मुंबई-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधातील वक्तव्य अखेर केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना भोवले आहे. राणे यांना अखेर रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. राणेंविरोधात नाशिक आणि पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राणेंनी रत्नागिरी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर तातडीनं याबाबत मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यासाठीही राणेंच्या वकिलांनी प्रयत्न केले. पण मुंबई उच्च न्यायालयानंही याप्रकरणावर तातडीनं सुनावणी देण्यास नकार दिला .त्यामुळे रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक राणेंच्या घरी पोहोचले..
त्यांना अटक करुन संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. राणेंना पोलिसांनी ताब्यात घेण्याआधी डॉक्टरांच्या एका पथकानं त्यांच्या आरोग्याची तपासणी केली होती. राणेंची तब्येत ठीक नसल्याची माहिती आता समोर आली आहे. तशी माहितीच राणेंच्या आरोग्याची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.राणेंच्या आरोग्याची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. “नारायण राणे यांची प्रकृती ठीक नाही. त्यांना शूगर आहे आणि त्यांचं ब्लडप्रेशर जास्त होतं. त्यांची शूगर तपासायची होती पण ती तपासता आलेली नाही. पण त्याचं ब्लडप्रेशर जास्त आढळून आलं आहे त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे”, असं राणेंच्या आरोग्याची तपासणी केलेल्या डॉक्टरांनी म्हटलं आहे.दरम्यान नारायण राणे यांना घेऊन पोलिसांचा ताफा महाडच्या दिशेने रवाना झाला.