायक जितेंद्र भुरुक, गायिका रुपाली आनंद,प्रिशीता पांडे यांनी पूजन करून आदरांजली वाहिली. यावेळी प्रेक्षकांनी सभागृह तुडुंब भरले होते.

“सपनोकी राणी”..”जिंदगी एक सफर”…”मेरे सामनेवली खिडकी में एक चांद का तुकडा रहता है” अशी असंख्य गाणी गाऊन ‘सोलफुल किशोर कुमार’ या कार्यक्रमाची जल्लोषात सुरवात गायक जितेंद्र भुरुक यांनी केली. जितेंद्र आणि गायिका रुपाली यांनी एकत्रित गात श्रोत्यांना जुन्या काळातील आठवणीत नेले

यावेळी गायकांना वादक रशीद शेख, अमन सय्यद ( की बोर्ड),सचिन वाघमारे (बासरी), मुकेश देढिया (गिटार), बाबा खान ( सॅक्सिफोन), कांचन निंबाळकर ( बास गिटार), नंदू डेव्हिड (रिदम मशीन), सोमनाथ फाटक ( तुंबा), अभिषेक भुरुक (ड्रम), स्वरन्वय ( कोरस ) यांनी आपले कौशल्य सादर करत कार्यक्रमात रंगत आणली.

पुणे नवरात्राै महोत्सव पार पडण्यासाठी अनेकांनी सहकार्य केले त्यामुळे कार्यक्रम यशस्वी होऊ शकला असल्याने विविध हितचिंतक यांचे आभार यावेळी महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी मानले.

भारतरत्न डाॅ.भूपेन हजारिका यांच्या स्मृत्तीस मानवंदना

आदल्या दिवशी लाेकप्रिय गायक, गीतकार, संगीतकार, वादक असे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले डाॅ.भूपेन हजारिका यांना देशातील सर्वाेच्च पुरस्कार भारतरत्न, संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त झाला हाेता. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त ३१ व्या पुणे नवरात्राै महाेत्सवात त्यांचे प्रतिमेचे पूजन, पुणे नवरात्राै महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल आणि गायक अभिषेक सराफ, गायिका तन्वी दाते आणि गायिका अवंतीका धुमणे, निवेदक आर.जे.बंडया यांच्या हस्ते करून आदरांजली वाहण्यात आली. भूपेन हजारिका यांचे प्रसिध्द ‘दिल हुम हुम करे..’ हे गाणे गायक अभिषेक सराफ यांनी गात त्यांच्या आठवणी पुनर्जागृत करण्यात आल्या.
स्वारगेट येथील गणेश कलाक्रिडा रंगमंदिर येथे याअनुषंगाने ‘हदयात वाजे स्मथिंग’ या विशेष कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. यावेळी निर्माते व गायक अभिषेक सराफ, गायिका तन्वी दाते आणि गायिका अवंतीका धुमणे यांनी बहारदार राेमाँटिक गाणी सादर केली. प्रसिध्द निवेदक आर.जे.बंडया याने विविध अनुभवांचे किस्से सांगत कार्यक्रमात रंगत वाढवली.

‘चुरा लिया है तुमने जाे दिलकाे…’ हे गाणे गायिका अवंतिका हिने सुरेल आवाजात गात कार्यक्रमाची जाेरदार सुरुवात केली. त्यानंतर गायिका तन्वी हिने गायलेले ‘सैय्या..’ गाणे तर गायक अभिषेकचे ‘मितवा..’ गाणे ऐकून रसिकांनी टाळयांचा कडकडाट केला. जीव रंगला..तेरे मेरे मिलने की..गुलाबी आँखें..अशी एकामागाेमाग एक प्रसिध्द गाण्यांचे गायनामुळे कार्यक्रम रंगत गेला.

यावेळी गायकांना विविध गाण्यांना आवश्यकतेनुसार अभिजीत भदे (ड्रम), ओमकार इंगवले (ऑक्टाेपॅड व ढाेलक), अजय थाेरात (गिटार), शंतनु जहागिरदार (की-बाेर्ड), भारत ढाेरे (की-बाेर्ड), मंगेश जाेशी (तबला आणि बाँगाे) या वादकांनी विविध वाद्य साधनांचा वापर करुन सुरेख साथ देत आपले कौशल्य दाखवून दिले.

आंतरराष्ट्रीय खेळाडू श्रुतिका सरोदे आणि विशेष दिव्यांग विद्यार्थी आर्या भालेराव यांचा खास सन्मान मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.

याप्रसंगी पुणे नवरात्राै महिला महाेत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, घनश्याम सावंत ,उद्योगपती दिलीपराव ढमाले, रमेश भंडारी, नंदकुमार बानगुडे, विशाल कोंढाळकर, संजय काळोखे, विलास आवटे, निर्मला जगताप,अमित बागुल, नुपूर बागुल, प्राजक्ता ढवळे, प्रांजल गांधी, वृषाली बागुल, हर्षदा बागुल, सागर बागुल उपस्थित होते.

पुण्यात11 वर्षीय मुलगा खेळता खेळता लिफ्टमध्ये अडकला, वेळेवर मदत न मिळाल्याने मृत्यू

पुणे-पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागातील चोवीसवाडी येथे एका 11 वर्षीय चिमुकल्याचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अमेय फडतरे असे या मुलाचे नाव होते. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून लिफ्टमध्ये काही दोष आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणाची अधिकची माहिती अशी की, अमेय हा लिफ्टसोबत खळत होता. जिन्याने वर जायचा आणि खाली येताना लिफ्टने यायचा. काही वेळ हा खेळ सुरू राहिला. मात्र, खेळत असतानाच लिफ्टच्या मधल्या जागेत अमेय अडकला. यात तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत बराच वेळ त्याने मदतीसाठी आरडा-ओरड केली. मात्र, वेळेवर मदतीला कोणीच आले नाही. अमेय हा लिफ्टमध्ये अडकला आहे हे बराच वेळ कोणाच्याच लक्षात आले नाही.

काही वेळाने अमेय हा लिफ्टमध्ये अडकला असल्याचे लक्षात येताच याची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी अमेयला लिफ्टमधून बाहेर काढले व लगेच नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच अमेयचा मृत्यू झाला. या घटनेमुळे फडतरे कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. तसेच अमेयला वेळेवर मदत मिळाली असती तर त्याचा जीव वाचू शकला असता अशी माहिती अग्निशमनच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाल्याचे अनेक घटना वारंवार समोर येत असतात. यावर आळा घालणे महत्त्वाचे झाले आहे. यासाठी आपण लिफ्टचे मेंटेनन्स वेळोवेळी केले पाहिजे. तसेच लहान मुलांना एकट्याने लिफ्टमध्ये जण्यापासून रोखावे. तसेच मोठी सोसायटी असल्यास एक व्यक्ती लिफ्टची ने-आण करण्यासाठी नेमण्यात यावा.

अस्वस्थ जगाला विश्वात्मक म. गांधींच्या तत्वाची गरज-डॉ.श्रीपाल सबनीस

एमआयटी डब्ल्यूपीयूत राष्ट्रपिता म.गांधी व भारतरत्न लालबहाद्दूर शास्त्री जयंती साजरी

पुणे ३ ऑक्टोबरः “ राष्ट्रपिता म. गांधी यांच्या आंदोलनात हिंसा नसल्याने संपूर्ण विश्वाने त्यांना सामावलेले आहे. परंतू वर्तमान काळात डोनाल्ड ट्रम्प, पुतीन, किंग जोन आणि चिनचे जिनपींग हे  सर्व हिटलरच्या भूमिकेतच आहेत. यांच्यामुळे विभाजीत झालेल्या जगात ‘जगा आणि जगू दया’ अशा घोषणा ऐकू येत आहेत. इस्त्रायल-पॅलेस्टाईन यांच्यातील युध्द व अमानुषता ही युनोच्या साक्षीनेच होत आहेत कारण असाह्य युनोच्या पायात बेड्या घालण्यात आल्या आहेत. त्यामुळे विश्वात्मक म. गांधी यांच्या विश्वशांतीच्या तत्वांची गरज भासत आहे.” असे विचार ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व थोर विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
 मानवतेचे पूजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाच्या वतीने ‘स्मरण महामानवांचे’ या अभिवादन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ व ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हासदादा पवार हे अध्यक्षस्थानी होते. माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.
तसेच माईर्स एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिटयूशन्सच्या सह व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी संचालक डॉ. सुचित्रा कराड-नागरे, सौ. ललिता सबनीस, माईर्सचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी, प्रसिद्ध गप्पाष्टक कार डॉ. संजय उपाध्ये, डब्ल्यूपीयूचे सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर, एडीटी विद्यापीठाचा कुलसचिव डॉ. महेश चोपडे व डॉ. महेश थोरवे उपस्थित होते.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले,“ पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा बाहेर देशात गेल्यावर भगवान गौतम बुद्ध आणि म. गांधी यांच्या नावांचा उल्लेख करतात. परंतू देशात म. गांधी यांच्या नावाने गलिच्छ राजकारण चालले आहे. लोकशाहीत स्वातंत्र्य जरी असले तरी या देशात मारेकरी हे देशभक्त ठरत आहेत ही सर्वात मोठी शोकांतीका आहे.”
 “सत्याचे सातत्य टिकविणारे म. गांधी हे वंचितांसाठी सेवा व समर्पण, द्वेष आणि हिंसेला उत्तर देणारे, प्रेम आणि बंधुता, साध्य व साधन मधील विवेक बाळगणारे आणि हिंसेला अहिंसेने उत्तर देणार होते.”
डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ सत्य, अहिंसा आणि शांती हेच खरे मानवत जीवनाचे तत्व आहे. सर्व धर्म ग्रंथ हेच जीवन ग्रंथ आहेत हे म. गांधींनी ओळखून सतत शांतीच्या दिशेने वाटचाल करीत होते. संपूर्ण जगात भारताची ओळख गौतम बुद्ध आणि म. गांधी यांच्या नावाने ओळखले जाते. आज संपूर्ण जगात वाढत जाणार्‍या अशांत आणि हिंसेला उत्तर म्हणजे म. गांधी यांनी दिलेला शांतीचा संदेश आहे.”
डॉ. उल्हास पवार म्हणाले,“ संयम आणि अहंकार यावर नियंत्रण ठेवले तर म. गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री या दोघांची जयंती खर्‍या अर्थाने साजरी केली असे म्हणू शकतो. कस्तूरबा गांधी यांनी अफ्रिकेत म. गांधी यांना असहकाराचा पहिला धडा दिला. तसेच मानवता, समता व नैतिकता या तीन पायांवर संघर्ष उभा राहण्याचे तत्व न्या. रानडे यांनी म. गांधी यांना दिले. त्याच प्रमाणे लाल बहाद्दूर शास्त्री यांचे साधेपण आणि आचरण या तत्वाचे पालन ही संपूर्ण देशाने केले. अहंकारातून हिंसा आणि शत्रू निर्माण होतात त्यामुळे अहंकार सोडण्याचे तत्व या दोघांनी संपूर्ण मानवजातीला दिले आहे.”
डॉ. सुचित्रा कराड नागरे म्हणाल्या,“या वर्षी नैसर्गिक आपत्ती पाहता शेतकरी व जवानांसाठी  पुन्हा जय जवान, जय किसान नारा देण्याची वेळ आली आहे. शांती हीच खरी ताकद असून भारत एकमेव देश असेल जो संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग दाखवेल.”
विद्यार्थी आयशी बासू, दिप्ती मिश्रा, निष्ठा मांडलिया, दिव्या थोरवे, कोमल नेवसे, खुशबू अवस्थी, शैलजा इनामदार यांनी आपल्या भाषणातून म.गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांनी सत्य, अहिंसा, शांती आणि मानवकल्याणासाठी केलेल्या कार्यावर विस्तृत विवेचन केले.
डॉ. रत्नदीप जोशी यांनी स्वागत पर भाषण केले.
डॉ. मिलिंद पात्रे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. महेश थोरवे यांनी आभार मानले.

सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग -शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बुडाले आहेत. यापैकी तिघांचे मृतदेह हाती लागले असून, अन्य पाच जणांचा शोध सुरू आहे. सर्व पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.

शिरोडा वेळागर येथे पर्यटनासाठी आलेल्या एकूण आठ पर्यटकांपैकी आठ जण समुद्रात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत तात्काळ मदतकार्यानंतर तीन जणांना समुद्रातून बाहेर काढण्यात यश आले असून, त्यांना उपचारासाठी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या दुर्घटनेतील तीन जणांचे मृतदेहही सापडले आहेत. बुडालेल्या उर्वरित पर्यटकांचा शोध घेण्याची प्रक्रिया घटनास्थळी सुरु आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे पर्यटक कुडाळ आणि बेळगाव येथील असल्याची शक्यता आहे.