जांबूत-
आंबेगाव शिरुरचे आमदार म्हणून अरुण गिरेंच्या रूपाने अरुणोदय होणार आहे, त्याचबरोबर शिवशाहीचे सरकार येणार आहे. राष्ट्रवादीची ही दहशत आपण मोडून काढू असे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी सांगितले. शिवसेनेचे उमेदवार अरुण गिरे यांच्या प्रचारार्थ ते टाकळीहाजी, जांबूत (ता. शिरूर) येथे बोलत होते. या वेळी टाकळीहाजी येथील ग्रामपंचायत सदस्य सुरेश चोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
खा.आढळराव पाटील म्हणाले की, या माणसाने सोज्वळ असल्याचा मुखवटा धारण केला आहे. प्रत्यक्षात बुरख्यामागे भीषण वास्तव दडले आहे. आंबेगावच्या जनतेला ते आता पूर्णपणे समजले आहे. खासदार किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्र शासनाच्या एमकेसीएलचा दोन हजार कोटींचा घोटाळा समोर आणला आहे.
या वेळी बोलताना अरुण गिरे म्हणाले की, या वेळी बदल घडणार व आंबेगाव-शिरूर मतदारसंघावर भगवा फडकणारच आहे. खासदार आढळराव-पाटील यांच्या प्रामाणिक नेतृत्वा खाली या मतदारसंघाचा आपण विकास करणार आहोत. या वेळी उपजिल्हाप्रमुख राम गावडे, तालुकाप्रमुख दादा खर्डे, रविंद्र करंजखेले, बी. डी. आढळराव-पाटील, गणेश जामदार, माउली घोडे, बाळासाहेब वाघ, पारभाऊ गावडे, लक्ष्मण घोड, नागरिक व शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते