पुणे :- जास्तीत जास्त झाडे लावून वृक्षतोडीमुळे निर्माण झालेला असमतोल दूर करण्याचा हा उपक्रम जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्याने गोयल गंगा फौंडेशनने हाती घेतला आहे. कचरा व्यवस्थापनातून कचर्याचा पुनर्वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंग, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान यासारख्या उपक्रमांची सुरुवात देखील या माध्यमातून करण्यात आली.वानवडी येथील गंगा सॅटेलाईट येथे पर्यावरण दिनानिमित्त ५०० झाडे लावून ते जगवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव ,फौंडेशनचे विश्वस्त जयप्रकाश गोयल, गीता गोयल,अतुल गोयल, अमित गोयल, अमितकुमार याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी जयप्रकाश गोयल म्हणाले कि, दिवसेंदिवस दुष्काळाची वाढती तीव्रता,पाणी टंचाईची स्थिती तसेच पावसाची अनियमितता यामुळे पर्यावरण संतुलन बिघडू लागले आहे. पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे.यासाठी आम्ही वानवडी येथील गंगा सॅटेलाईट येथे वाहून जाणाऱ्या पाण्याचा अपव्यय होऊ नये यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंगची प्रणाली येथे बसवीत आहोत ज्यामुळे ४० लाख लिटर पाण्याची बचत होणार आहे.
वाढत्या प्रदुषणामुळे पर्यावरण रक्षणाचे महत्त्व सर्वांनाच पटू लागले आहे. यापुढे मात्र रोपण केलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने पार पाडण्यासाठी जनजागृती गरज निर्माण झाली आहे.पर्यावरण दिन केवळ ५ जून पर्यंत मर्यादीत न राहता यातील संदेशाचे मोल वर्षभर रहावे या उद्देशाने अशा उपक्रमाचे आयोजन व्हावे. अशी भावना कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव यांनी व्यक्त केली.
गंगा सॅटेलाईट जवळील नाल्याचे सुशोभिकरण होण्यासाठी ‘स्वच्छ भारत’ अंतर्गत आम्ही लवकरात लवकर या योजनेची अंमलबजावणी करू असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.