पुणे-सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे आता दुर्घटनांचे सत्र सुरू झाले आहे. आज (६ जुलै) पहाटेच्या सुमारास मावळ तालुक्यातील पाटण गावात एका घरावर डोंगरकड्यावरून मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या ढिगाऱ्याखाली संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब अडकल्याची प्राथमिक भीती व्यक्त केली जात असून, घटनास्थळी बचावकार्याला युद्धपातळीवर सुरुवात झाली आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासन तात्काळ अलर्ट मोडवर आले आहे. पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी (DDMO) दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेची माहिती मिळताच मावळचे तहसीलदार आणि स्थानिक महसूल विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. मुसळधार पाऊस आणि चिखलाचे साम्राज्य यामुळे सुरुवातीला बचावकार्यात अडथळे येत होते, मात्र स्थानिकांच्या मदतीने प्रशासनाने तातडीने मातीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू केले आहे.
एनडीआरएफचे ३० जवानांचे विशेष पथक दाखल
मातीचा आणि दगडांचा मोठा ढिगारा असल्याने स्थानिक पातळीवरील मदत अपुरी पडत होती. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पुणे येथील ५ व्या बटालियनला पाचारण करण्यात आले आहे. निरीक्षक रविंदर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली एनडीआरएफचे ३० सदस्यांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले. यामध्ये १ वरिष्ठ अधिकारी, २ अधिकारी आणि २७ जवानांचा समावेश आहे. हे पथक अत्यावश्यक आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव साहित्यांसह आज पहाटे ५.५० वाजताच घटनास्थळाकडे रवाना झाले असून त्यांनी आता बचावकार्याची सूत्रे हाती घेतली आहेत. सध्या पाटण गावात अत्यंत तणावपूर्ण वातावरण असून, संपूर्ण यंत्रणा ढिगाऱ्याखालील नागरिकांचा शोध घेत आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत अधिकृतरीत्या कोणत्याही जीवितहानीची नोंद झालेली नाही. आत अडकलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना लवकरात लवकर आणि सुखरूप बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. संपूर्ण राज्याचे लक्ष आता या बचाव मोहिमेकडे लागले आहे.

