मुंबई – राज ठाकरे यांनी काल गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचा समाचार घेतला. त्यांनी उद्योगपतींना गुजरातमध्ये येण्याचे आवाहन केले, यावर राज यांनी टीका केली. इतिहासात एक आनंदीबाई होत्या त्यांनी ‘ध’ चा ‘मा’ केला, आता या आनंदीबेन ‘म’ चा ‘गु’ करायला निघाल्या आहेत. महाराष्ट्राचा गुजरात होऊ देणार नसल्याचा इशारा राज यांनी यावेळी दिला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रथमच जाहीर टीका केली आहे. भांडूप येथील सभेत राज यांनी, मोदी अजूनही गुजरातचे मुख्यमंत्री असल्या सारखे वागत, असल्याचे म्हटले आहे. मोदी सरकारने घोषणा केलेल्या पहिल्या बुलेट ट्रेनवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला. बुलेट ट्रेन मुंबई- अहमदाबादच का हवी, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात भाजप वाढण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी बळ दिले, असे सांगत त्यांनी भाजपच्या स्वबळावर घणाघात केला.
पंतप्रधान अमेरिकेत गेले तिथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी ‘केम छो’ म्हणून मोदींचे स्वागत केले. त्यांना हिंदीत स्वागत करता येत नव्हते का, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. मोदी काय गुजरातचे पंतप्रधान आहेत का? असा सवाल करत ते म्हणाले, मोदी अजूनही गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. ते भारताचे पंतप्रधान आहेत आणि त्यांनी त्याच पद्धतीने वागले पाहिजे, अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केली.
राज ठाकरे विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रचारसभा अटोपून मुंबईत परतले आहेत. रविवारी रात्री त्यांची शिशिर शिंदे यांच्या प्रचारार्थ भांडूपमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी मराठवाडा आणि विदर्भातील ऑक्टोबर हिटमध्येही हजारो लोक सभेसाठी तळ ठोकून बसत असल्याचे सांगितले.
राष्ट्रीय पक्षांना महाराष्ट्रात येण्याची गरजच काय, असा सवाल उपस्थित करुन महाराष्ट्रात भाजपला बाळासाहेब ठाकरेंनी बळ दिले आता तेच बेंडकुळ्या दाखवत आहे. महाराष्ट्राला स्वायत्तता हवी असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
मोदी सरकारवर तोफ डागताना राज ठाकरे म्हणाले, ‘मोदी म्हणत आहेत, आमच्या हातात सत्ता द्या, केंद्र मदत करेल. यावर अक्षेप घेत राज ठाकरे यांनी सवाल केला, आमच्या हातात सत्ता आली तर, मदत करणार नाही का? मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात काँग्रेसचे सरकार होते, त्यांनी केली ना मदत. मग, महाराष्ट्रात राज ठाकरेंचे सरकार आल्यावर तुम्हाला मदत करावीच लागेल.’
भाजपकडे महाराष्ट्रात नेताच नाही, हे आम्हाला सांगण्याची गरज नाही ते मोदींनी त्यांच्या पहिल्याच सभेत सांगितले, असल्याचे राज ठाकरे म्हणाले. मोदींनी भाजपच्या नेत्यांची पहिल्याच सभेत लायकी काढली, असे सांगत राज म्हणाले, ‘मुंडे असते तर मला महाराष्ट्रात येण्याची गरजच नव्हती, असे मोदींनी बीडमधील पहिल्याच सभेत सांगितले. म्हणजे सध्या जे स्वतःला नेते म्हणवून घेत आहेत त्यातील एकही लायकीचा नाही. भाजपच्या एकाही बॅनरवर स्थानिक नेता नाही. यांची लायकीच नाही, अशी टीका त्यांनी केली.
भाजपचे उमेदवार कोणत्या पक्षातून आणि कुठून आले याची यादीच राज ठाकरे यांनी वाचून दाखवली आणि भाजपच्या स्वबळाची पोलखोल जनतेसमोर केली.