पुणे – मागील तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलं असताना वेतन न मिळाल्याच्या विवंचनेतून दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. जळगाव आणि रत्नागिरीतील दोन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर आता विरोधी पक्ष भाजप देखील आक्रमक झाले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार आहे, असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे.त्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुध्दा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
त्यांनी यासंदर्भात ट्विटरवर ट्विट केले आहे. ते म्हणतात, गेल्या कित्येक महिन्यांपासून जनतेच्या सेवेसाठी कार्यतत्पर असलेल्या कर्तव्यनिष्ठ एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन या राज्य सरकारने अजूनही थकवून ठेवले आहे. आधीच आर्थिक परिस्थिती ढासळली असताना वेळेवर वेतन नाही, तर कुटुंबाला पोसायचं कसं? या चिंतेमुळे राज्यातील अनेक ठिकाणी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत.
यावेळी एका आत्महत्याग्रस्त कर्मचाऱ्याने राज्य सरकारचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये करून तेच आत्महत्येला जबाबदार असल्याचं म्हटलं. जुन्या गोष्टी उकरून काढून पत्रकार अर्णब गोस्वामींना तुरुंगात डांबणारे मुख्यमंत्री स्वतःचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आल्यानंतर स्वतःला अटक करवून घेणार आहेत का? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केला आहे.
पुढे चंद्रकांत पाटील म्हणतात, याच उत्तर त्यांनीच द्यावं. त्यात आपले परिवहन मंत्री अनिल परब जे या गोष्टींवर कधीही काही बोलत नाहीत, मात्र इतर विषयांवर माथेफोडी करण्यासाठी त्यांना वेळ असतो. कायदा सगळ्यांसाठी समान आहे, मात्र आता मुख्यमंत्री कारवाई करणार की नाही? असा प्रश्न त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना विचारला आहे.
पुढे चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला निष्काळजी असं संबोधलं आहे, ते म्हणतात, मुळात गोस्वामी यांच्या अटकेमुळे राज्यातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. राज्य सरकार जनतेनंतर, शेतकऱ्यांनंतर आता एसटी कर्मचाऱ्यांच्याही जीवावर उठले आहे. त्यामुळे त्यांचा हा निष्काळजीपणा आता त्यांनाच भोवणार आहे. अशी टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केली आहे.