पुणे दि. 14 : – कोणताही नागरिक अन्नापासून वंचित राहता कामा नये, या जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास विविध संस्था, सामाजिक संघटना आणि दानशूर व्यक्तिंनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.यामध्येपद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे हे संस्थापक अध्यक्ष असलेली दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री (डिक्की) ही संस्था देखील आघाडीवर आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन देशभर लागू केला. तथापि, राज्य शासनाने त्यापूर्वीच दोन-तीन दिवस अगोदर शाळा, महाविद्यालये, मॉल, थियटर बंद केली, त्यामुळे लॉकडाऊन सारखीच परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यातील बेघर, हातावर पोट असणारे नागरिक अन्नापासून वंचित राहता कामा नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच प्रशासनातील अधिका-यांनी उपाय योजण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्तिंना मदतीसाठी आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद म्हणून दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे आणि त्यांच्या सहका-यांनी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आणि त्यांच्या आवाहनानुसार पुणे शहरातील 7 निवारागृहातील बेघर नागरिकांच्या सकाळचा नाष्टा, दुपारचे भोजन आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्याची तयारी दर्शवली. जिल्हा प्रशासनाकडून भोजन वितरणाची पहिली परवानगी डीक्कीला मिळाली, हे विशेष !
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्वयंपाकगृहात सुमारे 2100 लोकांच्या जेवणाची तयारी गेल्या 28 मार्चपासून करण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या आयुक्त शेखर गायकवाड व त्यांच्या अधिका-यांच्या मदतीने हे तयार भोजन आणि नाष्टा वितरीत करण्यात येत आहे.