पुणे,दि.3: जिल्हयातील जेजुरी भुलेश्वर आणि श्री. क्षेत्र वीर या ठिकाणी वर्षभर भाविकांची मोठी संख्या असते. भाविकांच्या सोईकरीता पायाभुत सुविधा पुरविण्याकरीता शासनाकडून भरीव निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी दिली.
पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र वीर येथे जिल्हा नियोजन समितीच्या अनुदानातून करण्यात येणाऱ्या वेगवेगळया विकास कामांची पहाणी करुन विश्वस्त ग्रामस्थ यांच्याशी ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत चर्चा केली. त्यावेळी ते बोलत होते. तसेच या कामांबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही केल्या. या बैठकीस जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एन.पी.मित्रगोत्री, प्रांताधिकारी संजय आसवले, तहसिलदार सचिन गिरी, गट विकास अधिकारी अतुल म्हेत्रे, जिल्हा नियोजन अधिकारी प्रमोद केंबावी आदी मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा नियोजन समितीमार्फत यापूर्वी श्री क्षेत्र वीर या ठिकाणाकरीता 93 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तथापी जिल्हाधिकारी यांचा सहभाग असलेल्या इतर संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांची समिती लगेच नेमण्यात येवून यात्रा कालावधीमध्ये भाविकांना राहाण्याकरीता भक्तनिवास, रस्ते दुरुस्ती व इतर आवश्यक सोयी सुविधा तसेच ग्रामस्थांमार्फत सूचविलेल्या गरजा आणि सूचना लक्षात घेवून नव्याने आराखडा तयार करावा, अशा सूचना जलसंपदा मंत्री श्री.शिवतारे यांनी देवून वाढीव निधीसाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असे सांगितले. समितीमार्फत सूचविलेल्या कामांना लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता घेण्याचा प्रयत्न करावा, असेही सांगितले.
जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी देशपातळीवर पुणे जिल्हयातील प्रत्येक तालुक्याचे, गावांचे आगळेवेगळे वैशिष्टय आहे. श्री क्षेत्र वीर येथे वर्षभरात 25 ते 30 लाख भाविक दर्शनाकरीता येत असतात. त्यांच्या गरजांनुसार वाढीव कामाकरीता समिती गठीत करण्यात येईल. तसेच या ठिकाणच्या कामांना निधी उपलब्ध करुन देण्यात येवून ही प्रस्तावित कामे जलद गतीने पूर्ण करण्यात येतील असे सांगितले.