पुणे:- पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होत असतात. आषाढी पालखी सोहळयासाठी पुणे जिल्हयातून जाण्याऱ्या दिंडया आणि वारकऱ्यांना विविध विभागाकडून पुरविण्यात येणाऱ्या सुविधांच्या तयारीचा आढावा आज विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीस श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे विश्वस्त डॉ.अजित कुलकर्णी, ॲड.विकास ढगे पाटील, संत सोपान महाराज संस्थानचे विश्वस्त गोपाळ गोसावी, निर्मल वारी सेवा सहयोग प्रतिष्ठानचे नरेंद्र वैशंपायन, पोलीस अधीक्षक सुवेझ हक, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार, उपजिल्हधिकारी तथा समन्वय कक्ष प्रमुख उदय भोसले उपस्थित होते.
या बैठकीत पालखी मार्गावरील अतिक्रमणे दूर करणे, पालखी मार्गावरील अडथळे काढून टाकणे, पालखी सोहळयादरम्यान लावण्यात येणारा पोलीस बंदोबस्त, पालखी मार्गावरील राडा-रोडा उचलणे, पालखी मार्गावरील विहीरींचे अधिग्रहण करणे, वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सेवा पुरविणे, वारकऱ्यांना रॉकेल, गॅसचा पुरवठा करणे, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पाणी पुरवठा, अनधिकृत खाद्य पदार्थ विक्रीस प्रतिबंध करणे, आरोग्यविषयक सेवा पुरविणे, पालखीमध्ये सहभागी झालेल्या वाहनांची तपासणी करणे, आपत्ती निवारण पथकाची नियुक्ती करणे, पाण्याच्या टँकरचा पुरवठा आदि कामांच्या तयारीचा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आढावा घेतला. यावेळी संबधित विभागांनी पालखी सोहळयानिमित्त केलेल्या कामांचा अहवाल सादर केला. दिंडीच्या विश्वस्तांनी बैठकीत उपस्थित केलेल्या विविध सूचनांची दखल घेऊन, अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
प्लॅस्टीकचा वापर टाळण्याचे आवाहन
शासनाने प्लॅस्टीक बंदी लागू केली असून त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. पालखीसोहळयादरम्यान वारकऱ्यांना करण्यात येणाऱ्या अन्नदानामध्ये प्लॅस्टीकच्या वस्तूंचा वापर न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. या बैठकीस संबधित तहसीलदार, पोलीस अधिकारी,आरेाग्य विभाग, महावितरण, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.