पुणे- अतिवृष्टी आणि महापुराने केरळचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्ती मधून बाहेर पडण्यासाठी समाजातील विविध स्तरातून केरळसाठी मदतीचा हात पुढे केला जात आहे. क्रेडाई महाराष्ट्र ही या मध्ये मागे नाही. क्रेडाई महाराष्ट्रच्या महिला सदस्यांनी केरळ रिलीफ फंडासाठी पाच लाख रुपये केवळ ३६ तासांच्या आत जमा केले आहेत. क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला असून लवकरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पूरग्रस्त सहायता निधीमध्ये हा धनादेश जमा करण्यात येणार आहे. महिला विंगच्या अध्यक्षा दर्शना परमार यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित करण्यात आला असून यासाठी सातारा, अहमदनगर, बारामती, औरंगाबाद आणि पुणे येथील सर्व महिला सदस्यांनी पुढाकार घेतला आहे.
यावेळी डॉ. डी. के. अभ्यंकर, सोनिया ओगले, ज्योती ठक्कर, अर्चना बडेरा, मीनाक्षी जमातानी, लीना कुकरेजा, सोनल पोखरणा, यू.के जूलका, उपस्थित होते.
“संकटमय परिस्थितीत सहकार्य करण्यासाठी क्रेडाई नेहमीच आघाडीवर राहिला आहे. मराठवाडा-बीड परिसरातील दुष्काळी परिस्थितीमध्येही आम्ही मागील वेळेस मदत केली होती. महिला सदस्यांनी जमा केलेल्या 5 लाख रुपयांचा योगदानामध्ये फेडरेशनच्या कोणत्याही पुरुष सदस्याचा समावेश नाही. क्रेडाईच्या महिला विंगने अत्यंत कमी वेळेत ही रक्कम जमा केली आहे. म्हणूनच आम्ही क्रेडाई कुटुंबातील महिलांच्या शक्तीला सलाम करतो “, असे उद्गार शांतीलाल कटारिया यांनी महिला विंगची स्तुती करताना काढले.
गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने केरळ मधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर केरळला जगभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. आम्हीही सामाजिक जबाबदारी म्हणून पाच लाख रुपयांचा धनादेश देत आहोत. लवकरच येथील जनजीवन सामान्य होईल असा विश्वास क्रेडाई महाराष्ट्राच्या महिला सदस्यांनी यावेळी व्यक्त केला.