विशाखापट्टणम – ‘हुद हुद ‘ या चक्रीवादळाने विशाखापट्टणम येथे झालेल्या नुकासानाची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशला एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. ते आज (मंगळवार) येथे दाखल झाले. आंध्र प्रदेशचे राज्यपाल ईएसएल नरसिंहन, मुख्यमंत्री एन चंद्राबाबु नायडू, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, अशोक गजपती राजू व इतरांनी मोदी यांचे विमानतळावर स्वागत केले. या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटूंबीयांसाठी 2 लाख रुपये; तर जखमींसाठी मदत म्हणून 50 हजार रुपयांच्या रकमेची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली. “या संकटसमयी केंद्र सरकार आंध्र प्रदेशबरोबर आहे,‘‘ असे मोदी यांनी यावेळी सांगितले.
पंतप्रधानांना नौदलाचे वरिष्ठ अधिकारी वाईस ऍडमिरल सतीश सोनी यांनी यावेळी चक्रीवादळामुळे विशाखापट्टणम येथील विमानतळाच्या झालेल्या नुकसानाची माहिती दिली. यानंतर शहरामध्ये या वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मोदी हे मुख्यमंत्र्यांसमवेत रवाना झाले. विशाखापट्टणम स्टील कारखान्याला या वादळाचा मोठा फटका बसला असून, गेल्या पाच दिवसांपासून उत्पादन बंद आहे. त्यामुळे दररोजचे 40 कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच विमानसेवा बंद असल्यानेही 500 कोटींचा फटका बसला आहे. याशिवाय, शहरामध्ये 40 हजार विजेचे खांब कोसळले असून, वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी काम सुरू आहे.