पुणे – कॅम्पमधील रोझरी शाळेने जाणीवपूर्वक नववीतील 85 विद्यार्थ्यांना एकाच वेळी नापास केल्याची तक्रार पालकांनी शिक्षण उपसंचालक विभागाकडे केली आहे. दहावीचा निकाल शंभर टक्के लागण्याच्या उद्देशाने नववीतील विद्यार्थ्यांना नापास करणाऱ्या शाळांच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने दिला आहे.
रोझरी शाळेत तब्बल 85 हून अधिक नववीच्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला, यासाठी “मनविसे’च्या कार्यकर्त्यांसह पालकांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे धाव घेतली. नववीच्या विद्यार्थ्याना एकाच वेळी एवढ्या संख्येने नापास करणे, ही पद्धत चुकीची आहे. यावरून रोझरीच्या शाळेतील शिक्षक योग्य पद्धतीने शिकवितात का, असा प्रश्नही पालकांनी उपस्थित केला आहे.
नापास विद्यार्थ्यांची शाळेने चुकीच्या पद्धतीने पेपर तपासणी केल्याचा आरोपही पालकांनी केला आहे. यावरून शाळा प्रशासनाची शैक्षणिक दर्जा पूर्णपणे खालावलेला असून, या नववीतील विद्यार्थी पालकांची होणारे शैक्षणिक पिळवणूक थांबवावी. या विद्यार्थ्यांची पुन्हा उत्तरपत्रिका तपासणी करण्याची मागणी संघटनेने केली आहे. या विद्यार्थ्यांना योग्य न्याय मिळावा अन्यथा पालकांसमवेत आक्रमक पवित्रा घेवून आंदोलन करणार असल्याचे “मनविसे’ शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले.