पिंपरी । प्रतिनिधी :
जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश व मराठी मिडियम स्कूल, तसेच भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती स्वच्छता अभियान, प्रतिमापूजन, विद्यार्थी व शिक्षकांची भाषणे अशा विविध माध्यमांतून साजरी करण्यात आली. यावेळी सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे-पाटील, भटू शिंदे आदी उपस्थित होते. प्रशालेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी कार्यक्रमासाठी परीश्रम घेतले.
गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून परिसराची स्वच्छता केली. परिसरातील रस्त्यावरील कचरा गोळा करीत विद्यार्थ्यांनी साफसफाई केली. महात्मा गांधी यांची तीन शहाणी माकडे विद्यार्थ्यांनी यावेळी साकारली. गांधीजींची तीन माकडे ही समाजपरिवर्तन आणि नैतिक अधिष्ठानावर मानवी विकासाचा पैलू नव्याने घडविणारी होती, याचा संदेश विद्यार्थ्यांनी या माध्यमातून दिला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी ‘साबरमती के संत तुने कर दिया कमाल’ हे गीत गायले. तसेच महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारीत विचारही भाषणातून व्यक्त केले. शिक्षिका कविता मुदलीयार यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी विचार व्यक्त केले. त्या म्हणाल्या, महात्मा गांधी हे एक आदर्श व्यक्तिमत्व होऊन गेले. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. महात्मा गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते.