Home Blog Page 1145

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात द्राक्षांची आरास

 कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात होळीपौर्णिमेनिमित्त आयोजन 
पुणे : बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात होळीपौर्णिमेनिमित्त सुमधूर व रसाळ द्राक्षांची मनमोहक आरास करण्यात आली होती. पंढरपूर येथील दत्तभक्त व द्राक्ष बागायतदार  प्रकाश कुलकर्णी यांनी सुमारे १५१ किलो द्राक्षे श्री दत्त महाराजांचरणी अर्पण केली.
दत्त मंदिरासमोरील प्रांगणात विश्वस्तांचे हस्ते होलिकापूजन झाले. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, कार्यकारी विश्वस्त डॉ. पराग काळकर, उत्सव उप प्रमुख सुनिल रुकारी, विश्वस्त राजू बलकवडे उपस्थित होते. होलिकापूजनानंतर दत्त महाराजांची सायं आरती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष  ॲड. संतोष खामकर व त्यांच्या पत्नी स्मिता खामकर, विराज खामकर तसेच विश्वस्त ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांचे हस्ते संपन्न झाली. पौर्णिमेनिमित्त श्री दत्तयाग ॲड. शरद तुकाराम बांदल यांच्या तर्फे संपन्न झाला.

बँकिंग ऑडिटमध्ये सनदी लेखापालांचे योगदान महत्वपूर्ण-आशिष पांडे

-आयसीएआय’च्या वतीने ‘बँक ब्रँच ऑडिट’वर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद
पुणे : “मार्च-एप्रिल महिन्यात लेखापरीक्षणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरु असते. बँकांचे लेखापरीक्षण गुणवत्तापूर्ण व पारदर्शक होण्यात सनदी लेखापालांची भूमिका महत्वपूर्ण असते. बँकिंग क्षेत्रात नवीन लोकांचा, तंत्रज्ञानाचा अंतर्भाव आणि नियमात होणारे बदल लक्षात घेता अशा स्वरूपाच्या परिषदांचे आयोजन उपयुक्त ठरते,” असे बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक आशिष पांडे यांनी व्यक्त केले.

दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) ऑडिटिंग अँड अश्युरंस स्टँडर्ड बोर्ड आणि आयसीएआय पुणे शाखेच्या वतीने ‘बँक ब्रँच ऑडिट’वर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनावेळी आशिष पांडे बोलत होते. प्रसंगी ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, आयसीएआय पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी, उपाध्यक्ष सीए सचिन मिणियार, सचिव सीए ऋषिकेश बडवे, खजिनदार सीए मोशमी शहा, कार्यकारिणी सदस्य सीए अजिंक्य रणदिवे आणि सीए राजेश अग्रवाल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

आशिष पांडे म्हणाले, “लेखापरीक्षणात दृश्य व अदृश्य गोष्टींचा समावेश असतो. लेखापरीक्षण लवकर व अचूक होण्यासाठी बॅंक कर्मचारी आणि लेखापालन कर्मचारी यांच्यात समन्वय असावा. नवीन तंत्रज्ञान, क्लोझिंग सॉफ्टवेर आदी गोष्टी प्रशिक्षणावेळी सांगितल्या जातात. ब्रँच मॅनेजर नवीन किंवा दुसऱ्या बँकेतून आलेले असतील, तर त्यांनीही आधीच्या गोष्टी समजून घ्याव्यात, प्रशिक्षण घ्यावे. सनदी लेखापालांची आजची पिढी हुशार व तंत्रज्ञानाभिमुख आहे.”

सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “मार्चमध्ये संपूर्ण देशातील बँकांचे लेखापरीक्षण होत असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नवीन नियम, परिपत्रक काढत असते. या बदललेल्या नियम व तांत्रिक गोष्टींविषयी लेखापालांना माहिती व्हावी, यासाठी देशभर ‘आयसीएआय’कडून असे परिसंवाद घेतले जातात.”

सीए अमृता कुलकर्णी म्हणाल्या, “सनदी लेखापालाकडून बँकांना असलेल्या अपेक्षांची पूर्तता, नवतंत्रज्ञान वापरून वेळेत लेखापालन करण्याच्या दृष्टीने ही परिषद उपयुक्त ठरेल. नवीन नियम, लेखापालन करताना येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना यावर सनदी लेखापालांना मार्गदर्शन मिळेल.”

सूत्रसंचालन सीए मोशमी शहा यांनी केले. सीए ऋषिकेश बडवे यांनी आभार मानले.

संगीत साधना गुरूकुल आश्रमाच्या ‘अनुभूती संगीत सभेत’ श्रोते झाले मंत्रमुग्ध

पुणे, दि. २४ मार्च : तबल्याच्या विश्वात उदयास आलेले प्रसिद्ध ओजस अढीया, फारूकाबाद घराण्याचे वादक अनुव्रत चॅटर्जी आणि युवा कलाकार यशवंत वैष्णव यांनी कर्नाटक शाळेच्या शकुंतला शेट्टी सभागृहात नेत्रदीपक सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. त्यांचे सादरीकरण इतके मनमोहक होते की प्रेक्षक त्यात हरवून गेले.
प्रसिद्ध तबलावादक अनुप जोशी व प्रज्ञा देव यांनी स्थापन केलेल्या संगीत साधना गुरूकल आश्रम संस्थेतर्फे आयोजित दोन दिवसीय अनुभूती संगीत सभेत एकल तबला वादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध तबलावादकांनी प्रस्तुतीकरण करून हा दोन दिवसीय कार्यक्रम संस्मरणीय बनविला. यामध्ये अनेक लोकप्रिय आणि अप्रचलित बंदिशींचे सादरीकरण झाले. त्यांच्या सादरीकरणाची जादूच अशी होती की श्रोतांच्या बोटांना थिरकण्यापासून कोणीच थांबवू शकले नाही. मिलिंद कुलकर्णी यांनी हार्मोनियमवर उत्तम साथ संगत केली.
तबलावादकांनी तबल्याला स्पर्श करताच श्रोते मंत्रमुग्ध होऊन आत्म अनुभूती घेत होते. या सर्व तबलावादकांचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी तबला वाजवतांना श्रोत्यांशी आत्मिक नाते निर्माण केले. या कलाकारांसाठी सर्वात मोठे बक्षीस म्हणजे प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट.
प्रसिद्ध तबलावादक ओजस अढीया यांच्याकडे तबल्याची भाषा जिवंत करण्याची क्षमता आहे. अव्वल तबलावादक असण्याबरोबच त्यांनी त्यांच्या घराणाच्या वादनाच्या शैलीनुसार इतर घराण्यातील बंदिशीही सादर केल्या. उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
पहिल्या सत्राच्या कार्यक्रमाची सुरूवात अनुप जोशी यांचे शिष्य अनुराग अलूरकर यांच्या एकल तबला वादनाने झाली. कल्पतरू ठाकरे ंयानी त्यांना हार्मोनिअमवर साथ संगत केली. तबला वादनाची सुरूवात पेशकारने झाली व त्यानंतर कायदा, रेला आणि बंदिशीने कार्यक्रमाच शेवट झाला.
कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात म्हणजे रविवारच्या सकाळी फारूखाबाद घराण्याचे वादक अनुव्रत चॅटर्जी आणि युवा कलाकार यशवंत वैष्णव यांनी तबल्यावर अनुभवी हातानी थाप मारली तेव्हा प्रेक्षक भावनेने भरून गेले. अगदी अवघड गोष्टी सुद्धा त्यांनी अगदी सहज वाजविल्या. त्यांच्या तबला वादनाने श्रोत्यांवर जादू केली. त्यांच्या वादनात तबल्याचे बारकावे होते.
यावेळी ज्येष्ठ तबलावादक पं. ओंकार गुळवाडी, पं. रामदास पळसुले, पुरातत्वविद्या शास्त्रज्ञ गो. बं. देगलुरकर, गोविंद बेडेकर, सुरेंद्र मोहिते, मनीष गुप्ता आणि टेनएक्सचे हरीश भाबड आणि नेक्सजेन एज्युकेशनचे संभाजी चवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच संगीत साधना गुरूकुल आश्रमाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनुप जोशी, प्रज्ञा देव, अमित दरेकर, अमोल भट हे उपस्थित होते. त्याच प्रमाणे पुण्यातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन मंगेश वाघमारे यांनी केले.

महादेव जानकर महायुतीतच राहणार,रासपला १ जागा

मुंबई-

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हे महायुतीतच राहणार आहेत. महायुतीच्या वतीने रासपला एक जागा दिली जाणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महादेव जानकर यांची देखील उपस्थिती होती. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महादेव जानकर यांनी महायुतीतच राहणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर या निर्णयाची घोषणा तटकरे यांनी केली.

गेल्या काही दिवसांपासून महादेव जानकर हे महायुती विशेष करून भाजपवर सातत्याने टीका करत होते. परंतु आज अचानक त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली.

पवारांची झुंडशाही, घराणेशाही संपविण्यासाठी 12 एप्रिलला भरणार बारामती लोकसभेचा अर्ज

बारामती-शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी 12 तारखेला 12 वाजता उमेदवारी अर्ज भरत विरोधकांचे 12 वाजवणार असा निर्धार केला आहे. आज बारामती लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक त्यांनी आयोजित केली होती. या बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत आपली अखेरची भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच बारामतीत पवार रुपी हुकुमशाही संपवण्यासाठी माझे धर्मयुद्ध आहे असा हल्लाही त्यांनी केला.

यावेळी बोलतांना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. मी जिंकण्यासाठी लढत असून माझी लढाई पवारांविरोधात असल्याचे विजय शिवतारे म्हणाले. पुढे ते म्हणाले, ”अजित पवारांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या तेव्हा तुम्ही गप्प राहिला. शरद पवार यांना देखील माहित आहे शिवाजी विजय शिवतारे कोण आहे. या रावणाचा वध करण्यासाठी बापू ठाम असल्याची घणाघाती टीका शिवतारे यांनी केली.तसेच यावेळी ते म्हणाले की, ”राष्ट्रवादीकडून गैरसमज पसरवले जात आहेत. मी शरद पवार यांचा माणूस असल्याचे सांगितले जातं आहे. मात्र मला फक्त अजित पवार यांचा पराभव करायचा आहे. मी लढतोय ते जिंकण्यासाठी. त्यामुळे 1 तारखेला पालखी तळावर सभा घेणार आणि 12 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार”, अशी माहिती शिवतारे यांनी दिली.

त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. शिवतारे यांनी ग्रामीण दहशतवादी शब्दही वापरला. ते म्हणाले की ”ग्रामीण दहशतवाद शरद पवारांनी केला. माझ्या माणसांना त्रास दिला जात आहे. अजित पवारांनी खूप पाप केली आहेत. अख्ख्या राज्याला ग्रामीण दहशतवाद शब्द माहिती पडेल. ईस्ट इंडिया कंपनी आहे ती गेली आणि पवारांची कंपनी आली. अजित पवार आणि शरद पवार म्हणजे एक राक्षस आणि दुसरा ब्रह्मराक्षस अशा दोघांचा खात्मा करायचा आहे”, असा तिखट हल्ला शिवतारे यांनी केला आहे

मोदींच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नसल्यानं संविधान बदलाच्या अफवा शरद पवार पसरवतात-बावनकुळे

पुणे- मोदींच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नसल्यानं संविधान बदलाच्या अफवा शरद पवार पसरवतअसल्याचा आरोप भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विटर वर पोस्ट केली आहे त्यात काय म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात वाचा …

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या गॅरंटीपुढे निभाव लागत नाही, त्यामुळे आता भारताचे संविधान बदलणार अशा अफवा पसरवायला सुरूवात केली. ज्येष्ठ नेते शरद पवारही यात सहभागी झाले आहेत, ही अतिशय दुर्दैव बाब आहे.भारताचे संविधान बदलणे हे कुणाच्या बापालाही शक्य नाही. संविधान अत्यंत मजबूत आहे. शरद पवार ज्या काँग्रेस मध्ये एकेकाळी होते तो काँग्रेस पक्ष सत्तेत असताना घटना दुरुस्तीच्या नावाखाली संविधान कितीदा बदलविण्यात आले, याचा आकडा पवार साहेबांकडे नक्कीच असणार.उलट मोदीजी यांच्या नेतृत्वातील सरकारने मागील दहा वर्षात संविधानाचा सन्मानच केला आहे. पंतप्रधान मोदीजींनी संसद भवनाला संविधान सदन असं नाव दिलं आहे. भाजपने नेहमीच घटनात्मक मूल्य आणि राष्ट्रहितासाठी काम केलं आहे. त्यामुळे जनतेनं कुठल्याही नेत्यांच्या भुलथापांना बळी पडू नये. पवार साहेबांच्या तर अजिबातच नाही.
जय संविधान !

होळीपौर्णिमेनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात २ हजार किलो द्राक्षांची आरास

पुणे : होळीपौर्णिमेनिमित्त आयोजिलेल्या द्राक्ष महोत्सवात हजारो हिरव्या द्राक्षांनी दगडूशेठ गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजला होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरात साजरा झालेला द्राक्ष महोत्सव पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली. नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतक-यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित २ हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली होती.

यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांसह सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. ही द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार आहेत.

द्राक्षाच्या हंगामात सलग तिसऱ्या वर्षी अशा पद्धतीची आरास मंदिरात केली गेली. दगडूशेठ गणपती मंदिराच्या गाभा-यात संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.

ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, प्राचीन भारतीय आयुर्वेदात द्राक्षांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व मोठे आहे. द्राक्षांमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि क जीवनसत्त्वाचे चांगले स्त्रोत आहेत. द्राक्षे हृदयविकाराचा धोका कमी करतात. त्याच्या सेवनाने मेंदूवर वयाचा कमी परिणाम होतो. द्राक्षांमध्ये भरपूर फायबर असते, जे वजन कमी करण्यास मदत करते. हिरवी द्राक्षे खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो. द्राक्षांमध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्याची हालचाल सुलभ होते. तसेच शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. हे हिमोग्लोबिन पातळी वाढवते. हिरवी द्राक्षे हिमोग्लोबिन वाढवतात. त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्यदृष्टया उपयुक्त असल्याने अनाथाश्रम, वृद्धाश्रम व ससून रुग्णालयात द्राक्षांचे प्रसादरुपी वाटप करण्यात येणार आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात विविध उपक्रमांच्या आयोजनातून मतदान जनजागृती

बारामती, दि. २२: बारामती लोकसभा मतदारसंघात स्वीप उपक्रमाअंतर्गत लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्यावेळी अधिकाधिक मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन मतदान करावे, याकरीता मतदान व मतदार जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले. मानवी साखळी, रांगोळी स्पर्धा, मतदान प्रतिज्ञा, प्रभातफेरी, भजन आदी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

बारामती विधानसभा मतदारसंघात राधेश्याम एन अग्रवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट अँड कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने मतदान जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदारांना मतदान जनजागृतीचा संदेश दिला. विद्यार्थ्यांनी मानवी साखळी तयार करून मतदानाचा संदेश दिला. तसेच रांगोळी, घोषवाक्याच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात आली.

इंदापूर विधानसभा मतदारसंघात भवानीनगर येथील गोविंदराव पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालच्यावतीने प्रभातफेरीचे आयोजन करुन मतदारांची जनजागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी घोषवाक्याद्वारे नागरिकांना मतदान करण्याबाबत संदेश दिला. सरडेवाडी येथे वोटर हेल्पलाईन ॲपबाबत मतदारांना माहिती देण्यात आली.

भोर विधानसभा मतदारसंघात वेल्हे पंचायत समिती येथे तालुकास्तरीय मतदार जनजागृती मोहीमेचे आयोजन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या. त्यांना मतदान जनजागृती मार्गदर्शन करण्यात आले.

पानशेत येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मदतीने महिला मतदान जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली. सोंडेमाथाना आणि पानशेत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पासली येथे रांगोळी स्पर्धा व मतदान प्रतिज्ञा वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोंढूर येथे भजनाच्या कार्यक्रमातून मतदार जनजागृती करण्यात आली.

दौंड विधानसभा मतदारसंघात महिला मतदान जनजागृती मोहिमेअंतर्गत केडगाव बाजारपेठ येथे जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. यावेळी परिसरातील दुकानदार, बँकेचे अधिकारी व कर्मचारी, भाजीविक्रेते आदींना मतदान करण्याबाबत आवाहन करण्यात आले. तसेच मतदान करण्याबाबत मतदान प्रतिज्ञा घेण्यात आली. पुरंदर विधानसभा मतदारसंघातील विविध आरोग्य केंद्रांवर मतदारांना मतदान करण्याबाबत शपथ देण्यात आली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात स्वीप उपक्रमाअंतर्गत मतदान व मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून याला नागरिकांचा उर्त्स्फूत प्रतिसाद लाभत आहे.

आबा बागुल कॉंग्रेसच्या प्रचारार्थ सर्वात पुढे असतील -शरद पवारांच्या भेटीनंतर धंगेकरांचा आत्मविश्वास दुप्पट

पुणे- पुण्यात शरद पवार यांच्या सहा सभा होणार आहेत आणि आता उद्या पासून किंवा फक्त दोनच दिवसात कॉंग्रेसचे पुण्यातील निष्ठावंत , ज्येष्ठ नेते आबा बागुल कॉंग्रेसच्या प्रचारासाठी सर्वात पुढे दिसतील असा विश्वास लोकसभेसाठी कॉंग्रेसने दिलेले उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आज सकाळी शरद पवार यांची भेट होताच माध्यमांना सांगितले. मोहन जोशी, प्रशांत जगताप यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित होते.

ते म्हणाले ,बागुल ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडे मार्गदर्शनाचा खजिना आहे. त्यांची नाराजी रास्त आहे पण पक्षाच्या निर्णयाचा ते सन्मान करतीलच. त्यांचा स्वभाव सर्वांना ठाऊक आहे ते रंगीत आहेत तेवढेच प्रेमळ आहेत , आमचे नेते ,आणि मी त्यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत निश्चित काढू आणि पक्षाचा ते सन्मान करतील याचा आम्हाला विश्वास आहे.

रवींद्र धंगेकर म्हणाले, या भेटीदरम्यान पवारसाहेबांनी मला विजयासाठी शुभेच्छा दिल्या. नेहमीप्रमाणेच आजचीही भेट अतिशय उर्जादायी होती. पुढील काळात पुणेकरांचा आवाज म्हणून लोकसभेत जाण्यासाठी फार मोठी प्रेरणा या भेटीमुळे मिळाली. लोकशाहीचा आवाज बुलंद करण्यासाठी, दडपशाही रोखण्यासाठी महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीला जनता भरभरून आशीर्वाद देईल, असा आम्हा सर्वांना विश्वास आहे.

मोहोळांनी बिल्डरांना, गोखले,व्यासांना दुध पाजले,पैलवानांना नाही…गरीब पैलवानांसह वस्ताद आमच्याकडे -धंगेकर यांचा मोहोळांना दुसरा टोला

पुणे- गिरीश बापटांचा निवडणुकीसाठी आधार घेणार्यांनी त्यांना हयातीत किती त्रास दिला हे सर्वांना ठाऊक आहे या टोल्यानंतर आता रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार मोहोलाना दुसरा टोला लगावला आहे. पैलवानांची फौज घरोघरी जाऊन मोहोलांचा प्रचार करण्याची घोषणा काल झाली यावर धंगेकर म्हणाले ,’ मुरलीधर मोहोळ यांनी कुठल्या पैलवानला दूध पाजले? बिल्डर लोकांना दूध पाजले, हे क्षेत्र हे ‘जय बजरंगबली’चे क्षेत्र आहे. पैलवान हा सर्वसामान्य कुटुंबातील असतो. पैलवान हा सगळ्यांचाच असतो. मुरलीधर मोहोळ यांनी गोखले, व्यास यांना दूध पाजले, त्यांनी आमच्या गरीब पैलवानांना अर्धा लीटर दूध पाजले नाही. जर त्यांच्याकडे पैलवान असतील तर आमच्याकडे वस्ताद आहेत, असा टोला रवींद्र धंगेकर यांनी लगावला.

आज सकाळी काँग्रेसचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी शरद पवारांची भेट घेतली.यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना या भेटीबाबत माहिती दिली. तसेच भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर जोरदार टीका केली.

पुण्यात शरद पवार यांच्या सहा सभा होणार असल्याची माहिती देताना रवींद्र धंगेकर यांनी मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला. बापट साहेबांना मुरलीधर मोहोळ यांनी किती त्रास दिला, त्यांना किती छळले, हे सगळ्यांना माहिती आहे, असे सांगत, होळी आहे, वाईट प्रवृत्ती यांचा नाश होवो. शरद पवार यांची भेट घेऊन सल्ला, मार्गदर्शन घेतले. शेती ते आयटीपर्यंत शरद पवार यांचे काम आहे. निवडणुकीचे नियोजन, पक्षाच्या सभा या सगळ्यासंदर्भात चर्चा केली, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

लष्कर आणि ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’च्या मदतीने मास्टर बुरहानवर यशस्वी शस्त्रक्रिया

  • डॅगर परिवाराकडून मास्टर बुरहानचे उत्साहात स्वागत

पुणे : बारामुल्ला येथील मास्टर बुरहान हा नऊ वर्षाचा चिमुकला विद्यार्थी हृद्यविकाराच्या यशस्वी शस्त्रकियेनंतर डॅगर परिवार शाळेत परतला आहे. जीवघेण्या आजारातून बुरहान पुन्हा शाळेत परतल्याने संपूर्ण डॅगर परिवारासह भारतीय लष्कराच्या डॅगर विभागाने आणि इंद्राणी बालन फाउंडेशनच्यावतीने त्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

बुरहानला हृदयविकार हा गंभीर आजार असल्याचे निदान झाले होते. मात्र, आर्थिक परिस्थितीमुळे वैद्यकिय उपचार घेणे शक्य नव्हते. त्यामुळे भारतीय लष्कराच्या डॅगर विभाग आणि ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ यांच्या मदतीने दिल्लीतील आर्मी हॉस्पिटल रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये बुरहानवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. गत महिन्यात ही शस्त्रकिया पार पडली. तेंव्हापासून त्याचे शिक्षक आणि सहकारी विद्यार्थी त्याच्या परत येण्याची आतुरतेने वाट पाहत होते. त्यानुसार बुरहान नुकताच डॅगर परिवारात परतला. यावेळी सर्व परिवाराने त्याचे मोठ्या उत्साहात आणि आनंदात स्वागत केले. बुरहानवरील यशस्वी शस्त्रक्रियेने भारतीय लष्कराच्या मानवतावादी दृष्टीकोनाचे दर्शन घडले. त्यामुळे लष्करासह ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने आनंद व्यक्त केला आहे.

‘‘बुरहानला नवीन जीवन देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे डॉक्टर आणि त्याच्यासाठी शुभेच्छा देणाऱ्या त्याच्या मित्रांसह सर्वांचेच आम्ही मनापासून आभार मानतो. डॉक्टरांकडील दवा आणि आपल्या सर्वांचा दुवा यामुळं बुरहान ठणठणीत बरा झाला, याचा अत्यंत आनंद वाटतो. त्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!’’

पुनीत बालन
(अध्यक्ष, इंद्राणी बालन फाऊंडेशन)

२ पैलवानांंना.. दाजीने दिली मेव्हण्याच्या खुनाची सुपारी

पुणे-सख्या मेव्हण्याला जीवे ठार मारण्यासाठी त्याच्या दाजीनेच मध्यप्रदेश येधील कुस्ती पैलवानास सुपारी दिल्याच्या प्रकरणात महेश महादेव ठोंबरे (पैलवान), फैजल खान (पैलवान) आणि तथाकथित दाजी अश्विनीकुमार शेषराव पाटील वय ५२ वर्ष रा. कमलनिवास, संतोष बेकरीजवळ, आपटेरोड, शिवाजीनगर, पुणे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि,’दिनांक ०४/०२/२०२४ रोजी रात्रौ २२/३५ वा. सुमा फिर्यादी वय ३१ वर्ष रा. आपटे रोड पुणे हे आपले हॉटेल बंद करुन राहते घरी आले असताना दोन इसमांनी पत्ता विचारण्याचा बहाण्याने त्यांचे जवळ येऊन काही कारण नसताना त्यांचे तोंडावर लाल तिखट टाकुन कोणत्या तरी हत्याराने वार करुन गंभीर जखमीकरुन त्यांचा खुनाचा प्रयत्न केला बाबत डेक्कन पोलीस स्टेशन गुरनं २०/२०२४ भादंवि कलम ३०७,३२४,३४ अन्वये गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना युनिट १ कडील पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे, महेश बामगुडे, शशीकांत दरेकर, अभिनव लडकत, निलेश साबळे यांनी गुन्हयाचे घटनास्थळापासुन बालगंधर्व
चौक, वृधेश्वर घाट, पुणे मनपा, गाडीतळ चौक, मालधक्का चौक ठिकाणचे सविस्तर सीसीटीव्ही फुटेज पाहुनसंशयीत आरोपी माहिती घेवुन मार्ग काढुन संशयीत आरोपी हे पुणे स्टेशन येथे गेले बाबत निष्पन्न केले.
या सीसीटीव्ही फुटेज व्दारे तांत्रिक विश्लेषण करुन गुन्हयाचा तपास करुन निष्पन्न झालेला आरोपी नामे महेश महादेव ठोंबरे वय २८ वर्ष रा. जुना बस स्टॉप संगमवाडी पुणे सध्या आगरवाल तालीम, कसबा पेठ पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्हयाच्या गुन्ह अनुशंगाने व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करता त्याने सदर गुन्हा फिर्यादीचे दाजी यांचे सांगणेवरुन ५० हजार रुपायांची सुपारी देवुन इसम नामे पैलवान फैजल खान व त्याचे दोन मित्र रा. मध्यप्रदेश यांचेसह केला असल्याची कबुली दिली.
इ महेश ठोंबरे याच्या सांगणेवरुन फिर्यादीचे दाजी इसम नामे अश्विनीकुमार शेषराव पाटील वय ५२ वर्ष रा. कमलनिवास, संतोष बेकरीजवळ, आपटेरोड, शिवाजीनगर, पुणे. यास ताब्यात घेवुन त्यास युनिट १ कार्यालयात आणुन त्याचेकडे तांत्रिक विश्लेषण व केलेला तपास आधारे तपास केला असता त्यानेही सदर गुन्हयांची कबुली दिली आहे.
एकूणच महेश महादेव ठोंबरे (पैलवान), फैजल खान (पैलवान) यांनी अश्विनीकुमार पाटील यांचे सांगण्यावरुन सदर गुन्हयामध्ये पुर्व नियोजीत कट रचुन गुन्हा केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आरोपींना पुढील कार्यवाही कामी डेक्कन पोलीस ठाणे पुणे यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे,सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे-१, सुनिल तांबे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनिट १, शब्बीर सय्यद सहा. पोलीस निरीक्षक अशिष कवठेकर, पोलीस अंमलदार दत्ता सोनावणे, महेश बामगुडे, शुभम देसाई, निलेश साबळे, राहुल मखरे, शशीकांत दरेकर, आय्याज दड्डीकर, अभिनव
लडकत यांनी केली आहे.

निवडणूकीतील गैरप्रकारांवर १३५ भरारी पथके आणि १२९ स्थिर सर्वेक्षण पथकांचे लक्ष

पुणे, दि. २३: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ दरम्यान उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावर आणि निवडणुकीतील गैरप्रकारांवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात १३५ भरारी पथके आणि १२९ स्थिर सर्वेक्षण पथकांची स्थापन करण्यात आली आहेत, अशी माहिती तक्रार निवारण कक्षाद्वारे देण्यात आली आहे.

खर्च संनियंत्रणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अधिनस्त जिल्हास्तरावर समन्वय अधिकारी नेमण्यात आले असून प्रत्येक मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर खर्च पथक नेमण्यात आले आहे. या पथकाचे काम अन्य विविध पथकांच्या समन्वयाने चालते. भरारी पथक (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथक (एसएसटी), व्हिडीओ सर्वेक्षण पथक (व्हिएसटी), व्हिडीओ पाहणी पथक (व्हिव्हिटी), माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी), जिल्हा नियंत्रण कक्ष व तक्रार संनियंत्रण कक्ष आदीदेखील खर्च पथकाला सहकार्य करतात. तसेच त्यासाठी आयकर विभाग आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचीदेखील या कामात मदत घेतली जाते.

जिल्ह्यातील चार लोकसभा मतदार संघाअंतर्गत २१ विधानसभा मतदार संघात मिळून एकूण १३५ एफएसटी पथक आणि १२९ एसएसटी पथके स्थापन करण्यात आली आहेत. भोर मतदार संघात १५ आणि इतर २० मतदार संघात प्रत्येकी ६ एफएसटी स्थापन करण्यात आली आहेत. तसेच भोर विधानसभा मतदार संघात ९ आणि उर्वरित विधानसभा मतदार संघांमध्ये प्रत्येकी ६ एसएसटी स्थापन करण्यात आली आहेत.

या पथकांद्वारे मतदारांना प्रभावित करण्यासाठीची रोकड, मद्य, तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस आळा घालणे, आचारसंहिता भंगाबाबत घटनांवर लक्ष देणे, निवडणुकीतील गैरप्रकारांची माहिती घेणे, सिव्हिजिल आणि नियंत्रण कक्षाकडे आलेल्या तक्रारींवर कार्यवाही आदी कामे करण्यात येतात.

उमेदवार, राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या सर्व जाहीर सभा, रॅली यांचे व्हिडीओ चित्रीकरण व्हिएसटीच्या माध्यमातून केले जाते व त्याची पाहणी व्हिव्हिटीकडून केली जाते. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ३ व्हिएसटी आणि २ व्हीव्हीटी नेमण्यात आल्या आहेत. या पथकाची निरीक्षणे खर्च पथकासाठी उपयुक्त ठरतात. एमसीएमसीद्वारे उमेदवारांच्या वृत्तपत्रे तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातील जाहिरात खर्चाचा अहवाल समितीकडे पाठविला जातो. या विविध माध्यमातून उमेदवारांनी दर्शविलेला निवडणूक खर्चाची पडताळणी केली जाते. खर्च दर्शविण्यात आला नसल्यास त्याबाबतची नोटीस देऊन त्याच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जातो.

प्रत्येक विधानसभा मतदार संघासाठी सहायक खर्च निरीक्षक नेमण्यात येतो. केंद्र शासनाच्या आयकर विभाग, केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग, केंद्रीय लेखापरीक्षा व लेखा विभाग किंवा केंद्रीय सार्वजनिक उपक्रमाचे अधिकाऱ्यांची नेमणूक सहायक खर्च निरीक्षक म्हणून होते. ते विधानसभा मतदार संघातील खर्च तपासणीचे काम योग्य पद्धतीने चालले आहे का याची पाहणी करणे आणि खर्च निरीक्षक व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना खर्च पडताळणीसाठी सहकार्य करण्याचे काम करतात. तसेच उमेदवारांच्या खर्च नोंदवहीची तसेच शॅडो ऑब्झर्वेशन रजिस्टरचे संनियंत्रण करतात, अशीही माहिती जिल्हा निवडणूक प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

तृतीयपंथी व्यक्तींसाठी ओळखपत्र नोंदणी व मतदान जनजागृती शिबीर संपन्न

0

पुणे, दि. २३ : सहायक आयुक्त समाज कल्याण, सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट अँड ॲक्टिव्हिटीज (सी.वाय.डी.ए.) व मंगलमुखी किन्नर ट्रस्ट, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथी व्यक्तींसाठी ओळखपत्र नोंदणी व मतदान जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी सहायक आयुक्त समाजकल्याण विशाल लोंढे, तृतीयपंथी व्यक्तींच्या मतदारांसाठीच्या ब्रँड ॲम्बेसेडर प्रेरणा वाघेला, सी.वाय.डी.ए.चे प्रितेश कांबळे, मिलन लबडे, मंगलमुखी किन्नर ट्रस्टच्या श्रीमती मन्नत यांच्यासह सुमारे १०० तृतीयपंथी उपस्थित होते.

शिबीरात श्री. लोंढे आणि श्रीमती वाघेला यांनी तृतीयपंथी व्यक्तींना आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावण्याबाबत आवाहन केले.

हुकूमशाही विरोधात लाखो तरुण उभे राहावेत: किरण माने 

पुणे :हुकूमशाहीविरुद्ध लढणाऱ्या तरूणाईचा  सन्मान  ‘बोल के लब आजाद है तेरे’ या कार्यक्रमात   पुण्यात  करण्यात आला .दि.२३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथे भारत जोडो अभियान, पुणे आणि इंडिया आघाडी ,   युवक क्रांती दल, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, निर्भय बनो, जनसंघर्ष समिती, स्वराज अभियान, एनएस यु आय , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस (शरदचंद्र पवार), जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, अभ्यासिका विद्यार्थी कृती समिती या संस्था,संघटना आयोजनात सहभागी झाले.
 प्रसिध्द अभिनेते किरण माने,दिग्दर्शिका शिल्पा बल्लाळ,लेखक,अभ्यासक प्रा. डॉ. श्रीरंजन आवटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .

विविध आंदोलनातून हुकूमशाहीच्या विरोधात निर्भयपणे लढणाऱ्या अप्पा अनारसे,सचिन पांडुळे,भक्ती कुंभार,एड.बाळकृष्ण निढाळकर,वैभव कोठुळे, सायांतन चक्रवर्ती, रिताग्निक भट्टाचार्य, मधुरीमा मैती, मनकल्प नोकवोहम,निहारिका भोसले, श्रावणी बुवा, आकाश नवले,  प्रथमेश नाईक आणि आश्चर्या अशा अनेक युवा प्रतिनिधींचा सन्मान या कार्यक्रमात करण्यात  आला. शेतकरी आंदोलन, ललित कला केंद्र हल्ला प्रकरण, निर्भय बनो सभा हल्ला प्रकरण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हल्ला प्रकरण, फिल्म इन्स्टिट्युट हल्ला प्रकरण अशा ठिकाणी दडप शाही विरुद्ध लढणाऱ्या युवक , युवतींचा यात समावेश होता.
नीलम पंडित यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले.संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले. संदिप ताम्हणकर, इब्राहिम खान तसेच युवा आंदोलकांनी  मनोगत व्यक्त केले.  अशोक तातुगडे,  सुनील सुखथनकर , डॉ प्रवीण सप्तर्षी,अन्वर राजन, प्रशांत कोठडीया असे अनेक मान्यवर उपस्थित होते. एकनाथ पाठक यांनी आभार मानले.
यावेळी बोलताना किरण माने म्हणाले, ‘ ७० वर्ष भारतीय कंदमुळं खावून जगत होते, असा समज करून दिला जातो.  २०१४ नंतर हवेत ऑक्सिजन वाढला ,असा समज करून दिला जातो.मात्र,मोदी हे अवतारी पुरुष असल्याने त्यांनी चहा विकलेले रेल्वे स्टेशन सापडत नाही, डिग्री सापडत नाही . याच काळात माणसाचा गुलाम होण्याची प्रक्रिया झाली. मेंदूवर कब्जा घेण्यात आला आहे. या अराजक काळात जे दोन हात करतील त्यांचे नाव इतिहासात लिहिले जाईल. म्हणूनच आज होत असलेल्या सत्काराचे महत्व आहे.

आपण देश वाचविण्यासाठी झटले पाहिजे. कलाकारांनी राजाचे भाट बनू नये. किरण माने दडपशाहीच्या विरोधात उभे राहिले म्हणून संपले, असे उदाहरण सेट करण्याचा प्रयत्न झाला. मात्र मी संपलो नाही, म्हणून लढा देणाऱ्या कोणीही घाबरु नये. हुकूमशाही विरुद्ध लढणारे लाखो निर्माण व्हावेत, असेही ते म्हणाले.

 शिल्पा बल्लाळ म्हणाल्या,’  भगतसिंग यांनी केलेला स्फोट हिंसक नव्हता.  ती पहिली वहिली अभिव्यक्ती होती.   आज आपला लढा स्वातंत्र्य लढ्यासारखा आहे.  तरुण मंडळींनी हा लढा पुढे न्यायचा आहे. कलाकारांनी हिंसक अभिव्यक्ती पेक्षा सकारात्मक अभिव्यक्ती करावी. अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वव्यापी असली पाहिजे.गोडसेची अभिव्यक्ती हवी की गांधीजींची अभिव्यक्ती हवी, हे ठरवण्याची वेळ आली आहे.

श्रीरंजन आवटे म्हणाले, ‘देशाची स्थिती बिकट आहे. त्याविरुद्ध लढा देण्याची शपथ आजच्या शहीद दिनी घेतली पाहिजे.संविधानाचा वारसा नाकारण्याचा प्रयत्न होत आहे. संविधान बदलण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न लपलेला नाही.ध्रुवीकरणाच्या द्वारे विखार पसरवला जात आहे. या लढाईत द्वेष जिंकणार नाही, तर प्रेम जिंकणार आहे’.