पुणे – “राज्य जरी शासन चालवत असले तरी, समाजाचे परिवर्तन सामाजिक चळवळीतूनच होते. समाजात संवेदना असेल तरच गुंतागुंतीचे प्रश्न सुटतील. प्रत्येक गोष्टीला चळवळीचे रूप दिले तर परिवर्तन घडू शकते” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जैन संघटनेच्या वाघोलीच्या कार्यक्रमात केले. ते आज राज्यभरातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील १००० विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाच्या वेळी बोलत होते.
यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट, राज्यसभेचे सदस्य अजय संचेती, खासदार अनिल शिरोळे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार बाबूराव पाचर्णे, आमदार जगदीश मुळीक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदिपदादा कंद, वाघोली ग्रामपंचायतच्या सरपंच संजीवनी वाघमारे उपस्थित होते.
फडणवीस पुढे म्हणाले, “भारतीय जैन संघटनेने आत्महत्या या विषयावर नुसते दुख व्यक्त न करता मदतीचा हात पुढे केला आहे. आज शेतकरी नैराश्यात जात आहे. त्यामुळे आत्महत्येचा विषय हा संवेदनेचा विषय आहे. त्याचे उदात्तीकरण करू नये. आत्महत्या कशा कमी करता येईल याचा विचार कमी करता आला पाहिजे. समाजाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा विचार करून दुख व्यक्त न करता मदतीचा हात पुढे केला पाहिजे समाज म्हणून संकटात सापडलेल्या लोकांची जबाबदारी स्वीकारायला हवी. शांतीलालजी मुथा यांनी ही जबाबदारी ओळखून पित्याच्या रुपान ते हे कार्य करीत आहे.
इतर ज्ञानाबरोबरच शेतीचेही ज्ञान मुलांना देण्यात यावे. जेणेकरून त्या मुलांच्या मनात शेतीविषयी नकारात्मक भाव निर्माण होणार नाही अशी भावना अमृता फडणवीस यांनी यावेळी मांडली. यावेळी सर्व मुलांना आपल्या शासकीय निवास्थानी ‘’वर्षा’’ येथे भोजनाकरिता व मनमोकळ्या गप्पांसाठी आमंत्रित केले.
प्रास्ताविक करताना बीजेएसचे संस्थापक शांतीलाल मुथ्था म्हणाले कि, अनेक वर्षापासून शेतक-यांच्या आत्महत्या होत आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्या मुलांनीही आत्महत्येचा विचार मनात न आणता स्वतःच्या आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघायला हवे असे मला वाटते म्हणून हि नवी पिढी घडवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. नैसर्गिक असो वा मानव निर्मित प्रत्येक संकटामध्ये मुलांचा प्रश्न महत्वाचा असतो. हे लक्षात घेऊन बीजेएस ने समाजसेवेच व्रत स्वीकारले आहे. शेतक-यांच्या पुढील पिढीचा प्रश्न ऐरणीवर आहे. आम्ही या आत्महत्यांबाबत व त्यांच्या पुढच्या पिढीला डोळ्यासमोर ठेवून एक निरीक्षण अहवाल तयार केला आहे. आदिवासी विद्यार्थांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये झापत्याने वाढ होत असून वसतिगृहातील एका आदिवासी विद्यार्थाने ९१ % गुण मिळविले आणि ३० % आदिवासी विद्यार्थ्यांनी ७० % पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. राज्यभरातून २६ जिल्ह्यातील ९१६ मुले आज या प्रकल्पात दाखल झाली आहेत. १ जुलै पासून 11 वीचे वर्ग सुरु होत असल्यामुळे उर्वरित मुले त्यावेळी दाखल होतील. प्रत्येक नैसर्गिक आप्तीच्या वेळी मुलांच्या प्रश्न महत्त्वाचा असतो, या मुलांच्या मानसिक परिस्थितीचा सखोल अभ्यास करून यातून योग्य पद्धतीने मार्ग काढण्यासाठी मेंटल हेल्थ विभागाची स्थापन करण्यात आली आहे. जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या मुलांना याच पुढे भविष्यात उपयोग होऊ शकेल.
यावेळी कार्यक्रमात बीजेएस च्या ज्या विद्यार्थांनी जास्त गुण मिळवले आहेत अशा तीन विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच ज्या दोन मुलांना त्यांचे कला गुण बघून “झी-वाहिनीने चित्रपटात काम करण्याची संधी दिली, अशा दोन विद्यार्थ्यांचा सत्कार सुद्धा त्यांनी यावेळी केला. तीनही मुली झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी करणा-या सौ. अनिता देवकुळे यांच्या तीनही मुलीना बीजेएसच्या शाळेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रवेश देण्यात आला.
अमृता फडणवीस यांनी त्यांना त्यांच्या गायनाच्या माध्यमातून मिळालेली रक्कम यावेळी बीजेएस कडे निधी स्वरुपात सुपूर्द केली.
पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अजय संचेती, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. संस्थेचे कार्यकारी सदस्य शांतीलाल बोरा यांनी आभार व्यक्त केले.