साहीब सिंह शहीद
नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे. पाकने संयुक्त राष्ट्रांत काश्मीरचा मुद्दा नेला होता. पण या मुद्यामध्ये आम्ही दखल देणार नसून पाकने पुढाकार घेऊन आपसांत चर्चा करून हा मुद्दा सोडवावा असे संयुक्त राष्ट्रांनी स्पष्टपणे सांगितले आहे. दरम्यान काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात लष्कराच्या एका अभियानात सोमवारी दहशतवाद्यांनी गस्त घालणा-या सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. त्यात 30 राष्ट्रीय रायफल्स जवान साहीब सिंह शहीद झाले.
एकिकडे सीमेवर भारताच्या विविध भागांत फायरिंग सुरुच आहे. त्याचवेळी काश्मीरला आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा त्यांचा प्रयत्नही सुरुच आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सोमवारी अमेरिकेच्या खासदारांच्या एका शिष्टमंडळाच्या भेटीत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. शरीफ यांनी सिनेटर टीम केन आणि अँगस किंग यांची भेट घेतली.
पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने वृत्तसंस्थांना दिलेल्या माहितीनुसार, ‘नवाज शरीफ यांनी दोन्ही सिनेटरला सांगितले की, संयुक्त राष्ट्रांचा प्रस्ताव हाच काश्मीर मुद्यावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. अशा प्रयत्नात काश्मीरच्या लोकांचा सहभाग असणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.’ यादरम्यान, पाकिस्तानने सीमेवर पुंछच्या विविध भागांमध्ये असलेल्या चौक्यांवर फायरिंग करत पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. केरनी, शाहपूर आणि साब्जियामध्ये थोड्या थोड्या वेळाने फायरिंग सुरुच आहे. यात एक महिला जखमी झाली आहे.भारतीय लष्करही पाकिस्तानला जशास तसे उत्तर देत आहे. रविवारी सकाळपर्यंत म्हणजे सुमारे 24 तास आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून फायरिंग बंद होती. शनिवारी पाकिस्तानी रेंजर्सनी जम्मूच्या अरनिया सेक्टरमध्ये फायरिंग केली होती. त्यात एक जण जखमी झाला होता. 1 ऑक्टोबरपासून पाकिस्तानने अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून त्यात 8 जण ठार झाले आहेत, तर 90 जण जखमी आहेत. फायरिंगमुळे सीमेवरील गावांत राहणा-या सुमारे 32 हजार नागरिकांना घर सोडावे लागले आहे.