मुंबई : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटकेत असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. गोस्वामी यांच्या अटकेने राज्यात विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षात चांगलीच जुंपली आहे. आता या वादात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उडी घेतली आहे. यासंदर्भात राज्यपालांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करुन अर्णब गोस्वामी यांच्या सुरक्षा आणि आरोग्यबाबत चिंता व्यक्त केली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकार विरुद्ध राज्यपाल चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. भगत सिंह कोश्यारी यांनी याआधी घेतलेल्या भूमिकांमुळे राज्य सरकार काहीसं अडचणीत आलं होतं. आता अर्णब गोस्वामी अटक प्रकरणात झालेल्या कारवाईवरुन राज्यपालांनी आता थेट गृहमंत्र्यांनाच फोन केला आहे. अर्णब गोस्वामी यांच्या कुटुंबियांना त्यांना भेटू देण्याची तसेच त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्यावी, अशी सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली आहे. तसेच, गोस्वामी यांची सुरक्षा तसंच आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली. अर्णब यांना कुटुंबीयांशी बोलू द्यावं, भेटू द्यावं अशी सूचनाही केली.
तथापि, “कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही. महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करेल. ही केस बंद झाली होती. अन्वय नाईक यांच्या पत्नीने कोर्टात अर्ज केला होता. त्यानंतर ही केस रिओपन करण्याची परवानगी कोर्टाने त्यांना दिली.” अशी प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली होती. अन्वय नाईक आम्ह्त्या प्रकरणात गोस्वामी अटकेत असून सध्या ते तळोजा कारागृहात आहेत. अटके केल्यानंतर सुरवातीला त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील नगरपालिका शाळेतील विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते.याचदरम्यान, न्यायालयीन कोठडीत असताना शुक्रवारी अर्णब गोस्वामी यांनी मोबाईल वापरल्याचे समोर आले आहे. यावेळी अर्णब गोस्वामी हे सोशल मीडियावर लाईव्ह असल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात, अर्णब गोस्वामी यांच्याकडे मोबाईल फोन कसा पोहोचला? याची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली आहे.