सातारा : हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. शेतकऱ्यांना पाणी मिळवूण देण्यासाठी 1400 कोटी खर्च करुन जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत 24 टीएमसी पाणीसाठा निर्माण केला आहे. 5 लाख शेतकऱ्यांना सोलर पंप देणार आहोत, अशी घोषणा सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
माणदेशी फौउंडेशन निर्मीत माण नदी पुनर्जीवन अंतर्गत सिमेंट बंधाऱ्याचे भूमिपूजन आणि पुळकोटी येथील पाणी साठवण सिमेंट बंधाऱ्याचा लोकार्पण सोहळा श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल, नगराध्यक्ष विजय धट, जिल्हा उपनिबंधक डॉ.महेश कदम आदी उपस्थित होते.
सहकारमंत्री श्री. पाटील म्हणाले, गावातच शहरातल्या सुविधा दिल्यास गावचा शेतकरी शहराकडे जाणार नाही. त्यादृष्टीने आमची पावले पडत आहेत. शेतकऱ्यांना पाणी मिळवूण देण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. त्याला वीज, बाजारपेठ मिळाली पाहिजे. त्याचबरोबर त्याच्या उत्पादीत मालाला चांगला भाव मिळायचा असेल तर प्रक्रिया करुन बाजारपेठ मिळाली पाहिजे. त्यासाठी प्रक्रिया उद्योग सुरु करा. मागेल त्याला गोदाम आणि शीतगृह आम्ही देऊ. गावा गावात गोदाम आणि शितगृह बांधूण देणार आहोत. 5 लाख शेतकऱ्यांना सोलर पंप देणार आहोत. मागेल त्याला ठिबक संचही देणार आहोत. चांगली खतं आणि चांगले बी-बियाणे देखील शेतकऱ्यांना देणार आहोत.
त्यांचे उत्पादन वाढल्यास गावातला शेतकरी मुंबईला पळणार नाही. या भागातील पतसंस्था, बँका, याने दुष्काळ मुक्तीसाठी माणदेशी फौउंडेशनचा आदर्श घ्यावा. आणि एखादे काम पूर्ण करावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.