बारामती – सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृतीची जोपासना करणे आवश्यक आहे. वाचनालयात वाचल्या जाणाऱ्या पुस्तकांमुळे समाजात चांगले विचार पोहचू शकतात. त्यामूळे वाचन संसकृती समाजाला समृद्ध करू शकते, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
बांदलवाडी येथील क्रांती ग्रामविकास मंडळातर्फे उभारण्यात आलेल्या क्रांती ग्रामविकास वाचनालय व ग्रंथालय इमारतीचे उद्धघाटन श्री. बापट यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार अमर साबळे, आमदार संजय भेगडे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद काकडे, पंचायत समिती सदस्य भारत गावडे, क्रांती ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष दिलीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री बापट म्हणाले, गावात असणारे वाचनालय हे शिक्षणाचे, संशोधनाचे तसेच चांगले विचार रुजवण्याचे केंद्र असते. सध्या पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. तथापि या वाचनालयाच्या माध्यमातून येथील नागरिकांची वाचनाची ओढ नक्कीच वाढेल. सुरुवातीला भाषा निर्माण झाली, त्या भाषेच्या जोरावर लिखाणास सुरुवात झाली आणि तिथेच वाचन संस्कृतीचा जन्म झाला. सामाजिक जबाबदारी व बांधिलकी वाढवायची असेल तर वाचन करणे आवश्यक आहे. खासदार श्री. साबळे यांच्या निधीतून आणि मंडळाचे अध्यक्ष श्री. शिंदे यांच्या प्रयत्नातून निर्माण झालेले हे ग्रंथालय भावी पिढीसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास श्री. बापट यांनी व्यक्त केला.
खासदार अमर साबळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. ज्ञानदेव बुरुंगळे यांनी केले.