मुंबई – कोरेगाव-भीमामध्ये हिंसाचार घडवून आणल्याचा सातत्याने आरोप झालेले शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्या विरोधातील सांगली येथील दंगलीचे सहा गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारने भिडे यांच्या शेकडो कार्यकर्त्यांविरोधातील गुन्हे सुद्धा मागे घेतले आहेत.हि बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी हा दावा केला आहे .त्यांनी ,२००८ पासून किती जणांवरील गुन्हे मागे घेण्यात आले त्याची माहिती मागितली होती. त्यातून जून २०१७ मध्ये संभाजी भिडे आणि त्यांच्या तीन साथीदारांवरील गुन्हे मागे घेतल्याची माहिती समोर आली. काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार सत्तेवर असताना २००८ ते २०१४ दरम्यान एकही गुन्हा मागे घेतला नाही. मात्र जून २०१७ ते १४ सप्टेंबर २०१८ पर्यंत शेकडो आरोपींवरचे गुन्हे मागे घेण्यात आले.
सरकारने शिवसेना-भाजपा- राष्ट्रवादी कार्यकर्त्यां विरोधात दाखल झालेले गुन्हे सुद्धा मागे घेतले आहेत. ज्यामध्ये राजू शेट्टी,नीलम गोऱ्हे,विकास मठकरी आदींचा समावेश आहे.माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने या संदर्भात एकूण आठ परिपत्रक जारी केली आहेत. २००८ साली जोधा अकबर चित्रपटाला विरोध करताना संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांनी मालमत्तेची नासधूस केल्याचा आरोप होता. त्या प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर हे गुन्हे दाखल करण्यात आले होते.