पुणे-तिकडे बॉलीवूड मध्ये आलेल्या ‘तनुश्री ‘ नावाच्या वादळाने रथी महारथींच्या मुखवटे उडून जावू पाहत असताना ;इकडे कालवा दुरुस्तीला तो फुटण्याची वेळ पाहता काय ? असा सवाल मनात घेऊन च पाटबंधारे विभागाने उठविलेल्या पाणीकपातीच्या वादळात अखेर महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाची नौका भरकटली कि काय अशी शंका घेण्याजोगी स्थिती दिसते आहे . सत्ताधिकारी पदाधिकारी,अधिकारी ,आणि पालकमंत्री,जलसंपदा मंत्री यांच्यात कोणताही ताळमेळ नसल्याचे स्पष्ट झाले .एकूणच पाणीकपातीच्या बाबत सत्ताधारी नगरसेवकांमध्ये हि गोंधळाचे वातावरण दिसून येते आहे.खुद्द स्मार्ट पुण्याच्या आयुक्तांना आपण पाणी किती घेतो याचे मोजमाप प्रत्यक्षात जावून तपासण्याची वेळ येवून ठेपली आहे . काही पदाधिकारी कपात वगैरे काही नाही सांगत आहेत ,काही मौन पाळून आहेत ,तर काही आम्ही कपात होऊ देणार नाही असे सांगत आहेत . आणि विरोधी पक्षांनी तर आंदोलनाचा धडाका लावला आहे .
खरोखर धरणात पाणी कमी आहे काय ? खडकवासला धरणक्षेत्रातील धरणे भरली तेव्हा किती पाणी एकूण साऱ्या धरणात होते ? आणि किती दिवसात किती पाणी कमी झाले ?गेल्या वर्षी धरणे भरली तेव्हा किती पाणी होते ? आणि ते कशा पद्धतीने- नियोजनाने सोडले गेले ? या सर्व प्रश्नांचा अभ्यास करायला त्यांना पाटबंधारे खात्याने वेळ दिलेला दिसत नाही .
आजच्या मितीला गेल्या वर्षाच्या तुलनेत पावणेदोन टीएमसी पाणी धरणांतून कमी झालेले नसून ते नियोजनपूर्वक गायब करण्यात आल्याची माहिती येथे मिळते आहे . आणि याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर पाटबंधारे खात्याचे मोठ्ठे मासे गळाला लागतील असाही दावा करण्यात येतो आहे . महापालिका राजकारण आणि पाटबंधारे खात्याचे राजकारण याकडे दुर्लक्ष करून नियोजन केले तरीही पुण्याच्या पाण्यात कपात केल्याशिवाय व्यवस्थित कारभार हाकता येईल अशी स्थिती असताना हि वादळ आले आणि नौका भरकटली असे चित्र तयार झाले आहे . आता यापुढे पुणेकरांना मात्र या वादळात गुरफटवून टाकण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणजे झाले . अन्यथा या वर्षी गायब झालेल्या पाण्याचा हिशेब पुढच्या वर्षी का होईनात सीबीआय मार्फत होऊ शकतो असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही .