पुणे :
“पर्यावरणीय कायदे आपल्याकडे आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी नीट होत नाही. पर्यावरण अहवाल निघत असतात त्याची माहिती महापालिकेने देणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:हून पर्यावरणाबाबत सजग राहून पर्यावरणीय उपक्रम राबवून स्वत: सहभाग घ्यायला हवा, असे आवाहन ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी केले. पर्यावरण, गृहनिर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या गंगोत्री संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित निसर्गस्नेही जीवनशैली या कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम शनिवार, दिनांक 22 नोव्हेंबर रोजी “शिवचैतन्य सभागृह’ (कोथरूड) येथे पार पडला.
या कार्यक्रमाला “गंगोत्री’चे संचालक गणेश जाधव, राजेंद्र आवटे, मकरंद केळकर उपस्थित होते. यावेळी गाडगीळ यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यामतून उपस्थितांशी संवाद साधला.
“ऑस्ट्रेलियामध्ये “सिटिझन रिव्हर वॉच’ नावाचा उपक्रम राबविला जातो. त्या उपक्रमांतर्गत लोकांना पाण्याची सध्याची स्थिती काय आहे, हे सांगितले जाते. प्रयोगशाळेत नेऊन नागरिकांच्या सहभागातून प्रयोग केले जातात त्यातून नागरिकांमध्ये जनजागृती होते, असे जनजागृती करणारे उपक्रम आपल्याकडे राबवायला हवेत’, असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले.
गाडगीळ म्हणाले, “ऑस्ट्रेलियामध्ये “सिटिझन रिव्हर वॉच’ नावाचा उपक्रम राबविला जातो. त्या उपक्रमांतर्गत लोकांना पाण्याची सध्याची स्थिती काय आहे, हे सांगितले जाते. प्रयोगशाळेत नेऊन नागरिकांच्या सहभागातून प्रयोग केले जातात त्यातून नागरिकांमध्ये जनजागृती होते, असे जनजागृती करणारे उपक्रम आपल्याकडे राबवायला हवेत. पर्यावरण विषय निघाला की, सध्या पर्यावरणाची हानी होत आहे. विज्ञान तंत्रज्ञानामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, असे बोलले जाते.’
विज्ञान आणि वाढत्या लोकसंख्येमुळे केवळ अधोगतीच झाली आहे, असे नव्हे, तर प्रगतीही बरीच झाली आहे. शहरातील टिंबर मार्केटवाले फर्निचरसाठी वडाची झाडे सर्रास कापत आहेत, अशीही माहिती आहे; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते. सरकार, प्रशासनामध्ये चांगले लोक आहेत; परंतु यंत्रणा नक्कीच सडली आहे. पुण्यात अनेक वेळा नागरिकांनी उत्स्फूर्तपणे टेकडी बचाव सारखी आंदोलने केली आहेत. मातीत खेळा, जेथे जाल तेथील पाणी प्यावे नाहीतर शरीराला त्याची सवय लागते. याचे उदाहरण म्हणजे माझ्या अमेरिकेतील एका मित्राला गव्हाची ऍलर्जी आहे. त्यामुळे निसर्गात ज्या गोष्टी आहेत. त्यासोबत आपण जुळवून घ्यायला हवे. निसर्गातील पशू, पक्षी, प्राणी साफ करून आपण नाही राहू शकत. त्यामुळे घरात पाली, झुरळे असावीत, असे गंमतीने सांगितले.
यावेळी उपस्थितांपैकी एकाने हल्ली टेकड्यांवर विदेशी झाडे लावली जातात, असे विचारले. यावर विदेशी झाडांचा पशू, पक्षी, किटकांना काहीच फायदा नाही. पक्षी अशा झाडांवर घरटी करीत नाहीत. त्यामुळे अशी झाडे लावू नयेत आणि लावलेली झाडे काढून देशी झाडे लावावीत असे सुचविले.’