नवी दिल्ली :भाजपचा पदाधिकारी असताना पत्रकार परिषद होण्यापूर्वी तुमच्यासाठी खुर्च्या लावत होतो. मला जुने दिवस आठवतात. आज पंतप्रधान या नात्याने तुम्हाला भेटत असल्याने आनंद होत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. प्रसारमाध्यमांनी लेखणीलाच झाडू बनवून आपल्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेचा प्रचार आणि प्रसार केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी माध्यमांचे कौतुक करत त्यांचे आभार मानले. यापुढे पत्रकारांसोबत प्रत्यक्ष संपर्क साधत गहन व व्यापक चर्चा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
दिल्लीतील भाजप मुख्यालयात आयोजित ‘दिवाळी मिलन’ या कार्यक्रमाद्वारे स्नेहभोजनासाठी बोलावलेल्या सुमारे ५००संपादक-पत्रकारांसोबत मोदींनी थेट भेटीगाठी घेऊन संवाद साधला.ज्यामध्ये यावेळी अनेक वृत्तपत्रे, वाहिन्यांचे मालक, संपादक, प्रमुख पत्रकार उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मोहिमेबद्दल जनजागृती करण्यासाठी प्रसारमाध्यमांचे आभार मानले. या मोहिमेची माध्यमांमधून व्यापक चर्चा होत आहे; परंतु पंतप्रधानांनी हाती झाडू घेतल्याने भागणार नव्हते. मात्र, तुम्ही तुमच्या लेखणीलाच झाडू बनवल्याने देशाची फार मोठी सेवा केली आहे, असे मोदी म्हणाले. स्वच्छता मोहिमेवर माध्यमांमधील८० टक्के बातम्यांमधून सरकारवर टीका करण्यात आली. मात्र टीका करत असतानाही माध्यमांनी हा विषय लावून धरला आणि त्यामुळे आज अनेक राज्य सरकारे जागी झाली आहेत. स्वातंत्र्यानंतर देशात सर्व काही सरकारच करेल, अशी भावना निर्माण झाली होती; परंतु आपल्याला मिळून बदल घडवावा लागेल, ही जाणीव माध्यमांनी जनतेच्या मनात निर्माण केली. देश बदलण्यासाठी माध्यमांचे हे मोठे योगदान आहे, अशा शब्दांत त्यांनी इलेक्ट्रॉनिक, प्रिंट आणि सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव केला.
पंतप्रधान झाल्यानंतर प्रथमच पत्रकारांशी संवाद साधणार्या मोदींनी भाजप मुख्यालयातील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. कधीकाळी मी येथे तुमच्यासाठी खुच्र्या लावत होतो. तेव्हा तुमच्याशी अधिक जवळीक होती. मोकळय़ा वातावरणात चर्चा व्हायची. ते संबंध वेगळे होते आणि मला त्याचा गुजरातमध्येही लाभ झाला. प्रसारमाध्यमांशी पुन्हा जुने नाते प्रस्थापित करण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. पत्रकारांशी चर्चा केल्यानंतर अनेक गोष्टी नव्याने समजतात. केवळ माहितीच नाही तर नवी दृष्टीही मिळते आणि ते फार महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले. भाषणानंतर मोदी व्यासपीठावरून खाली उतरले आणि त्यानंतर त्यांनी उपस्थित सर्व पत्रकारांशी हस्तांदोलन केले. यावेळी अनेक वृत्तपत्रे, वाहिन्यांचे मालक, संपादक, पत्रकार उपस्थित होते. या कार्यक्रमाला भाजप अध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, माहिती-प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते.आजच्या स्नेहमिलन कार्यक्रमाला जवळपास 500 पत्रकारांना निमंत्रण देण्यात आले होते. पंतप्रधान मोदी हे दुपारी 12 वाजता येणार होते; परंतु सुरक्षेसाठी पत्रकारांना शामियान्यात प्रवेश करण्याची वेळ ही सकाळी 10 ची देण्यात आली होती.