पुणे-थकल्या, भागल्या जिवांचे आयुष्यभर मनोरंजन करणार्या, वृद्ध लावणी कलाकरांना सेवाधन, निवृत्ती वेतन सरकारने द्यावे आणि रसिकांनी या कलेला दाद द्यावी असे आवाहन लावणी महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी केले.
पुणे नवरात्रौ महोत्सवातील लावणी महोत्सवाचे उद्घाटन श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे नारळ वाढवून झाले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार उल्हास पवार, नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल मंचावर उपस्थित होते. दुपारी 12 ते रात्री 12 असा हा लावणी महोत्सव दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले आणि अभिनेत्री श्वेता शिंदे यांनी या लावणी महोत्सवाला भेट दिली. आठवले यांनी आपल्या शीघ्र कवितेने उपस्थितांची मने जिंकली आणि आपल्या कवितेतून आबा बागुल यांना शुभकामना दिल्या. नवरात्रौ महोत्सवाच्या माध्यमातून आबांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून वैचारिक दिशा दिली आहे अशा शब्दात कौतुक केले. आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणूनही मी त्यांना शुभेच्छा देतो. निवडणुकीच्या राजकारणात आपण वेगळे असतो पण, भारतीय म्हणून आपण एक आहोत त्यामुळे माझे या व्यासपीठावर येण्याचा वेगळा अर्थ काढू नये असे ते म्हणाले.
उद्घाटनपर बोलताना श्रीनिवास पाटील म्हणाले, लावणी म्हणजे सौंदर्य, नजाकत, ठेका धरायला लावणारी कला. लावणी म्हणजे लवण. लवण म्हणजे मीठ. आपल्या जेवणात मिठाचे जे महत्व आहे तेच आपल्या जगण्यात लावणीचे आहे. त्या लावणीच्या झटक्यात जगण्याची प्रेरणा मिळते. लावणी कलावंत आयुष्यभर रसिकांचे मनोरंजन करीत असतात. त्या कलावंतांच्या वृद्धापकाळी त्यांचे आयुष्य समाधानात व्यतित व्हावे यासाठी सरकारने त्यांच्या वृद्धापकाळची सोय करावी. याबाबत सरकारचा काही योजनांचा विचार चालू आहे. आता त्या योजना प्रत्यक्षात येण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. रसिकांनीही या कलावंत मुलींचा योग्य तो सन्मान राखायला हवा, असेही यावेळी बोलताना पाटील म्हणाले.
लावणी ही महाराष्ट्राची लोककला. रसिकांनी ती जपलेली आहे म्हणून ती जिवंत आहे. या कलेला उत्तेजन देण्यासाठी या उत्सवात आम्ही लावणी महोत्सव गेली 23 वर्षे साद करीत आहोत, असे प्रास्तविकात बोलताना पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संयोजक अंध्यक्ष नगरसेवक व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी सांगितले.
अमित बागुल आणि नंदू बानगुडे यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन श्रीनिवास पाटील यांचा आणि उल्हास पवार यांचा सत्कार करण्यात आला. केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांचा सत्कार आबा बागुल यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देवून आणि अभिनेत्री श्वेता शिंदेचा सत्कार रामदास आठवले यांच्या हस्ते झाला. विकी खन्ना, अमित बागुल, नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, नंदकुमार कोंढाळकर, रमेश भंडारी, माजी नगरसेवक विजय मोहिते, अभिषेक बागुल, रिपब्लीकन पक्षाचे बाळासाहेब जानराव, अशोक कांबळे, असित गांगुर्डे, मंदार जोशी, आयुब शेख आदी यावेळी उपस्थित होते.
गण गौळणीने लावणीच्या सादरीकरणाला सुरवात झाली. नंतर या रावजी बसा भाऊजी, बाई मी लाडाची कैरी पाडाची, मला आमदार झाल्यासारख वाटत गं, तुमच्या पुढ्यात कुटतेय मी ज्वानीचा मसाला, पिकल्या पानाचा देठ कि हो हिरवा अशा एकापेक्षा एक ठसकेबाज लावण्या सादर करण्यात आल्या. बुगडी माझी सांडली गं, तुझ्या उसाला लागलं कोल्हा, आई मला नेसव शालू नवा या जून्या लावण्यांनी वेळी सार्या गणेश कला रंगमंच येथे टाळ्यांचा गगनभेदी कडकडाट झाला.
लावणी महोत्सवातील महासंग्राम या कार्यक्रमात ’पाहुणं फक्त तुमच्यासाठी’, ’लावणी धमाका’, ’तुमच्यासाठी कायपण’, ’छत्तीस नखरेवाली’, ’ढोलकीच्या तालावर’ या शिर्षकाखाली वेगवेगळ्या लावणी संस्थांनी ठसकेबाज लावण्या सादर केल्या या महोत्सवला प्रचंड गर्दी होती. महिलांचा सहभाग त्यात लक्षणीय होता.