सातारा(जि.मा.का) : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेच्या आज झालेल्या समितीच्या बैठकीत अपघातात मृत्युमूखी पडलेल्या आठ विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 75 हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी दिली.
राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना समितीची बैठक अप्पर जिल्हाधिकारी श्री.यादव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या बैठकीला उपशिक्षणाधिकारी पी.डी.कुंभार, उपशिक्षणाधिकारी आर.एन.चव्हाण, विस्तार अधिकारी एस.के.देशमाने, पोलीस निरीक्षक संजय सुर्वे आदी उपस्थित होते.
श्री.देशमाने यांनी विषय वाचन केले. आज झालेल्या बैठकीत पाटण तालुक्यातील तळमावले येथील वाल्मिकी विदया मंदिर 7 वीच्या वर्गात असणाऱ्या ऋषिकेश नारायण पाटील या विद्यार्थ्याचा 11 फेब्रुवारी 2014 रोजी मृत्यू झाला होता. कराड तालुक्यातील कोर्टी येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता 7 वीमध्ये शिकत असणाऱ्या सुशांत साहेबराव भोसले याचा 3 ऑक्टोबर 2014 रोजी नदीत पोहताना बूडून मृत्यू झाला होता. म्हासोली – येवती येथील भैरवनाथ विद्यालयातील प्रतीक्षा सुभाष साळुंखे या विद्यार्थीनीचा 16 मे 2014 रोजी वाहन अपघातात मृत्यू झाला होता. फलटण तालुक्यातील वाठार (नि.)येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 5 वीच्या वर्गात शिकणाऱ्या राधेय संतोष कासार तसेच 3 रीत शिकणाऱ्या मयूर संतोष कासार या दोघा विद्यार्थ्याचा विहिरीत बुडून 28 मार्च 2015 रोजी मृत्यू झाला होता. कोरेगांव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील इ.4 थीच्या वर्गात शिकणाऱ्या शिवम दिनेश चौधरी याचा 27 जून 2015 रोजी विजेचा धक्का बसून मृत्यू झाला होता.
जावली तालुक्यातील श्री.वेण्णा विद्यामंदिर इ.10 वीच्या वर्गात शिकणाऱ्या विकी शंकर धनावडे याचा वाहन अपघातात 16 मे 2014 रोजी मृत्यू झाला होता. फलटण तालुक्यातील यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील इ.12 वी मध्ये शिकणाऱ्या विक्रम बिराजी माने या विद्यार्थ्याचा 7 जानेवारी 2014 रोजी विजेचा धक्का बसून मृत्यू झाला होता.
वरील आठही अपघाती प्रकरणांमधील मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच्या आईच्या नावे प्रत्येकी 75 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान आजच्या बैठकीत मंजूर करण्यात आले.