मराठी सिनेमात पहिल्यांदाच एका स्त्री अभिनेत्रीने साकारली तृतीयपंथीयाची भूमिका!!
सत्य घटनेवर आधारित “ऋण” १५ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात!!
श्री समर्थ इंटरनॅशनल फिल्म्स’ च्या मुकुंद म्हात्रे आणि एकनाथ भोपी यांची निर्मिती असलेला, विशाल गायकवाड दिग्दर्शित ” ऋण” या आगामी सिनेमाचा फर्स्ट लूक नुकताच मुंबई येथे प्रदर्शित करण्यात आला. याप्रसंगी सिनेमातील मुख्य अभिनेत्री नारायणी शास्त्री, दिग्दर्शक विशाल गायकवाड, अभिनेते जयराज नायर, संगीतकार सिद्धार्थ आणि संगीत हळदीपूर कॅमेरामन नजीब खान आणि संवाद लेखक अजितेम जोशी आदी मान्यवर मंडळी आवर्जून उपस्थितीत होती.
शिक्षणासाठी एका खेडेगावातून शहरात आलेल्या एका गरीब मुलाची राहण्याची, खाण्याची आणि जगण्याची होणारी ससेहोलपट आणि त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी अशा एका व्यक्तीचे प्रयत्न ज्या व्यक्तीला समाजात माणूस म्हणून स्वीकृती नाही, कारण ती एक तृतीयपंथीय आहे. अशा या समाजातील दोन पूर्णपणे वेगळ्या असलेल्या समाजातील व्यक्तींच्या नाजूक संबंधांवर आधारित “ऋण” सिनेमाची कथा असून ही कथा एका सत्य घटनेवर आधरित आहे.
“ऋण” सिनेमातून अभिनेत्री नारायणी शास्त्री यांनी तब्बल दहा वर्षानंतर मराठी सिनेमात पुनरागमन झाले आहे. मराठी सिनेमामध्ये पहिल्यांदाच एक स्त्री अभिनेत्री तृतीयपंथीयाची आव्हानात्मक अशी भूमिका साकारणार असून ही भूमिका नारायणी शास्त्री यांनी अगदी उत्तमपणे साकारली आहे. जेव्हा या सिनेमाची स्क्रिप्ट मला ऐकवण्यात आली त्याच क्षणी मला ती खूप आवडली. एका स्त्रीसाठी हे पात्र साकारण हे किती आव्हानात्मक असून शकते याचा अंदाज मला स्क्रिप्ट वाचतानाच आला होता. तृतीयपंथीयांबद्दल समाजात जी टिंगल केली जाते ती खऱ्या अर्थाने योग्य नसून देवानेच त्याना समाजात स्त्री, पुरुष यांच्याबरोबर या तृतीयपंथीयांना बनविले आहे. आपल्या जशा काही अपेक्षा आहेत त्याचप्रमाणे त्यांच्याही काही अपेक्षा, भावना, इच्छा आहेत ज्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. असा हा नाजूक आणि तितकाच सामाजिक विषय केवळ मराठी सिनेमांमधूनच रसिकांनपर्यंत पोहोचवता येऊ शकतो कारण या मराठी रसिक श्रोत्यांकडूनच त्याला योग्य तो न्याय मिळू शकतो असे अभिनेत्री नारायणी शास्त्री यांनी याप्रसंगी सांगितले. तसेच या सिनेमातील माझी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मी माझे वजन तब्बल १५ किलोने वाढविले असून डबिंगसाठी ही मी तेवढीच जास्त मेहनत घेतल्याचे नारायणी यांनी आवर्जून नमूद केले
सिनेमातील ही मध्यवर्ती भूमिका साकारण्यासाठी जेव्हा मी नारायणी यांना भेटलो तेव्हा मला बोलायला काहीच सुचत नव्हते. कारण माझ्या या सिनेमात तुम्ही तृतीयपंथीयाची भूमिका साकारणार का? असे कसे विचारणार हा मला प्रश्नच पडला होता पण त्यांनी स्क्रिप्ट वाचली आणि त्यांना ती भावली व त्यांनी लगेच होकार दिला. या सिनेमाचे निर्माते मुकुंद म्हात्रे आणि एकनाथ भोपी यांनी मला उत्तम पाठबळ दिले. सिनेमातील सर्वच कलाकारांनी उत्तम भूमिका साकारल्या असून सिनेमातील गाणीही श्रवणीय अशी आहेत आणि ती आपल्या सर्वाना आवडतील अशी आशा सिनेमाचे दिग्दर्शक विशाल गायकवाड यांनी व्यक्त केली.
“ऋण” सिनेमात अभिनेते मनोज जोशी आणि राजेश्वरी सचदेव या हिंदीतील नामवंत कलाकारांबरोबरच ओमकार गोवर्धन, अनंत जोग, विनय आपटे, विजय पाटकर, उषा नाईक, विवेक लागू, जयराज नायर आदी या प्रसिद्ध कलाकारांच्या ही महत्वपुर्ण भूमिका आहेत. सिनेमाची कथा विशाल गायकवाड यांची असून पटकथा विनोद नायर तर संवाद अजितेम जोशी यांनी लिहिले आहेत. सुप्रसिद्ध ज्येष्ठ कॅमेरामन नजीब खान यांनी या सिनेमासाठी सिनेमॅटोग्राफार म्हणून काम पाहिले असून संकलन फैझल महाडिक आणि इम्रान महाडिक यांनी केले आहे. गुरु ठाकूर आणि प्रकल्प वाणी यांनी लिहिलेल्या अर्थपूर्ण गीताना हिंदी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी संगीत हळदीपूर आणि सिद्धार्थ हळदीपूर यांचे सुमधुर संगीत लाभले असून “ऋण” सिनेमातून या संगीतकार जोडीने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.
तर अशी ही एक आगळी वेगळी प्रेमकथा असलेला सत्य कथेवर आधारित “ऋण” सिनेमा येत्या १५ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.