नागपूर
विधानसभेतील भाजपच्या विजयामागे मोदी लाट नसून ‘इव्हीएम इफेक्ट’ आहे. मशीनमध्ये गडबड झाल्याची शंका अनेक ठिकाणचे उमेदवार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे संशयास वाव असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. ‘या प्रकाराची पक्ष म्हणून आम्ही तक्रार करणार नसलो तरी, निवडणूक आयोगाने स्वतःहून चौकशी करावी,’ अशी मागणी त्यांनी केली.
ते म्हणाले, ‘काँग्रेसला ज्या बुथवर किमान ४०० मते मिळण्याची हमखास खात्री होती, त्या बुथवर केवळ ३०-४० मते मिळाली. असे अनेक बुथ आहेत. याप्रकारे मतदान झाल्याने निवडणुकीचे समीकरण बदलले आहे.
अशाप्रकारे झालेले मतदान शंका घेण्यासारखे आहे. संबंध राज्यातून या प्रकारच्या तक्रारी पुढे येत आहे. त्यामुळे स्वत: उमेदवारांनी याबाबत आयोगाकडे तक्रार करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.’
काँग्रेसप्रमाणेच इतर पक्षांकडूनही ईव्हीएममध्ये गडबड केल्याच्या तक्रारी पुढे येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. ज्या बुथवर हमखास ९० टक्के मते मिळण्याची खात्री असते, तिथे ३ ते ४ टक्के मते मिळणे पटण्यासारखे नाही. त्यामुळे अशा ठिकाणी इव्हीएममध्ये गडबड झाल्यास वाव आहे. निवडणूक आयोगाने याप्रकारच्या तक्रारी येण्याची प्रतीक्षा न करता, चौकशी सुरू करण्याची गरज असल्याचे स्पष्ट मत ठाकरे यांनी व्यक्त केले.