कोल्हापूर-सध्या रावण आणि कंस यांच्यासारखे अत्याचार होत नाहीत. जे थोडेफार पाप होते, ते देखील संपले. कारण आत्तापर्यंतचे सर्व पंतप्रधान हे केवळ ‘भोगी’ होते, मात्र नरेंद्र मोदी ‘योगी’ आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने अच्छे दिन निर्माण होत असल्याची मुक्ताफळे योगगुरू रामदेवबाबा यांनी उधळली.
कणेरी मठ येथे आयोजित भारतीय संस्कृती उत्सवात ‘युवा ज्ञानोत्सव’ या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर होते. रामदेवबाबा पुढे म्हणाले, ‘सध्याचा युवक आपल्यापुढे आदर्श नाही, असे सांगत असतो. पण, राम, कृष्ण, अर्जुन, विवेकानंद हे सर्व तरूण होते. त्यांनी अत्याचारी राक्षसांचा नाश केला. त्यांचा आदर्श समोर असताना असा विचार मनात येतोच कसा. छत्रपती शिवाजी महाराज, विवेकानंद, भगतसिंग यांची चित्रे घरात लावा. केवळ इतिहासातूनच प्रेरणा घेण्यापेक्षा स्वतः वेगळा इतिहास निर्माण करा. आपल्याला मिळालेला मनुष्यजन्म हा नशीबाने मिळालेला आहे. त्यामुळे जे काही प्राणपणाने करता येईल तेवढे करण्याचा प्रयत्न करा.’
डॉ. विजय भटकर म्हणाले, ‘संस्कृती रक्षणासाठी भारताला विश्वगुरू बनलेच पाहिजे. संस्कृती ही फार मोठी गुंतवणूक आहे, त्याचा विचार करता शिक्षणातून पूर्ण संस्कृती मिळत नाही त्यासाठी देशभरात अनेक ठिकाणी असे महोत्सव झाले पाहिजेत. भारतीय संस्कृती विचार हा वैश्विक आहे. गुरू परंपरा, मातृभक्ती याचा आदर सर्वांना समजला पाहिजे.’
बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनचे अधिक कदम यांनी देवाने एकच माणूस निर्माण केलेला असताना देशांनी सीमा का केल्या असा मुद्दा उपस्थित केला. देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत, खुलेआम अंमली पदार्थांची देवाणघेवाण सुरू असते. सीमावर्ती भागामध्ये प्रचंड भीती आहे ती कमी झाली पाहिजे. आजच्या तरूणांमध्ये काम करण्याची इच्छा आहे पण लोक साथ देत नाहीत अशी नाराजी व्यक्त केली.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षण तज्ज्ञ गुरुराज करजगी यांनी मौखिक शिक्षणापेक्षा कृतीयुक्त शिक्षण अधिक गरजेचे असल्याचे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पुरोहीत यांनी राष्ट्र निर्मितीचे मिशन आवश्यक असून लोकांचा सरकारवरील विश्वास कमी झाल्याचे सांगितले.
गोव्याचे मंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी परदेशातून आलेल्या गोष्टी चांगल्या असे म्हणण्याची आपल्याला सवय लागली असून परदेशी वस्तू, पोशाख आणि पद्धतीचा अंगीकार करू नये असे सांगितले. तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नात राजश्री चौधरी यांनी युवा चळवळ वाढीस लागली असून या देशात भारतमाता आणि मातृभूमीचा म्हणून महिलांचा सन्मान केला गेला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. गोविंदाचार्य यांनी प्रास्ताविक केले. यावेळी जीवरक्षक दिनकर कांबळे, उद्योजक बबनराव शेळके आणि अनिल वासुदेव यांचा सत्कार करण्यात आला. सकाळी ५ ते ७ यावेळेत बाबा रामदेव यांचे योगशिबीर झाले.