पुणे, दिनांक 12- येत्या 1 जानेवारी ते 31 डिसेंबर पर्यंत राज्य शासनाच्या वतीने ‘कुक्कूटपालन वर्ष’ साजरे करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगून शेतक-याचा मुलगा उद्योगपती व्हायला हवा, अशी अपेक्षा पशुसंवर्धन, दुगधव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केली.
जागतिक अंडीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार साबळे, पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप, अतिरिक्त आयुक्त डॉ. डी. एम. चव्हाण, सह आयुक्त डॉ. धनंजय परकाळे, डॉ. गीता धर्मट्टी, डॉ. प्रसन्न पेडगावकर, भाऊसाहेब ढोरे, सचिन काकडे, संजय शेडगे आदी उपस्थित होते.
पशुसंवर्धन मंत्री जानकर म्हणाले, पोषणाच्या बाबतीत आईच्या दुधानंतर अंड्यामधील प्रथिनांचा क्रमांक लागतो. अंड्यातील प्रथिने ही दूध व मांस यापेक्षा पचनास हलकी असतात आणि सर्व वयोगटातील लोकांना सहज पचतात. आंध्र प्रदेश, तेलंगाणामध्ये शालेय पोषण आहारात अंड्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातही अंड्यांची सोय करण्यात येईल. राज्यामध्ये सध्या दीड कोटी अंडी उत्पादन होते. राज्याची अंड्यांची गरज तीन कोटींची आहे, उर्वरित अंडी आंध्र प्रदेश, तेलंगाणा राज्याकडून विकत घेतली जातात. राज्यामध्येच अंडी उत्पादन वाढवण्याची मोठी संधी असून शेतक-यांनी कुक्कूट पालनाकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले. सन 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. पशुसंवर्धन, कुक्कूटपालन या व्यवसायामध्ये हे उत्पन्न चारपट करण्याची क्षमता असल्याचेही त्यांनी सांगितले.
खासदार अमर साबळे यांनी खाण्यामध्ये अंड्यांचे प्रमाण वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली. कुक्कूटपालन, सेंद्रीय खाद्य निर्मिती, विक्री व्यवस्थापन याचे नियोजन केल्यास अंडीविक्रीसाठी जागतिक बाजारपेठ खुली असल्याचे सांगितले. अरब देशांचे इंडो-अरब फोरम लवकरच स्थापन करण्यात येणारअसून त्या माध्यमातून 28 देशांमध्ये अंड्यांची जास्तीतजास्त विक्री होऊ शकते,असेही ते म्हणाले.
आयुक्त कांतीलाल उमाप यांनी प्रास्ताविक केले.मानवी आहारात अंड्यांच्या पोषणमुल्याचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवणे आणि कुक्कूट पालन व्यवसायाला चालना देऊन ग्रामीण भागात स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी जागतिक अंडी दिन साजरा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. अंडे हे शाकाहारी असल्याने प्रत्येकाने आहारात समावेश करण्यास हरकत नसल्याचेही ते म्हणाले.
यावेळी डॉ. गीता धर्मट्टी यांनी पोषण आहारातील अंड्यांचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. प्रसन्न पेडगावकर, भाऊसाहेब ढोरे, सचिन काकडे, संजय शेडगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशीष जराड यांनी तर आभार डॉ. डी. एम. चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. राऊतमारे, डॉ. शमीम शेख, डॉ. विश्वास भागवत यांच्या विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.