पुणे: श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा शुभारंभ पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री.गिरीश बापट यांनी सपत्निक महापुजा करुन, आज श्री क्षेत्र देहू येथे केला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, आ.संजय भेगडे, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब ऊर्फ पंढरीनाथ मोरे, पालखी सोहळा प्रमुख सर्वश्री सुनिल मोरे, विठ्ठल मोरे, अशोक मोरे, अभिजीत बाळकृष्ण मोरे, जालिंदर मोरे, बबनराव पाचपुते,उपविभागीय अधिकारी ज्योती कदम उपस्थित होते.
मंगलमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात श्री क्षेत्र देहू येथील श्री संत तुकाराम महाराज संस्थान येथील मंदिरात माऊलींच्या पादुकांची पालकमंत्री गिरीश बापट यांच्याहस्ते विधीवत पाद्यपूजा करण्यात आली. शिस्तबध्द पध्दतीने वारकऱ्यांनी केलेल्या टाळ-मृदुंगाच्या गजराने यावेळी सभोवतालचा परिसर दुमदुमला होता. पालखी प्रस्थानापूर्वी करावी लागणारी नैमेत्तिक कामांची तयारी मंदिर प्रशासनाच्यावतीने पूर्ण करण्यात आली होती.
पालखी सोहळयात सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. आरोग्य सेवा, पिण्याचे पाणी, इंधन इत्यादी व्यवस्था पालखी सोहळा व्यवस्थापनातर्फे करण्यात आल्या आहेत. पालखीमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्यातील दिंडयाही सहभागी झाल्या आहेत. या दिंडयाच्या माध्यमातून निर्मल वारी-स्वच्छ वारी तसेच सामाजिक जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती पालखी व्यवस्थापनाने दिली.
पालखी प्रस्थानानंतर, श्री क्षेत्र देहू येथील इनामदार वाडयात पालखीचा मुक्काम राहणार असून त्यानंतर पुढील प्रवासासाठी पालखी मार्गस्थ होणार असल्याची माहिती यावेळी विश्वस्तांनी दिली. या सोहळयास वारकरी, नागरीक, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, महाविद्यालयीन युवक-युवती, स्वयंसेवक मोठया प्रमाणावर सहभागी झाले होते.
भक्त निवासाचे उदघाटन
श्री क्षेत्र देहू येथे पालखी सोहळयासाठी, वारकरी मोठया संख्येने सहभागी होत असतात. वारकऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या भक्त निवासाचे उदघाटन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. या भक्त निवास अठरा कक्षांमध्ये भाविकांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. भक्त निवासात भोजन कक्ष, सभा मंडप, वाहनांसाठी पार्कींग इत्यादी सोयी करण्यात आल्या आहेत.