राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांत ‘राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, अशी जाहीरात देत शिंदेसेनेने आज चांगलीच खळबळ उडवून दिली. झी टीव्ही व मॅटराईझ या संस्थेने केलेल्या सर्व्हेवर ही जाहीरात देण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील 46.4 टक्के जनता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इच्छुक आहे, असा दावा करण्यात आला आहे.यावर खासदार संजय राऊत यांनी म्हटले कि जर शिवसेना नाव वापरता , धनुष्यबाण वापरता , बाळासाहेब ठाकरेंचे देखील नाव वापरता तर मग बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही ? तो नसल्याने आम्हीच शिवसेना हा त्यांचा फुगा फुटला आहे तर छगन भुजबळ यांनी असे म्हटले आहे कि, देवेंद्र फडणवीस यांचा फोटो नाही ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी झेप आहे.
या सर्व्हेक्षणातील सर्वात ठळक बाब म्हणजे महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाचे सर्वेक्षण. त्यानुसार एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील 26.1 टक्के जनतेला पुन्हा मुख्यमंत्रीपदी आणि देवेंद्र फडणवीस यांना 23.2 टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदावर पाहायचे आहे. यासंदर्भात शिंदेसेनेने दिलेल्या जाहीरात केवळ शिंदे व मोदी यांचाच फोटो आहे. वर ‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, असा दावाही केला आहे. जाहीरातीत म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोडीने महाराष्ट्रात केलेल्या लोककल्याणकारी प्रकल्पांमुळे नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात त्यांना अव्वल स्थान मिळाले आहे.
जाहीरातीतून देवेंद्र फडणवीसांना वगळणे, ही एकनाथ शिंदे यांची मोठी झेप आहे, असा टोला यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी लगावला आहे. या सर्व्हे व जाहीरातीमधून एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांनाच आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावरून विरोधकही भाजप व देवेंद्र फडणवीसांना टोला लगावत आहे. पाहुयात या सर्व्हेत आणखी काय म्हटले आहे.
गेल्या काही काळामध्ये आलेल्या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढल्यास त्याचा फायदा होऊ शकतो, असे समोर आले होते. परंतु ‘झी न्यूज’ने केलेल्या सर्वेक्षणामध्ये मतदारांचा कौल शिंदे फडणवीस सरकारच्या दिशेने दिसत आहे. या सर्वेनुसार जर आज निवडणुका झाल्या, तर युतीला 46 टक्के मते मिळू शकतील. महाविकास आघाडीला 35 टक्के मतदान होऊ शकते. मनसेला 3 टक्के मते मिळू शकतात. त्याचबरोबर 2019 मध्ये काँग्रेससोबत जाण्याचा उद्धव ठाकरे यांचा निर्णय योग्य होता की, अयोग्य? या प्रश्नावर 57 टक्के मतदारांनी हा निर्णय अयोग्य असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री म्हणून कुणाची कामगिरी चांगली होती? या प्रश्नावर केवळ 27 टक्के लोकांनी उद्धव ठाकरेंची कामगिरी चांगली होती, असे म्हटले आहे. तर 45 टक्के मतदारांनी ठाकरेंची कामगिरी अत्यंत वाईट होती, असे म्हंटले आहे. मुख्यमंत्री म्हणून शिंदेंची कामगिरी चांगली असल्याचे 51 टक्के लोकांनी म्हंटले आहे.