मुंबई :
‘अग्निपथ’ योजना युवकांसह देशासाठी फायद्याची असून त्यामुळे युवकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत होईल. अग्निवीरच्या भरतीत तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं, ही एक संधी आहे, असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार श्री. मंगलप्रभात लोढा यांनी केले. ते मुंबई भारतीय जनता पक्ष आणि हिंदूरोजगार डॉट कॉमतर्फे आयोजित अग्निपथ योजना मार्गदर्शन शिबिरात शनिवारी बोलत होते. शिबिर दादर येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पार पडले. मुंबई भाजपा उपाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, भाजप मुंबई सचिव व राष्ट्रीय ओबीसी मोर्चा सदस्य प्रतिक कर्पे, राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिव प्रकाश यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार श्री. मंगलप्रभात लोढा म्हणाले, आपल्याला चांगल्या भविष्यासाठी आजच तयारी करावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला बदलाव करावाच लागेल. अग्निपथ योजना देशासाठी अतिशय आवश्यक आहे. युवकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हावी, ही यामागची भावना आहे. आज जगातील अनेक देश सैन्याचे आधुनिकीकरण करत आहेत. देशाच्या सीमांचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. तरुण अग्निवीर समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतील असा आशावाद आमदार श्री. मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. शिबिरातील पहिल्या सत्रात निवृत्त ब्रिगेडियर श्री. अजित श्रीवास्तव यांनी अग्निपथ योजनेबाबत मार्गदर्शन केले. श्रीमती प्रिया सावंत यांनी व्यक्तिमत्व विकास विषयावर उपस्थित शिबिरार्थीना मार्गदर्शन केले. हिन्दूरोजगार डॉट कॉमचे श्री. हर्षल कंसाराजी यांनी आभार मानले.