कात्रज : “खडकवासला पोटनिवडणुकीत इतिहास घडविला. आता भीमराव तापकीरांना चाळीस हजारांचे मताधिक्य द्या. त्यांना मानाचे स्थान देतो,‘‘ असे आश्वासन विनोद तावडे यांनी धनकवडी येथील प्रचारसभेत दिले. या वेळी खासदार अनिल शिरोळे, पुरंदर हवेली मतदारसंघाच्या उमेदवार संगीताराजे निंबाळकर, आरपीआयचे प्रदेशाध्यक्ष महेश शिंदे, अरुण राजवाडे, वर्षा तापकीर, दिगंबर डवरी उपस्थित होते.
तावडे म्हणाले, “”पंधरा वर्षे विकास तर झाला नाही, मग राज्यावर तीन लाख कोटी रुपयांचे कर्ज कसे झाले. मतदारांनो, विचार करण्यापेक्षा भूलथापांना बळी न पडता मतदान करा.‘‘ तावडे यांनी या वेळी आर. आर. पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करत, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांचे नाव जे घेतात त्यांच्याच जिभेने समस्त महिलांचा अपमान केला आहे. आबांच्या पोटात जे आहे तेच ओठावर आले आहे. त्यांना सत्तेचा माज आणि मस्ती आली आहे, असा घणाघात केला.