‘बा विठ्ठला, सर्वधर्मसमभावचा एकोपा कायम राहू दे’
विश्वशांती यज्ञाद्वारे वैष्णवांचे साकडे!
पुणे
सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची आस, मुखी अखंड हरिनाम, हाती टाळ अन् मृदंग घेऊन पंढरीच्या वाटेवरून निघालेल्या हजारो वैष्णवांनी पुणे मुक्कामी बा विठ्ठला … बळीराजाचे अकाली ‘मरण ‘ टळू दे… सर्वसामान्यांना आता महागाईतून ‘मुक्ती ‘ दे …जगामध्ये समाजातील सर्वधर्मसमभावचा एकोपा कायम राहू दे! अशी आळवणी विश्वशांती यज्ञाद्वारे करून श्री विठ्ठलाला साकडे घातले.
निमित्त होते,माजी उपमहापौर व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी श्री. आबा बागुल आणि पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या विश्वशांती यज्ञाचे. यंदा २१ व्या वर्षीही सहकारनगर येथील प्रसिद्ध श्रीलक्ष्मीमाता मंदिर प्रांगणात वारकऱ्यांची निवास – भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली. यावेळी दरवर्षीप्रमाणे हजारो वारकऱ्यांनी विश्वशांती यज्ञ करून वर्षेनुवर्षे पायी वारी करणाऱ्या बळीराजाला निसर्गाचा प्रकोप, सरकारी अनास्था या दुष्ट चक्रातून सोडविण्यासाठी,समाजातील वाईट प्रवृत्ती नष्ट होऊ दे आणि जगात शांतता नांदू दे असे साकडे विठ्ठलाला घातले. माजी उपमहापौर श्री. आबा बागुल, पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल, नंदकुमार बानगुडे,घनश्याम सावंत, सागर बागुल, रमेश भंडारी, हेमंत बागुल, नंदकुमार कोंढाळकर, अभिषेक बागुल, इम्तियाज तांबोळी,सागर आरोळे,किरण कांबळे,अल्ताफ सौदागर धनंजय कांबळे ,अशोक शिंदे,संतोष पवार आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आरोग्य तपासणी शिबिराचाही वारकऱ्यांनी लाभ घेतला. त्यांना मोफत औषधे वितरित करण्यात आली. नित्यनेमाने यंदाही पंढरीच्या वाटेवर जाणाऱ्या या वैष्णवांच्या पायाची काळजी घेण्यासाठी माजी उपमहापौर आबा बागुल ,अमित बागुल आणि सहकाऱ्यांनी वारकऱ्यांच्या पायाला तेलाने मालिश करून त्यांची सेवा केली.