पुणे
सहकारनगर भागातील खाजगी जागेतील मंदिरावर महापालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे शिवसेना, भाजपच्या सभासदांनी सभागृहात गोंधळ घातला. सभा सुरू होऊन दीड तास झाल्यानंतर त्यांनी सभागृहात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यापुढील काळात पालिका प्रशासनाने शहरातील बेकायदा पद्धतीने बांधण्यात आलेल्या प्रार्थनास्थळांवर कारवाई करू नये, अशी मागणी काही लोकप्रतिनिधींनी सभागृहात करत राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र याच ठिकाणी म्हणजे गोळ्वलकर गुरुजी रस्त्यावर वारंवार दुचाकीस्वारांना गंभीर अपघात होत आहेत या घटनेकडे मात्र पोलिस आणि राजकीय नेते कार्यकर्ते लक्ष द्यायला तर नसल्याचे दिसते आहे अर्थात मंदिर पडणे आणि या नजीकचे अपघाती स्थळ या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत .
सहकारनगर भागातील गंगधर मिठाई वाले नजीकचे मंदीर बेकायदा असल्याच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे आल्या होत्या. महापालिकेच्या लोकशाही दिनाबरोबरच विभागीय लोकशाही दिनामध्ये या प्रार्थनास्थळाबाबत तक्रारी आल्याने बुधवारी प्रशासनाने सहकारनगर भागातील प्रार्थनास्थळावर कारवाई केली. पोलिस बंदोबस्त घेऊन ही कारवाई करत बेकायदा बांधकाम काढून टाकण्यात आले. सर्वसाधारण सभा सुरू होऊन दीड तास झाल्यानंतर भाजपच्या नगरसेविका मनीषा घाटे यांनी हा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाकडून खुलासा मागितला. प्रार्थनास्थळावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत अधिकाऱ्यांवर तोंडसुख घेत संबधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना, भाजपच्या सभासदांनी केली. ‘पालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली त्यांना सभागृहात बोलवा नाहीतर आम्ही त्यांच्या कार्यालयात जावून आंदोलन करू,’ अशी धमकीच काही सभासदांनी दिली.
सभागृहात हा विषय सुरू असतानाच सभागृहाच्या प्रेक्षक गॅलरीत जाऊन भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी गॅलरीत लावलेली काच फोडण्याचा प्रयत्न केला. अखेर महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी प्रशासनाला खुलासा करण्याचे आदेश दिले. महापालिकेने कारवाई केलेल्या प्रार्थनास्थळाबाबत अनेकदा तक्रारी आल्या होत्या. लोकशाही दिनामध्ये वारंवार याबाबत तक्रारी करण्यात आल्याने प्रशासनाने या प्रार्थनास्थळाला नोटीस बजाविली होती. हे बांधकाम बेकायदा असल्याने पोलिस बंदोबस्त घेऊन ही कारवाई करण्यात आल्याचा खुलासा नगर अभियंता प्रशांत वाघमारे यांनी केला.
रस्तोरस्ती अनेक ठिकाणी बेकायदा मंदिरे आहेत हि बाब खरी आहे , मंदिरांच्या नावाने अनेक लोक आपापल्या हिताच्या गोष्टी साधून घेतात हे हि खरे आहे पण हे मंदिर रस्त्यात नव्हते ते खाजगी जागेत होते ते पाडण्याची तसदी घेण्यामागे कोणाच्या तक्रारी होत्या त्या कोणत्या स्वरूपाच्या होत्या हे मात्र उजेडात आलेले नाही . दरम्यान या समोरच रस्त्यावर कित्येकदा दुचाकीस्वांना सारखे गंभीर स्वरूपाचे अपघात होत आहेत अशावेळी जखमी अवस्थेत दुचाकीचालक येथे बराच काळ पडलेले दिसतात त्यांना कोणी तातडीने रुग्णालयात हलवायचे यावर केवळ हालहाल व्यक्त होताना दिसते . एरवी चौकाचौकात दुचाक्या अडवून वसुली करणाऱ्या पोलिसांनी इथे थांबून आपले काम सुरु ठेवले तरी प्रसंगी अपघातग्रस्तांना त्यांच्यामार्फत मदत होईल अशी हि भावना व्यक्त होते आहे , मात्र असा अपघात झाला कि पोलिस -कार्यकर्ते यापासून सहसा दूरच राहतात असे दिसत आहे यामध्ये रिक्षावाले मात्र नागरी दबावाने भरडले जात असल्याचे सांगितले जाते