यवतमाळ – 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांची निवड करण्यात आली आहे. अ.भा.म. साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणीची सभा महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेत आज सुरू झाली होती. या सभेत या वर्षी यवतमाळ येथे होणाऱ्या 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यांची निवड करण्यात आली. महामंडळाची ही 18 सदस्यीय कार्यकारणी 26 ऑक्टोबरपासून यवतमाळमध्ये दाखल झालेली आहे. या कार्यकारिणीच्या माध्यमातून संमेलनाचे पूर्वनियोजन, संमेलनाची तारीख ठरविणे, अध्यक्ष निवड करणे, ग्रंथप्रदर्शन, बैठक व्यवस्था, तसेच संमेलनासाठी नियोजनपूर्ण विषय याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येत आली.
बंदद्वार चर्चेत झाली अध्यक्ष निवड
बैठकीत सर्वात महत्त्वाचा विषय होता अध्यक्ष निवडीचा. या कार्यकारिणीच्या सभेमध्ये बंदद्वार चर्चा होऊन अध्यक्षपदावर एकमत झाले. संमेलनाच्या कार्यालयात महामंडळाच्या घटक संस्था असलेल्या मुंबई, पुणे, मराठवाडा, छत्तीसगड, इंदूर, कर्नाटक, गोवा, औरंगाबाद, बडोदा, नागपूर येथील 15 सदस्य व यवतमाळ येथील आयोजन समितीचे 3 सदस्य असे एकूण 18 सदस्य या बैठकीला उपस्थित होते. यातील प्रत्येक घटक संस्थांनी 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी आपली नावे सुचवली होती. यात अध्यक्षपदासाठी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त डॉ. भालचंद्र नेमाडे, प्रसिद्ध कवी ना. धों. महानोर, नाटककार प्रेमानंद गज्वी, ज्येष्ठ साहित्यिका प्रभा गणोरकर, अरुणा ढेरे यांच्यासह अन्य दोन ते तीन नावे अध्यक्षपदाच्या निवडीसाठी चर्चेत होती. हे साहित्य संमेलन पोस्टर ग्राउंडवर जानेवारी महिन्याच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात होणार असल्याचे नियोजन महामंडळाने केले होते. त्यानुसार 11 ते 13 जानेवारी 2019 यादरम्यान साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचे ठरले आहे. समितीचे अध्यक्ष डॉक्टर रमाकांत कोलते आहेत; मात्र त्यांनाही या कार्यकारिणीच्या बैठकीत दुपारपर्यंत दूर ठेवण्यात आले होते.
45 वर्षांनंतर यवतमाळात साहित्य संमेलन
यवतमाळमध्ये 1973 मध्ये ग. दि. माडगूळकर यांच्या अध्यक्षतेत गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तत्कालीन जि. प. अध्यक्ष सुधाकरराव नाईक होते, तर राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनीही या संमेलनाला हजेरी लावली होती. या संमेलनामध्ये प्रसिद्ध गायिका शोभा गुर्तू यांची संगीत मैफल अविस्मरणीय ठरली होती. या घटनेला आज 45 वर्षे पूर्ण झाली आहेत. तथापि, या वर्षी यवतमाळात होणाऱ्या 92 व्या मराठी साहित्य संमेलनाची जबाबदारी आयोजन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.