आज भाजपकडून मुंबई कार्यालयात विजयी जल्लोष साजरा करण्यात आला. तथापि, या विजयात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला. त्यामुळे आता याच स्थितीवरून काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्विट करत फडणवीस यांच्या जखमेवर एक प्रकारे मीठ चोळले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हले आहे की, मुंबईच्या भाजपच्या कार्यालयात लग्न सोहळा, पण नवरदेव गायब
भाजप कार्यालयाच्या बाहेर जो फलक लावण्यात आला आहे त्यावर अमित शहा यांचाच फोटो नाही. त्यामुळेही चर्चा सुरु झाली आहे. देवेंद्र फडणीस यांचे दिल्लीतून पंख कापण्यात आले की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियामध्ये देवेंद्र फडणीस यांना का रोखण्यात आलं? याची चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस यांची महत्त्वाकांक्षा कधीच लपून राहिली नव्हती. त्या अनुषंगानेच त्यांची प्रत्येक वाटचाल सुरू होती. मात्र, आता यामध्ये भाजप सरकार स्थापन होऊनही मुख्यमंत्रि पदापासून दूर ठेवण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार नसल्याचे तसेच मंत्रिमंडळाबाहेर राहण्याचे जाहीर केल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी फडणवीस यांना विनंती करत मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट होण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा देवेंद्र फडणीस यांना मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यासाठी दोनदा फोन केल्याचे बोलण्यात आले. दस्तुरखुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करत देवेंद्र फडणीस मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून समावेश होत असल्याचे सांगितले. त्यामुळे या सत्ता नाट्यानंतर भाजपमध्येही सर्व काही आलबेल नसल्याचे दिसून आले.

