औरंगाबाद -औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एकनाथ शिंदे सरकारवर जोरदार टीका केली आहे. औरंगाबादचं नामकरण केलं, मात्र औरंगाबादकरांना ८ दिवसांऐवजी रोज पाणी कधी देणार असा सवाल जलील यांनी सरकारला केला आहे. याआधी जलील यांनी नामांतराला विरोध करण्यासाठी औरंगाबादेत भर पावसात मोर्चा काढला होता.जलील म्हणाले की, नामांतरामुळे आमचे पासपोर्ट/आधार/पॅन/शैक्षणिक कागदपत्रे बदलण्यासाठी पैसे लागतील. त्याचा खर्च सरकार उचलणार का, हेही सरकारने स्पष्ट करावे. तसेच आता तरुणांना नोकऱ्या मिळू लागतील का? आमचे क्रीडा विद्यापीठही परत येईल का? इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर केव्हा मिळेल? असे प्रश्नही जलील यांनी उपस्थित करत औरंगाबादला नामांतराची नव्हे तर विकासाची गरज असल्याचंही जलील यांनी म्हटलं.