Home Blog Page 1494

ज्ञानोबा, तुकोबांच्या पालखीचं पुण्यातून भक्तीमय वातावरणात प्रस्थान…

पुणे- संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या दोन्ही पालख्या पुण्यातून सासवडकडे जाण्यास मार्गस्थ झाल्या आहेत.भक्तिमय वातावरणात पुणेकरांनी पालखीला निरोप दिला.निवडुंगा विठोबा मंदिर परिसर विठू नामाचा गजराने दुमदुमला गेला होता.

दोन दिवसांच्या मुक्कामामध्ये पुणेकरांकडून मिळालेला स्नेह आणि आदरातिथ्याचा भाव मनामध्ये ठेवून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्‌गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यानी आज पंढरपुराकडे प्रस्थान करताना हडपसरपर्यंत दोन्ही पालख्यांचा एकत्रित प्रवास केला असून सकाळचा विसावा झाल्यानंतर पालख्यांचे स्वतंत्रपणे मार्गक्रमण होणार आहे.हडपसर येथे प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार डॉ . अमोल कोल्हे यांनी दोन्ही पालख्यांचे दर्शन घेतले .

संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी हडपसरपासून उजवीकडे वळून दिवे घाटातून सोपानदेवांच्या सासवडकडे रवाना होणार आहे. तर, संत तुकाराम महाराज यांची पालखी सोलापूर रस्त्याने सरळ जाणार असून लोणीकाळभोर येथे मुक्कामी जाईल.

आळंदीहून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि देहूहून जगद्‌गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्या सोमवारी रात्री उशीरा पुणे मुक्कामी आल्या होत्या .त्यामुळे पुणेकरांनी दर्शनासाठी गर्दी केली. संपूर्ण दिवसभर या वैष्णव्यांच्या मेळ्याने पुण्यातील वातावरण वारीमय झाले होते. पालखीच्या दर्शनासाठी लागलेली पुणेकरांची रीघ, शहरातील मंदिरांना वारकऱ्यांनी दिलेली भेट, टाळ-मृदंगांसह विठुनामाचा जयघोष, आपापल्या परीने प्रत्येकाने केलेली वारकऱ्यांची सेवा असे भक्तीमय वातावरण मंगळवारी शहरात दिसत होते.शहरात सकाळी मंदिरांमध्ये, दिंडी मुक्कामाच्या ठिकाणी वारकऱ्यांचा मेळा जमला आणि भारूड, भजन, हरिपाठ, अभंग, ओव्या अशी भक्तीमय सकाळ शहरात उजाडली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असलेल्या पालखी विठोबा मंदिर आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचा मुक्काम असलेल्या निवडुंग्या विठोबा मंदिर येथे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच रीघ लावली होती.पादुकांच्या दर्शनासाठी रांगेत उभे राहून प्रतीक्षा करत असलेल्या भाविकांनी हरिनामाचा गजर करत, टाळ-मृदंगांवर ताल धरला आणि शीण घालवला. या वारकऱ्यांची बडदास्त ठेवण्यासाठी अनेक संस्था, संघटना, परिवार सरसावले होते. नाश्‍ता, चहा, जेवण या सगळ्यांची लगबग दिंडी आणि पालखी मुक्कामाच्या ठिकाणी दिसून आली. शिवाय गणेश मंडळांकडून वारकऱ्यांना चौकाचौकात चहा आणि अल्पोपहार देण्यात आला. तसेच वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीची व्यवस्था महापालिकेशिवाय काही स्वयंसेवी संस्थांनीही केली होती. त्यामध्ये रक्तशर्करा तपासणी, नेत्र तपासणी यांचा समावेश होता.

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनुसूचित जमातीच्या एकूण १० विद्यार्थ्यांना परदेशात एम.बी.ए., वैद्यकीय शिक्षण, बी.टेक (इंजिनिअरींग ), कृषी, विज्ञान व इतर विषयांचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेता यावे यासाठी शिष्यवृत्ती देण्याची योजना आयुक्तालयस्तरावर राबविण्यात येत आहे….या योजनेबाबतचा माहितीपूर्ण आढावा या विशेष लेखात घेण्यात आला आहे.…

असे आहेत निकष

उमेदवाराची निवड करतांना भूमिहीन आदिवासी कुटूंबातील विद्यार्थी, दुर्गम भागातील विद्यार्थी, तसेच आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यास या शिष्यवृत्तीसाठी प्राधान्य देण्यात येईल. विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावा. अधिवास प्रमाणपत्र (नॅशनॅलीटी व डोमिसाईल सर्टीफिकेट) सादर करणे आवश्यक आहे. विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा. त्याबाबत सक्षम प्राधिका-यांकडून जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र विद्यार्थ्याने अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याचे वय १ मे २०२२ रोजी जास्तीत जास्त ३५ वर्षापर्यत असावे. तथापि, नोकरी करीत असलेल्या विद्यार्थ्याचे बाबतीत उच्च वयोमर्यादा ही ४० वर्षापर्यंत राहील. परंतु, नोकरीत नसलेल्या विद्यार्थ्यास निवडीच्या वेळी प्राधान्य देण्यात येईल. विद्यार्थ्यास परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठात प्रथम वर्षाकरीता प्रवेश मिळालेला असावा.  शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कमाल मर्यादा जास्तीत जास्त रुपये ६ लाख रुपयांपर्यंत असावे.

विद्यार्थ्याने कोणत्या दिनांकास व कोणत्या विमानाने परदेशात जाणार आहे याची माहिती आयुक्तालयास दिल्याशिवाय त्याला परदेशात जाता येणार नाही. या शिष्यवृत्ती आदिवासी कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीस (मुलगा/मुलगी) आणि एकच अभ्यासक्रमास अनुज्ञेय राहील. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्याने निवडलेला अभ्यासक्रम अर्धवट सोडल्यास अभ्यासक्रमासाठी शासनामार्फत खर्च करण्यात आलेली संपूर्ण रक्कम त्याच्याकडून वसुल करण्यात येईल अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर भारतात परत येणे किंवा किमान पाच वर्ष भारतात सेवा करणे बंधनकारक राहील. या अटी मान्य असल्यासबंधी विद्यार्थ्याने लेखी हमीपत्र (बॉन्ड) दोन जामीनदारांसह सादर करावे लागेल. परदेशात अभ्यासक्रमासाठी एकदा निश्चित केलेला कालावधी वाढवता येणार नाही. अथवा शिष्यवृत्तीस मंजूरी घेतेवेळी जो अभ्यासक्रम निवडला आहे त्यात बदल करता येणार नाही. विद्यार्थ्याने निवडलेला अभ्यासक्रम व त्याचा कालावधी अर्जात स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रम संपल्यावर संबंधित विद्यार्थ्यांने त्वरीत भारतात येऊन त्याचे अंतिम परिक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र आयुक्त, आदिवासी विकास यांना सादर करणे आवश्यक राहील. याशिवाय सध्या करीत असलेल्या व्यवसायाची माहिती द्यावी. नोकरीत असलेल्या विद्यार्थ्यास या शिष्यवृत्तीसाठी सादर करावयाचा अर्ज त्याच्या नियोक्त्यामार्फत सादर करणे बंधनकारक राहील. परदेशात ज्या विद्यापीठात विद्यार्थ्यास प्रवेश मिळाला आहे. त्या विद्यापीठास आणि संस्थेस ऑनलाईन प्रणालीनुसार थेट खात्यावर ट्युशन फी जमा करण्यात येईल. तथापि विद्यार्थ्यासाठी निर्वाहभत्ता त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल.

शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यास, परदेशातील निवास हा अभ्यासक्रमाच्या कालावधीपलीकडे कोणत्याही परिस्थितीत वाढविता येणार नाही. संबंधित विद्यार्थ्याने अगोदरच्या वर्षाचे गुणपत्रक, विद्यापीठ शुल्क व निवास शुल्क अदा केल्याबाबत प्रमाणित प्रत दिल्यानंतरच पुढील वर्षाची शिष्यवृत्ती आयुक्त, आदिवासी विकास हे मंजूर करतील. अभ्यासक्रमाचा कालावधी संपल्यावर परदेशातील वास्तव्यासाठी कोणताही पत्रव्यवहार आयुक्तालयामार्फत केला जाणार नाही. अथवा त्यासाठी कोणताही जादा निधी मंजूर केला जाणार नाही. परदेशातील ज्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याची निवड झाली आहे त्या देशाचे पारपत्र (व्हीजा) प्राप्त करण्याची जबाबदारी संबंधीत विद्यार्थ्याची राहील. यासाठी राज्य अथवा केंद्रशासनाचे कोणतेही अर्थसहाय्य उपलब्ध होणार नाही. ज्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश घेणार आहे त्याच अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास शुल्क अनुज्ञेय राहील, इतर कोणताही अनुषांगिक अभ्यासक्रमाकरिता प्रवेश व शुल्क अनुज्ञेय राहणार नाही. शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्याने अर्जासोबत चुकीची माहिती अथवा खोटी कागदपत्रे सादर केल्याचे आढळून आल्यास अशा विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्तीपोटी शासनाने केलेला संपूर्ण खर्च शेकडा १५ टक्के व्याजासह वसूल करण्यात येईल.

तसेच सदर विद्यार्थ्याचे नांव काळ्या यादीत टाकण्यात येईल. परदेशी विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी GRE (Graduate Record Examination) तसेच TOFEL (Test of English as a Foreign Language)/ IELTS (International English Language Testing System) या प्रवेश परिक्षा घेतल्या जातात. सदर GRE च्या आधारावर प्रवेश घेणाऱ्या व TOFEL/ IELTS उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष विचार करण्यात येईल. ज्या परदेशी विद्यापीठाचे जागतिक रँकींग 300 पर्यंत आहे अशाच विद्यापीठात प्रवेश मिळालेले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र राहतील मात्र निवड मेरीटनुसार होईल. विद्यार्थ्यास शिक्षण फी, परिक्षा फी, निर्वाह भत्ता (निवास व भोजन), शैक्षणिक कॉन्टेजन्सी चार्जेस हे लाभ देण्यात येतील. विमान प्रवास, विजा फी, स्थानिक प्रवास भत्ता, विमा, संगणक, लॅपटॉप व आयपॅड व इतर सुविधांचा खर्च विद्यार्थ्याने स्वखर्चाने करावा लागेल. नोकरीत असलेल्या विद्यार्थ्यास या शिष्यवृत्तीसाठी सादर करावयाचा अर्ज त्याच्या नियोक्त्यामार्फत सादर करणे बंधनकारक राहील. परदेशात ज्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्याची निवड झाली आहे त्या देशाचे पारपत्र (व्हीजा) व पासपोर्ट मिळविण्याची जबाबदारी विद्यार्थ्याची राहील. यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध होणार नाही. परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश मिळाल्याबाबतचे त्या विद्यापीठाचे पत्र व सबंधित विद्यापीठाच्या प्रॉस्पेक्टसची प्रत अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्कासह येणाऱ्या एकुण खर्चाचे संस्थेचे प्रमाणपत्र, परदेशातील ज्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे, त्या अभ्यासक्रमाशी संबंधित असलेल्या शाखेतील / विभागातील दोन विद्येकनिष्ठ / फॅकल्टी यांचे शिफारसपत्र जोडावे. विद्यार्थ्याने शिक्षणानंतर नोकरी मिळाल्यावर शासनामार्फत खर्च करण्यात आलेल्या रक्कमेपैकी त्याच्या स्वेच्छेने 10 टक्के रक्कम 5 वर्षामध्ये शासनामार्फत स्थापन करण्यात आलेल्या अनुसूचित जमातीसाठीच्या निधीमध्ये आदिवासी उपयोजना निधी जमा करणे अपेक्षित राहील.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र, इयत्ता १२ वी आणि पदवी अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिकांच्या सत्यप्रती, कुटुंबातील व्यक्तींच्या वार्षिक उत्पन्नासंबंधी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र. अर्जदाराने परदेशात ज्या विद्यापीठात / मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेत उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रत्यक्ष प्रवेश मिळाला आहे त्यासबंधीत विद्यापिठाचे/ शिक्षण संस्थेचे पत्र (ऑफर लेटर) आणि त्या विद्यापिठाचे शैक्षणिक शुल्क आकारणीसंबंधी (ट्यूशन फी) व इतर खर्चाची (निवास व भोजन खर्च, बुक खर्च) तपशिलवार माहिती / विवरण. (प्रॉस्पेक्ट प्रतीसह), ज्या देशात उच्च शिक्षणासाठी जाणार आहे त्या देशाचे पारपत्र (पासपोर्ट ), दोन राजपत्रित अधिकाऱ्यांचे ओळख / शिफारस पत्र. विद्यार्थ्याचे वयासबंधी प्रमाणपत्र (शाळा सोडल्याचा दाखला / इयत्ता १२ वी उत्तीर्ण प्रमाणपत्राची सत्यप्रत. अभ्यासक्रम पुर्ण न केल्यास / अर्धवट सोडल्यास, बनावट कागदपत्र सादर केल्याचे निदर्शनास आल्यास शासनाने केलेला पूर्ण खर्च परत करण्यात येईल याबाबत रु.१००/- चे स्टॅंप पेपरवर हमीपत्र. अभ्यासक्रम पुर्ण केल्यानंतर नोकरी मिळाल्यावर शासनाने खर्च केलेल्या रक्कमेपैकी स्वेच्छेने कमीत कमी १० टक्के रक्कम शासनामार्फत स्थापन करण्यात आलेल्या अनुसूचित निधीमध्ये (आदिवासी उपयोजना निधी ) जमा करण्याबाबत रु. १००/- स्टॅप पेपरवर शपथपत्र, परदेशी विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी TOFEL/IELTS परिक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र. ज्या परदेशी विद्यापीठाचे जागतिक रँकींग ३०० पर्यंत आहे त्या विद्यापिठाचे जागतिक रँकींगचे कागदपत्र सादर करण्यात यावीत.

शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी विहित नमुन्यातील आवेदनपत्र (अर्ज) आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य नाशिक, अपर आयुक्त, आदिवासी विकास नाशिक / ठाणे/ अमरावती / नागपूर यांचे कार्यालयात तसेच संबंधीत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत विनामूल्य उपलब्ध आहेत. शिष्यवृत्ती लाभ घेऊ इच्छीनाऱ्या विद्यार्थी / विद्यार्थीनींनी वर नमूद कार्यालयातून विहित नमुन्यात शिष्यवृत्तीसाठी नमूना अर्ज प्राप्त करुन परिपुर्ण माहिती भरुन व त्यासोबत आवश्यक कागदपत्र प्रमाणित प्रतीसह अर्ज प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांचे कार्यालयामार्फत अपर आयुक्त, आदिवासी विकास यांच्याकडे सादर करावेत.

एकाही मंत्र्याचा राजीनामा घेणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आपल्या समर्थक आमदार, खासदारांना ग्वाही

मुंबई

येऊ घातलेला वर्धापन दिन, ५ मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा अन् युतीमधील धुसफूस या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (१२ जून) रात्री वरळी येथील एनएससीआय येथे शिंदे गटाची बैठक पार पडली. बैठकीला सेनेचे आमदार, खासदार, मंत्री अन् जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. आपल्या कोणाही मंत्र्यांचा राजीनामा होणार नाही, निश्चिंत राहा, अशी ग्वाही या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिली.शिंदे म्हणाले, पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. पक्षामध्ये विविध जिल्ह्यांतून राज्यातून नगरसेवक, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेत दाखल हाेत आहेत. सरकारबद्दल त्यांच्या मनात विश्वास निर्माण झाला आहे, असा दावा शिंदे यांनी केला.

शिंदे सेनेच्या ५ मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाणार, अशा बातम्या वृत्तपत्रात आल्या आहेत. या बातम्या सरकारमधील जबाबदार मंडळींनी पेरल्या आहेत. याचा जाब विचारला पाहिजे, अशा तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या. मला सगळे माहिती आहे, कोण कुठे काय करते ते, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या एकाही मंत्र्याचा राजीनामा घेणार नाही, अशी ग्वाही दिली.


“अज्ञाताने जाहिरात दिली, शिवसेनेचा काहीही संबंध नाही”, शंभूराज देसाईंचा यू-टर्न

मंगळवारी (१३ जून) राज्यातील प्रमुख वृत्तपत्रात एक जाहिरात देण्यात आली आहे. ‘देशात मोदी अन् राज्यात शिंदे’ असा संदेश या जाहिरातीतून दिला आहे. यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात ‘देशात नरेंद्र अन् महाराष्ट्रात देवेंद्र’ अशी घोषणा दिली होती. पण आज प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर देण्यात आलेल्या जाहिरातीवर ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’ असा मजकूर छापण्यात आला आहे. मात्र यावर झालेल्या मोठ्या घडामोडींनंतर शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी काल घुमजावके ला आहे. आजच्या वर्तमानपत्रात छापून आलेल्या जाहिरातीचा शिवसेनेशी (शिंदे गट) काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या हितचिंतकांनी ही जाहिरात दिली असावी, असं स्पष्टीकरण देसाई यांनी दिलं. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.संबंधित जाहिरातीवर स्पष्टीकरण देताना शंभूराज देसाई म्हणाले, “आज वर्तमानपत्रात जी जाहिरात छापून आली आहे, त्या जाहिरातीचा शिवसेना पक्षाशी (शिंदे गट) कसलाही संबंध नाही.या दोन्ही नेत्यांच्या हितचिंतकांनी कदाचित ही जाहिरात दिली असेल. पण एक गोष्ट समाधानकारक आहे की, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना-भाजपाचेच नेते आहेत. शिवसेना-भाजपा युती आणि आमचे मित्रपक्ष ५० टक्क्यांच्या पुढे आहेत, हे सर्व्हेवरून दिसलं आहे.”

विशेष म्हणजे शिंदे गटातील विविध नेत्यांकडून संबंधित जाहिरातीतील दाव्याचं समर्थन करण्यात आलं आहे. शंभूराज देसाई यांनीही काल सकाळी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना जाहिरातीतील मजकूराचं समर्थन केलं होतं. एकनाथ शिंदेंकडून वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातीत बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही, या राऊतांच्या टीकेला उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले होते, “बाळासाहेब ठाकरे हे आमच्या हृदयात आहेत. आम्ही आज जे काही आहोत, ते बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आहोत.त्यामुळे काहीतरी वक्तव्य करून राऊत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतायत. हा एक सर्व्हे आला आहे. यामध्ये लोकांची मतं जाणून घेतली जातात. महाराष्ट्रात आमची युती आहे. सर्वसामान्य लोकांनी दिलेला हा कल आहे. जनमताचा आपण आदर केला पाहिजे.”

मिडिया जाहीरातींसाठी खोक्यांवर खोके ..होऊ दे खर्च ..महाराष्ट्र समर्थ ..

शिंदे गटाची आता आणखी एक सुधारित जाहिरात:त्यात बाळासाहेबआणि दिघेंचा फोटो; फडणवीसांनाही स्थान म्हणाले- ‘हम साथ-साथ है’

वरचे अर्धे पान पाहिले तर भाजपा सेनेची वाटेल खाली मंत्री पाहिले तर शिंदे गटाची वाटेल अशी जाहिरात करत पुन्हा एक जाहिरात

राज्यातील ठराविक निवडक वृत्तपत्रांना दिलेल्या या जाहिरातीमुळे जनमाणसांत राज्य सरकारविषयी निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याकरता आज शिंदे गटाने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. आजही त्यांनी राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांना जाहिरात देऊन “राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे” या जाहिरातीला “जनतेच्या चरणी माथा, गर्जा महाराष्ट्र माझा” या जाहिरातीने उत्तरार्ध केला आहे.

महाराष्ट्रातल्या अनेक वर्तमान पत्रांमध्ये मंगळवारी (१३ जून) शिवसेनेच्या शिंदे गटाने एक जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीला ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ असं शीर्षक देण्यात आलं होतं. या जाहिरातीत शिंदे गटाने आगामी निवडणुकीसंदर्भातला एक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय नेते असल्याचं सांगण्यात आलं. तसेच अलिकडच्या काळात शिवसेना आणि भाजपात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्रसिद्ध केलेली ही जाहिरात म्हणजे शिंदे गटाचं दबाव तंत्र असल्याचं बोललं जात आहे.

शिंदेच्या शिवसेनेकडून मंगळवारी देण्यात आलेल्या जाहिरातीवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतःचे वर्चस्व दाखविण्यासाठी व फडणवीसांना दुय्यम स्थान त्या जाहिरातीत दिल्याने युतीत आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, तापलेल्या राजकारणावर पडदा टाकण्यासाठी आणि डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आज शिवसेनेकडून आपली चूक सुधारित जाहिरातबाजी करण्यात आली. दरम्यान, या प्रकारामुळे पुन्हा राज्याच्या राजकारणात चर्चांना सुरूवात झाली आहे.

‘राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीने मंगळवारी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला. शिंदे गटाच्या या जाहिरातीमुळे शिंदे-फडणवीस युतीत बिघाड असल्याची चर्चा रंगली. शिंदे गटाने केलेल्या या जाहिरातीत फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच छायाचित्र असल्यानेही आरोप प्रत्यारोप झाले.

महाराष्ट्रातल्या अनेक वर्तमान पत्रांमध्ये मंगळवारी (13 जून) शिवसेनेच्या शिंदे गटाने एक जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीला ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ असे शीर्षक देण्यात आले. या जाहिरातीत शिंदे गटाने आगामी निवडणुकीसंदर्भातला एक सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला आहे

त्या अहवालानुसार महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय नेते असल्याचे सांगण्यात आले. तसेच अलिकडच्या काळात शिवसेना आणि भाजपात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने प्रसिद्ध केलेली ही जाहिरात म्हणजे शिंदे गटाचं दबाव तंत्र असल्याचं बोललं जात आहे.

‘बिपरजॉय’ वादळाचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज -केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.मनसुख मांडवीय 

नवी दिल्ली, 13 जून 2023

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी भूज येथे गुजरात राज्याचे आरोग्यमंत्री ऋषिकेश गणेशभाई पटेल यांच्यासह ‘बिपरजॉय’वादळामुळे उद्भवू शकणाऱ्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर केंद्र तसेच गुजरात राज्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेतला.‘बिपरजॉय’ हे “अत्यंत तीव्र चक्रीवादळ” येत्या 15 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टी ओलांडेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय पश्चिम किनाऱ्यावरील गुजरातसह सर्व तटवर्ती राज्यांतील प्रादेशिक कार्यालयांच्या सतत संपर्कात राहून या राज्यांना वादळाच्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्यासंदर्भात लागेल ती सर्व मदत करण्याच्या सूचना देत आहे. आतापर्यंत, अशा प्रकारच्या मदतीची मागणी कोणत्याही तटवर्ती राज्याने आरोग्य मंत्रालयाकडे केलेली नाही

सहा बहु-शाखीय केंद्रीय शीघ्र प्रतिसाद आरोग्य पथके (नवी दिल्ली येथील डॉ.राममनोहर लोहिया रुग्णालय, लेडी हार्डिंग्ज वैद्यकीय महाविद्यालय, सफदरजंग रुग्णालय, एम्स रुग्णालय तसेच जोधपुर आणि नागपूर येथील एम्स रुग्णालयांतून पाचारण करण्यात आलेली पथके)आपत्कालीन वैद्यकीय सुविधा आणि सेवा पुरवण्याची गरज उद्भवली तर त्यासाठी तयार ठेवण्यात आली आहेत. त्याचसोबत, वादळाने प्रभावित लोकांना मानसिक उपचार आणि तत्सम मदतीची गरज भासली तर ती पुरवण्यासाठी बेंगळूरू येथील एनआयएमएचएएनएस संस्थेतील पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

वादळाचे पश्चात परिणाम म्हणून कोणत्याही साथीच्या रोगांचा प्रसार वेळेवर शोधून काढण्यासाठी  आयडीएसपी अर्थात एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमातील कर्मचाऱ्यांना राज्य/जिल्हा स्तरावरील सर्वेक्षम पथकांच्या माध्यमातून आपत्ती-पश्चात रोग-सर्वेक्षण मोहीम राबवण्याचे कार्य सोपवण्यात आले आहे. राज्यांना कोणत्याही प्रकारे लॉजिस्टिक्स संदर्भातील गरज भासली तर त्यासाठी एचएलएल लाईफकेअर या कंपनीला संदर्भित मालाचा पुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्री वादळाच्या स्थितीवर बारकाईने सतत लक्ष ठेवून आहेत आणि कोणत्याही आरोग्यविषयक आपत्कालीन स्थितीला तोंड देण्यासाठी तयार राहण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत आहेत.

वक्फ मालमत्ता ऑनलाईन नोंदणी वेबपोर्टलचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई, दि. १३: वक्फ मालमत्तांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या वेब-पोर्टलचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर वेबपोर्टलचा शुभारंभ झाला. यावेळी मंत्रिमंडळातील सदस्यांसह खासदार इम्तियाज जलील, फौजिया खान, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहद मिर्झा, सदस्य समीर काजी, मुदस्सीर लांबे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ हे कार्यालय औरंगाबादला असून राज्यातील वक्फ मालमत्तांशी संबंधित प्रकरणांच्या अनुषंगाने राज्यभरातील वक्फ संस्थेच्या प्रतिनिधींना औरंगाबाद येथे जावे लागते. ही अडचण दूर व्हावी व वक्फ मालमत्तांशी संबंधित कामकाज ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा निर्माण व्हावी, या हेतूने एक संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम विभागाने हाती घेतले. त्यानुसार आता “ऑनलाईन-नोंदणी” ची सुविधा https://mahawaqf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे.

आर्थिक साक्षरता, सायबर संरक्षणबाबत राज्य शासनाचा त्रिपक्षीय करार

मुंबई, दि. 13 : गुंतवणुकदारांची गुंतवणूक सुरक्षित राहण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे करावे, याबाबत राज्यात विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मनि बी प्रा. लि. यांच्यात आज त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मनि बी प्रा. लि. च्या संचालक शिवानी दानी, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे मुख्य व्यवस्थापक अमिश पटेल, श्रीराम कृष्णन, संबंधित अधिकारी यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला आहे.

राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्यासाठी नॅशनल स्टॉक एक्सचेंज, आणि मनि बी प्रा. लि. यांच्यामार्फत राज्यात आर्थिक साक्षरता विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानातून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार असून हा आर्थिक साक्षरता कार्यक्रम संपूर्णपणे मोफत असणार आहे.

यामध्ये शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी, आर्थिक गुंतवणुकीची कशी खबरदारी घ्यावी आणि सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण कसे मिळवावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

डिजीटल सिस्टीम सुरक्षितता आणि सायबर हल्ले रोखण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि ज्ञान विद्यार्थ्यांना शिक्षीत आणि प्रशिक्षीत करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.

‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या आळंदी ते पंढरपूर पायीवारीचा शुभारंभ

पर्यावरण वारीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती होईल- प्रवीण दराडे

पुणे, दि. १३: आषाढी पालखी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ हा एक उत्कृष्ट उपक्रम असून याच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण व संवर्धनाविषयी चांगली जनजागृती होईल, असे प्रतिपादन पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी केले.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आणि महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या आळंदी ते पंढरपूर पायीवारीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, संचालक आदित्य शिरोडकर, नितीन गोरे, माजी न्यायमूर्ती ह.भ.प. डॉ. मदन महाराज गोसावी, एमआयटी पुणेच्या कार्यकारी संचालक स्वाती चाटे- कराड, ज्येष्ठ लोककला अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे, म. प्र. नि. मंडळ पुणेचे प्रादेशिक अधिकारी शंकर वाघमारे आदी उपस्थित होते.

श्री. दराडे म्हणाले, बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे काही ठिकाणी दुष्काळ, काही ठिकाणी पूर अशा आपत्तीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे समाजात पर्यावरणाविषयी जागरुकता आणणे गरजेचे आहे. राज्यातून पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांमध्ये बहुतांश वारकरी शेतकरी असतात. वारीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश आपण त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्नआहे. पर्यावरणाचे महत्व त्यांच्यापर्यंत पोहोचून पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ उभी राहील आणि पर्यावरण संरक्षणाच्या विचाराला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रत्येकाने पर्यावरण पूरक जीवनशैली राबविणे आवश्यक आहे. सण, उत्सव पर्यावरण पूरक साजरे करावेत. मुंबई महापालिकेने यावर्षी गणेश उत्सव पर्यावरण पूरक साजरा करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील इतर महानगरपालिका, नगरपालिका यांनीही अशा प्रकारचे उपक्रम हाती घेवून पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्याचा प्रयत्न करावा. एकल वापराच्या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करून खरेदीला जाताना नेहमी कापडी पिशवी सोबत ठेवण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही श्री.दराडे यांनी केले.

कार्यक्रमात ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे, चंदाबाई तिवाडी आणि शाहीर देवानंद माळी यांनी कीर्तन, लोककला पथक आणि पोवाडा यांच्या माध्यमातून समृद्ध पर्यावरण व व्यसनमुक्तीवर आधारीत सादरीकरण केले.

प्रास्ताविकात डॉ. खांडगे यांनी ‘पर्यावरणाची वाटी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी ह.भ.प. डॉ. गोसावी आणि श्री. गोरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी उपक्रमाची संकल्पना

पर्यावरणाचे प्रश्न हे व्यापक असल्याने वारीत सहभागी होणाऱ्या दहा लाख वारकरी मंडळीमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती साठी गेल्या नऊ वर्षापासून ‘पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी’ हा अभिनव उपक्रम सुरु आहे. याद्वारे पर्यावरण संरक्षण व संवर्धनात लोकजागृतीचे पुढचे पाऊल टाकले जात आहे. वारीत सहभागी होणाऱ्या ग्रामीण जनतेला लोककला प्रकार हा अत्यंत जवळचा असल्याने या माध्यमातून लोकजागृतीचे नवीन साधन समोर आले आहे व ते यशस्वी होत आहे. या पायी वारीत मुक्कामाच्या ठिकाणी लोककला प्रकारांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

पालखी सोहळ्यात किर्तन, प्रवचन, भारुड, पोवाडा व गणगवळण व बतावणी अशा लोककला प्रकारांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे. या उपक्रमात राज्य शासनाने घेतलेल्या एकल वापराचे प्लास्टिक बंदी बाबत व्यापक जनजागृती, प्लास्टिकचा वापर टाळा आणि कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करा, विजेची बचत, पाण्याचा अतिरिक्त वापर टाळून पाण्याचे नियोजन, वृक्षतोड टाळा आदी संदेश देण्यात येणार आहे.

शेतीमध्ये सेंद्रिय खताचा वापर, कुटुंबातील प्रत्येक सदस्याने वर्षभरात किमान एक झाड लावावे व त्याचे संगोपन करावे, शेतीसाठी पाण्याचा अतिरिक्त उपसा न करता मर्यादित कालावधीत शेतीपंप चालवावा, ओला कचरा-सुका कचरा वेगळा करुन त्यातून सेंद्रिय खताची निर्मिती करावी अशा विविध संदेशांची पखरण लोककलांच्या माध्यमातून केली जाते. ही संपूर्ण वारी ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे, दिंडी क्र. ८६ सोबत संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मार्गक्रमण करणार आहे.

शिंदेसेनेचा वृत्तपत्रांतून जाहिरातींचा मारा,ना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो,ना फडणवीसांचा:मोदींनंतर एकनाथरावच

राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांत ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, अशी जाहीरात देत शिंदेसेनेने आज चांगलीच खळबळ उडवून दिली. झी टीव्ही व मॅटराईझ या संस्थेने केलेल्या सर्व्हेवर ही जाहीरात देण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे, असा दावा करण्यात आला आहे.यावर खासदार संजय राऊत यांनी म्हटले कि जर शिवसेना नाव वापरता , धनुष्यबाण वापरता , बाळासाहेब ठाकरेंचे देखील नाव वापरता तर मग बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही ? तो नसल्याने आम्हीच शिवसेना हा त्यांचा फुगा फुटला आहे तर छगन भुजबळ यांनी असे म्हटले आहे कि, देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नाही ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी झेप आहे.

या सर्व्हेक्षणातील सर्वात ठळक बाब म्हणजे महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाचे सर्वेक्षण. त्यानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. यासंदर्भात शिंदेसेनेने दिलेल्या जाहीरात केवळ शिंदे व मोदी यांचाच फोटो आहे. वर ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, असा दावाही केला आहे. जाहीरातीत म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे.

जाहीरातीतून देवेंद्र फडणवीसांना वगळणे, ही एकनाथ शिंदे यांची मोठी झेप आहे, असा टोला यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी लगावला आहे. या सर्व्हे व जाहीरातीमधून एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांनाच आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावरून विरोधकही भाजप व देवेंद्र फडणवीसांना टोला लगावत आहे. पाहुयात या सर्व्हेत आणखी काय म्हटले आहे.

गेल्या काही काळामध्ये आलेल्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढल्यास त्याचा फायदा होऊ शकतो, असे समोर आले होते. परंतु ‘झी न्यूज’ने केलेल्या सर्वेक्षणामध्ये मतदारांचा कौल शिंदे फडणवीस सरकारच्या दिशेने दिसत आहे. या सर्वेनुसार जर आज निवडणुका झाल्या, तर युतीला 46 टक्के मते मिळू शकतील. महाविकास आघाडीला 35 टक्के मतदान होऊ शकते. मनसेला 3 टक्के मते मिळू शकतात. त्याचबरोबर 2019 मध्ये काँग्रेससोबत जाण्याचा उद्धव ठाकरे यांचा निर्णय योग्य होता की, अयोग्य? या प्रश्नावर 57 टक्के मतदारांनी हा निर्णय अयोग्य असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री म्हणून कुणाची कामगिरी चांगली होती? या प्रश्नावर केवळ 27 टक्के लोकांनी उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली होती, असे म्हटले आहे. तर 45 टक्के मतदारांनी ठाकरेंची कामगिरी अत्यंत वाईट होती, असे म्हंटले आहे. मुख्यमंत्री म्हणून शिंदेंची कामगिरी चांगली असल्याचे 51 टक्के लोकांनी म्हंटले आहे.

लाच घेताना पोलीस हवालदार राजेंद्र दीक्षितला पोलीस ठाण्यातच पडल्या बेड्या

पुणे: येरवडा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदाराला लाच घेताना पकडण्यात आले.पोलीस हवालदार राजेंद्र दीक्षित असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. तर संबंधित हवालदाराला सहाय्य करणाऱ्या आणखी दोन हवालदारांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. जयराम सावलकर आणि विनायक मुधोळकर या दोन पोलीस हवालदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका मोटारीला झालेल्या अपघाताची दखल घेण्यासाठी त्यांनी १३ हजार रुपयांची लाच मागितली होती.

तक्रारदार व्यक्तीचा खाजगी ट्रॅव्हल्स व्यवसाय आहे. त्यांच्या एका गाडीला अपघात झाला होता. याची तक्रार देण्यासाठी ते येरवडा पोलीस ठाण्यात गेले होते. तीनही हवालदारांनी त्यांच्याकडे २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती हा सर्व व्यवहार १३ हजार रुपयात ठरला होता.

दरम्यान, तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला. रात्री उशिरापर्यंत लाचलुचपत विभागाचे अधिकारी येरवडा पोलीस ठाण्याच्या परिसरात नजर ठेवून होते. त्यानंतर मध्यरात्री तक्रारदार व्यक्तीची तक्रार दाखल करून घेतली. आणि त्यानंतर लाच स्वीकारत असताना दीक्षित याला रंगेहात पकडले.

पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक शीतल जानवे, पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस निरीक्षक भारत साळुंखे, पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, एएसआय मुकुंद आयाचीत, पोलिस शिपाई भूषण ठाकूर,चालक पो शि पांडुरंग माळी यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे.

मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवेवर केमिकलच्या टँकरला आग; चार जणांचा मृत्यू, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका केमिकल टँकरला अपघात होऊन टँकर रस्त्यामध्ये पलटी झाला व टँकरला भीषण आग लागल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आगीचे लोट उसळले आहेत. ही घटना लोणावळा ते खंडाळा दरम्यान असलेल्या कोणेगाव पुलाजवळ घडली आहे

या अपघातामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या दुर्घटनेमध्ये तीन जण ठार, तर तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. टँकरने पेट घेतल्यानंतर कोणेगाव पुलाखालील काही वाहने जळाली. त्यामध्ये चार जण ठार, तर तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या अपघातात टँकरने पेट घेतल्याने त्याला भीषण आग लागली. त्यामुळे ब्रीजखालून जाणाऱ्या गाडयावरही ऑईल सांडून गाडयांनी पेट घतला. धक्कादायक बाब म्हणजे रस्त्यावर ऑईल सांडल्याने एक दुचाकीस्वार यावरून घसरला. यामध्ये दुचाकीवरील 12 वर्षांचा मुलगा होरपळून ठार झाला. तर, त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले.दुर्घटनेनंतर पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. तर दुर्घटनेत टँकर चालकही गंभीर जखमी झाला असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातामध्ये आतापर्यंंत एकूण 4 ठार आणि 3 गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. सध्या या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबविण्यात आली. युध्दपातळीवर बचाव कार्य करत येथील वाहतूक लोणावळा शहरातून वळविण्यात आली. त्यामुळे दुतगती महार्गावर वाहतूकीची कोंडी झाली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात ट्वीट करून शोक व्यक्त केला आहे. “मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत तीन जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो”, असं फडणवीसांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

लग्न होत नसल्यामुळे शरद पवारांना धमकी-बर्वेची अजब जबानी

पुणे-केवळ लग्न जमत नसल्यामुळे सागर बर्वेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना ठार मारण्याची धमकी दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ‘तुमचा दाभोलकर करू’ अशी धमकी पवारांना देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी सागर बर्वे या तरुणाला बेड्या ठोकल्यात.पवारांना धमकी दिल्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगल्या होत्यात. धमकी देणारा तरुण भाजपचा कार्यकर्ता असल्याचा आरोपही झाला होता.मात्र सागर बर्वे हा कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडित नसल्याचे समजते.’राजकारण महाराष्ट्राचे’ या फेसबुक पेजवरून आणि नर्मदाबाई पटवर्धन या नावाच्या फेक अकाऊंटवरून ही धमकी देण्यात आली होती.सागर बर्वे हा तरुण अविवाहित असल्याचे समजते. काही केल्या त्याचे लग्न जमत नव्हते. त्यात महाराष्ट्रात अचानक औरंगजेबाच्या फोटोवरून वाद निर्माण झाला. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगत गेल्या. या साऱ्याचा राग येऊन त्याने ही धमकीची पोस्ट लिहिली. याशिवाय यामागे आपला कोणताही हेतू नसल्याची माहिती सागरने पोलिसांना दिल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरवरून ‘तुमचा देखील दाभोलकर करू’ अशी धमकी मिळाली होती. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांची भेट घेत तक्रार दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपास करून कारवाईच्या सूचना पोलिसांना दिल्या. तर ‘मी धमकीची मी चिंता करीत नाही. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायची जबाबदारी सरकारची आहे. ज्यांच्या हातात सूत्र त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही. त्यांनी यासंबंधी जबाबदारी घ्यावी,’ असे म्हणत सुरक्षेचा चेंडू शरद पवारांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टाकला होता.

शरद पवारांना अमरावती येथील भाजपच्या सौरभ पिंपळकर या कार्यकर्त्याने धमकी दिल्याचे आरोप झाले होते. मात्र, त्याने पवारांबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. शिवाय, मी भाजपचा कार्यकर्ता आहे. मी धर्मनिरपक्षतेचा तिरस्कार करतो, असा उल्लेखही त्याच्या ट्विटर अकाऊंटवर असल्याचे समोर आले आहे.

शरद पवारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या सौरभ पिंपळकरचे भाजप नेत्यांसोबतचे फोटो समोर आलेत. त्यात एका फोटोत तो केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत तर दुसऱ्या फोटोमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत तो दिसतो आहे. त्यावरूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती.

पर्जन्य यज्ञातून वारकऱ्यांचे ‘वरुणराजा’ला साकडे; पाद्यपूजन सोहळ्याने भारावले!

पुणे-  सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची आस, मुखी अखंड हरिनाम, हाती टाळ अन्‌ मृदंग घेऊन पंढरीच्या वाटेवरून निघालेल्या  हजारो  वैष्णवांनी पुणे मुक्कामी पर्जन्य यज्ञातून बा विठ्ठला … बळीराजासह नागरिकांना समृद्धी दे,शेतकऱ्यांचे  अकाली ‘मरण ‘ टळू दे… सर्वसामान्यांना आता महागाईतून ‘मुक्ती ‘ दे …जगामध्ये समाजातील सर्वधर्मसमभाव एकोपा कायम राहू दे!  अशी प्रार्थना करून वरुणराजाला साकडे घातले. यावेळी बागुल परिवार व मित्रमंडळीने केलेल्या पाद्यपूजनाच्या सोहळ्याने वारकरी भारावले. 


  दरवर्षी माजी उपमहापौर, पुणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी गटनेते आबा बागुल  व मित्रपरिवार आणि  पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे    वारकऱ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.  यंदाही  वारकऱ्यांचे  पाद्यपूजनाने स्वागत करण्यात आले.  चौरंग पाट , सुगंधी तेल,गुलाब पुष्प,स्वस्तिक, फुलांची रांगोळी  हे शाही स्वागत अनुभवताना वारकरीही भारावले होते. प्रारंभी वारकऱ्यांच्या हस्ते पर्जन्य यज्ञ संपन्न झाला. यावेळी वारकऱ्यांनी  दुष्काळ कायमस्वरूपी हटू दे, बळीराजा सुखी होऊ दे… सर्वसामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे,असे साकडे वरुणराजाला घातले. माजी उपमहापौर  व पुणे नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल यांच्या वतीने शिवदर्शन येथील श्री लक्ष्मी माता मंदिरात वारकऱ्यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्वधर्मियांकडून वारकरी बांधवांच्या पायाला तेलाने मालिश करण्यात आली.  सिनसन फार्मास्युटिकल केझर  व आबा बागुल मित्रपरिवार  यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आले होते.यावेळी डॉ. कल्पेश पाटील यांच्यासह मोहन आगलावे, ओमप्रसाद बिरादार , लखन पाटील यांनी वारकऱ्यांची ब्लडप्रेशर, शुगर तपासणी करून औषधोपचार केले तसेच वारकऱ्यांसाठी दाढी करणे,चप्पल बुटांची दुरुस्तीही करण्यात आली. वारकरी बांधवांना भजनासाठी उत्तम व्यवस्था  श्री लक्ष्मी माता मंदिरात करण्यात आली असल्याचेही  आबा बागुल यांनी सांगितले. 
यावेळी आबा बागुल म्हणाले की जनसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद घेऊन आम्ही गेली ३० वर्षे वारकऱ्यांची सेवा करत आहोत.  पंढरीच्या वाटेवर जाणाऱ्या  वैष्णवांचे  पाद्यपूजन करून त्यांचे स्वागत करण्यात आले.  कोरोनासारखे  संकट पुन्हा जगावर येऊ नये,सामान्यांचे जगणे सुसह्य व्हावे, समाजात एकोपा कायम राहावा, बळीराजा सुखी होऊ दे   यासाठी विठ्ठलाला साकडे घातले आहे असे आबा बागुल   म्हणाले. 

यावेळी पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा सौ. जयश्री बागुल, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे  पदाधिकारी  नंदकुमार बानगुडे, घनशाम सावंत, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, अमित बागुल,सागर बागुल,हेमंत बागुल  तसेच महेश ढवळे  सागर आरोळे,अभिषेक बागुल, इम्तियाज तांबोळी, समीर शिंदे, संतोष पवार, बाबासाहेब पोळके,सुरज सोनावणे व कार्यकर्ते उपस्थित होते.

मार्केटयार्ड जवळील हॉटेलला आग: २ कामगारांचा मृत्यू

पुणे : पुण्यातील मार्केटयार्ड येथील हॉटेल रेवळ सिद्धी येथे आग लागल्याची घटना घडली. या आगीत २ कामगारांचा होरपळून जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.अग्निशामक विभागाचे नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड येथील गेट नंबर एक जवळ असलेल्या हॉटेल रेवळ सिद्धी येथे मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत हॉटेलच्या आतील बाजूस असलेल्या पोटमाळ्यावर तीन कामगार झोपले होते. त्यातील दोघांचा या आगीत जागीच मृत्यू झाला. तर एकावर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. त्याचबरोबर या घटनेमधील मृतांची नावे समजू शकली नसल्याचे त्यांनी सांगितले.